शुक्रवार, ३० मार्च, २०१२

त्या दिवसापासून १३ वर्षांच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या....


देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणारी गतिशील संघटना म्हणजे ज्ञान प्रबोधिनी. सुरुवातीस हे विधान समजायला खुपच अवघड जायचे.पण हळूहळू समाज दर्शन होत गेले व त्याचा दररोज नवा अर्थ उमजू लागला. आपल्याला अवती भोवती अनेक ठिकाणी असं काही करता येईल का? थोडं डोळसपणे पाहिले की अनेक गोष्टी उमजतात.

अंबाजोगाईतील गणेशोत्सव, त्यात प्रबोधिनीचा सहभाग जोरदार असायचा.शिस्तबद्ध मिरवणूक, सतत काही नवीन हे आता नित्याचे झाले आहे. मोठेमोठे ढोल कमरेला बांधून कित्येक तास वाजवायचे यासाठी बरीच शाररिक क्षमता लागते. ढोलाला ताशा व झांजा यांची साथ असते. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना असतात. अशा अंबाजोगाईतील प्रबोधिनीचा  वाद्य गट १६ रचना वाजवतो. दरवर्षी एखाद्या रचनेची निर्मिती होते. अतिशय जोश पूर्ण व वीररसपूर्ण असे हे वादन असते. समन्वय न बिघडू देता आपल्या संपूर्ण ताकदीने प्रत्येक जण वाजवत असतो त्याच प्रमाणे एकमेकांना प्रेरणा देत असतो.फक्त जोरात वाजवणे हा वाद्य गटाचा खरा हेतू नाही. गणेशोत्सवात अतिशय विचित्रपणे गणराया समोर अनेक जणांना नृत्य करताना आपण पाहतो. काही शुद्धीत असतात तर काही सोमरसाचे सेवन करून स्वर्गीय नृत्य करत असतात. यासाठी त्यांना साथ असते ती चित्रपटातील कर्णकर्कश्य गाण्याची. प्रबोधिनीचे संस्थापक संचालक आ. आप्पासाहेब पेंडसे हे सर्व दृश्य पहात होते. गणेशोत्सवात एक आदर्श घालून देण्यासाठी त्यांनी वीररस युक्त,जोशपूर्ण व अतिशय गतिशील असे बर्ची नृत्य सुरु केले. वाद्यगटाचे खरे दायित्व हे या बर्ची नृत्याला साथ देण्याचे.बर्ची नृत्य हा प्रकार अंबाजोगाईतील मुली व मुलं हे पहिल्याच वर्षी शिकले. त्याचे सादरीकरण अनेक ठिकाणी झाले. 

अंबाजोगाईतील गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक इतर ठिकाणांपेक्षा काही वेगळी नव्हती. जे सर्व ठिकाणी होते ते इथे पण होत होते. सर्व वयोगटातील मुलं मोठ्या संख्येने प्रबोधिनीत येऊ लागल्यानंतर अंबाजोगाईतील विसर्जन मिरवणूकीत सहभागी व्हायचे ठरवले.खूप सराव केला. खूप उत्साहात व जोशात मिरवणूक निघाली. रात्री साडे नऊच्या आसपास सादरीकरण व परीक्षण शिवाजी चौकात झाले. शिवाजीचौकात मोठया संख्येने अंबाजोगाईकर विसर्जन मिरवणुकीतील मंडळांचे सादरीकरण पाहण्यासाठी येतात. प्रबोधिनीच्या सादरीकरणाच्या थोड्या आधी महेंद्रभाई व प्रशांत दिवेकर पुण्याहून आले. त्या आधीच आशुतोष बारमुख आम्हाला मदत करण्यासाठी आला होता. एकदम जबरदस्त प्रात्यक्षिक झाले आणि अगदी दिलेल्या वेळेत. अंबाजोगाईकरांना एक वेगळे व आकर्षक प्रात्यक्षिक पहावयास मिळाले. प्रबोधिनीच्या मंडळाला त्या वर्षीचे पहिले पारितोषिक मिळाले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत माझा पण पहिल्यांदाच असा कर्ता सहभाग होता.त्यामुळे ते वातावरण खूप जवळून अनुभवता आले. खूप काही करण्याची संधी होती. तरुणाईची प्रचंड उर्जा वाहताना दिसली. पण मनात एक मोठी खंत होती.जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या आम्हा लोकात भवानीदेवीला फारसे स्थानच नव्हते. गणेश मिरवणुकीत फार महत्वाचे स्थान स्त्रियांना नव्हते. प्रेक्षक म्हणून त्यांची उपस्थिती मोठी होती. त्यांचा सहभाग त्यावेळी असणाऱ्या वातावरणात वाढवणेही शक्य नव्हते. दोन वर्षांनी आम्ही मुलीचे ढोल पथक बसवले. खूप मेहनत घेतली पण निसर्गाने त्यावेळी खुपच मोठ संकट उभे केले. मिरवणूक चालू झाली व पाऊस धोधो पडू लागला. सर्वांची निराशा झाली. साडे आठ, नऊच्या आसपास पाऊस थोडा थांबला व एक प्रात्यक्षिक सावरकर चौकात करता आले. ज्या प्रमाणात प्रयत्न केला होता त्या प्रमाणात नवा पायंडा पाडण्यास आम्हाला यश नाही आले.

मागच्या वर्षी मात्र आम्ही पूर्ण तयारीने उतरलो. युवतींचा वाद्य गट मोठा होता. मलाही अंबाजोगाईच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा दहा वर्षांचा अनुभव होता. शिवाजी चौकात अनेक गणेश मंडळांच्या प्रमुखांना स्वागत स्वीकारताना बघितलं होत. अंबाजोगाईत २५-३० तरी नोंदणीकृत गणेश मंडळ आहेत. पण गेल्या दहा वर्षांत मला एकही महिला गणेश मंडळाची अध्यक्ष असल्याचे दिसले नाही. प्रबोधिनीचे गणेश मंडळ पण त्यास अपवाद नव्हते. त्याच वेळी निर्णय घेतला या वर्षी आपल्या गणेश मंडळाची अध्यक्ष महिला असेल. पण कोण हे दायित्व स्वीकारणार ? मन थोडं अस्वस्थ होतं. प्रबोधिनीतील सर्वांना माझी कल्पना आवडली. पण अध्यक्ष कोण होणार या बाबत प्रश्नच होता. सर्व जण विचार करत असताना सगळ्यांच्या तोंडून नाव आले मीराताई. सर्वांनी एकमताने मीराताईंची निवड केली. अगदी नोंदणी पासून अनेक ठिकाणी सर्वांना आश्चर्य वाटत होतं. शिवाजी चौकात नगराध्यक्षांच्या हस्ते मीराताईंनी स्वागत स्वीकारले. तो अंबाजोगाईतील ऐतिहासिक क्षण होता.
ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार कार्य अंबाजोगाईत सुरु झाल्यापासून मीराताई कार्यरत होत्या.माझ्या मावशीच्या घराजवळच त्या राहायच्या. गीता प्रबोधिनी सुरु झाल्यावर त्या श्रोत्या म्हणून यायच्या. पुढे शिशुविहार सुरु झाले. लता मावशी बरोबर त्यांनी त्याची जबाबदारी घेतली.

मीराताईंचे वडील मूळ धनेगाव धरणाजवळच्या काळेगाव सावरगावचे. कृष्णाबाई व किसनरावांच्या मीराताई दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. पहिले खंडेराव हे मीराताईंचे ५ वर्षांनी वडील बंधू. ताईंपेक्षा लहान बहिण हिरा. कृष्णाबाईंचे लग्न त्यांच्या नवव्या वर्षीच सोळा वर्षांच्या किसनरावांशी झाले होते. आजोबा मारोतीराव गावातील इनामदार. बरेच लोकांचे येणेजाणे होते. मीराताई आजोबांच्या फारच लाडक्या. आजोबा त्यांना प्रेमाने अहो मीराबाई म्हणून हाक मारायचे. वडील शिक्षक असल्याने ते बऱ्याच वेळा बदलीच्या गावाला असायचे. आई कधी त्यांच्या बरोबर तर कधी सावरगावला. तसे मस्त कुटुंब होत कुलकर्णींचे ! सर्व काही मजेत चालले होते.

खंडेराव खूप हुशार होते. त्यांना शिक्षणासाठी औरंगाबादच्या काकांकडे ठेवले होते. बारावीच्या परीक्षेचा खूप चांगला अभ्यास त्यांनी केला होता. इकडे मीराताई सावरगावला ७ वीत शिकत होत्या. खंडेराव चांगल्या श्रेणीत १२ वी पास झाले. त्यानां डॉक्टर व्हायचे होते. काकांचा मात्र त्यांनी कृषीमहाविद्यालयात प्रवेश घ्यावा असा आग्रह होता. काका थोडे रागीट होते. खंडेरावांनी आपल्या आवडी नुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. या बाबत त्यांनी काकांना अंधारातच ठेवले. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला खरा पण काही दिवसात ते खूप आजारी पडले. त्यांना मधुमेह निघाला. इन्सुलिनचे इंजेक्शन सुरु झाले. त्तीन महिने ते काही महाविद्यालयात जाऊ शकले नाहीत. आजार थोडा आटोक्यात आल्यावर ते महाविद्यालयात गेले. महाविद्यालयाच्या प्रमुखांनी त्यांना पालकांचे आजारी असल्याचे पत्र घेऊन येण्यास सागितले. खंडेराव काकांकडे गेले व त्यांनी त्यांना पत्र देण्यास सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे व ते ही न सांगता हे पाहून काका चिडले व रागात म्हणाले, “माझं जर ऐकायचे नसेल तर इथे राहायचे नाही व मी तर या पत्रावर सही पण करणार नाही.”

खंडेराव पण थोडे अस्वस्थच झाले व त्यांनी सरळ सावरगावची वाट धरली. आजोबा व वडिल त्यांची समजूत काढत होते. काकांचे बोलणे खंडेरावांनी थोडे मनावरच घेतले होते. ते काही औरंगाबादला काकांकडे जाण्यास तयार नव्हते. याच काळात त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. इन्सुलिनचे इंजेक्शन दररोज घ्यावे लागायचे ते चारपाच दिवस घेतले नाही. आजार अधिकच बळावला. त्यांना अंबाजोगाईच्या दवाखान्यात नेण्यात आले. अंबाजोगाईतील डॉक्टर काही दाखल करून घेण्यासाठी तयार नव्हते. “आजार विकोपास गेला आहे. इथे उपचार होणार नाहीत. औरंगाबादला न्यावे लागेल.” डॉक्टर सांगत होते.

औरंगाबादला जाणारी फक्त एकच बस आणि ती ही गेली होती. आता सकाळीच बस. दुसरे कुठले वाहन मिळणे अवघड. शेवटी राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ती रात्र काही खंडेराव काढू शकले नाहीत. रात्रीच त्यांचे निधन झाले.

मोठा झालेला वंशाचा दिवा असा अचानक गेल्याने कृष्णाबाईना फार मोठा धक्का बसला होता. त्यांना यातून सावरणे खुपच अवघड गेले. “आता दोनच मुली, त्यांची लग्न झाली की त्या निघून जाणार मग आम्हाला कोण सांभाळणार?” या भीतीने कृष्णाबाई नेहमी चिंतीत असायच्या. आत्ता त्या तिशीत पोहोचल्या होत्या. त्यांनी निर्णय घेतला एक अपत्य होऊ द्यायचे.

चवथ्या अपत्यासाठी कृष्णाबाईना दिवस गेले. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. चवथी मुलगी झाली. याचा धक्का त्यांना परत बसला. त्यांनी ते फारच मनावर घेतले. मुलीची व आईची तब्येत फारशी चांगली नव्हती. अडीच महिने झाले. रात्री कृष्णाबाईना फणफणून एकशे चारपर्यंत ताप आला. धनेगावच्या वसाहतीतील डॉक्टराना दाखवले. त्यांनी अंबाजोगाईला नेण्याचा सल्ला दिला. पण परत तीच समस्या बस एकच आणि तीही सकाळी. त्या रात्रीच कृष्णाबाईंनी प्राण सोडले. मीराताई, हिरा, आणि छोटं पिल्लू ज्याचे अजून नाव पण ठेवले नव्हते यांचे मातृछत्र हरवले. कुठल्याही लहानग्यांची आई जाणे फारच अवघड असते पण अडीच महिन्याच्या तान्ह्या बाळाचे आई जाणे म्हणजे फार कठीण. माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात न त्या प्रमाणे बाळाची जिम्मेदारी मावशीने घेतली व ती त्याला घेऊन आपल्या घरी गेली. पुढे शिकण्यासाठी मीराताईं कळंबला काकांकडे गेल्या.

एक दिवस मावशी लहान बाळाला घेऊन सावरगावला आली. ती थोडी अस्वस्थच होती.

“या पुढे नाही सांभाळता येणार मला.” तिने घरातील सर्वाना सांगितले.

किसनराव व मारोतीराव समोर मोठाप्रश्न उभा राहिला. लहान लेकराला सांभाळणे खूप कठीण होते. शेवटी मीराताईनां कळंब हून परत बोलावण्यात आले. त्या दिवसापासून १३ वर्षाच्या मीराताई अडीच महिन्याच्या बाळाच्या आई झाल्या. स्त्रियांमध्ये हे मातृत्व जन्मतःच असते असं मला वाटते.माझी भाच्ची, शिशुशाळेतील अनेक मुली ज्यावेळी त्यांच्या बाहुल्यांच्या आई होऊन, अगदी आई प्रमाणे वागतात त्यावेळी हे खूप जाणवतं. बाहुलीची आई होणं आणि खऱ्या बाळाची आई होणं, यात खूप फरक आहे. पिल्ल्याला सकाळी उठल्यापासून त्याची शी-शु,स्नान, दुध पाजणे , त्याचे कपडे घालणे,जोजावणे,झोपवणे या सर्व गोष्टी मीराताई खूप तत्परतेने करत होत्या. या सर्वाबरोबर त्या घरच्या सर्वांचा स्वयंपाक आणि तो ही चुलीवर करत असत. इनामदारांच्या घरात अनेक लोकांचे येणे जाणे. त्यांची व्यवस्था सगळ सगळ मीराताई खूप शांत पणे करायच्या. घरात दुसरं कुणी बाई माणूस नव्हते. खूप कष्टानी ताई घर सांभाळत होत्या. मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळण्याचे त्यांचे वय, पण त्या वास्तवातील गृहिणीचे व आईचे काम करत होत्या.

किसनरावांना अनेकांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. तीन तीन मुली त्यांचे कसे होणार? मोठा प्रश्न होता. आजोबा मात्र याच्या विरोधात होते. त्यांची दोन लग्ने झालेली. त्यामुळे वास्तवाचे चटके त्यांनी सोसले होते. किसनरावांनी काही दुसरे लग्न केले नाही.रात्री लहान बाळाला झोपवणे खूप कठीण काम. आजोबा व मीराताई यांच्या मध्ये लहान बाळ असे. मध्येच ते श्वास कोंडून रडत जागे होई. दिवसभर खूप अंग मेहनत करून झोपलेल्या मीराताईंना आजोबा उठवत. मग त्या  त्याला पाणी पाजून थोडे मांडीवर घेऊन थोपटून शांत करत.

दिवसांमागून दिवस जात होते. त्या दिवशी मामी सावरगावला आली होती. आज मीराताईंना खुपच काम पडले होते. मीराताई, मामी व लहान बाळ आज सोबत झोपले होते. सर्वांना गाढ झोप लागली होती. नित्याप्रमाणे मीराताई सकाळी उठल्या. काही वेळानी त्या बाळासाठी दुध घेऊन आल्या. दुध चमच्याने भरवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या पण बाळ काही दुध पीत नव्हते. त्याच्या तोंडातून ते बाहेर पडत होते.

मीराताईंनी आजोबांना हाक दिली. आजोबा लगेच आले. त्यांनी बाळाला पाहिले. त्यांना समजायचे ते समजले होते. बाळ शाश्वत निद्रेत गेले होते. एक दीड वर्षाच्या काळात मीराताईंनी तीन मृत्त्यू पहिले होते. प्रचंड दुःख सहन केल्यावर व खूप अनाहूत संकटांना सामोरे गेल्यावर न डगमगता सामोरे जाण्याची वृत्ती माणसांमध्ये निर्माण होत असावी. तो मग प्रत्येक गोष्टीला अगदी धिटाईने न डगमगता हसतहसत तोंड देतो. ते हास्य त्यांचे नित्याचे बनते. कितीही पैसे देऊन हा अलंकार आपल्याला बाजारात मिळत नाही. ते जीवन संघर्षाचे बक्षीस असते. मीराताईंच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांची निडर वृत्ती मला नेहमी अचंबित करते.

वयात आलेली मुलगी म्हणजे पहिल्यांदा तिचे लग्न लाऊन देणे ही त्यावेळची जगरहाटीच होती. त्यात आई नसल्याने अधिकच चिंता. धनेगाव धरणावर शामसुंदर देशपांडे नावाचा एक चांगला अविवाहित तरुण आला होता. मीराताईंच्या वडिलांना मुलगा चांगला वाटला. मीराताईचे लग्न त्यांच्या पंधराव्या वर्षी शामसुंदर देशपांडेशी झाले. वर्षभरात त्यांना किरण हा पहिला मुलगा झाला. या सर्वात मीराताईंची मनातून असलेली शिकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. यासर्व प्रवासात मात्र त्या एक खूप चांगल्या गृहिणी व आई झाल्या होत्या. किरण थोडा मोठा झाल्यावर मात्र त्यांनी दहावीची परीक्षा १७ नंबरचा फॉर्म भरून व स्वतः घर सांभाळत अभ्यास करून दिली. त्या दहावी पास झाल्या. पुढे D.Ed करण्याची इच्छा होती पण घर सांभाळणे पण गरजेचे होते. याच काळात SP काकांची ( मीराताई चे पती) बदली माजलगावला झाली. वैद्य काकांचे ते मित्र त्यामुळे आम्ही त्यांना काका म्हणायचो. त्यांना माजलगावला असताना स्वप्नाली झाली. वडिलांच्या निवृतीनंतर त्यांची जबाबदारी पण मीराताईंनी घेतली. घरात सासू,सासरे व वडील असे तीन वृद्ध लोक,मुलं व काकांची चोख व्यवस्था ताई ठेवायच्या.

 मीराताईंनी यातून वेळ काढून त्यांनी बालशिक्षणाचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. अगदी मुलींच्या शाळेत मधल्या सुट्टीत खाऊ विक्रीची व्यवस्था पण त्या करण्यास तयार होत्या. कोणताच संकल्प पूर्ण होत नव्हता. मुलं पण आत्ता मोठी झाली होती.
अंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम सुरु केल्यावर विवेक कुलकर्णी सर अंबाजोगाईत आले होते. त्यांनी अगदी माझे दिवसातील मिनट आणि मिनिटांचे नियोजन करून दिले त्याच बरोबर जागेच्या वापराचे. दुपारी ११ ते २ मध्ये जागा मोकळी असायची कारण त्या काळात गावातील मुलं शाळेत असत. काय करावे या काळात? माझ्या समोर मोठा प्रश्न होता. याच काळात मला कळले की गणेश पिंगळे सरांच्या पत्नीने ज्ञान प्रबोधिनी,सोलापूरचा शिशु अध्यापिका अभ्यासक्रम केलेला आहे. माझे विचार चक्र चालू झाले. चला या काळात बालवाडी सुरु करावी. पिंगळे ताईंशी या बाबत बोलणे झाले पण त्यांना शक्य नव्हते. मग चोथवे काकूंना विचारले पण त्या आधीच एका बालवाडीत शिकवत होत्या. शेवटी लतामावाशीने मीराताईंच्या नावाचा प्रस्ताव माझ्या समोर ठेवला. मी लगेच तो स्वीकारला, कुठलेही कागद पत्र न पाहता. माझा विश्वास त्या कागद पत्रापेक्षा व्यक्तीच्या कार्यावर जास्त आहे.

लतामावशी बरोबर मीराताईंनी शिशुविहारची सुरुवात केली. २५ मुलांचा गट घेण्याचे ठरले. काही दिवसातंच त्या मुलांच्या लाडक्या झाल्या. त्यांच्यात दडलेल्या सुप्त शक्तीला प्रबोधिनीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले. थोड्या दिवसांमध्ये शिशुशाळेला अंबाजोगाईच्या बालशिक्षणात लौकिक मिळाला. दुसऱ्यावर्षी चोथवे काकू आल्या. मुलांची संख्याही वाढली. आता शिशुशाळेत २५० मुले आहेत. मीराताईंचा मुलगा अमेरिकेत मोठा इंजिनिअर आहे. मुलीचे लग्न होऊन तिला मुल झाले. ताई आता आजी झाल्या आहेत. दम्याचा खूप त्रास असून सुद्धा शिशुशाळा व प्रबोधिनी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या नित्य जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. त्यांनी प्रबोधिनीची द्वितीय प्रतिज्ञा घेतली. जीवनाचे बरेच अनुभव घेतलेली व संकटांशी दोन हात करत जीवन संग्राम करणारे सहकारी 

सोबत असले की काम अधिक सुखद होते.
दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवन भर अविचल चलता है ............   


  

बुधवार, २८ मार्च, २०१२

पर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहताना गुरुजींच्या चेहऱ्यावर जीवनाच्या गणिताचे अतिशय अवघड प्रमेय सोडवल्याचा आनंद व आत्मविश्वास दिसत होता.


वि.र .जोशी गुरुजी (मरुतमलाई ,कन्याकुमारी)
१९९९ ला मी अंबाजोगाईत राहायचे या उद्देशाने अरुणाचल प्रदेशातून अंबाजोगाईला आलो. अंबाजोगाईत काय कार्य करायचे हे निश्चित नव्हते पण पुढील सहा महिने तरी रामकृष्ण व विवेकानंद यांच्या साहित्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच बरोबर भगवद्‌गीतेचा अभ्यास पण एक संघटन व मनुष्य विकसनाचे शास्त्र म्हणून करत होतो. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक आ. गिरीशरावांशी तसे बोलणे पण झाले होते. मला संस्कृत येत नसल्याने भगवद्‌गीतेचा अभ्यास करणे अवघड होते. मी अश्या लोकांच्या  शोधात होतो ज्यांचा भगवद्‌गीतेचा अभ्यास चांगला आहे. मामा पारगावकर, मालतीताई धारूरकर,  देशमुख काकू अश्या अनेक जणांची भेट घेतली व दर शनिवारी एक तास थोरल्या देवघरात आम्ही संध्याकाळी ६ ते ७ एक तास एका वेळी फक्त एका श्लोकाचा अर्थ आम्ही समजून घेत असूत. अभ्यास करून जाणत्या लोकांनी पहिल्यांदा अर्थ सांगायला सुरुवात केली. त्याला आम्ही नाव दिले गीताप्रबोधिनी.


संध्याकाळी काही कारणास्तव मी सावरकर चौकात गेलो होतो. अगदी चौकातच मला वि.र जोशी गुरुजी दिसले. संदीकर गुरुजींना भेटल्यावर गीतेच्या अभ्यासासाठी वि.र जोशी गुरुजीना नक्की भेट असे सांगितले होते. गुरुजी दिसल्याबरोबर खूप आनंद झाला. त्यांना मी नमस्कार केला व विचारले,
“ओळखलंत का गुरुजी मला ?”
माझ्यात खूप बदल झालेला होता. गुरुजींना मी १६ वर्षांनी भेटत होतो. त्यांनी ओळखणे शक्य नव्हते.
“मी प्रसाद चिक्षे.” मी नाव सांगितले.
गुरुजींनी हातात हात घेतला व विचारले, “अरे वा ! काय करतोस ?”
“गुरुजी इंजिनिअरींगचे पदव्युत्तर शिक्षण झाले. विवेकानंद केंद्राचे अरुणाचलप्रदेश मध्ये काम केले गेले पाच वर्ष. आता अंबाजोगाईत आलो आहे. सध्या गीतेचा अभ्यास चालू आहे. तुम्ही पण या की थोरल्या देव घरात दर शनिवारी संध्याकाळी.” माझे थोडक्यात इतिवृत्त गुरुजींना सांगितले.
“तू पण घरी ये एकदा. माझा मुलगा रवी इंजिनिअरिंगला आहे. त्याला पण तुझे मार्गदर्शन होईल.” गुरुजींनी खूप प्रेमाने आमंत्रण दिले.

काही दिवसांनी मी गुरुजींच्या घरी गेलो. आनंदनगर मध्ये ते रहात होते क.र.जोशी गुरुजींबरोबर. घराचे नाव पण मस्त होत “करविर”. करविर पिठाची महालक्ष्मी हे त्यांचे कुलदैवत व दोन्हीही गुरुजींचे आद्याक्षरे घेतली तर हे नाव बनते. गुरुजी मस्त घोंगडीवर भिंतीला टेकून पांढरे लांब बाह्याचे बनियन व पांढरी लुंगी घालून ते बसले होते. चेहऱ्यावर १६ वर्षांपुर्वीचेच भाव होते. थोडे केस पांढरे झाले होते. तीच सहजता व आपुलकी होती. आवाजात थोडा फरक झाला होता. बोलता बोलता आवाज घोगरा होई.

गुरुजींची पत्नी माझ्या आईची विद्यार्थिनी. रवी व स्नेहल हे त्यांची दोन मुलं.रवी अंबाजोगाईतील अभियांत्रिकी महाविद्यालयात तर स्नेहल केजच्या D.Ed कॉलेज मध्ये शिकत होते. रवीची व माझी ओळख झाली. कधी कधी ७ वीचा अभ्यास करत असताना तहान लागल्यावर आम्ही गुरुजी राहत असलेल्या लादनीत पाणी पिण्यासाठी जात असू त्यावेळी लहाग्या रवी बरोबर खूप खेळत असुत. त्याचे बोबडे बोलणे खूप मजेदार वाटायचे.रवी खूप उंच झाला होता. डोळ्यावर चष्मा, अगदी टापटीप इन शर्ट मध्ये.त्याची आणि माझी लवकरच मैत्री झाली.

गुरुजी अंबाजोगाई जवळील चंदन सावरगावचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावरगावलाच झाले. अठरा खणांचे माळवद व त्यासमोर विस्तीर्ण ओसरी. पहिली ते सातवी पर्यंतचे गुरुजींचे शिक्षण गावातील मठात चालणाऱ्या जिल्हापरिषद शाळेत झाले. आजोबांबरोबर मस्त घोड्यावरून ते शाळेत जायचे. चार भाऊ व एक बहिण असा त्यांचा परिवार. घर मात्र अनेक लोकांनी भरलेलं असे. कमीतकमी २ /३ जण तरी घरी शिकण्यासाठी रहात असत.वडील सुरुवातीला शिक्षक होते नंतर परंपरागत भिक्षुकी करत होते.

७ वीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणाचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. वडिलांच्या काकीने आपल्या मुली कडे म्हणजे गुरुजींच्या आत्याकडे ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. आत्याला दम्याचा त्रास होता. केजला पाणी नदीतून आणावे लागे. ते त्यांना खूप त्रास दायक होते. गुरुजी तिथे राहिले तर या कामात आत्याला खूप मदत होणार होती. गुरुजी सरळ आत्याला बोलायला केजला गेले. आत्याच्या सासूबाई सोवळ्या होत्या पण खूप मायाळू व परिपक्व ! एक विद्यार्थी आपल्या घरी राहून अध्ययन करणार या विचाराने त्या खुपच खुश झाल्या. आत्याला पण मदत होणार होती व गुरुजींना पुढे शिकता येणार होते.

पुढचे शिक्षण केजच्या हायस्कूलमध्ये सुरु झाले. गणितात खुपच रस असल्याने त्यांनी “Higher maths” घेतले. पण मोठा प्रश्न निर्माण झाला. गणित शिकवण्यासाठीचे शिक्षक सातत्याने बदलत होते व काही काळ तर असा गेला की शिक्षकच नाहीत. दहावी पर्यंत गणिताचा अभ्यास गुरुजींनी स्वतःच केला. याचमुळे प्रबोधिनीतील स्वयंअध्ययन पद्धत त्यांना फारच भावली. दहावीला नवीन आलेले मुख्याध्यापक श्री अंबेकर खूपच तत्पर व कल्पक होते. दहावीची परीक्षा दोन महिन्यावर आली आहे व त्यांना गणित शिकवायला शिक्षक नाहीत हे समजल्यावर त्यांनी तत्परतेनी धारूरहून श्रोत्री गुरुजींना खास गणित शिकवायला आणले. मोकळ्या मैदानात ते सकाळी सहा वाजता “Higher maths” असणाऱ्या मुलांना शिकवायचे. दोन महिने त्यांनी खूप चांगली तयारी करून घेतली. दहावीच्या परीक्षेत शाळेतील फक्त चारच मुलं पास झाली तर बाकी सगळे गणितात नापास झाले. गुरुजी ४८ टक्के गुण घेऊन पास झाले.

कद्रे गुरुजी नावाचे गुरुजींच्या आईचे भाऊ शिक्षक होते. गुरुजींचे गुण त्यांनी पाहिले.
“विजूने पुढे अंबाजोगाईला जाऊन शिकले पाहिजे. माझे कुटुंब मुलांच्या शिक्षणासाठी अंबाजोगाईला आहे. तिथे विजू राहील व त्याच्या जेवणाची व्यवस्था होईल. माझ्या जेवणाची व्यवस्था तुम्ही इथे सावरगावात करा.” कद्रे गुरुजींनी आईंना सुचवले.
सूचना स्वीकारली गेली व गुरुजी त्यावेळचे PUC विद्यापीठ पूर्व अभ्यासक्रमा साठी अंबाजोगाईत दाखल झाले. त्यांनी वाणिज्य शाखा घेतली. देवघराच्या पुढे बोळीत असलेल्या कुर्डूकरांच्या वाड्यात कद्रे कुटुंब रहात होते. तिथेच गुरुजींची त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या दिलीप कुर्डूकरांशी व वकील आर. डी देशपांडे यांचा मुलगा सुधीरशी घट्ट मैत्री झाली. दिलीप व सुधीर बरोबर गुरुजींचा अभ्यास मस्त चालू होता. सुधीर हा  खुपच वेगळा. खूप सारे अवांतर वाचन. अफाट बुद्धिमत्ता व त्यात निर्भयता. एक अवलियाच. सबनीससर, माहुरकरसर, हरीश देशपांडे असे अनेक नामवंत प्राध्यापक त्यांना शिकवायला होते.

PUC च्या परीक्षेचे दोन महिने राहिले तो एक दुःखद घटना घडली. कद्रे गुरुजी अचानक कर्करोगाने निधन पावले. त्यांच्या कुटुंबाला स्वतःचे भागवणे अवघड होऊन बसले. शेवटी दुसऱ्या एका नातेवाइकांकडे व्यवस्था झाली व गुरुजी PUC मध्ये अव्वल दर्जाने पास झाले. माहुरकरसर शिकवत असलेल्या बुककीपिंग या विषयात त्यांना १०० पैकी ९८  गुण मिळाले व ते सर्व प्रथम आले.
निकाल लागायच्या आतच एक नवीन अभ्यासक्रम सुरु झाला होता. दहावी पास मुलांसाठी प्राथमिक शिक्षकांसाठीचा D.Ed अभ्यासक्रम. नेकनूर येथे महाविद्यालय सुरु झाले. प्रवेश ज्या विद्यार्थ्यांना मिळेल त्यांना ४० रुपये प्रति महिना विद्यावेतन होते. गुरुजींना हे कळताच ते व व्ही.टी कुलकर्णी गुरुजी या दोघांनी प्रवेश घेतला. ४० रुपये विद्यावेतन फारच महत्वाचे व गरज भागवणारे होते. इकडे ९८  गुण घेणारा विद्यार्थी कुठे गेला याचा शोध मात्र अंबाजोगाईतील प्राध्यापक करत होते. गुरुजी D.Ed. चा अभ्यासक्रम ७८ % गुण घेऊन पास झाले. त्यात त्यांच्या विद्यावेतनात त्यानी बचत करून १८० रुपये शिल्लक ठेवले.

बडेगावच्या ( बर्दापूर ) रेणूक विद्यालयात मुलाखत व पाठ देऊन गुरुजी सावरगावला निघाले. बस अंबाजोगाईला येऊन बदलावी लागायची. अंबाजोगाईला ते आले व सावरगावच्या बसची वाट पहात होते. बस स्थानकावर त्यांना सुधीर देशपांडे हा त्यांचा PUC मधील मित्र भेटला. शिक्षकाच्या पदासाठी मुलाखत देऊन आल्याचे कळताच तो म्हणाला. “ आपल्या प्राथमिक शाळेत जागा आहेत की तिथे अर्ज दे.”
गुरुजींना त्याबाबत फारशी माहिती नव्हती.
“मी पहातो किती जागा आहेत व तुला तसे कळवतो.” खुपच आश्वासक पणे सुधीर देशपांडे बोलले.
ते आता वाणिज्य तृतीय वर्षाला होते. आपल्या पत्त्याचे पोस्ट कार्ड गुरुजींनी सुधीर देशपांडेना दिले.
सुधीर देशपांडे तसे बिनधास्त व मित्रांसाठी बरच काही करायचे. त्यांचे वडील अंबाजोगाईतील प्रसिद्ध वकील व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी. त्यामुळे संस्थेतील अनेक लोक त्यांच्या परिचयाचे होते. योगेश्वरी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यावेळी बाजीराव गुरुजी होते.सुधीर भाऊ त्यांच्या कडे गेले व गुरुजींबद्दल सर्व काही सांगितले.

“तुम्ही ठरवलं तर त्याला तुम्ही नक्की घेऊ शकता, तुम्ही त्याला घ्याच आपल्या शाळेत. अहो तो खूप हुशार आहे. ७८% पडेल आहेत त्याला D.Ed मध्ये.” नेहमीच्या बिनधास्तपणे बाजीराव गुरुजींना सुधीरभाऊनी गळ घातली.

“अरे अर्ज तरी दे आधी त्याचा.” बाजीराव गुरुजी म्हणाले.

गुरुजींकडूनच कागद घेऊन सुधीरभाऊनी गुरुजीचा शिक्षक पदासाठीचा अर्ज भरला. येवढ्यावर ते थांबले नाहीत तर संस्थेचे कार्यवाह त्यावेळी बेथुजी गुरुजी होते. त्यांच्याकडे ते गेले व त्यांना गुरुजींबद्दल सांगून. शिक्षक म्हणून घेण्याची विनंती केली.

मुलाखत व पाठ घेण्यासाठी गुरुजी अंबाजोगाईला आले. साहजिकच पहिल्यांदा ते गेले सुधीर भाऊंकडे.
योगेश्वरी प्राथमिक शाळेत पाठ झाला. गुरुजींनी गणिताचा पाठ घेतला व ते परत सावरगावला गेले.
सुधीरभाऊ पिच्छा सोडणारे नव्हते. ते बाजीराव गुरुजींकडे गेले व विचारले,
“गुरुजी काय झालं विजूचं?

“त्याची भाषा थोडी अशुद्ध आहे आणि थोडं उच्चारात स्पष्टता नाही.” नकार कळवण्याच्या भाषेत बाजीराव गुरुजी बोलले.

“हो थोडी ग्रामीण भाषा आहे. ग्रामीण भागातीलच आहे न तो. पण उच्चारातील अस्पष्टता अशक्य, मी त्याच्या बरोबर एक वर्ष राहिलो आहे. खूप स्पष्ट बोलतो तो.” खूप विश्वासाने सुधीरभाऊ बोलले.
तसं हार मानणाऱ्यातील ते नव्हते. असा बिनधास्तपणा अंबाजोगाईकरांच्या नसानसात भिनलेला आहे. म्हणूनच अंबाजोगाई हैदराबाद मुक्ती संग्रामचे केंद्र होते.

सुधीर भाऊ बेथुजी गुरुजींना भेटले त्यांनी पण गुरुजींच्या भाषेबद्दलच सांगितले. सुधीर भाऊ मात्र त्यांच्याशी सहमत नव्हते. ते बेथुजी गुरुजींना आपल्या मित्राची योग्यता पटवून देत होते. शेवटी बेथुजी गुरुजी म्हणाले, “त्याला परत एकदा पाठ घ्यायला सांग. या वेळी मात्र पाठ मराठीचा घ्यावा त्याने.”

“हो घेईल की त्यात काय. मी सांगतो त्याला लगेच.” उत्साहाने सुधीरभाऊ बोलले.

गुरुजी मराठीचा पाठ घेण्यासाठी अंबाजोगाईला आले. त्यांना कुठलाही विषय शिकवण्याबाबत समस्या नव्हती. “छान किती दिसते फुलपाखरू” ही कविता गुरुजींनी रंगून शिकवली. विद्यार्थी दशेत त्यांचे अक्षर थोडे खराब होते. D.Ed ला असताना फळ्यावर ते नीट यायचे नाही. आपले अक्षर सुंदर झाले पाहिजे असे त्यांना आता मनोमन पटले होते. अगदी बाजारातून अक्षर वळणदार होण्यासाठी मिळणारी अक्षर गिरवण्याची बरगे पाटी त्यांनी आणली व दररोज सराव सुरु केला. खूप सराव करून त्यांनी आपले अक्षर खुपच वळणदार केले. त्यांचे फळ्यावरचे लिखाण खुपच नेटके व आकर्षक असायचे. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, सुंदर, वळणदार व नेटके लिहावे यासाठी ते फार दक्ष असत. अनेक मुलांनी त्यांचा प्रसाद यासाठी बऱ्याच वेळा घेतला होता.

पाठ एकदम मस्त झाला. गुरुजी, विजू गुरुजी म्हणून योगेश्वरी प्राथमिक शाळेत रुजू झाले. सुधीर भाऊ पण खुश झाले. १८० रुपये प्रतिमहा पगार. दहावी पात्रतेच्या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. गुरुजींच्या बरोबर काही दिवस आधी तांदळे गुरुजी धारूरची जनता विद्यालयातील नौकरी सोडून योगेश्वरी प्राथमिक शाळेत रुजू झाले होते. थोडया दिवसात दोघांची चांगली मैत्री झाली. तांदळे गुरुजी वयानी खूप वडील होते पण निखळ मैत्रीच्या आड वय कसे येणार? नौकरी लागली, पगार मिळायला लागला म्हणून पुढील शिक्षण थांबवणाऱ्यातील गुरुजी नव्हते. महाविद्यालयात प्रवेश घेऊ दिला जाईल का याची शंका त्यांच्या मनात होती. मोकळे राहणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांनी मग हिंदीच्या विविध परीक्षा द्यायला सुरुवात केली. अगदी पंडित पर्यंतच्या. याच काळात प्रयोगातून विज्ञान (NCERT) चा अभ्यासक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरवले व त्यासाठी तालुक्यातील दहा शाळांची निवड करण्यात आली. योगेश्वरी प्राथमिक शाळा त्यामध्ये एक होती. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवायचे ठरले. योगेश्वरी प्राथमिक शाळेतून तरुण,कल्पक व उपक्रमशील वि.र. गुरुजींची निवड होणे स्वाभाविक होते. ते त्या प्रयोगात रमले व त्यातच ते जिल्हापातळीवरील शिक्षण प्रशिक्षणाचे प्रमुख बनले.

माध्यमिक शाळेत शिकवावे असे त्यांना वाटत होते. तशी संधी पण योगेश्वरी माध्यमिक शाळेत आली होती. पण मुख्याध्यापक बाजीराव गुरुजी त्यांना सोडायला तयार नव्हते. बेथुजी गुरुजींना इच्छा सांगितली तर ते म्हणाले की तुमचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले नाही. लगेच गुरुजींनी विद्यापीठातील पदवी परीक्षेसाठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांच्याबरोबर ४० वर्षांच्या तांदळे गुरुजींनी पण प्रवेश घेऊन अभ्यास सुरु केला. भालचंद्र मोटेगावकर, कोष्टगावकर हे सारे त्यावेळी नियमित अभ्यासक्रमाला होते. संध्याकाळी सुधीर देशपांडे,तांदळे गुरुजी, भालचंद्र मोटेगावकर व वि.र गुरुजी एकत्र प्राथमिक शाळेत अभ्यास करायचे. कालच्या पेक्षा आज पुढे गेले पाहिजे हे प्रबोधिनीपणाचे वैशिष्ट्य गुरुजींमध्ये खूप आधीच रुजले होते.

पुढच्या वर्गाला शिकवण्याची इच्छा खूप होती पण तशी संधी येत नव्हती. काय करणार? मनात तर चलबिचल होती. शेवटी ५ वी ते ७ वी च्या मुलांसाठी त्यांनी व तांदळे गुरुजींनी मिळून  मार्गदर्शन वर्ग सुरु केले. तांदळे गुरुजी इंग्रजी तर वि.र. गुरुजी गणित शिकवायचे. थोडया दिवसात त्यांच्या शिकवण्याची हातोटी मुलांना भावली व मुलांचे ते आवडते शिक्षक बनले. अनेक मुलं त्यांच्या वर्गाला येऊ लागली. काही संस्थेतील शिक्षकांची व पदाधिकाऱ्यांची पण होती. सहाजिकच त्यांच्या पर्यंत दोन्हीही गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोंचली वं ते प्रभावित झाले.


१९७८ ला माध्यमिक शाळेत अनेक जागा निघाल्या. तांदळे गुरुजी व वि.र गुरुजींची निवड झाली. तुकड्या कमी झाल्या तर नौकरी जाण्याचा धोका होता. अनेकांनी सांगितले की आता नियमित झालेली नौकरी सोडून कश्याला या फंद्यात पडता. कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या ज्यांना पुढे जायचे असते त्यांनी अश्या भीतीने पाऊल मागे घेणे शक्य नव्हते. दोघंही योगेश्वरी मंदिरा जवळील शाळेत रुजू झाले. फडके गुरुजी मुख्याध्यापक होते. दोघांच्या शिकवण्याच्या क्षमतांना ते जाणते होते. तांदळे गुरुजींना एकदम ७ वी चे इंग्रजी शिकवायचे दायित्व त्याच बरोबर ७ वी शिष्यवृत्तीची जवाबदारी वि.र गुरुजींना दिली. आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे सार्थक करण्यासाठी दोघंही खूप कष्ट घेत होती. त्याची प्रचीती लवकरच आली अनेक मुलं पहिल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली. दुसऱ्या वर्षी तर जिल्ह्यातील १६ जणांपैकी ९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली. वि.र. गुरुजींच्या प्रयत्नाला यश आले तर फडके गुरुजींनी टाकलेल्या विश्वासाचे त्यांनी चीज केले.    

शिक्षणातील नवनवीन प्रयोग सतत करत राहणे व त्यात यश मिळवणे यासाठी अंबाजोगाईकराना वि.र गुरुजी सर्व परिचित झाले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी गीतेची संथा कोष्टगावकर गुरुजींकडून घेतली. त्यांचे नित्य गीतापठण व अभ्यास हा त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनला. ७ वीत  ज्यांच्या मुळे गणिताची आवड लागली त्यांच्या बरोबर राहून आता गीता शिकायला मिळणार या कल्पनेंनी मी खूप भारावून गेलो होतो. शनिवारच्या गीताभ्यासाला गुरुजी आले व पुढे त्यात ते रमत गेले.

दर शनिवारचा आमचा गीता अभ्यास मस्त चालू होता. एकावेळी फक्त एका श्लोकाचा अभ्यास करून कुणीही एक जण बोलायचे. माझ्यासाठी हे खुपच उपयोगी होते. विविध पद्धतीने गीता समजून घेता येत होती. मामा पारगावकर वय वर्ष ८१ व मालतीताई धारूरकर वयवर्ष ७१ या दोघांचा उत्साह खुपच दांडगा होता. मामा तर भगवद्‌गीता जगले होते. एक छोटे किराणा सामानाचे दुकान ते चालवायचे. भिक्षुकी करायचे व खूप कष्टानी त्यांनी दिवस काढले. आपण जे भोगतो आहोत ते आपल्या मुलांना भोगावे लागू नये म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दुकानात फावल्या वेळेत ते भगवद्‌गीतेचा अभ्यास करायचे. दोन्ही मुले खूप शिकली एक प्राध्यापक तर दुसरा डॉक्टर झाला. मामांचे आयुष्य आता फक्त भगवद्‌गीतेच्या प्रचारासाठी होते. अनेक महिलांना व पुरुषांना त्यांनी गीता शिकवली.

गीतेच्या अभ्यासा बरोबरच प्रबोधिनी करत असलेल्या अनेक शिक्षणातील प्रयोगांबद्दल मी वि. र. गुरुजींना सांगायचो. प्रबोधिनीचे प्रकाशित साहित्य मी त्यांना वाचायला देत असे. माझा दैंनदिन अभ्यास व्यवस्थित सुरु होता. प्रबोधिनीच्या संदर्भात मी अंबाजोगाईतील अनेक लोकांना बोलत होतो. वेगवेगळी अनुभव येत होती. ज्यांच्या विचारांमुळे मी प्रभावित झालो होतो अश्या अनेक लोकांना प्रबोधिनीचे काम अंबाजोगाईत सुरु करण्यासाठी बोलत होतो.

“समाज हा प्रचंड अश्या आगीच्या वणव्या सारखा असतो. तो जे काही त्यामध्ये उभे राहील त्याला भक्ष्य  करून टाकतो. मग तृप्तीची ढेकर देतो. अश्या सामाजिक कामानी काही होत नाही. या पेक्षा वेगळ काही कर स्वतःच्या हिताचे.” असे समजून सांगणारे स्वर पण ऐकायला मिळाले.

तर विलासराव बेलुर्गीकर गुरुजींची मला शाळेत असताना खूप भीती वाटायची त्यांना भेटायला गेलो.
थोडं भीतभीतच त्यांना प्रबोधिनीच्या कामाबद्दल सांगितले.

“अरे वा ! चांगले काम करतोस की तू. तुझ्या सर्व उपक्रमांना आमच्या सर्वांची सर्व प्रकारची मदत व साहाय्य असेल.” विलासराव गुरुजी खुपच आत्मीयतेने बोलले.


 चैत्र प्रतिपदे नंतर प्रबोधिनीचे काही शैक्षणिक काम अंबाजोगाईत सुरु करावे असे वाटत होते. पण निश्चित असे काहीच होत नव्हते. संघटनशास्त्राचा अभ्यास व अंबाजोगाईचे भावविश्व, विचारविश्व मी मा.मा. क्षीरसागरांकडून समजून घेत होतो. संघटनशास्त्राचा त्यांचा अभ्यास खुपच तगडा होता.दररोज त्यांच्या बरोबर मी किमान एक तास बसायचो. विविध लोकांना भेटायला जायचो. खूप विषयांवर चर्चा व्हायची. मामांची, विषय समजून घेऊन त्यावर कोटी पूर्ण भाष्य करण्याची क्षमता अफलातून होती. माणूस समजून घेऊन त्याच्या क्षमतांना कश्या प्रकारे समाज विकासाचे व्यासपीठ संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे या बद्दलची त्यांची हातोटी विलक्षण होती.

शिक्षण व संघटन क्षेत्राचा योग जोडत चांगले मनुष्य निर्माणाचे कार्य त्यांनी गेले अनेक दशकं केली होती. गम्मत म्हणजे मामांचे संवाद कौशल्य भारीच होते. लहान मुलांपासून ते अगदी आपल्या विरुद्ध विचारांच्या लोकांशी ते सहजपणे बोलत. “मत भेद होने पर भी, मन भेद हो न पाये” हे त्यांची मैत्री असलेल्या अनेक लोकांकडे पाहून लगेच लक्षात येते. अंबाजोगाईत अनेक विचार नांदतात. त्या विचार प्रवाहासाठी उभे आयुष्य देणाऱ्यांची मांदियाळी या गावात आपल्याला दिसते. अनेक मोठे सामाजिक, शैक्षणिक प्रकल्प या लोकांनी उभे केले.  आपल्या विचारांचे समर्थन करताना त्यांच्यात होणारे संभाषण म्हणजे कुणालाही सहज पणे समृद्ध करणारी वैचारिक जुगलबंदीच असायची. सरते शेवटी एकमेकांची मजा घेत व सर्वांचे अंबाजोगाईच्या विकासातील आवश्यक स्थान ते मान्य करत. अंबाजोगाईचे कधी Mono culture होऊ दिले नाही या लोकांनी. मतभेद असणारच पण व्यक्तिगत पातळीवरकिंवा कश्याच्याही बाबतीत एकमेकांवर पातळी सोडून टीका कधी कुणी केली नाही. आधीच्या पिढीने पाडलेले चांगले आदर्श आपण नक्कीच पुढे जपले पाहिजेत हे या सहवासातून समजत होते.

मामांबरोबरच्या संवादातून मी अंबाजोगाईत प्रबोधिनीचेच काम करावे हे निश्चित झाले. प्रबोधिनी म्हणजे अनेक संस्था, संघटना,विचारधारा, माणसे यांच्यामध्ये पूल बांधणारी संघटना. माझा स्वभाव पाहता मला हे करणे जमेल असे मामाना वाटत होते. आपण एखाद्या संघटनेच्या महत्वाच्या स्थानावर काम करत असताना सुद्धा समोरील व्यक्तीस अभिव्यक्त होण्यासाठी कोणती संघटना योग्य आहे हे समजून घेऊन त्याला ते कामच कर म्हणून सांगण्याचा उमदेपणा मामांमध्ये होता.
प्रबोधिनीचे काम अंबाजोगाईत सुरु करायचे या माझ्या विचाराला एक जाणत्या संघटकाचा अनुभवाचा दुजोरा मिळाला व मग मी जोरात कामाला लागलो. माझ्याबरोबर काम करण्याला ज्यांनी अनुकूलता दर्शविली होती अश्या पन्नासेक लोकांची बैठक मी माझ्या घरीच आयोजित केली. बैठकीची वेळ झाल्याबरोबर पहिल्यांदा वि.र .गुरुजी आले. आम्ही इतरांची वाट पहात होतो. एक तास झाला पण कुणी आलेच नाही. विवेक जोशी थोडा वेळ येऊन गेला. बैठकीच्या अंति आम्हा दोघांना हे समजून चुकले हे काम आम्हा फक्त दोघांनाच करायचे आहे. त्यादिवसापासून मी व गुरुजी प्रबोधिनीच्या कामाला लागलो.

गुरुजींच्या मनात पण अनेक नवीन उपक्रम करण्याचे होते. शैलेश कंगळेशी याच काळात माझी मैत्री झाली. त्यांनी एक खूप वेगळे शिबिर आपण मुलांसाठी घेऊत असा प्रस्ताव ठेवला. माझ्या स्वतःच्या अनुभवातुन मला एक पक्के वाटत होते की ७ वी तून आठवीत जाणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम असावा. या वयात झालेले संस्कार खूप दीर्घकाळ आयुष्यात टिकतात.संस्कार या शब्दाचा अर्थ वेगवेगळे लोक खूप वेगळा लावतात असे लक्षात आले होते. माझ्या स्वतःच्या लहानपणीच्या आठवणीतून, मामा क्षीरसागर, वि.र गुरुजी, बेळूर्गीकर गुरुजी यांच्याशी होत असलेल्या संवादातून काही गोष्टी  मला प्रकर्षाने जाणवत होत्या. प्रबोधिनीचे शैक्षणिक प्रयोग अभ्यासताना त्यातील मानसशास्त्रीय संकल्पना खुपच स्पष्ट होत होत्या. आज देशाला सायंकाळी शुभंकरोती म्हणण्याच्या पुढे जाऊन भोवतालचा समाज माझा आहे, या समाजातील सर्व लोकांचे माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पण महत्वाचे योगदान आहे, या समाजात अनेक वाईट प्रथा, रुढी,प्रश्न व समस्या आहेत, त्यांचा योग्य तो अभ्यास करून त्यावर माझ्या परीने प्रयत्न करत राहण्याचा संस्कार पण मुलांवर झाला पाहिजे. याचबरोबर आता त्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागल्यात. त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेऊन या पुढे स्वतःच्या विकासाची जबाबदारी त्याची स्वतःची आहे याचे त्याला योग्य पद्धतीने भान आणून देण्याचा संस्कार पण त्याच्यावर झाला पाहिजे.

आपल्या भोवतालच्या परिसरातील लोकांच्या परिणामातून आपले व्यक्तीमत्व बनत असते. आज काल फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करताना हा महत्वाचा संस्कार दुर्लक्षित राहतो. अंबाजोगाईत आल्यापासून मामा व वि.र गुरुजींबरोबर राहून माझ्या पहिली ते बारावी पर्यंतच्या काळात व पुढे ज्या ज्या वेळी मी अंबाजोगाईत राहिलो त्यावेळी न समजलेली अंबाजोगाई गेल्या चार महिन्यात खुपच समजली. विलक्षण वैभव आहे या अंबाजोगाईत. गाव व्यापारपेठेंनी, उद्योग धंद्यांनी श्रीमंत होते हे असेलही पण अंबाजोगाईची श्रीमंती म्हणजे येथील माणसे. त्यांनी देश विकसनासाठी केलेले अथक प्रयत्न व त्यातून तयार झालेली गावाची एक संस्कृती हे फार थोडया ठिकाणी पहावयास मिळते. अंबाजोगाई या बाबतीत मराठवाड्याची  राजधानी आहे. पण या अश्या अंबाजोगाईची ओळख माझ्या शालेय जीवनात फार कधी झाली नव्हती. देशपातळीवरचे व प्रबोधिनीचे काम करताना याचे महत्व अधिकच पटत होते.

गावाची ओळख मुलांना झाली पाहिजे हे खूप आतून पटले होते. गुरुजी व शैलेश कंगळेशी चर्चा करून गावातील परिसर,शिल्प व ऐतिहासिक स्थळे, इमारती,शैक्षणिक व सामाजिक संस्था,दूरदर्शन केंद्र व गिरवली विद्युत केंद्र,शेती व तेथे काम करणारी माणसे  यांचा प्रत्यक्ष भेटीतून व सहवासातून अनुभव घेत अभ्यास करण्याचे व्यक्तीमत्व संस्कार शिबीराचे आयोजन १४ एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान केले. खूप छान अनुभव होते. पुण्याहून माझा मित्र मिलिंद नाईक खास ह्या शिबिरासाठी सात दिवस आला होता.

गुरुजींबरोबर अनेक क्षेत्रात काम करता आले. खूप काही शिकत होतो. रवी व स्नेहल पण खूप मोठी झाली होती. याच काळात एक दुर्घटना घडली रवीचे अपघाती निधन झाले. गुरुजींना भगवद्‌गीतेच्या अभ्यासामुळे ह्या धक्यातून सावरणे थोडं अवघड जरी असले तरी जमले. काकूंना मात्र रवीचे अपघाती निधन हा खुपच मोठा धक्का होता. त्यांचा रवीवर खूप जीव होता. या धक्यातून त्या बाहेर येणे खुपच अवघड होते. गुरुजी शाळेत गेल्यावर तर घर त्यांना खायला उठायचे. काकूंनी घराच्या बाहेर पडणेच बंद केले होते. रवीची आठवण आली की त्यांना दाटून येई. ९ महिने आपल्या अंगाचा एक भाग म्हणून वाढवले, त्याच्या जन्माच्या वेळी वेदना सहन करत मातृत्वाचा सुखद अनुभव त्यांनी घेतला होता. प्रत्येकाला एक दिवस शाश्वत निद्रेत जायचेच असते. पण पोटच्या पोराचा शाश्वत विरह त्या माऊलीला आत्मकैदेच्या एकांतवासात नेत होता. गुरुजींचे पण त्यामुळे शाळेशिवाय बाहेर पडणे थांबले. त्यात मानेच्या मणक्याच्या दुखण्यानी त्यांना अचानक चक्कर येत असे. या सर्वांनी गुरुजींचा आत्मविश्वास पण थोडा कमी होत असल्याची पुसटशी कल्पना त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होती.

या सर्वातून बाहेर कसे निघायचे? गुरुजींसमोर व आम्हा सर्वांसमोर मोठा प्रश्न होता. मला पण भावी आयुष्याचे अनेक निर्णय घ्यायचे होते. आई निवृत्त झाल्यावर तिला निवांत विचार करण्यासाठी तपस्व्यांच्या भूमीत मी तिला नेले होते व त्याचा खूप वेगळा परिणाम तिच्यावर झालेला होता. स्वामी विवेकानंदानां आयुष्याचे ध्येय दर्शन झालेले हे ठिकाण आधुनिक युगातील साध्या वेशातील संन्याश्यांनी “कर्मयोगेक निष्ठा” म्हणत तपोभूमी बनवली आहे. माता पार्वतीच्या तपाने पुनीत झालेल्या कन्याकुमारीला सर्व प्रबोधिनीच्या सदस्यांसोबत  अभ्यास सहलीसाठी जाण्याचा प्रस्ताव मी गुरुजींसमोर ठेवला. सोबत काकूंना पण घ्यायचे ठरले. आम्ही सर्व जण १७ दिवसांसाठी कन्याकुमारीला निघालो. गुरुजींचे प्रबोधिनीत येणे नित्याचे होते पण काकू फारच प्रासंगिक यायच्या.सर्वांसोबत काही दिवसातच काकू मिसळून गेल्या. १७ दिवस सहजीवनाचा व अभ्यासाचा अनुभव अनेकांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला पण गुरुजी व काकुंसाठी तो उत्तर आयुष्याला ध्येय देणारा ठरला. काकूंचा एकांत पूर्णपणे संपला तर गुरुजी आमच्या सोबत उंच असा मरुतमलाई पर्वत चढले. पर्वताच्या उंच टोकाहून भारतमातेचे शेवटचे टोक पाहताना गुरुजींच्या चेहऱ्यावर जीवनाच्या गणिताचे अतिशय अवघड प्रमेय सोडवल्याचा आनंद व आत्मविश्वास दिसत होता.

त्या उंची वरून ते भारताचे टोक पहात संकल्प करत असावेत, या भूमीच्या विविधतेचा अनुभव घेण्यासाठीच्या भारताच्या परिक्रमेचा! सागरातील भूमीच्या अंतिम शिलेवर स्वामी विवेकानंदानी आपल्या भारत परिक्रमेचा शेवट केला होता. त्याच शिलेपासून उत्तरेल्या पसरलेल्या पुण्यभूमीचे दर्शन आसेतु हिमालय करण्याचा निश्चय गुरुजींनी केला. काकू व गुरुजी भारतभर तर फिरलेच व नेपाळ दर्शन पण करून आले.सामान्य पणे अवघड असणाऱ्या भूप्रदेशांचे दर्शन मोठया मानसिक इच्छाशक्ती ने गुरुजींनी व काकूंनी केले. त्यांचे प्रवास अनुभव आपल्याला स्तिमित करतात.

माझा पण स्वतः स्वीकारलेला स्वान्तआश्रम संपवून गृहस्थाश्रम स्वीकारायचे ठरवले. वडिलांचे निधन मी ३ वर्षांचे असतानाच झाले होते. लग्नात आता माझ्या मागे वरपिता म्हणून प्रबोधिनीच्या अंबाजोगाईतील कामात जे अगदी पहिल्या पासून फक्त माझ्या पाठीशी नाहीतर बरोबरीने काम करणारे वि.र गुरुजी होते व त्यांच्या सोबत काकू.

मातृदेवो भव्, पितृदेवो भव्, आचार्य देवो भव् ................

मंगळवार, २० मार्च, २०१२

मी खूप हुशार मुलगा झालो !!!!!!


अगदी संताना पण ज्याची ओढ सतत वाटत राहते ते म्हणजे बालपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला या वयोगटाचे खुपच आकर्षण आहे. सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे या वयातील सर्वात मोठी ताकद म्हंजे विस्मरण क्षमता. विनाकारण आपला मेंदू या वयात नको त्या विचारांची कचरा कुंडी बनत नाही. काही झाले तरी लवकर आपण विसरून जातो. दुसरं या वयात असलेला उत्साह व कुतूहल. सतत काही तरी नवं करावे वाटते. काही तरी नवीन समजून घ्यावं वाटत. मला फार कमी क्षण लहानपणीचे आठवतात की मी घरी एकटा आहे आणि खूप कंटाळलो आहे. एका बॉलबरोबर मी व एका बाहुलीबरोबर माझी बहिण कित्येक तास खेळत बसायचो.आपलं मन रमवण्यासाठी आपण खुपच सक्षम असतो या वयात. रात्री झोपवताना आईनी सांगितलेली चिमणा चिमणीची, चतुर कावळ्याची,रामाची, हनुमानाची तर कधी श्रावण बाळाची गोष्ट कधीही old version ची वाटत नाही. भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान,मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता यांपासून कोसो दूर असतो आपण. आपल्या शिक्षकांवर खुपच विश्वास असतो व निर्व्याज प्रेम असते. वय वाढत जातं व मग भेद, वाद, प्रथा, परंपरा, अभिमान, मान, अपमान, मत्सर,हाव,चिंता हे सर्व आपल्यावर हावी होतात व आपण मोठे होतो !!!!!स्वामी विवेकानंद म्हणतात ते आता पटते Be like child, not childish. Lead like a child.

अंबाजोगाई हे शिक्षणाचे माहेर घर. मला तर हे माझ्या स्वअनुभवाने पटले आहे. फारच उपद्व्यापी असल्याने आईच्या शाळेच्या वेळेनुसार माझ्या शाळेची वेळ असणे हे तिला, घरातील अनेक वस्तू सुखरूप राहाव्यात म्हणून व माझे हात,पाय व डोकेही दुखापतरहित रहावे म्हणून निकडीचे होते. त्यात आम्ही एका शाळेत टिकलो पण पाहिजेत ना ? अंबाजोगाईतील अनेक शाळांचा व शिक्षकांचा खास अनुभव आहे आमच्या पाठीशी !!

अंबाजोगाईतील बुरुजाजवळची मुशीरमंजीलची जिल्हापरिषद शाळा ही माझी पहिली शाळा. जिरे गल्लीतील मुक्त जीवन सोडून त्या बंदिस्त खोल्यात शिकणे म्हणजे मला माझ्यावर जबरदस्ती वाटे. मग आमचे असहकार आंदोलन सुरु. रडणे, आक्रस्ताळेपणा हे आमचे हत्यार. पहिल्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही हे हत्यार शाळेत जाण्याच्या विरुद्ध वापरले आणि विजयी पण झालोत. माझी आई माझ्यापेक्षा साहजिकच हुशार होती. तिने शाळेतील मोठ्या बाई मंकले बाईना सांगितले. मंकले बाईनी वरच्या वर्गातील चार धष्टपुष्ट मुलं घरी पाठवली. त्यांनी माझी चक्क उचलबांगडी केली. दोन मुलांनी पुढून आपल्या खांद्यावर माझे दोन्ही हात घेतले व उरलेल्या दोघांनी दोन्ही पाय त्यांच्या खांद्यावर घेतले. माझे तोंड आकाशाकडे. याला उचलबांगडी म्हणत. अश्या राजेशाही पद्धतीने व आमच्या पद्धतशीरपणे चाललेल्या सुरांच्या भोंग्यात आमची मिरवणूक जिरे गल्ली ते मुशीरमंजील शाळेपर्यंत काढण्यात आली. मंकले बाई व उचलबांगडी या खेरीस त्या शाळेतील फारश्या गोष्टी आठवत नाहीत. तसं फार काळ त्या शाळेत रहावे पण लागले नाही.

मला दुसऱ्या शाळेत घालण्याचे ठरवले. गुरुवार पेठेतील महिला मंडळाच्या बालक मंदिरात. अंबाजोगाईतील माई खेडगीकर, निर्मलाताई कुंबेफळकर, माझी पणजी कमलाबाई देशपांडे अश्या अनेक शिक्षित महिलांनी ते सुरु केले होते. नेण्यासाठी मस्त सायकल रिक्षा होता.खास लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी.मागच्या दोन चाकांवर निळ्या रंगाचा पत्र्याचा डब्बा असे. त्यात बसण्यासाठी लाकडाचे बाक व बाहेर पाहण्यासाठी जाळीच्या खिडक्या. मला रिक्षा फारच आवडायची पण त्यात बसायचे म्हणजे शाळेत जाणे गरजेचे. रिक्षा, मधल्या सुट्टीतील खाऊ व रडत असताना जवळ घेऊन बसणारी जुबाताई म्हणजे अरुंधती लोहिया पाटील, ह्या स्मरणात राहिलेल्या आठवणी.
 
अंबाजोगाईत इंग्रजी माध्यमाची बालवाडी पहिल्यांदा सुरु केली ते अनिल होळसमुद्रेकरांच्या पत्नीने. आमची स्वारी मग त्या शाळेत दाखल झाली. आकर्षक नारंगी रंगाचा टायसहित गणवेष मला खुपच आवडला होता.शाळा होळसमुद्रेकरांच्या आदर्श कॉलनीतील त्यांच्या स्वगृहीच चाले. एके दिवशी मी लघुशंकेसाठी त्यांच्या स्नानगृहात केलो. कुणी बघेल म्हणून आतून कडी लाऊन घेतली. मोकळे झाल्यावर कडी काढायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या मला ती कडी निघेना. आत मध्ये जोरात भोंगा काढला.  बाहेर सगळे आले पण काय करणार? शेवटी जर्मनचा तांब्या होता तो जोर जोरात कडी वर मारून १५ -२० मिनिटांनी मी बाहेर पडण्यात यश मिळवले. भयानक अनुभव होता तो. कधीही विसरता न येणारा.

माझ्या आयुष्यातील पहिली चोरी पण मी ह्या शाळेत केली. शाळेतील एका मुलीकडे एक लाल रंगाची लंबगोलाकार डबी होती. त्यात ती पाटीवर लिहिण्याच्या वेगवेळ्या पेन्सिली ठेवायची. ती डबी फारच मनात बसली होती. वेळ साधून डल्ला मारला. घरी घेऊन गेलो. आईने दप्तरात ती डबी पाहिली. माझा पराक्रम तिच्या लक्षात आला. ती काहीच म्हणाली नाही. पण दुसऱ्या दिवशी ती मुलगी प्रार्थनेच्या वेळी मला खूप चिमटे घेत होती. काहीच कळत नव्हतं. थोडया वेळानी ती डबी मी तिच्या जवळ पाहिली. माझे दप्तर पाहिले, त्यात डबी नव्हती. तिने काय जादू करून आपली डबी परत मिळवली हे बरेच दिवस कळले नव्हते.

अनिल होळसमुद्रेकरांनी अंबाजोगाई सोडले व आमची रवानगी झाली अंबाजोगाईतील सुप्रसिद्ध इंग्रजीचे शिक्षक गोटे गुरुजींच्या लिटील फ्लॉवर स्कूल मध्ये. शाळा बदलली, गणवेश बदलला. जुन्या वाड्यात ही शाळा चाले. वर्गात अनेक ओळखीचे मित्र होते. अजय खुरसाळे हा आधीपासून ओळखीचा होता. एक दिवस मी एका मुलीचे केस ओढले, का? ते आठवत नाही. मुलीने गोटे गुरुजींना सांगितले. पांढरे शुभ्र कपडे घालणारे गोटे गुरुजी खूप शिस्त प्रेमी.आपल्या कपड्याच्या विरुद्ध रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा लांब व गोल रूळ ते मारण्यासाठी वापरायचे.त्याची आम्हाला खूप भीती वाटायची. आमचे कर्म मुलीनी गुरुजींना सांगितल्यावर आम्हाला त्या रुळाचा चांगलाच प्रसाद मिळाला. तसे आमचे अनेक पराक्रम घरापर्यंत पोहोंचले होते. तसंते इंग्रजी माध्यम पण जड जातंय हे आईला लक्षात आले असेल.

आमची रवानगी छल्यावरच्या खोलेश्वर शाळेत झाली. घसरगुंडी व कोदरकर सरांनी वर्गात लक्ष नसल्याने पाठीत मारलेला गुद्दा व हृदयात बसलेली धडकी मात्र आठवते. काय माहित नाही पण थोड्याच दिवसात माझी रवानगी योगेश्वरी प्राथमिक विद्यालयात झाली. तिथे मात्र थोडा जास्त काळ काढला. जवळ पास ३ वर्ष. माझी तुकडी होती “ब”. अ तुकडीत हुशार मुलं असायची. मी त्यातला नव्हतो.

मुंडे गुरुजींच्या पिळदार मिशा, कपाळावरील अष्टगंध, त्यांची शिकवातानाची अदाकारी व शिक्षा करताना वापरलेली ठकुबाई मी कधीच विसरू शकणार नाही. खाँसाहेब व त्यांचा मुलगा मुसा हे आमचे रिक्षा वाले मामा. अगदी बाबा होते त्या वेळेपासून खाँसाहेबांच्या रिक्षातच आम्ही फिरायचो. ते निवृत्त सैनिक होते. बाबा आजारी असताना व त्यांचे निधन झाल्यावर त्यांनी आम्हाला खुपच मदत केली. माझ्या दहावीच्या परीक्षेपर्यंत त्यांनी मला घेऊन जाण्याचे व आणण्याचे काम केले. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी गुरुजी, खूप उंच,पांढरे धोतर, त्यावर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट व पांढरी गांधी टोपी व टोकदार नाक. गुरुजींचे व्यक्तीमत्व खुपच प्रभावित करणारे होते. मी शाळेत मस्त रमलो होतो. संतोष डागा, किरण अंबेकर,मनिष रुपडा असे अनेक जीवाभावाचे मित्र होते.

आईच्या शाळेची वेळ बदलली व मग माझी शाळा पण. अगदी आमच्या चौधरी गुरुजींच्या सारखेच दिसणाऱ्या संदीकर गुरुजींच्या कार्यालयात मला नेण्यात आले. खोलेश्वर शाळेतील कोदरकर गुरुजींचा गुद्दा चांगलाच लक्षात होता. मनात भीती होती. मी शाळा बदलण्यासाठी तयार नव्हतो. संदीकर गुरुजींनी पहिल्या भेटीतच त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझी भीती दूर केली. ४ थीला मी छल्या वरच्या, कवठाच्या झाडाजवळच्या खोलेश्वर शाळेत जाऊ लागलो. सुहास सेलूकर उर्फ उक्या, आनंद कुलकर्णी उर्फ अण्णा, शरद भोसले उर्फ शऱ्या हे सारे माझे जिगरी दोस्त. गणित शिकवणारे क.र.जोशी गुरुजीनी मी पहिल्यांदा गांधीजींवर केलेलं भाषण ऐकून दिलेली शाब्बासकी अजून लक्षात आहे. त्या बरोबर भाषण करताना लटलटणारे पाय पण ! मराठी शिकवणाऱ्या बालासाहेब गुरुजींनी माझे अक्षर मात्र चांगले करून घेतले. ते खूप रागीट होते. माझ्या शुद्धलेखनाच्या वहीतील एका लिखाणावर त्यांनी दिलेले छान हा शेरा माझ्या  तोपर्यंतच्या शिक्षण यात्रेतील सर्वात मोठा बहुमान होता.

५ वीला मग घराजवळील खोलेश्वर माध्यामिक शाळेत जाऊ लागलो. जून मध्येच विषाणू संसर्गामुळे एक महिना शाळेत उशिरा गेलो. ५ वी  ते ७ वी पर्यंत माझ्या अनेक क्षमता विकसित झाल्या. मुळे गुरुजींमुळे चित्रकला, केशव मुंडे व महामुनी गुरुजींमुळे खेळ, भारतराव धर्मराव गुरुजी व धाटबाईंमुळे निबंध लेखन व वाचन, वि.वा देशपांडे गुरुजी व हेबाळकरबाईंमुळे विज्ञाना बद्दलचे कुतूहल व इतिहासाबद्दलची अभिरुची. पण या सोबत गाण्याच्या एका स्पर्धेत एका गुरुजींनी “गर्दभ गायन” म्हणून मारलेल्या शेऱ्यामुळे मी कधी गायनाकडे वळलो नाही. पुढे देगलुरकर गुरुजी आले. त्यांच्या मुळे थोडं गाणं ऐकायला, आवडायला लागले. “आकाशी झेप घे रे पाखरा” हे त्यांच्या आवाजातील गाणे मी कधी विसरू शकत नाही. पुढे ते माझे जगण्याचे तत्वज्ञान बनले. खूप तयारी करूनही कथाकथन स्पर्धेत बोलण्यासाठी उभे राहिल्या बरोबर भरलेली थरथरी,मेंदूला आलेल्या मुंग्या व सर्वांसमोर पळून जावं लागल्याने अगदी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत स्टेजवर बोलण्याची हिम्मत केली नाही.


हे सर्व असले तरी प्रचलित शिक्षणात जे फारच गौरवाचे असते ते चांगले गुण मिळवण्याची क्षमता काही माझ्यात निर्माण झाली नाही. आमचे लक्ष अभ्यास करताना एका ठिकाणी कधीच नसायचे. आई अभ्यास घेण्यासाठी बसली तर चीडचीड व्हायची तिची. मार पण खूप खाल्ला.अगदी पहिली पासून सर्व प्रकारच्या शिक्षकांच्या शिकवण्या लावल्या. फक्त एकट्याला शिकवण्या पासून ते शाळेतील शिक्षकांच्या घरी जाऊन शिकण्यापर्यंत. काही प्रगती नाही. पालथ्या घडयावर पाणी. मला कधीही फार चांगले गुण मिळाले नाहीत पण प्रथम श्रेणी मात्र कधी चुकली नाही. अभ्यासाच्या नावानी बोम्बच होती आमची.


७ वीला बोर्डाची परीक्षा. आईने तिच्या परीने सर्व गोष्टी केल्या पण मी काही अभ्यास करत नव्हतो. २ किलोमीटर वर असणऱ्या तांदळे गुरुजींकडे पण शिकवणी लावली. परिवहन मंडळाच्या शहर वाहतूक बसनी  मी २ रुपयाचे तिकीट काढून जायचो. फार काही बदल घडला नाही. शेवटी सततचे लक्ष राहवे व थोडया   धाकानी अभ्यास करावा म्हणून माझी रवानगी लतामावशी कडे करण्यात आली. मावशी माझ्या पणजोबांच्या वाड्यात राहायची. तिथे महेश कानडे नावाचा योगेश्वरी मध्ये शिकणारा खूप हुशार मुलगा राहायचा. खूप चांगला अभ्यास करायचा. आता पर्यंत माझे मित्र माझ्या सारखेच मैदानावर रग जिरवायचे. पुस्तक आणि अभ्यास हे आमचे शत्रू. महेशच्या संगतीत राहून चांगला अभ्यास करेल असे मावशीला वाटले. त्याच्या बरोबर मला तिने जवळच नाना जोशींच्या वाडयात रहाणाऱ्या व योगेश्वरीशाळेत शिकवणाऱ्या जोशी गुरुजींकडे शिकवणीला पाठवले. गुरुजींना सर्व जण वि.र.गुरुजी म्हणायचे. खोलेश्वर मधील क. र. जोशी गुरुजींचे ते लहान भाऊ होते.


अंबाजोगाईतील ७ वी बोर्ड व शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी करून घेणाऱ्यांत वि.र.गुरुजींचे नाव फार मोठे होते. खूप हुशार व मोठ्या लोकांची मुलं मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे यायची. मी महेश बरोबर त्यांच्या कडे जाऊ लागलो. खोलेश्वरचा मी एकटाच होतो व गुणाच्या टक्केवारीत सर्वात खालून पहिला ! गुरुजी शिकवायचे कमी पण मुलांनी समस्या विचाराव्यात व त्यांचे ते निराकरण करायचे. मुलं पण अभ्यास करणारी होती. त्यामुळे त्यांना अनेक न सुटलेली गणितं असायची. मला मात्र फार समस्या नसायच्या.कधी तरी आपण पण विचारले पाहिजे म्हणून काही गणितं करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक गणित अडायला लागले. पहिल्यांदा मला काहीच समजत नव्हते. काही गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढायला पहिल्यांदा शिकलो.

शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आल्याने महेश व त्याचे मित्र त्यांचा ते अभ्यास करायचे. गुरुजींच्या घराच्या देवळी मध्ये. २०-२५ शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तके होती. त्यातील पुस्तकातून ते अभ्यास करायचे. गुरुजींचा चुलत भाऊ विठ्ठल, अजय खुरसाळे, महेश सबनीस असे अनेक जण असायची. मी पण ७ वी च्या गणिताच्या शिकवणीला बसण्यापेक्षा महेश व मित्रांबरोबर ७ वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करायला लागलो. गणितात रस निर्माण होत होता.


७ वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. मला सेकंड क्लास मिळाला. परत माझी शाळा बदलली.योगेश्वरी माध्यमिक मध्ये “G” तुकडीत प्रवेश मिळाला. माझ्या आयुष्यात एक मोठ स्थित्यंतर होत ते. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मात्र मी पास झालो. गुणवत्ता यादीत नाही आलो पण गणितात मला ३५ गुण मिळाले होते. चवथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी गणितात नापास होतो. ७ वी चा निकाल असो किवा गुरुजींच्या घरी बसून हुशार मित्रांबरोबर केलेला अभ्यास या मुळे मला स्वतः हून अभ्यास करावा वाटायला लागले. मी खूप अभ्यास करायला लागलो व आधी वर्गातून, मग शाळेतून पहिला, दुसरा यायला लागलो. मी  खूप हुशार मुलगा झालो. दहावीला गणितात १५० पेकी १४८ तर १२ वीला १०० पेकी ९९ तर इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षी Maths-3 मध्ये १०० पेकी ९२ गुण मी घेतले. पुढे आयुष्यात अनेक स्थित्यंतरे होत गेली.

रविवार, १८ मार्च, २०१२

निर्मात्यानी प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता येत नाही म्हणून खूप सारे परिस्थितीचे दाहक अनुभव देऊन, तयार केलले असत त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून.

उमेश वैद्य (काका )
दूरदर्शन, इलेक्ट्रोनिक्स खेळ आणि शिकवण्या यांचा बोलबाला माझ्या लहानपणी नव्हता. उन्हाळ्यात आंब्याच्या कोया, पावसाळ्यात रोवना पाणी, श्रावणात झोका, मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवणे असे अनेक खेळ वेगवेगळया ऋतूत खेळायचो. तर काही बारमासी खेळ होते गोट्या, चिंचेचे चिंचुके, विट्टीदांडू, लपंडाव,चोरपोलिस, कधी कधी सूर पारंब्या, लगोर, चेंडूची बक्कम बुक्की. हे खेळ कुणी मला शिकवले ते आठवत पण नाही. एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कढे ते सहज संक्रमित झाले.

या खेळांच वैशिष्टय म्हणजे यासाठी साधन म्हणून फार गोष्टी लागायच्या नाहीत. त्यामुळे खर्च नसल्यातच जमा. गल्लीतील चार पाच पोर जमली की खेळ सुरु. कुणी पंच नाही आणि कुणी मार्गदर्शक पण नाही. पण खेळ कुण्या एकट्याला खेळता यायचा नाही, सवंगडी बरोबर असलाच पाहिजे! या खेळांसाठी कधी कुठले बक्षीस मिळाले हे पण आठवत नाही. खेळांच्या स्पर्धाचे  आयोजण कुणी राजकीय पुढारी किंवा खेळाच्या संघटना करायच्या नाहीत. दुसरे लहानपणाचा निखळ आनंद या खेळातून घेता आला. सहज सर्वांगाला व्यायाम व्हायचा. सहजीवनातील अनेक गोष्टी सहज शिकता यायच्या.

जिवाभावाचे मित्र असायचे. टोपण नाव घेऊन व त्यातही बिघाडकेल्या शिवाय कुणी कुणाला साद घालायचे नाही. बाळ्या, पिंट्या, शिव्या, चम्या, बाप्या असे अनेक आमचे मित्र. पाळण्यात घालून मोठया हौसेनी घरातील लोकांनी नाव ठेवलं होत “हर्षवर्धन”.त्याला आम्ही सर्व म्हणायचो “चम्या” आणि ते सुद्धा त्याच्या कुटुंबातील लोकांसमोर. बऱ्यापैकी सहजता होती. कोण कुठल्या जातीचा आहे हे माहित असायचे पण त्याच्या बरोबर खेळू नको, कारण तो वेगळ्या जातीचा आहे हे कधीच कानावर पडल नाही. आमच्यात भांडण व्हायचे, अबोले पण आम्ही धरायचो. भांडण आई पर्यंत पोहोचायचे. दोन आया पण कडकडून भांडायच्या. “परत त्यांच्या घरात गेलास न .... तर बघून घेईल.” अस पण अनेक वेळा ऐकायला  मिळायचे.

दोन चार दिवस व्हायचे एकमेकाशिवाय करमायचे नाही. आमच्याकडे नव्हते न व्हीडीओ, कॉम्पुटर, मोबाईल गेम्स आणि खूप सारी खेळणी !!! आमचे मित्र हेच खरे आमचे साथीदार. एखादा मित्र मध्यस्ती करायचा. मग ज्यांची भांडणं झाली आहेत ते दोघ मित्र आपापल्या अंगठ्या जवळच बोट व मधले बोट एकमेकाला जोडायचे.  ते दोन बोट, भांडण ज्याच्याशी झालय त्याच्या बोटांवर ठेवायचे. मग दोघही ती दोन बोट आपल्या ओठाला लाऊन बोटांचे चुंबन घ्यायचे व आमची मग “दो” व्हायची. आमची डिस्क फोर्मेट व्हायची. परत सर्व काही अगदी पहिल्या सारखे. त्या दिवशी मध्यस्ती करणाऱ्या मित्राचा रुबाब फारच असायचा. अशी मध्यस्ती मी पण अनेक वेळा केली आहे. खुपच आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढतो. मला कधी कधी वाटत, गणितातील अति अवघड प्रमेय किवा कोडे, संगणकावरचा खूप अवघड पातळीचा  खेळ  जिंकल्यावर किवा एखाद्या विषयात पहिले आल्यावर सुद्धा, खऱ्या खुऱ्या जगण्यातील जो आत्मसन्मान किवा आत्मविश्वास वाढतो त्या पेक्षा खूप जास्त हा अश्या प्रकारच्या भांडण झालेल्या मित्रांची दो करून दिल्यावर वाढत असेल.
वडिलांचे नसणे, आईची वैधव्यातून निर्माण झालेली अस्वस्थता, नातेवाईकांचे कुत्सित बोलणे या सर्व गोष्टींची धग ही माझ्या मित्रांमुळे व त्यांच्या बरोबर खेळत असणाऱ्या खेळांमुळे कधीच जाणवली नाही.
आज घरात खूप खेळणी आहे. खूप काळजी घेणारे आई आणि बाबा आहेत. अगदी आजच झळकलेला चित्रपट घरीच पाहण्याची सोय आहे. रस्त्यावर येणाऱ्या कुल्फीची किवा रंगीत गारेगारची वाट पण पाहावी लागत नाही. घरच्या फ्रीज मध्ये आई आईस्क्रीम तयार करते. पण सहज नावानी हाक मारता येतील व त्यांच्याशी मनमुराद दंगा मस्ती करता येतील अशी मित्र नाहीत. जवळ जवळच्या घरातील मुलं मित्र असणं थोड अवघड झालंय कारण कुंपणाच्या भिंतींपेक्षा मनातील भिंती खुपच उंच झाल्या आहेत.

अंबाजोगाईची शिशुविहार सुरू करताना हे सीधे, साधे, सपाट सत्य मनाशी पक्क ठरवलं की कुठल्याही प्रकारची खेळणी वापरायची नाही. शाळेतील मित्रांबरोबर व ताई,दादांबरोबर खेळायचे. शाळेतील आपल्या मित्रांच्या ओढीने व ताई दादाच्या प्रेमा पोटी यावे. स्कूल बस अजिबात नाही. आपल्या आई,आजी,आजोबांच्या बोटाला धरून यायचे. बाबांच्या गाडीवर यायचे. मग थोडया दिवसांनी शाळेतील दोन आया मैत्रिणी होतात व दोन बालवीर मित्र. दोन बालवीर सोबत व त्यांच्या आया एकमेकांशी गप्पा मारत शाळेत येतात व घरी जातात.पुढे आईंची मैत्री घट्ट होते व मग त्या आलटून पालटून सोडायला येतात.    मस्त सहजीवन सुरु होते.


प्राथमिक शाळेत असताना शाळेतील गुरुजी लंगडी पाणी, खो-खो, कबड्डी खेळ घ्यायचे. योगेश्वरी महाविद्यालयातील हजारीसर आम्हा मित्रांना कॉलेज मध्ये कुस्ती शिकवायचे. ती ही लाल मातीच्या आखाड्यातील.क्रिकेटची ओळख थोडी उशिराच झाली. बाकीचे खेळ फार माहित नव्हते. आजोबा खूप व्यायाम करायचे. ते आज ९३ वर्षाचे व फुर्तीले आहेत. त्यांचे शिकवलेले शीर्षासन फार लहानपणा पासून करायचो.


आईने आपार कष्टातून नवीन वसाहतीत घर बांधले. अवती भवती फक्त दोन तीन घर होती. आमच्या बरोबर बाईआजी राहायच्या. त्यांचे खरे नाव सुभद्राताई भातंब्रेकर. खूप आधार होता त्यांचा. आमच्या वसाहतीचे नाव रामकृपा वसाहत. आमच्या समोरच नवीन केशव नगर उभे रहात होते.बांधकाम एक दोन घरांचेच झाले होते. बाकी मोकळे पटांगण. माझा दिवसातील बराच वेळ मित्रांबरोबर जायचा. आई शाळेतून आली की मग आमची स्वारी घरी यायची. तसं तिचा घरातूनच दिलेला आवाज सहज आमच्या पर्यंत कुठही असलो तरी पोहोचायचा. आजूबाजूला फार वाहतूक व वर्दळ नसायची. आज थोडया जोरातच आईने हाक मारली.
घरी थोडा घाबरतच आलो होतो.

“अरे! मुन्ना ती बघ समोर शाखा भरली आहे. जा लवकर.” आईने न चिडता थोडया उत्साहाने सांगितले.

समोर बघतो तो २०-२५  जण आमच्या समोरच्या मैदानावर खेळत होती. मी तिथेजाई पर्यंत खेळ संपला होता व मुलं गोल करत होती. मी त्यांच्यात सामील होणार तोच मला एका महाविद्यालयातील तरुण थांबवत म्हणाला

“अरे प्रणाम घेतलास का ?

मला त्याचे बोलणे काही समजले नाही. मग त्याने मला दगडांनी गोल केलेली जागा दाखवली. तो पहिल्यांदा सावधान मध्ये त्या गोलाकडे तोंड करून उभा राहिला. मग त्याने उजवा हात जमिनीस समांतर छाती समोर धरला व मान खाली केली व शेवटी हात खाली घेतला.

“कर आता असे.” तो खमक्या आवाजात मला म्हणाला.

त्याने केलेली कृती मी केली.

“आता माझ्या कडून प्रणाम घे.” तो म्हणाला आणि माझ्याकडे तोंड करून सावधान मध्ये उभा राहिला. व जी कृती गोलाकडे पाहून केली ती आम्ही एकमेकांकडे पाहून केली.

मला काही कळत नव्हत पण तो सांगेल ते मी करत होतो. त्याने मला गोलात उभे राहयला सांगितले. माझे काही मित्र होते. त्याच्या जवळ जाऊन मी उभा राहिलो. मग सूर्य नमस्कार झाले. आम्हा सगळ्यांना त्यांनी बसायला सांगितले. मग गाणे झाले.प्रत्येकाला आपले पूर्ण नाव, वर्ग व शाळा सांगायला सांगितली. मी पण माझे नाव जोरात सांगितले.

“ काय रे मित्रांनो ! आजचे खेळ आवडले न ?” त्या तरुणाने सर्वाना विचारले.

“हो...हो.....” सर्व मुल मोठ्यांनी म्हणाली.

“मग उद्या येणार का खेळायला? असेच दररोज खेळत जाऊ पण एक करायचं उद्या येताना एका नवीन मित्राला घेऊन यायचे.” प्रेमळ पणे युवक बोलला.

आम्ही सगळे परत जोरात म्हणालो. “हो ....हो ...”

नंतर प्रार्थना होऊन शाखा संपली. मुलं पळत सुटली.

“अरे इकडे या....थोड थांबा” तो सर्वाना थांबण्यास सांगत होता. आम्ही काही मुलं थांबलो. त्याने आमचे नाव परत विचारले. घर कुठ आहे ते विचारले.

“तुम्ही सर्वानी मला नाव सांगितलं पण माझ नाव माहित आहे का तुम्हाला?”

“सांगा की मग.” आम्ही सगळ्यांनी विचारले.

“माझं नाव उमेश प्रभाकरराव वैद्य.” त्याने नाव सांगितलं.

उमेशदादा व आमची थोडया दिवसात चांगली मैत्री झाली. थोडा ठेंगणा, गव्हाळ रंग, फार नाही पण थोडे कुरुळे केस, हनुवटी वर काळ्या रंगाची जन्मखूण. हालचालीत खुपच गती होती व बोलण्यात आपलेपणा व आश्वासकता. तो शाखेचा मुख्य शिक्षक होता. आमचे शाखेत जाणे नियमित झाले. नाही गेलं तर आई रागवायची. तस घरातल्या लोकांनी माझी अनेक नाव ठेवलेली पण अनेकदा वापरला जायचं ते “कुत्र मारी भंम्पक.” मला कुत्रीची पिल खूप आवडायची. अशी अनेक पिल्लं मी घरी घेऊन यायचो.त्यांना मग मी पाळायचो. रात्री मी त्याला घराबाहेर बांधून ठेवायचो. रात्री पिल्लू प्रचंड केकाटायचं. आई चिडायची दोन चार पदव्या देत त्या पिल्लाला सोडून द्यायची. दुसऱ्या दिवशी मग माझा पिल्लाचा शोध सुरु व्हायचा. असे अनेक उपद्व्याप मी करायचो. निदान चांगल वळण लागेल म्हणून आई मला शाखेत जा म्हणून रागवायची.


माझे अनेक मित्र सुरवसेंचा बाळू व शिवा,माहूरकरांचा बाळू व दिपू डबीरांचा संदीप हे सगळे शाखेत जायचे. शाखेत आम्ही खूप वेग वेगळे खेळ शिकलो. वाघ शेळी, लीडर लीडर, शिवाजी म्हणतो, खाऊगां, गावगुंड, झूल झूल झेंडा झूल, अग्नीकुंड,हनुमानाची शेपटी, सुदर्शन चक्र असे अनेक काही बसून तर काही धक्का बुक्कीचे. खूप मजा यायची.

उमेशदादा बरोबर गोराप्पान थोडा उंच व घोगऱ्या आवाजाचा श्रीकांतदादा पण असायचा. खुपच प्रभावी व्यक्तिमत्व होते त्याचे. ते पण आमच्या कडून खेळायचे. मग दोन संघ केले की एकीकडे उमेशदादा व दुसरीकडे श्रीकांतदादा. मग घनघोर युद्ध ! शाखा संपली की मग दोघांच्या एक, एका हाताला आम्ही धरायचो मग ते मध्ये आणि आम्ही ग्रहा सारखे एकमेकांना पकडायला पळायचोत. ते मध्य भागी आमच्या बरोबर आसा प्रमाणे फिरायचे. खूप वेळ हा खेळ चालायचा. आता उद्या खेळू म्हणून आमच्या बरोबर ते रोज एकाच्या घरी पाणी प्यायला यायचे.आमचे दादा घरी आले की खूप मस्त वाटायचे.


आईनी मला नवी व महागाची चप्पल घेतली होती माझ्या हट्टा पोटी. ती नको म्हणत असतानाही मी मोठ्या ऐटीत शाखेत घालून गेलो होतो.शाखा झाली.खूप खेळलो होतो.खुपच तहान लागली.आज मला कुठलच पद नव्हते. खेळ झाले की हळूच घरी पळून गेलो. अस बऱ्याचदा व्हायचे. पाणी पिलो, थोडा बसलो आणि मग लक्षात आले चप्पल राहिली न शाखेत. बाहेर येऊन पहिले तर शाखा संपलेली. मी संघस्थानावर गेलो व चप्पल जिथे काढून ठेवतात तिथे पहिले. चप्पल काही नव्हती. तोंडचे पाणी पळाले होते. आवडलेली चप्पल नाही व आईला काय सांगणार? दुःख आणि भीती मिश्रित विचित्र अवस्था होती. ५ -१० मिनिटे मी चप्पल तिथेच शोधत होतो. अंधार पडला होता. हताश होऊन मी घरी गेलो व आईला सांगितले.

“जा, त्या दादाच्या घरी जाऊन विचार.” रागातच आज्ञा केली मातोश्रीनी.

उमेशदादाच व श्रीकांतदादा चे घर एकमेकाच्या  जवळच होते. मी त्यांच्या घरी निघालो.
आज मी पळून पण आलो होतो व त्यात चप्पल हरवलेली. खुपच घाबरलेल्या आवाजात मी श्रीकांतदादा ला

विचारले,  “दादा, माझी चप्पल राहिली रे आज शाखेत.”

“बघ हीच आहे का ?” त्याने मला एक चप्पल दाखवली.

एकदम जान आल्या सारख मोठ्यांनी म्हणालो, “हो...हो हो हीच रे.”

चप्पल पायात घातली व आमची स्वारी भांडयात जीव पडल्यानी थोडया आनंदातच घरी निघाली.

दादांच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो. कुर्डूकरांच्या घरची दक्षिणेकडील बाजू. घर कसले दोन मोठ्या खोल्या. एक वालवडकरांची  (श्रीकांतदादाचे) तर दुसरी वैद्यांची. १६ वर्ष ते सोबत राहिले. वालवडकर गुरुजी, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, खूप उंच, सावळा रंग, डोळ्यावर चष्मा, धोतर घालायचे. तर उमेश दादाचे वडील प्रभाकरराव कन्नडहून आलेले व शेती खात्यात नौकरी करायचे. त्यांना लोक प्रेमानी मामा म्हण्याचे. मामा पण खूप उंचेपुरे, धष्टपुष्ट, गोरे, थोडे घारे डोळे,मस्त मिश्या,उजव्या गालावर उठून दिसणारी काळी जन्मखुण, सदा अर्ध्या बाह्याचा पांढरा मस्त इस्त्री केलेला सदरा व  गडद काळी प्यांट.

२० वर्ष कन्नड व औरंगाबादला नौकरी केल्यावर मामांची बदली अंबाजोगाईला झाली.ते खूप चांगले खेळाडू होते. कबड्डी, व्हॉलीबॉल हे त्यांचे कन्नडला असतानाचे आवडते खेळ.खुद्द अंबाजोगाईत ते फार कमी राहिले. पण कुटुंब अंबाजोगाईत होत. बायको,चार मुलं व दोन मुली अस जम्बो कुटुंब. मामानी भूम परंडा ते अहमदपूर पर्यंत अनेक ठिकाणी नौकरी केली. शनिवारी ते अंबाजोगाईला यायचे रविवार मुक्काम व सोमवारी परत नौकारीवर. त्यांचा सारा प्रवास हा सायकलवर चाले. दिवसाला ४० किलोमीटर पर्यंत सायकल प्रवास करायचे. त्यामुळे त्यांची देहयष्टी मस्त होती.

मामा, अंबाजोगाईत असताना त्यांचा आवडता खेळ होता ब्रिज. अंबाजोगाईत फक्त तीन लोकच ब्रिज खेळायची. स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले डीन डॉक्टर डावळे दुसरे कॅप्टन अशोक पाटील व तिसरे वैद्य मामा. तिघांमध्ये प्रचंड फरक पण खेळ कुठल्याही लोकांना एकत्र आणू शकतो. डॉक्टर डावळेन कडे त्यांचे खेळणे कित्येक तास रविवारी चालायचे. त्याच बरोबर मांजरा प्रकल्प वसाहतीत असणाऱ्या सभागृहात शटल तेथिल व गावातील लोकांबरोबर खेळायचे. बॉल बॅडमिंटन पण मामांचा खूप आवडता खेळ.पण गावात खेळण्याची सुविधा नव्हती. मामाचे मुथा नावाचे दोन व्यापारी बंधू  मित्र होते. मुथा बंधू,मामा व इतर व्यापारी मित्र यांनी मिळून गुरुवारपेठमध्ये जाजू यांच्या हवेलीतील मोकळ्या पटांगणात अंबाजोगाई मधिल पहिले बॉल बॅडमिंटन चे मैदान तयार केले. पिवळा लोकरीचा बॉल, लाकडी फ्रेमची व नायलॉन दोऱ्याने विणलेली बॅट, मैदानाच्या मधोमध दोन मीटर उंचीच्या दोन पोलला नेट जे मैदानाला दोन भागात विभागते. पाच पाच जणांचे दोन संघ एकमेका विरुद्ध खेळायचे. या सांघिक खेळाची जननी ही आपली भारतमाता. मला हे अगदी अलीकडे पर्यंत माहित नव्हते. मी त्याला विदेशी खेळ समजायचो. तंजावरच्या राजघराण्याचा हा खेळ. मामाच्या मुळे अंबाजोगाईत सुरु झाला.


काही दिवसानंतर पोलिस स्टेशन मध्ये पण मैदान तयार करण्यात आले व सर्व शासकिय अधिकारी तिथे खेळायला यायचे. व्यावसायिक किवा वयानी थोडे जेष्ठ असलेले लोकच हा खेळ खेळायचे. मामानी खोलेश्वर महाविद्यालयाच्या धाटसराना, बॉल बॅडमिंटन महाविद्यालयाच्या मैदानात सुरु करणाची विनंती केली. खोलेश्वर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सोनवणे गुरुजींनी पण पुढाकार घेतला व महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळ सुरु झाला. महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, डॉक्टर भाऊसाहेब देशपांडे सारखे मान्यवर खेळायला येऊ लागले.या सर्वांचे मार्गदर्शक होते मामा. ऊन थोड उतरलं की मामा मैदानावर यायचे. आम्ही लहानपणी कित्येक तास हा खेळ पहात असूत. बॉल बाहेर गेला की आणून द्यायचे काम आमचे. मामांमध्ये खिलाडूवृत्ती नसानसात भिनली होती. प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला हुरूप देणे व नकळत त्यांचा खेळ अधिक प्रभावी होईल ते पहाणे. तरुणांमध्ये मामा आपले वय विसरून खेळत असत. वयाच्या ७५ वर्षां पर्यंत ते हा खेळ खेळत होते.


अंबाजोगाईतील अनेक तरुण बॉल बॅडमिंटन हा खेळ राष्ट्रीय पातळीवर खेळले. सध्या तहसील मध्ये नायब तहसीलदार असणारे शंकर (राजा) बुरांडे हे अंबाजोगाईतील पहिले राष्ट्रीय खेळाडू. त्याच्या नंतर राजा चिमणगुंडे  ते अगदी माझा मित्र हर्षवर्धन जोंधळे उर्फ चम्या हे सगळे राष्ट्रीय पातळीवर खेळले. शंकर (राजा) बुरांडेनी पुढे मामांचे काम हजारी सरांच्या मदतीने चालू ठेवले.


मामाचे कुटुंब मोठे होते. ते सर्व एकाच खोलीत रहात.पहिले दोन मुल अभ्यास व झोपण्यासाठी मित्रांच्या घरी जात. नौकरीसाठी म्हणून मामा आठवडयातील सहा दिवस बाहेरगावीच असत. या सर्वामुळे उमेश वैद्य जे मामांचे तिसरे चिरंजीव आठवीत जाताच घरच्या व्यवहारिक कामाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. मामांचा पगार होता २८० रुपये त्यातील २०० रुपये ते उमेशदादाला द्यायचे. महिन्याभरचा सगळा व्यवहार त्यातून भागवावा लागायचा. लहानपणा पासूनच एक कर्तेपण उमेशदादा कडे आले होते.

मी माध्यमिक शाळेत गेल्या पासून श्रीकांतदादा व उमेशदादाचं शाखेवर येण जसे बंद झाले तसे माझे पण. पुढे त्यांचा संपर्क पण फार राहिला नाही. श्रीकांतदादा वायुदलात वैमानिक झाला व पुढे तो विंग कमांडर –ग्रुप कॅप्टनपण झाला. तो आता पण भेटला की खूप आतून आपलेपण वाटते . उमेशदादाची भेट मात्र एकदम जवळ पास वीस वर्षांनीच झाली. त्यांचा मुलगा ओंकार प्रबोधिनीच्या शिबिरात २००२ मध्ये आला, त्याच्या सोबत. सगळे मुलं त्यांना काका म्हणायची आणि त्यांच्या सोबत माझ्यासाठी पण ते उमेशदादा चे वैद्य काका झाले.


२०० रुपयात घर खर्च भागवायचा किराणा, भाज्या, कपडे, सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तस सगळं तंगीत पण व्यवस्थित भागायचे कारण कुणाचे फाजील लाड नसायचे. गरजेच्या गोष्टी तेवढ्या घेतल्या जायच्या. खरच गांधीजी म्हणतात ते खर ही वसुंधरा आपल्या सर्व गरजा पुऱ्या करू शकते परंतु हाव नाही. आज मध्यमवर्गीय घरात लाखानी पैसा येतो पण .........?


वर्षातून सर्व भावा बहिणींना दोन ड्रेस शिवायचे. पांढरा सुती सदरा व खाकी चड्डी. मामांचा खिलाडूपणा वैद्य काकान मध्ये पण आला होता. मामा बॉल बॅडमिंटन पिचवर तर काका होम पीचवर आपापले खेळ मस्त खेळत होते. मामाचा एक खाक्या होता बारावी पर्यंतच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व मुलांची त्यांची. बारावी नंतर मात्र सर्वानी स्वतः काम करून स्वतःच्या खर्चानी शिकायचे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी काकांनी योगेश्वरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १२ पास झाला म्हणून मामांनी त्यांना पहिल्यांदाच रंगीत हिरव्या रंगाचा शर्ट घेतला होता. तो नवा नवा शर्ट घालून काका महाविद्यालायाचे प्राचार्य श्री ए.सी. चौधरी यांच्या कडे फी माफीचा अर्ज घेऊन गेले.

प्राचार्य खाली मान घालून वाचत होते. फी माफीचा अर्ज काकांनी समोर केला.

अर्ज न वाचता प्राचार्यांनी त्यांच्याकडे पाहिले व विचारले काय आहे हे ?

“सर, फी माफ करण्या बद्दल विनंती अर्ज आहे.” काकांनी उत्तर दिले.

“नवे कापडे घालण्याची हौस आहे पण फिस भरण्याची ऐपत नाही का?” थोड रागातच चौधरीसर बोलले.

ते अस बोलताच काकांनी सरळ आपल्या अंगातील नवा शर्ट काढला व तो प्राचार्यांसमोर ठेवला. अगदी

बिनधास्त आणि रोखठोकपणे. मग व्हायचे ते झाले. सर प्रचंड संतापले. शांतपणे काका सगळ ऐकत होते . आज ही तोच बिनधास्त पणा काकांमध्ये पहावयास मिळतो व कधी कधी त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पण. मामांचा मुलगा म्हटल्यावर ही गोष्ट सरांनी मामानां घरी येऊन पण सांगितली. आपल्या कर्माचे धनी आपण मग सामोरे गेलं पाहिजे हे त्यांच्या वागण्यातून बऱ्याचदा दिसते.

कॉलेजची फिस काही प्रमाणात माफ झाली तरी बराच खर्च होता. शेती शाळेतील बागेतील लिंबाची बोली दरवर्षी व्हायची. काका चढ्या बोलीने ते सर्व लिंब घ्यायचे व त्यातील काही भाजी मंडीच्या बीटवर व काही मोठी लिंब घराघरात जाऊन विकायची. अनेक अनुभव यायचे मोठ्या मोठ्या लोकांचे व त्यांचे मोठे पण समजायचे. व्यवहारात माणूस चांगला ओळखता येतो हे खरे. फक्त १२ वी शिकलेल्या काकांचे व्यवहारीक जाणतेपण पहिले की आवाक होतो आम्ही. काका प्रबोधिनीच्या कामात सक्रिय झाल्या पासून प्रबोधिनीतील सगळे व्यवहार म्हणजे बाजारातील घेण्या देण्याचे हे सर्व काकांनी केले. एका नव्या पैश्याची कधी खोट खावी लागली नाही.

पहिलं वर्ष होताच काकांना टेलीफोन ऑपरेटरची नौकरी लागली. पुढ शिकण्यापेक्षा काकांना नौकरी करणे भाग होते. कुटुंबाचे आयुष्य अधिक सुसह्य करण्यासाठी ते अगत्याचे होते. दररोजची ओढाताण त्यांनी अनुभवली होती.सगळ जुळून आणतानाची तारांबळ खुपच भांबावणारी. दैनंदिन कुटंबातील व्यवहारात पूर्ण नाही पण थोडा तरी सक्रिय सहभाग कामाच्या व निर्णयांच्या बाबतीत मुलांचा असला पाहिजे का ? वर्तमानात यशस्वी होण्यासाठी व उज्वल भविष्यासाठी आपण जी त्यांची कुटुंबाच्या व्यवहारापासून नाळच तोडून टाकतो त्यामुळे ते करिअर मध्ये  यशस्वी होतीलही !  पण त्यांच्या स्वतःच्या जीवन जगण्याच्या व कौटुंबिक पातळीवर त्यानां  योग्य ते यश मिळेल का? की त्यासाठी पण आपल्याला भविष्यात “Art of adjusting and Living happy family Life” चे crash courses सुरु करावे लागतील?


नौकरी, मोठा मित्रपरिवार, कुटुंबातील जबाबदारी या सर्वांसमवेत काकांचं आयुष्य मस्त चालू होत. आता त्यांच्या आयुष्यात आगमन झाले मनीषा मधुकरराव देशपांडे, राहणार धामणगाव, शिक्षण D. Ed यांचे. त्या बीडला शिकत असताना लग्नाचा प्रस्ताव देण्यासाठी मित्राचा आधार घेऊन काका तीनदा गेले पण तिन्ही वेळा त्यानां माघार घ्यावी लागली. नेमके काका ज्या ज्या वेळी प्रस्ताव घेऊन गेले त्यावेळी मधुकरराव देशपांडेंची उपस्थिती बीडला होती. शेवटी एक बीडची मोहिम  फत्ते  झाली व हिरवा सिग्नल मिळाला. मामाना हुंडा नको पण लग्न मुलीच्या वडिलांनी करून द्यावे ही इच्छा होती. मधुकररावांच्या आठ लेकरान मधील लाडक्या शेंडेफळाच लग्न होते. त्यांच्या कडे हे घरातील शेवटचे  कार्य, चांगले करून देण्या इतपत पुंजी नव्हती. शेवटी एक महिना आधी काकानी बिनधास्त स्वभावानुसार नोंदणी कार्यालयात लग्नाची नोंदणी करून टाकली व पुढील महिना मग अनेक क्षेपणास्त्रांना नेटानी तोंड देत एकही लाल रक्ताचा थेंब न गाळता स्वतःच्या पैश्यांनी आपले हात पिवळे करून घेतले !!


३१ डिसेंबर काही कामासाठी काका अहमदनगरला गेले. काम झाल्यावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा सासरे बुवांना व सासुबाईना देण्यासाठी काकांना जवळ असलेल्या सासुरवाडीला का नाही जावे वाटणार? त्यात बाळंतपणासाठी वैद्यकाकु माहेरी गेल्या होत्या न ! एक तारखेला वैद्यसाहेबांचे धामणगावला आगमन झाले. दिवस आनंदात गेला. रात्री काकुना प्रसुती वेदना सुरु झाल्या. डॉक्टर प्रसाद रसाळ त्यांच्या घरातच राहणारे

फँमिली डॉक्टर होते. त्यांनी नाडी परीक्षा केली. थोड नाराजीतच ते भाऊनां ( काकुंचे वडील ) म्हणाले,

“भाऊ, मनीला ताबडतोब नगरला न्यावे लागेल. मी म्हणालो होतो न तुम्हाला आधीच. थोड अवघड आहे बाळंतपण”

सर्वत्र अस्वस्थता पसरली. नगरला न्यायचे तर जीप लागणार. गावात एकाकडेच जीप होती व चालक जवळच्या तांड्यावर राहायचा. काका डॉक्टर रसाळ यांच्या मोटारसायकल वर पाठी मागे बसून तांड्यावर निघाले. तांड्यावर चालकाच्या घरी पोहोंचले. तो थोड्यावेळा पूर्वीच एक मृतदेह पोचऊन आला होता येण्यासाठी त्याने असमर्थता दर्शविली. शेवटी काय करायचे ? एक मोठा यक्ष प्रश्न.
काकांचे मित्र डॉक्टर कुंभार धामणगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात होते. काकांनी डॉक्टर कुंभार यांची मदत घेण्याचा प्रस्ताव डॉक्टर रसाळ समोर ठेवला.

“हे शासकिय लोक कसली मदत करणार ?” आपल्या सारख्या लोकांना तर अजीबात नाही.” थोडया नाराजीत डॉक्टर रसाळ बोलले.

“विचारून तर पाहू नाही दिली तर दुसरा पर्याय शोधू” काका म्हणाले

शेवटी दोघही डॉक्टर कुंभारांकडे पोहोंचले. काकांनी सर्व माहिती दिली.

“मग इथच करू की डिलिव्हरी....” डॉक्टर कुंभार म्हणाले.

“तू पहिल्यांदा घरी चल, पहा आणि मग ठरऊ” काका डॉक्टर कुंभाराना म्हणाले.

सर्वजण घरी आले. काकूंची परिस्थिती पाहून डॉक्टर कुंभार यांनीपण नगरला नेण्याचा सल्ला दिला. सोबत त्यांची जीप दिली. पण जीपचा हेडलाईट काम करत नव्हता. शेवटी ऑपरेशन थेटर मधील इमर्जन्सी दिवा रस्ता दाखवायला घेऊन काकू त्यांच्या आई, काका व डॉक्टर रसाळ यांना घेऊन डॉक्टर कुंभारांच्या  चालकाने जीप नगरच्या रस्त्याला लावली.

काकूंची अवस्था नाजूक होती आणि ती अधिक बिघडत होती. रस्ता कच्चा, खूप धक्के बसत होते. कडयाच्या जवळ जीप पोहोंचली. डॉक्टर रसाळ सतत काकूंची तपासणी करत होते.

“डॉक्टर गांधींच्या रुग्णालयाकडे जीप न्या.” त्यांनी थोडया अस्वस्थतेनी आज्ञा केली.

डॉक्टर गांधीनी काकूंना गाडीतच तपासले व नगरला नेण्याचा सल्ला दिला. नगरला जाण्याशिवाय आता पर्याय नव्हता. एक दीड तासांचा अजून प्रवास. या सर्व गडबडीत डॉक्टर रसाळ त्यांचा स्टेथोस्कोप डॉक्टर गांधींच्या रुग्णालयात विसरले. आता फक्त नाडीच्या परीक्षणा शिवाय दुसरा मार्ग नव्हता.

गाडी थोडी पुढे गेली तोच काकूंना एकदम झटका आला व त्यांची शुद्ध हरपली. डॉक्टर रसाळनी जीप  थांबवायला लावली. काकांना त्यांनी बोलावले व काकूंच्या छातीवर दोन्ही हातानी जोरात दाब देऊन मसाज करायला सांगितले. काकांनी मसाज देण सुरु केल. जीप पुढे निघाली. जीप मध्ये प्रचंड अस्वस्थता होती. रस्त्याहून ऊस वाहून नेणाऱ्या बैलगाडयांची लांबच्या लांब रांग होती. साईड मिळत नसल्याने जीप खुपच धीम्या गतीने जात होती. वेळ जात होता तसे सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वेगानी पडत होते. काका मात्र न थकता  काकूंच्या चेहऱ्याकडे पाहत जोरात सर्व शक्तीने दाब देऊन त्यांच्या हृदयाला मसाज देत होते. थांबणे शक्य पण नव्हते, वेळ व अंतर कटता कटत नव्हते. साडे अकरा वाजता त्यांनी कडा सोडले व सकाळी ४.३० ला ते नगर जवळ पोहोंचले. खुपच वेळ लागला.


वेळ आली की प्रत्येक गोष्टी अवघड होऊन बसतात व प्रत्येक क्षण आपली परीक्षा पाहतो. केवळ आपल्या हातात आहे ते करता येत. मनुष्य खुपच अगतिक होतो. नियती समोर तो स्वतःला खुपच खुजा समजतो. अशी वेळ स्वतःवर आल्यावरच तिची दाहकता अनुभवते. शब्दपण तोकडे पडतात हे सर्व सांगताना. या अश्या अनुभवांचा खोल संस्कार संवेदनशील मनावर होतो व अश्या कुठल्याही परिस्थितीत कुणासाठीही मदतीला धावून जाण्याची आणि कधीकधी तर बोलावलं नसतानाही. परिस्थितीची दाहकता अनुभवलेल्या माणसाला तटस्थ राहताच येत नाही. त्याला कितीही शाररिक, मानसिक व कधी कधी आर्थिक हानी पण होते व मन विषण्ण होते मदत करून लोक त्यांच्याशी  कोत्या वृतीने जेव्हा वागतात. जर तो अश्या वेळी हरला तर नियती पण त्याला हरवते योग्य वेळी योग्य मदत न उपलब्ध करता.

काकांना  असे अनेक लोकांना मदत करण्यासाठी धावून जाताना मी पाहिलं आहे. प्रबोधिनीत असू किवा बाहेर कुठही अशी परिस्थिती असली व काकांना आपण सांगितलं की काकांची साद असते,

“हा आलोच....शून्य मिनिटात.”

खूप आधार वाटतो अश्या वाक्यांचा. भूतलावर अशी माणसे आधीच कमी त्यात आपल्यामधे दडलेल्या स्वार्थामुळे त्यांचे मन पण आपण बोथट करतो. नकळत आपल्या कडून अशी चूक घडू नये व काकां सारखे मदतीला धावून जाणाऱ्या माणसाना पण खूप शक्ती मिळावी असे हलाहल पचवण्याची.

त्यांचे मदतीचे हात हे त्यांचे नसतात
तर निर्मात्यानी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी धावून जाता येत नाही म्हणून
खूप सारे परिस्थितीचे दाहक अनुभव देऊन, तयार केलले असत त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून.

“डॉक्टर चक्रवर्तीच्या रूग्णालया कडे न्या.” इतका वेळ मनीचे मनगट आपल्या हातात पकडून नाडी पाहणारे डॉक्टर रसाळ गडबडीने म्हणाले.

रुग्णालय समोर जीप पोहोंचली. डॉक्टर चक्रवर्ती ह्या विदेशातून शिकून आलेल्या महिला डॉक्टर,विश्रांतीसाठी वरच्या मजल्यावर असलेल्या आपल्या निवासस्थानी झोपण्यासाठी गेल्या होत्या.

“डॉक्टर प्रसाद आलाय, फक्त एवढच सांगा डॉक्टरांना.” जोरातच रुग्णालयाच्या स्वागत कक्ष्यात बसलेल्या व्यक्तीला खूप अधिकारानी डॉक्टर रसाळानी आज्ञा केली.

तो करारी आवाज ऐकताच समोरचा माणूस सरळ उठला व डॉक्टर चक्रवर्तीनां सांगायला गेला. बरोबर १० मिनिटात डॉक्टर खाली आल्या. डॉक्टर प्रसाद रसाळनी असे आडलेले अनेक रुग्ण त्यांच्या कडे अनेक वेळा, वेळी अवेळी आणलेले होते. ते ही कुठलीही कट न घेता, म्हणूनच डॉक्टर चक्रवर्ती सारख्या प्रतिथयश डॉक्टरांच्या ऑपरेशन थेटर मध्ये त्यांना सहज प्रवेश असे.

काकूंना ऑपरेशन थेटर मध्ये घेण्यात आले. सर्व काही औपचारीकता पूर्ण झाल्या. आपल्याला वाटतील आर्थिक...अहो त्याचा तर विषय पण नव्हता त्या वेळी सगळ विश्वासावर व्हायचे.

सकाळी ६.१५  मिनिटांनी ओंकार साहेबांचे आगमण झाले पण त्यांनी सर्व डॉक्टरांना भंडावून सोडले.स्वारीचे आगमन मौनात झाले होते. कुठल्याही प्रकारच्या रडण्याला स्थान नव्हते. परत अस्वस्थता .....आता तर डॉक्टर चक्रवर्ती पण घाबरून गेल्या. काय करावे कुणाला सुचत नव्हते. डॉक्टर रसाळ पुढे आले आणि त्यांनी ओंकारला सरळ पाण्यानी भरलेल्या पिंपात बुडवले. नाकातोंडात पाणीजाताच स्वारी रडायला लागली व सर्वाना हायसे वाटले. काकू अजून बेशुद्धच होत्या. त्यांना अतिदक्षता विभागात हलवले व ओंकारला नवजात अर्भकाच्या दक्षता विभागात.

डॉक्टर रसाळ बाहेर आले व त्यांनी एक पुस्तक काकांना वाचायला दिले.

“वाच हे ! तुझ्या बायकोला ही समस्या होती.” इतक्या वेळ खूप ताणात असलेल्या डॉक्टर रसाळ यांना थोडं ताण मुक्त अवस्थेत असल्याचे पाहून काकांही सब कुछ ठीक असल्याची जाणीव झाली. काकूंना व ओंकारला आता भेटता येणारच नव्हतं.

काका पुस्तक वाचायला लागले.

“इक्लेमप्शीया” नावाच्या समस्येशी काकू लढत होत्या. यात गरोदर स्त्रीचा प्रसूती पूर्वीचा रक्तदाब अचानक खुपच वाढतो व त्यातच झटका येऊन ती स्त्री बेशुद्ध होते. आई बेशुद्ध झाल्याने गर्भात असलेले बाळ गुदमरून जाते. भारतात अश्या प्रकारची समस्या २००० मधील एखाद्या स्त्रीला होते व त्यातून आई व बाळाचे वाचण्याचे प्रमाण खुपच कमी. एखादी आई व बाळ वाचली तरी पुढे खुपच समस्या त्यांना येतात.

काका, जे होईल त्याला सामोरे जाण्यास तयार होते. सकाळी १०.३० ला त्यांना काकुना भेटता आले. त्या बेशुद्धच होत्या व ओंकारला ११ वाजता दुसऱ्या रुग्णालयात, तो एका बंदिस्त काचेच्या पेटीत शांत झोपला होता.
काय वाटले असेल काकांना? मला विचार पण करवत नाही.खरंतर नियती अश्या वेळी विचार करायला वेळ देत नाही एक आव्हान संपले की दुसरे आव्हान दत्त म्हणून समोर उभे राहते. प्रसुतीच्या वेळी रक्तस्त्राव खूप झाल्याने काकूंना रक्त देण्याची नितांत आवश्यकता होती. काका पुढचे आव्हान स्वीकारून कामाला लागले.


दुपारी ४.३० वाजता काकूंना शुद्ध आली. सर्वाना आनंद झाला पण त्यांना कुणालाच ओळखता येत नव्हतं. परत वेगळ संकट. पुढचे ४  दिवस त्या कुणालाच ओळखत नव्हत्या. चार  दिवसांनी त्याना थोडं थोड आठवायला लागले व ओंकारला पण आता काकूंच्या जवळ आणल. एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. काकुंचे कमरे खालील अंग प्राणहीन झालेले होते. काहीच हालचाल त्यांना करता येत नव्हती. काका व त्यांच्या आई (वहिनी) त्यांची सुश्रुषा तहानभूक विसरून करत होते. सतत नवीन संकट खूप ताण निर्माण करत होत. पैश्याची पण खूप आवश्यकता होती. काकांच्या परळीच्या मित्रांनी ते दायित्व स्वीकारले. दररोज परळीहून येणाऱ्या बसच्या चालका बरोबर ते काकांना दोन हजार रुपये पाठवायचे. त्या सर्वांच्या मूक मदतीने काका नगर सारख्या अनोळखी ठिकाणी लढत होते. शेवटी १८ दिवसांचा हा जन्म मृत्यूचा संघर्ष संपला. काकूनां रुग्णालयातून  सुट्टी मिळाली.


“कुठल्याही प्रकारच जास्त क्षमतांचे औषधे ओंकारला द्यायचे नाहीत. या सर्व प्रसंगा मुळे त्याला पुढील पाच वर्ष सतत झटके येत राहतील. बेशुद्ध होऊन काळानिळा पडेल. खूप काळजी घ्यावी लागेल. खुपच जपावे लागेल.” डॉक्टरांनी काकांना ओंकारची घ्यावयाची काळजी व्यवस्थित समजून सांगितली.
संकटातून तावूनसुलाखून  बाहेर निघाल्यावर पुढचे आयुष्य आनंदात जगण्यासाठी वैद्य परिवार सज्ज झाला पण मनातल्या एका कोपऱ्यात अस्वस्थता होती. ओंकार समोर ही जाणवू  पण द्यायची नव्हती. लाडाचा मन्या होतान तो त्यांचा!  मनाला झालेले दुःख चेहऱ्यावर कधी येऊ दयायचे नाही ही कला काका खुपच बखुबीने शिकले.

“होता है ...चलता है.” अनेक जण अस्वस्थ होऊन बोलायला लागले की काका त्याला सहज समजून सांगतात.

मामा व काकांच्या आईने ओंकारची खुपच काळजी घेतली. त्यांचा खुपच आधार होता त्यांना. स्वतःच्या मुलांचे जेवढे लाड केले नसतील तेवढे लाड मामांनी ओंकारचे केले. त्या दोघांचे खूप अतूट नाते होते. त्यांनी स्वतःहूनच ओंकारची जबाबदारी घेतली होती. ओंकार पण शांत होता पण महिन्यातून त्याला २-३ दा तरी झटके यायचे.
काका कार्यालयात गेले होते व मामा खेळण्यासाठी बाहेर गेले होते. आता ते मोठ्या घरात रहात होते. घरात काकू,काकांची आई व ओंकार होते. अचानक ओंकारला झटका आला तो काळानिळा होऊन बेशुद्ध पडला. दोघांना काय करायचे ते समजेना. काकू डॉक्टरांना कडे पळत गेल्या. तेवढ्यात  काका घरी आले. त्यांनी ओंकारची अवस्था पाहिली व सरळ त्याला उचलले व पाण्यानी भरलेल्या टिपात बुडवले. पाणी नाका तोंडात गेल्यावर ओंकार शुद्धीवर आला.

काकांच्या भाषेत,  “डॉक्टर रसाळचा हा गावठी उपाय करावा लागे”

ओंकार पाच वर्षांचा झाला व त्याला येणारे झटके थांबले. तो आता सामान्य मुलांसारखा शाळेत जाऊ पण लागला. खूप शांत स्वारी होती मनोबांची! त्यांनी पण खूप सहन केलं होत न कळत्या वयात. मामांच्या खिलाडूवृत्ती मुळे व काकांना असलेल्या होम पिचच्या अनुभवामुळे ही  ग्रीष्माची दीर्घकाळाची धग वैद्य कुटुंब न होरपळून जाता तेजस्वी होऊन बाहेर पडले. वडीलधाऱ्या मंडळींचे घरात असणे खुपदा असे धक्यात शॉकअब्सोर्बर सारखे असते पण त्याची किंमत खुपदा आमच्या सारख्या खुपच सुखात वाढलेल्यांना कळत नाही व ते आमच्या सुखी संसारातील अडगळ बनायला लागतात. तर वडीलधाऱ्या मंडळींनां नव्या उभारणाऱ्या संसारात आपल्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे लढ म्हणण्याची शक्ती द्यायची असते पण आधारा ऐवजी  आपल्या अस्वस्थतेचे शॉक जर ते देत राहिले तर सुंदर संसाराचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही. वैद्य कुटुंबात संघर्ष अजिबातच नव्हता असे नाही पण घरातील सर्व  लोकांना एकमेकांचे महत्व माहित होते म्हणून शेवट पर्यंत आजोबाचे प्रेम ओंकार अनुभऊ शकला तर काका व काकूंची अगदी आतून केलेल्या सेवेनी मामांचे आयुष्यातील फाल्गुन,कुटुंबातील सर्वांबरोबर  आल्हाददायक झाला. एक खात्रीचा व हक्काचा आधार मामांच्या रुपाने काका व काकूंना मिळत राहिला. हे सर्व कुठल्या मॉल मध्ये नाही मिळत.


ओंकार शाळेत जाऊ लागला तसे काकूनी पण शाळेत जाण्यास सुरुवात केली. त्या हाडाच्या शिक्षक. मुलांबद्दल प्रचंड आस्था. ओंकार पण त्यांच्या तालमीत घडत होता. खुपच छान भाषण करायचा. अगदी आकाशवाणीच्या लहान मुलांच्या कार्यक्रमात त्याचे भाषण झाले होते. अनेक स्पर्धेत यश मिळवायचा. प्रबोधिनीतील लहान मुलांच्या संचयनीचे उदघाटन करण्यासाठी ऋषीतुल्य नानाजी देशमुख आले होते. त्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन ओंकारनी केले होते. त्यावेळी तो ४ थीत होता. याचं खरं श्रेय होत काकूंना. त्या खूप सुंदर लिहून द्यायच्या. ओंकारच्या उमलत्या वयात काकुंचे संवेदनशील संस्कार झाले. खुपच कमी पण हळूवार व नम्रपणे सर्वांशी ओंकार बोलायचा.


बजाज एम ८० वर ओंकार,काका व काकू यांना अनेक वेळा जाताना पहिले. ओंकारला घेऊन काका पहिल्यांदा प्रबोधिनीत घेऊन आले ते शिबिरासाठी आणि ओंकार प्रबोधिनीत रमू लागला. काकांनी आता त्याचा हात माझ्या हातात दिला होता. २० वर्षांपूर्वी  माझा हात काकांच्या हातात होता. आम्ही दोघांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. माझ्या येवढा ओंकार उपद्व्यापी कार्टा नव्हता. २० वर्षां पूर्वी ज्यांना मी दादा म्हणायचो ते काका आज त्यांच्या मोठेपणा मुळे मला दादा म्हणतात.


प्रबोधिनीतील मुक्त विद्या केंद्रात ओंकार चांगलाच रमला. फक्त २५-३० मुलं त्यावेळी होते. संगणक प्रशिक्षण, वाचनालय, संध्याकाळची उपासना व क्रीडादल,गीतासंथा वर्ग अश्या अनेक उपक्रमात तो सहभागी होत होता. त्याला अभिव्यक्त होण्याला चांगले व्यासपीठ मिळत होते. त्याने केलेली एक छोटी कविता आजही वाचली की कौतुक वाटते.

असे अंगी सगुण हे, त्यावरून तो विजय मेळवे.
याच गुणांच्या तू आधारे, झेप घे झेप घे  १
जोपास या गुणांना रे, वाढव या गुणांना रे
वाढव आपली शान रे, तू याच गुणांच्या आधारे   २
याच गुणामुळे तुला रे, शाब्बासकी मिळेल मोठ्यांची रे
तू त्यांच्या आशिर्वादमुळे रे मोठा हो मोठा हो  ३


काका व काकू त्याला संध्याकाळी उपासने नंतर आपल्या एम ८० वर न्यायला यायचे. रस्त्यावर बऱ्याच वेळ मग आम्ही गप्पा मारायचोत. काका मध्येच कधीतरी आपला हात समोर करून म्हणायचे, “ या हाताला काम द्या.” त्यांच्या म्हणण्याची पद्धत इतकी विनोदी होती की मला खूप हसू यायचे. ओंकार मुळे हळूहळू काका व काकू पण उपासनेला येऊ लागले.

७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ओंकार व त्याच्या बरोबर स्वयंअभ्यास करणारे प्रणव, अरविंद, चंद्रशेखर हे सर्व मित्र गुणवत्तेनी पास झाले. तालुक्याच्या गुणवत्ता यादीत त्यांचे नाव झळकले. वि. र. जोशी सर ज्यांनी मला ७ वीला शिकवले व ज्यांच्या सर्वात जास्त आधाराने व मदतीने मी अंबाजोगाईत प्रबोधिनीचे काम करू शकलो. त्यांचे मार्गदर्शन या सर्वाना मिळाले. ७ वी शिष्यवृत्ती ८,९ MTS १० ची NTSE परीक्षेत एक नवा आदर्श जोशी सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही रूढ करू शकलो. पुढे तर मराठवाड्यात पण मोठ्या संख्येनी मुलांनी यशस्वी व्हावे यासाठीचे  यशस्वी प्रयत्न प्रबोधीनीच्या माध्यमातून केले.

फक्त शिष्यवृत्तीच नाही तर स्वयंपाक करण्याचे शिबीर पण आम्ही घ्यायचोत. सर्व मुल ४-५ दिवस राहण्यासाठी माझ्या घरी म्हणजेच प्रबोधिनीत यायचे. मग आम्ही बाजारात जाऊन भाजीपाला व इतर सामान घेऊन येत असू.भाजी निवडणे, कांदा कापणे, फोडणी देणे, कुकर लावणे, पुऱ्या तळणे असे अनेक अनुभव मी व माझ्या सोबतची १०-१२ मुलं घ्यायची. आपणच तयार केलेले, कच्चे, करपलेले आम्ही आनंदात खायचो. या काळात आम्हाला कळले काका एक उत्कृष्ट स्वयंपाकी आहेत. त्यांनी शिबिरात केलेली पावभाजी आम्ही ताव मारून संपवली होती. काकांना कितीही माणसांचा आणि कुठलाही स्वयंपाक सहज करता येतो. BSNL मधील cash counter वर नोटा मोजताना त्यांचे हात ज्या सफाईने फिरतात, तेवढ्याच सफाईने २०० जणांचे भजे प्रबोधिनीत करताना त्यांच्या हातातील झाऱ्या तेलाच्या कढईत फिरतो. अनेक पक्वान्न ते खूप प्रेमाने नियमित पणे सर्वाना करून खाऊ घालत.  अश्या अनेक पंगतींचा अनुभव आम्ही घेतला आहे. अगदी पिठलं भात ते कोजागिरीचे खास दुध.


प्रबोधिनीत दर वर्षी गणपती बसायचा. मुलं व माझ्या कुवतीनुसार सर्व चाले. या वर्षी ढोल-बर्ची पथक बसवण्याचा विचार होता. ढोल प्रशिक्षणासाठी पुणे युवक विभागाचा मार्गदर्शक ढोल घेऊन आम्हाला शिकवायला आला. सर्वात पहिल्यांदा ढोल शिकले काका. आम्हाला काही जमता जमत नव्हता. त्यावेळी काकांना प्रबोधिनीच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व मुलांनी केले. खूप नवीन कल्पना या वेळी राबवल्या. “उद्याचा भारत” या विषयावर अनेक विचारप्रणालीचे कार्यकर्ते, विविध धर्माचे धर्मगुरु व विविध संघटना व संस्थाचे प्रमुख लोकांचे व्याख्याने प्रबोधिनीत ९ दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले. अनंतचतुर्दशीला विसर्जनाच्या मिरवणुकीत काका व मी ढोल वाजवत होतो. मध्येच एक ढोल फुटला मग एका बाजूचा ताशा करून आम्ही गणरायाचा निरोप घेतला.


गणेशोत्सव संपला व वैद्य कुटुंब प्रबोधिनीचे कुटुंब झाले. अमोल पाटणकर निवासी पूर्ण वेळ कार्यकर्ता त्याचे तर वैद्य काका व काकू पालकच होते. सर्व मुलं क्रिकेटचा सामना मामांबरोबर पाहायचे. सामना जिंकल्यावर मामांकडून आईस्क्रीम,भेळ,चिवडा यांचा पण आस्वाद घेतला जायचा. दिवसा काका काकू बाहेर असले तरी मामांबरोबर अर्ध्याच्या आसपास प्रबोधिनीचे मुलं ओंकार निवासात मस्त संवाद साधत सामना पहात असत. ७८ वर्षांच्या मामांचा उत्साह तर मुलांच्या वरचा.


ओंकार, काका व मामा प्रबोधिनीत सक्रिय झाल्यावर मग काकू कश्या मागे राहणार? त्यांनी १ली  ते ४ थीच्या मुलांसाठी दर रविवारी आनंदगट सुरु केला. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, “ प्रथम वाटले होते, की रविवारी असल्यामुळे मुलं यायला कंटाळा करतील. पण छे ! दूरदर्शनलाही बाजूला सारून मुलं आनंद गटाला येऊ लागले आणि परीक्षेच्या काळात पण. परीक्षेच्या काळात अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषे सारखे कार्यक्रम घेतले. त्यामुळे परीक्षेची तयारी झाली पण आनंदात.”


काकू खूप कल्पक शिक्षक आहेत व खुपच उपक्रमशील असल्याने थोडयाच काळात आनंदगटात येणाऱ्यांची संख्या वाढली. आनंद गट,मग ४ थी शिष्यवृत्ती व नंतर ७ वी शिष्यवृत्ती व ८ वीच्या मुलींचा विद्याव्रत संस्कार अश्या अनेक उपक्रमात काकूंचा सक्रिय सहभाग वाढत गेला.

लहान मुलांसमोर गोष्टीशिवाय सोडलंतर काकू कधीही एखादा विषय घेऊन बोलल्या नव्हत्या. त्यांनी त्यांचे पहिले अभ्यास पूर्ण भाषण प्रबोधिनीत केले तर काकांनी रजेच्या अर्जा शिवाय कुठलेही लेखन केले नव्हते पण अमोलच्या आग्रहाने त्यांना प्रबोधिनीच्या दुसऱ्या कार्यवृत्तात “श्रमदान” नावाचा छोटा लेख तर “मु.पो,वाघाळा” हा मोठा लेख लिहून घेतला.

रविवारचे वाघाळा गावासाठी काम, विवेकवाडी प्रकल्पासाठी सकाळ, संध्याकाळी व गरज पडल्यास मध्यरात्री अगदी शून्य मिनिटात ते उपस्थित असायचे. सरपंच सहली  मध्ये तर सर्व व्यवस्थांची तयारी  काकांनी केली होती.

ओंकार ७ वी तून पुढे जात जात १२ वी ला गेला. प्रबोधिनीत त्याच्या मित्रांचा खुपच घट्ट मैत्रीचा गट बनला होता. कुठही ते बरोबरच असायचे.

कुठलाही संघटक ज्यावेळी संघटनेचे काम सुरु करतो तेव्हा त्याने एक हक्काची मदत मिळवणारे स्थान शोधले पाहिजे असे आ. एकनाथजींनी लिहिलेल्या “सेवा साधना” या पुस्तकाचा अभ्यास करताना अनेकदा वाचले होते ते कसे असावे यावर अनेक बुद्धीला ताण देऊन गटचर्चा आम्ही केल्या होत्या. अश्या हक्काच्या मदतीचा अनुभव प्रत्येक्ष घेता आला ते अंबाजोगाईत. वैद्य कुटुंब हे प्रबोधिनीचे हक्काच्या मदतीचे स्थान आहे. असा एकही कार्यक्रम, उपक्रम, सोहळा नाही की ज्यात संपूर्ण वैद्य कुटुंबाचा सहभाग नाही असे फारच क्वचित वेळा झाले असेल.

ओंकारची बारावी सुरु झाली होती. मामांच्या गुडघ्याचे दुखण्याने  त्यांच्या फिरण्यावर बंदी आणली होती. त्यात त्यांना हर्नियाचा त्रास सुरु झाला. ऑपरेशन लातूरला झाले. काकांच्या मोठया भावाकडे ते होते. लातूरला जाणेयेणे ही वाढले. आज रविवार होता.ओंकारला नवीन sack घ्यायची होती म्हणून काकाना त्याने फोन केला. काकांनी त्यास बोलाऊन घेतले. काकांचे मित्र पुजारी पण त्यांच्या सोबत होत. Sack घेतल्यावर ओंकार स्कुटी वर निघाला काका पाठीमागून पुजारींसोबत चालत येणार होते. खूप पाऊस पडल्यामुळे भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचा त्यांचा मूड होता. शेंगा खात खात काका पुजारीकाकां बरोबर निघाले. खूप दिवसांनी असे रमत गमत ते निघाले होते. गप्पाही रंगत होत्या. थोडया वेळानी फोन वाजला.

“ओंकारचा accident झाला तुम्ही लवकर घरी या.” काकूंचा फोन होता.

काका त्वरित घरी निघाले.

ओंकार गाडी चालवत मोहन टॅाकीजजवळ आला होता.तिथे पाण्यानी भरलेला एक खड्डा होता. त्याला तो पाण्यानी भरला असल्याने समजला नाही. गाडीपण थोडी वेगात होती. गाडी खड्यात जाताच, ओंकारचा तिच्यावरील ताबा सुटला. ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याने एक्सिलेटर वाढवले. गाडी वेगाने उसळली व तिने दिशा बदलली. खूप वेगात ती जागच्या जागी फिरली व ओंकारचा पाय धाडकन जवळच्या विद्युत खांबाला लागला. तोच उलट्या दिशेनी गाडी फिरली. ३६० अंशाच्या कोनातून व परत त्याचा पाय विद्युत खांबाला धडकला व तो खाली पडला. जवळच साखरे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी त्याला नाव विचारले.

“ओंकार वैद्य.” ओंकारनी सांगितले.

“उमेशचा का ?” साखरेनी विचारले.

“हो ....पण मला घरी न्या आधी.” ओंकार त्यांना म्हणाला.

साखरेनी ओंकारला रिक्षात टाकले व घरी नेले. काकू घरीच होत्या. त्यांनी काकांना व आमच्या सर्वांनाच फॅमिली डॉक्टर अतुलला फोन केला. कार घेऊन अतुल पोह्चला व काकापण. पाहताक्षणी फोन फ्रयाक्चर असल्याचे लक्षात आले .

अतुल व काकांनी ओंकारला गाडीत घातले आणि रुग्णालयात निघाले. आज नेमका रविवार होता व अंबाजोगाईतील सर्व डॉक्टरांची दवाखाने बंद होती. शेवटी लातूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. वेदना शामक इंजेक्शन अतुलने ओंकारला गाडीतच दिले व ते लातूरला निघाले. रक्त पण खूप वाहत होते.काकांनी ओंकारचा पाय घट्ट धरून ठेवला होता.

मला डॉक्टर भाऊसाहेब देशपांडे व डॉक्टर काळेनी घडलेला प्रकार सांगितला. काकांना फोन लावताच कळले ते लातूरला निघाले आहेत. विवेकानंद रुग्णालयाच्या अपघात विभागात ओंकारला घेऊन जात होते. अभिजीत प्रबोधिनीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता लातूरला आपल्या घरी व तेथून औरंगाबादला जात होता. माझा फोन जाताच तो गाडीतून उतरला व सरळ रुग्णालयात गेला. कागद पत्राचे काम त्यांनी पूर्ण केले. तोपर्यंत काका व अतुल ओंकारला घेऊन पोहोंचले. अनेक ठिकाणी जखमा व हाडांना इजा झाली होती. प्राथमिक उपचार झाले. ऑपरेशन करावे लागणार होते. उपचारासाठी त्याला ५२ दिवस रुग्णालयात ठेवावे लागले. काकू व काकांनी ओंकारची खुपच काळजी घेतली त्याला बरे होण्यासाठी सहामहिने तरी लागणार होते. त्याच्या बारावीच्या परीक्षेचे काय होणार? खूप अस्वस्थ असायचा तो पण त्याने धीराने सर्वाला तोंड दिले. त्याच्या मित्रांनी खुपच मोलाची साथ दिली.


ओंकार परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला पण काकांची व काकूंची परीक्षा अजून चालूच होती. मामांची तब्येत वरचेवर ढासळत चालली होती. काका अनेक आघाड्यांवर लढत होते. ते उत्कृष्ट परिचारक झाले होते.खूप आस्थेनी व आपुलकीने ते मामांची सेवा करत होते.

ओंकारनी अंबाजोगाईतच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तो त्या वर्षीच्या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. मामा खूप आजारी असतानाही अनंतचतुर्दशीच्या आरतीला आले. त्यांच्या हस्ते आरती झाली. मामांची ती शेवटची प्रबोधिनीची भेट. त्यानंतर त्यांना देवाज्ञा झाली. काका,काकू त्या पेक्षाही ओंकारला खूप मोठी पोकळी जाणवत होती.

सर्व संकटाना सामोरे जाण्याचे व त्यातून तावूनसुलाखून निघायची सवय वैद्य कुटुंबियांना झाली होती. मी पण एका मोठ्या आजारातून बाहेर पडलो होतो. काका व मी दररोज संध्याकाळी ४ किलोमीटर फिरायला जायचो. मी प्रबोधिनीची पहिली प्रतिज्ञा पुण्यात घेतली पण दुसरी मात्र अंबाजोगाईत घ्यावी अशी इच्छा माझी व प्रबोधिनीच्या आ. संचालकांची होती. ओंकार, काकू व काकांनी म्हणजे संपूर्ण कुटुंबांनी प्रबोधिनीची  पहिली राष्ट्रसेवेची प्रतिज्ञा घेतली. मी ज्यावेळी तिसरी प्रतिज्ञा घेतली त्यावेळी पण सोबत दुसरी प्रतिज्ञा घेणारे एक काका होते.

२००८ च्या सप्टेंबर मध्ये मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी  इच्छा होती लग्न प्रबोधिनीच्या पद्धतीने व अंबाजोगाईतीलच कुणी तरी त्याचे पौराहित्य करावे.अंबाजोगाईत अश्या प्रकारे लग्न आधी कधी लागले नव्हते त्यामुळे पौराहित्य करणारे साहजिकच कुणी नव्हते. माझ्या समोर हे करण्यासाठी उभ्या राहिल्या त्या वैद्य काकू. केवळ ४-५ दिवसांची तयारी करण्यासाठीचा वेळ होता. काकुनी खूप तयारी करून, मस्तच पौराहित्य मोठया अधिकारवाणीने केले. काकांनी त्यांना तत्परतेनी सहाय्य केलं. अंबाजोगाईत महिला पुरोहित म्हणून लग्न लावणाऱ्या त्या पहिल्याच होत्या.    

ओंकार महाविद्यालयात चांगलाच रमला होता.पुढील सातही  सत्रांमध्ये महाविद्यालयात पहिल्या पाचात होता. महाविद्यालयाचे शेवटच्या सत्राची परीक्षा देऊन झाल्यावर त्याच्याशी पुढील १० वर्षाच्या त्याच्या स्वतःच्या नियोजनाबद्दल आमची साधक बाधक चर्चा झाली. पुढील काही संगणकाच्या सॉफ्टवेअरचा अभ्यास करण्यासाठी तो पुण्याला गेला. त्याचे प्रयत्न पण आता योग्य दिशेनी चालू होते. शेवटच्या सत्राचा निकाल लागण्याच्या आधीच त्याची  एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड पण झाली. सगळे जण खूप आनंदात होते. परत त्याचे मित्र व तो एकत्र पुण्याला आले होते. निकालानंतर प्रशिक्षणासाठी निवड करण्याचे  कंपनीचे पत्र पण त्याला मिळाले. निकाल लागला व ओंकार चक्क एका विषयात नापास झाला होता. एक फारच मोठा धक्का होता. कधीही आणि कुठल्याच आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचा क्लास पण चुकला नव्हता. आता चक्क नापासच. ओंकारने गुण पाहिले व तो म्हणाला,  “येवढे तर मार्क्स मला एका पेपरमध्ये  पडायला पाहिजेत. माझ्या दुसऱ्या पेपरचे मार्क्स यात धरले नाहीत किवा माझा एक पेपर तपासला नाही.”
तो खूप अस्वस्थ होता पण त्याबरोबरच त्याला विश्वास पण होता हे मार्क चुकीने आलेले आहेत. आपल्या शिक्षण पध्दतीत अश्या अनेक गडबडी होताना आपण पाहतो पण नेमकी ती आपल्या बाबतीत घडली की मग तोंडचे पाणी पळते. परत ज्यापद्धतीने याची पडताळणी होते तीही वेळखाऊ व तापदायक प्रक्रिया असते. यामुळे किती तरी मुलांचे आयुष्य उध्वस्त होताना आपण पाहतो.


काका, अंबाजोगाईच्या प्रामाणिकपणे काम करणारे व अश्या वेळ प्रसंगी धावून जाणारे विद्यापीठ प्रतिनिधी अविनाश लोमटे बरोबर विद्यापीठात गेले. ओंकारचे म्हणणे खरे ठरले. त्याच्या एका पेपरचे गुण धरलेच नव्हते. योग्य तो बदल करून गुण पत्रिका मिळाली. ओंकार आता पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
काकानी आता पन्नाशी गाठली तरी ते अजून तरुण आहेत. ते नेहमी म्हणतात, “माझ्या समोर आदर्श आहे मामांचा. आता मला मामांसारखे जगायचे आहे.” आपल्या अवती भवती अगदी कुटुंबातही आपण इतरांसाठी आदर्श ठरू शकतो. माझ्या सारख्या माणसाला मामांपेक्षा काका भावत असतीलही पण ओंकारला मात्र काका, काकू व मामांचे खूप छान आदर्श आहेत. अस आपले आयुष्य आपल्या कृतीतून एकमेकाला आदर्श करून वैद्य कुटुंबाने प्रबोध कुटुंबाचा आदर्श मात्र आम्हा सर्वांसमोर ठेवला.


माझ्या इस्त्रायल दौऱ्याची तयारी काकानी माझ्या एवढीच केली होती. व्हिसा मिळण्यासाठी तातडीने १ लक्ष रुपये भरायचे काम बँकेची वेळ अगदी संपलेली असताना व मी अंबाजोगाईत नसताना बिपिन क्षीरसागर व काकांनी अगदी तातडीने केले होते. इस्त्रायल दौरा झाल्यावर मी अंबाजोगाईत आलो व मला थोडे राजकारणाचे वेध लागले. मी एका राष्ट्रीय पक्षाचे  महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रोनिक्स व मिडिया विंगचा प्रमुख म्हणून काम करायचे हे पक्षाच्या प्रमुखाशी बोलून निश्चित झाले होते. मुंबईतून परळीला येणाऱ्या ट्रेन मध्ये बसलो. मोठ काम होत.बर्थ वर पहुडलो व अंबाजोगाईतील गेल्या काही वर्षांच्या प्रबोधिनीच्या कामाचा पट डोळ्यासमोरून पुढे जात होता. काका काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हते. या सर्व लोकांनी तन,मन आणि धनानी केलेले काम डोळ्यासमोर येत होते. त्यांच्यामुळे कुणालाही माहित नसलेला माणूस आज प्रसाददादा चिक्षे म्हणून लोकांना माहित झाला होता. आता त्या सर्वांना सोडून वेगळ्या वाटेनी फक्त आपला विचार करून मोठे व्हायचा मार्ग धरायचा? प्रबोधिनीसाठी स्वतः मध्ये प्रचंड बदल करणारे काका सतत दिसत होते. त्यांनी अनेक मोठे व आनंदी राहण्याचे मार्ग सोडून प्रबोधिनीचा मार्ग धरला होता. सावलीसारखे ते सतत बरोबर होते. किती स्वार्थी झालो होतो मी? गाडी परळीला पोहचली.

 मी रात्र भर स्वतःशी झगडत होतो. परळीत उतरलो व मुंबईत जाण्याचा विचार पूर्णतः बाद करून अंबाजोगाईच्या बसमध्ये बसलो व शांत झोपी गेलो..........