गुरुवार, १२ मार्च, २०२६

जिथे तत्त्वज्ञान कृतीत उतरते....असे प्रबोधक कुटुंब !!!

 


 प्रबोधक कुटुंब !!!



आयुष्याच्या प्रवासात काही माणसं आपल्याला अगदी अचानक भेटतात. ती का भेटली, हे सुरुवातीला कदाचित समजत नाही; पण पुढे जाऊन तीच माणसं आपल्या आयुष्याचा भक्कम आधार बनतात. जेव्हा समोर अनेक प्रश्न उभे असतात, तेव्हा ही माणसं एखाद्या पहाडासारखी आपल्या पाठीशी उभी राहतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात.

माझा स्वभाव तसा मुक्तपणे जगण्याचा. माणसांत मिसळणं, गप्पा मारणं आणि आनंदाने काम करणं ही माझी वृत्ती. भगवद्गीतेतील 'जो न लोकांसे लोक न कंटाळती तया' या ओळीप्रमाणे जगण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. विवेकानंद केंद्राच्या 'अरुण ज्योती' प्रकल्पामध्ये मी माझ्या ध्येयधुंदीत काम करत होतो. तिथे काम करताना मला खूप समाधान मिळत होतं.

पण अचानक एक दिवस दिब्रुगडहून फोन आला आणि मला तातडीने तिथे बोलावण्यात आले. खरं सांगायचं तर, मी बदलायला चटकन तयार होणारा माणूस नाही. माझ्यात थोडं 'जडत्व' आहे; मी सहजासहजी आपली जागा सोडत नाही. त्यामुळे मी लगेच गेलो नाही. पण जेव्हा गेलो, तेव्हा मला सांगण्यात आलं की, आता मला संघटनात्मक काम सोडून विवेकानंद केंद्राच्या 'औपचारिक शिक्षण' विभागात एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळायची आहे. त्यासाठी मला अरुणाचलच्या दापोरिजो या छोट्याशा गावातून दिब्रुगडला शिफ्ट व्हायचे होते.

मला ते काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी निवेदिता दीदींना स्पष्टपणे 'नाही' म्हणून सांगितलं. पण पुढे झारखंडमधील एका शिबिरात दीदी पुन्हा भेटल्या. त्यांनी मला प्रेमाने समजावलं आणि म्हणाल्या, "तू एकदा पुण्याला जाऊन आपल्या संस्थेतील ज्येष्ठांचा सल्ला घे, त्यांचा तुझ्यावर खूप जीव आहे."

दीदींचा शब्द मानून मी पुण्याला आलो. तिथे गिरीशराव आणि विवेक सरांना भेटलो. त्यांनी मला एकच सल्ला दिला— "तू एकदा विवेक पोंक्षे सरांना भेट."

त्यावेळी मला पोंक्षे सरांबद्दल फारशी माहिती नव्हती. ते शिक्षण क्षेत्रात काय काम करतात किंवा त्यांनी अरुणाचलमध्ये काय योगदान दिलं आहे, याची मला कल्पना नव्हती. पण जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा पुढचे तीन-चार दिवस मी त्यांच्याच सहवासात होतो.

आमच्या त्या भेटी इतक्या प्रदीर्घ होत्या की, दिवसातील जवळपास १८-१८ तास आम्ही एकत्र असायचो. मी त्यांच्या घरी राहिलो, त्यांच्यासोबत जेवण केलं आणि तासनतास गप्पा मारल्या. सर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी बोलायचे आणि पुन्हा माझ्याशी संवाद साधायचे. त्या तीन दिवसांत त्यांनी मला शिक्षणाचे महत्त्व आणि या कामाची खोली इतक्या सहजपणे पटवून दिली की, माझ्या मनातील सर्व संभ्रम दूर झाले.

ज्या कामाला मी सुरुवातीला नकार दिला होता, त्याच कामाचा आवाका मला आता समजू लागला होता. पोंक्षे सरांच्या विचारांनी आणि त्यांच्या साध्या-सरळ स्वभावाने मी इतका प्रभावित झालो की, मी माझा निर्णय बदलला. तिथूनच माझ्या एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली— मी आनंदाने 'शिक्षणाधिकारी' होण्याचे ठरवले.

जीवनाच्या प्रवासात अनेक माणसे भेटतात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या केवळ मार्ग दाखवत नाहीत, तर त्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्यही देतात. माझ्या आयुष्यात पोंक्षेसर हे अशाच एका 'श्रीकृष्णा'च्या भूमिकेत आले, ज्यांनी मला माझ्या 'कुरुक्षेत्रा'ची ओळख करून दिली.

 

एका संघटकाच्या वृत्तीने जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी औपचारिक शिक्षण क्षेत्र आणि त्यातही प्रशासकीय (Administration) जबाबदारी स्वीकारणे तसे जीवावर आलेले काम होते. पण पोंक्षे  सरांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांनी मला केवळ जबाबदारी दिली नाही, तर ती पेलण्यासाठी लागणारे 'साहित्य' आणि 'आयुधं' देऊन सज्ज केले. शिक्षण विस्तार अधिकारी (Education Officer) म्हणून काम करताना जेव्हा जेव्हा मी गोंधळलो, तेव्हा पोंक्षे  सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खऱ्या अर्थाने ते माझे 'श्रीकृष्ण' झाले आणि हे प्रशासकीय काम माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव ठरले.

 

'फिलॉसॉफी इन ॲक्शन': शब्दांपलीकडचे शिक्षण

 

सरांचे माझ्यावर असलेले प्रेम केवळ कामापुरते मर्यादित नव्हते. एकदा केवळ मला भेटण्यासाठी पोंक्षे सरांनी आपला मार्ग बदलला आणि ते दिब्रूगडला आले. त्या काही क्षणांच्या भेटीने मला जी ऊर्जा दिली, ती शब्दातीत होती. पुढे गुवाहाटीतील शिक्षकांच्या शिबिरात त्यांच्याकडून मला 'ज्ञान प्रबोधिनी'ची खरी शैक्षणिक भूमिका आणि तत्वज्ञान समजले. ज्याला आपण 'Philosophy in Action' म्हणतो, त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे पोंक्षेसर होते.

अरुणाचलमधील कामाचा अनुभव घेऊन जेव्हा मी परतलो, तेव्हा ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाईचे काम सुरू करण्याचा विचार झाला. या नव्या वाटेवर चालताना विवेक कुलकर्णी सर आणि पोंक्षेसरांनी माझा हात घट्ट धरून ठेवला. नियोजनातील बारकाव्यांपासून ते मनात येणाऱ्या शंका-कुशंकांचे निरसन करण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांचे भक्कम पाठबळ मला लाभले.

पोंक्षे सरांच्या घराशी निर्माण झालेला ऋणानुबंध हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आहे. बागेश्री ताई आणि पोंक्षेसरांचे ते घर केवळ एक वास्तू नव्हती, तर तो प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांसाठी एक 'ठेपा' (आधारवड) होता. पुण्यात आल्यावर ईशान्य भारतातील (North-East) प्रत्येक व्यक्तीसाठी आणि माझ्यासाठी ते 'दुसरे घर' झाले होते. जेवतानां रंगणाऱ्या गप्पांपासून ते तत्वज्ञानाच्या सखोल चर्चेपर्यंत, त्या घरात मला जे संस्कार मिळाले, त्यातूनच एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला.

'प्रबोधक कुटुंब'

पोंक्षे सरांच्या कुटुंबाकडे पाहून माझ्या मनात एक विचार पक्का झाला—'प्रबोधक कुटुंब'. प्रबोधिनीच्या इतर कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा जास्त वेळ सुरवातील मी सरांसोबत घालवला असेल. त्यांच्यासोबत जेवलो, खूप गप्पा मारल्या, अनेकदा आमचे वाद झाले, अगदी भांडणेही झाली; पण त्यातून नाते अधिकच दृढ होत गेले.

आज जेव्हा मी माझ्या अंबाजोगाईच्या घराचा विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पोंक्षे  सरांच्या घराची प्रतिमा असते. माझे घरही तसेच असावे—जिथे तत्वज्ञान कृतीत उतरते आणि जिथे येणाऱ्या प्रत्येकाला ते आपले स्वतःचे घर वाटते. पोंक्षे कुटुंबांनी दिलेली ही 'प्रबोधक कुटुंबा'ची संकल्पना आता माझ्या आयुष्याचे खास बनली आहे.

 

विवेक पोंक्षे सरांच्या बालपणाची ही गोष्ट म्हणजे एका सुसंस्कृत, ध्येयवादी आणि प्रेमळ कुटुंबाचा सुंदर प्रवास आहे. त्यांच्या घराण्याची मुळे सांगलीत रुजलेली. त्यांचे आजोबा सांगलीच्या म्युनिसिपालिटी शाळेत शिक्षक होते. तिथूनच त्यांच्या घरात शिक्षणाचा आणि संस्कारांचा वारसा सुरू झाला. सरांचे वडील, म्हणजेच अण्णा, आधी पुण्याच्या हिंदी हायस्कूलमध्ये सायकलवरून जाऊन शिकवायचे. रास्ता पेठेतील एका छोट्या खोलीत त्यांचा संसार सुरू झाला, पण नशिबाने त्यांना धुळ्याच्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून संधी दिली आणि हे कुटुंब खान्देशात स्थायिक झाले.

 

त्या काळात सासूबाईंना वाटायचे की आपले नातेसंबंध पुण्यातच असावेत, पण कर्तव्यापोटी त्यांनी धुळ्याचा स्वीकार केला. पोंक्षे कुटुंबाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे विशाल मन. घरात दोन भाऊ आणि पाच बहिणी असा मोठा गोतावळा होता.

 

अण्णांच्या पगारात मोठ्या कुटुंबाची ओढताण होऊ नये आणि सांगलीच्या घरीही मदत करता यावी, या उदात्त हेतूने सरांच्या आईंनी स्वतः शिकण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आणि मुले लहान असताना त्यांनी बीएड आणि मग एमएड पूर्ण केले. त्यांचा एमएडचा विषय 'आचार्य अत्रे' हा होता. जेव्हा त्या अभ्यास करायच्या, तेव्हा विवेक सर खूप लहान होते. धाकटा भाऊ तर जेमतेम सहा महिन्यांचा होता. अशा परिस्थितीत आईंनी जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांच्या त्या अभ्यासाचा नकळत परिणाम सरांवर होत गेला.

 

घरात पुस्तकांचा जणू खजिनाच होता. आईंच्या अभ्यासामुळे अत्रेंची पुस्तके घरात असायचीच, पण अण्णांनीही मुलांच्या वैचारिक जडणघडणीसाठी एक अभिनव पद्धत शोधली होती. ते बीएड कॉलेजमधील अनेक नामांकित नियतकालिके आणि 'नॅशनल जिओग्राफिक' सारखी जागतिक दर्जाची पुस्तके वाचून झाल्यानंतर घरी आणायचे. चार-पाच दिवस ती पुस्तके घरी असायची. विवेक सर तेव्हा खूप लहान होते, त्यांना इंग्रजी कळत नसे, पण अण्णा आवर्जून सांगायचे की, 'अरे, वाचता नाही आले तरी चालेल, पण यातील चित्रे तरी बघ.'

 

चित्रे पाहता पाहता जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी सरांना मिळत गेली. घरातल्या त्या समृद्ध ग्रंथालयाने आणि आई-वडिलांच्या कष्टाने सरांचे बालपण अक्षरशः फुलून गेले. एका बाजूला अत्रेंचे विनोद आणि साहित्य, तर दुसऱ्या बाजूला विज्ञानाची आणि जगाची ओळख करून देणारी आंतरराष्ट्रीय मासिके, अशा वातावरणात 'विवेक' नावाच्या एका समृद्ध व्यक्तिमत्वाची जडणघडण होत होती. आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जो सखोलपणा दिसतो, त्याचे मूळ धुळ्याच्या त्या पुस्तकप्रेमी घरात दडलेले आहे.

 

 

जिज्ञासेचा प्रवास: वर्तमानपत्रे, विश्लेषण आणि अफाट स्मरणशक्ती

विवेक पोंक्षे सरांच्या जडणघडणीत त्यांच्या घराइतकाच वाटा त्यांच्या शेजारचाही होता. धुळ्याला त्यांच्या घराशेजारीच एका शाळेचे मुख्याध्यापक राहायचे. त्यांच्याकडे दररोज अनेक प्रकारची वर्तमानपत्रे येत असत. पाचवी-सहावीत असल्यापासूनच विवेक नावाच्या त्या लहान मुलाला या वर्तमानपत्रांनी जणू वेड लावले. तासनतास शेजाऱ्यांकडे बसून ही सगळी वृत्तपत्रे वाचून काढण्याची सवय त्यांना तिथेच लागली. ही केवळ बातमी वाचणे नव्हती, तर जगाचा वेध घेण्याची ती त्यांची पहिली पायरी होती.

 

वाचनाचे हे वेड लग्नानंतरही तितकेच कायम होते. सरांच्या कामाचा परीघ मोठा होता; विवेकानंद केंद्राच्या प्रशिक्षणासाठी ते महिना-महिना ईशान्य भारतात (नॉर्थ-ईस्ट) असायचे. जेव्हा ते प्रवासाहून परतत, तेव्हा घराचा उंबरठा ओलांडल्या ओलांडल्या त्यांची पहिली नजर महिनाभराच्या साठवलेल्या वर्तमानपत्रांच्या चळतीवर पडत असे. रेल्वेचा चार-पाच दिवसांचा थकवणारा प्रवास झालेला असायचा, घरचे लोक त्यांना फ्रेश होण्यासाठी, चहा घेण्यासाठी आग्रह करायचे, पण सरांचे मन मात्र त्या बातम्यांमध्ये गुंतलेले असायचे. जोपर्यंत महिनाभरातील घडामोडी डोळ्याखालून जात नाहीत, तोपर्यंत त्यांना चैन पडत नसे.

 

सरांच्या बुद्धिमत्तेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. एखाद्या बातमीचा संदर्भ देताना ते अगदी तारखेसह सांगायचे, "२५ जून १९७७ च्या सुमारास अमुक वर्तमानपत्रात, तिसऱ्या पानावर उजव्या बाजूला ही बातमी आली होती." हे ऐकून समोरचा माणूस थक्क व्हायचा. केवळ माहिती साठवणे नव्हे, तर तिचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची खासीयत होती.

 

राजकारण आणि समाजकारण या विषयांत त्यांना विशेष गती होती. त्यांचे मित्र अभय लिमये आणि सर तासनतास निवडणुकीच्या समीकरणांवर चर्चा करत. एकदा तर एका राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी वर्तवलेला निवडणुकीचा अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात केवळ एक-दोन जागांचाच फरक पडला होता. प्रणय रॉय यांच्यासारख्या तज्ज्ञांनी जेव्हा निवडणुकीचे विश्लेषण भारतात लोकप्रिय केले, त्याच काळात पोंक्षे सर आपल्या अभ्यासाने अचूक आकडेवारी मांडत असत.

 

राजकारणासोबतच क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. या विषयांवरील त्यांची चर्चा सुरू झाली की घरातील वातावरण अभ्यासू आणि तितकेच रंजक होऊन जायचे. एक शिक्षक, एक मार्गदर्शक आणि एक उत्तम विश्लेषक म्हणून सरांनी जी उंची गाठली, त्याची पायाभरणी धुळ्याच्या त्या वर्तमानपत्रांच्या सानिध्यात आणि निरंतर वाचनाच्या व्यासंगामुळे झाली होती.

 

विवेक पोंक्षे सरांच्या व्यक्तिमत्त्वात एकीकडे ज्ञानाचा व्यासंग होता, तर दुसरीकडे माणसांची आणि त्यांच्या गुणांची अचूक पारख करण्याची दृष्टी होती. त्यांच्या याच अफाट स्मरणशक्तीचा प्रत्यय एका रंजक प्रसंगातून येतो. 'केएसबी पंप्स'चे संचालक अनंत विष्णू शेटलवाड हे एकदा ज्ञान प्रबोधिनीत आले होते. रविवारचा दिवस असूनही सर तिथे कामात मग्न होते. अनंतजींना शिक्षणाऐवजी अशा ठिकाणी देणगी द्यायची होती, जिथे स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत आहेत. सरांनी तत्परतेने त्यांना ग्राम विकास विभागाची वाट दाखवली.

 

तिथे चर्चा सुरू असतानाच सरांनी अनंतजींना एक अनपेक्षित प्रश्न विचारला, "तुम्ही क्रिकेट कॉमेंट्रेटर होतात का?" अनंतजी थक्क झाले. ते खरोखरच उत्तम समालोचक होते. खेळाडूंचे आवाज ओळखणे, कोणाची सेंच्युरी कधी झाली, त्याकाळी कोणत्या देशाचे कोणते खेळाडू मैदानात होते, याचे इत्थंभूत ज्ञान सरांना मुखोद्गत होते. मुलगा आदित्य आणि मित्रांसोबत रंगणाऱ्या क्रिकेटच्या चर्चांतून सरांच्या या तल्लख मेमरीचा प्रत्यय वारंवार येत असे.

 

या विलक्षण बुद्धिमत्तेची मुळे त्यांच्या समृद्ध बालपणात दडलेली होती. लहानपणी वर्तमानपत्रातील प्रत्येक बातमी वाचायची आणि संध्याकाळी ती आई-वडिलांना सांगायची, या सवयीने त्यांची वैचारिक बैठक पक्की केली होती. वाचनाच्या या छंदामुळेच त्यांची नाळ जगाशी जोडली गेली होती.

केवळ आकडेवारी किंवा खेळच नव्हे, तर सामाजिक प्रश्नांची समजही सरांनी लहानपणीच विकसित केली होती. धुळ्याला त्यांच्या शेजारी राहणारे परांजपे काका (अंबाजोगाईच्या शैलाताई लोहियांचे वडील) हे समाजवादी विचारसरणीचे होते. पण पुढे त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. लहानग्या विवेकने कुतूहलाने त्यांना विचारले, "काका, तुम्ही असे का केले?" तेव्हा काकांनी दिलेले उत्तर सरांच्या कायम स्मरणात राहिले. काका म्हणाले होते की, "दलितांवरील अन्यायाची जाणीव समाजाला आहे, पण त्यात प्रत्यक्ष उतरून काम करणारे हवेत, म्हणून मी हा मार्ग निवडला."

 

अशा प्रकारे, वयाने मोठ्या असणाऱ्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि विचारसरणीत काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधत विवेक पोंक्षे सरांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. या चर्चांनीच त्यांना समाजातील गुंतागुंत समजून घेण्याची आणि त्यावर मार्ग काढण्याची दृष्टी दिली.

 

 

तत्त्वनिष्ठतेचा वारसा: संस्कारांची शिदोरी

 

विवेक पोंक्षे सरांच्या जडणघडणीत त्यांच्या बालपणीच्या सवयी आणि वडिलांकडून मिळालेली नैतिक मूल्ये यांचा फार मोठा वाटा होता. धुळ्याला असताना ते शेजारच्या टकले सरांकडे जाऊन रोज वर्तमानपत्र वाचत असत. पण हे वाचन केवळ माहितीसाठी नसायचे, तर टकले सर त्यांना आवर्जून विचारायचे, "तू आज काय वाचलंस? तुला त्यातलं काय काय लक्षात आहे ते सांग बरं!" लहान वयातच झालेल्या या संवादामुळे सरांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती कमालीची तल्लख होत गेली.

 

घरातील वातावरणही तितकेच शिस्तबद्ध आणि तत्त्वनिष्ठ होते. सरांचे वडील (सासरे) आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड करत नसत. याचा एक प्रत्यय तेव्हा आला जेव्हा सरांनी अरुणाचल प्रदेशावरून परतल्यानंतर धुळ्याला बीएड करायचे ठरवले. योगायोगाने ते वडिलांच्याच कॉलेजमध्ये शिकणार होते. मुलाने प्रवेश घेतल्याचे समजताच वडिलांनी व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगून टाकले की, "यावर्षी मी प्रश्नपत्रिका काढणे, पेपर तपासणे किंवा मुलाखती घेणे, यांपैकी कोणत्याही प्रक्रियेत सहभागी होणार नाही." मुलाला कोणतीही विशेष सवलत मिळू नये किंवा कोणाचे उपकार वाटू नयेत, ही त्यामागील शुद्ध भावना होती.

 

ही तत्त्वनिष्ठा केवळ मुलापुरतीच मर्यादित नव्हती. जेव्हा सासूबाईंनी बागेश्रीताईंना (सून) त्याच कॉलेजमध्ये बीएडला प्रवेश देण्याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी कॉलेजच्या नियमावर बोट ठेवले. आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य देण्याचा नियम त्यांनी स्वतः बनवला होता, त्यामुळे "सून बी.कॉम आहे, म्हणून तिला मी प्रवेश देऊ शकणार नाही," असे स्पष्टपणे सांगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. घरापेक्षा कर्तव्याला आणि नियमांना मोठे मानण्याचा हा संस्कार सरांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

 

योगायोगाने, असाच प्रसंग सरांच्या आयुष्यातही पुन्हा घडला. जेव्हा त्यांचा मुलगा आदित्य आणि मुलगी निवेदिता यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला, तेव्हा सरांनी स्वतःला त्या वर्षीच्या मुलाखत प्रक्रियेतून पूर्णपणे बाजूला करून घेतले. शाळेतील इतर शिक्षकांना जेव्हा अर्जावर 'आदित्य विवेक पोंक्षे' हे नाव आणि घराचा पत्ता दिसला, तेव्हा त्यांना सरांच्या या भूमिकेमागचा अर्थ उलगडला.

 

आपल्या कामाचा आणि पदाचा उपयोग घरच्यांसाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी कधीही करायचा नाही, हा मौल्यवान वारसा सरांनी आपल्या वडिलांकडून घेतला आणि तो आयुष्यभर जपला. एक आदर्श शिक्षक आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून पोंक्षे सरांची जी ओळख आहे, त्याचा पाया या अशा छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या तत्त्वांवर उभारलेला आहे.

 

आधुनिक विचारांची जननी आणि कर्तव्याची जाणीव

 

विवेक पोंक्षे सरांच्या आयुष्यावर त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांच्या आई केवळ गृहिणी नव्हत्या, तर त्या काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या एक धाडसी स्त्री होत्या. तरुणपणी त्या स्विमिंग चॅम्पियन होत्या आणि स्काऊट गाईडमध्येही त्यांनी मोठे नाव कमावले होते. २६ जानेवारीच्या परेडसाठी त्यांच्या ट्रूपची निवड झाली होती आणि पंडित नेहरूंसमोर त्यांनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले होते, हा त्यांच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण होता.

 

पुण्यातून लग्नानंतर धुळ्याला गेल्यावर सुरुवातीला त्यांचा नोकरीचा कोणताही विचार नव्हता. मात्र, आपल्या पतीवर (अण्णांवर) कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे, हे त्यांनी ओळखले. त्यांनी स्वतः नोकरी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. केवळ स्वतःचा संसार न पाहता, पतीच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची ही वृत्ती सरांनी जवळून पाहिली होती.

 

आईंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शेवटपर्यंत टिकलेली जिद्द आणि अद्ययावत राहण्याची ओढ. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देतानाही त्या कधी डगमगल्या नाहीत. उलट, कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचे सर्व स्वतः करण्यावर त्यांचा भर होता. वयाच्या उत्तरार्धातही त्या तंत्रज्ञानाशी दोस्ती करून होत्या. फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा वापर त्या केवळ गप्पांसाठी नाही, तर ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी करत असत.

 

आपल्या नातवाच्या (आदित्यच्या) संशोधनासाठी स्पेनमधील एखाद्या सायन्स पेपरची लिंक शोधून पाठवणे असो, किंवा मृण्मयीला सायकॉलॉजीमधील उत्तम लेख शोधून देणे असो; सासूबाईंचे वाचन आणि शोध घेण्याची वृत्ती अफाट होती. अगदी सुनेलाही सामाजिक कार्याशी संबंधित लेख पाठवून त्या प्रोत्साहन देत असत. एका बाजूला अण्णांची तत्त्वनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला आईची ही आधुनिक, जिज्ञासू आणि कष्टाळू वृत्ती, अशा दोन मोठ्या प्रवाहांच्या संगमातून विवेक पोंक्षे नावाचे समृद्ध व्यक्तिमत्त्व आकाराला आले.

 

गुरुकृपा आणि ध्येयाची निश्चिती: दाबके सरांचा प्रभाव

 

विवेक पोंक्षे सरांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने वळण मिळाले ते धुळ्यातील व्यंकटेश दाबके सरांच्या सानिध्यात. दाबके सर हे केवळ एक शिक्षक नव्हते, तर ते माणुसकी आणि निष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण होते. आजारी आईची सेवा करणे, तिची वेणी-फणी करण्यापासून ते घरचा स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ते शाळेत येत असत. त्यांच्या या सेवाभावाचा आणि साधेपणाचा विवेक सरांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

 

सरांची हुशारी उपजत होती; ते चौथी आणि सातवीत स्कॉलरशिपमध्ये आले होते. मात्र, अभ्यासाचे गांभीर्य निर्माण व्हावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना दाबके सरांकडे पाठवले. तिथे गेल्यावर सरांसमोर ज्ञानाचे एक नवीन दालनच उघडले. दाबके सरांकडे पुस्तकांचा अफाट खजिना होता. ते स्वतः रशियन भाषा शिकायचे, इंग्रजी वर्तमानपत्रे वाचायचे. विवेक सरांना इंग्रजीची गोडी लागावी म्हणून ते म्हणायचे, "अरे, जे तू मराठीत वाचतोस तेच इथे आहे, फक्त वाचून मला सांग." ही शिकवण्याची पद्धत सरांच्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालणारी ठरली.

 

दाबके सर केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नव्हते. ते मुलांना सायकलवरून गडांवर न्यायचे, नदीचा उगम आणि भूभागाचा अभ्यास प्रत्यक्ष निसर्गात जाऊन कसा करायचा, हे शिकवायचे. त्यांनी स्वतः तयार केलेल्या दुर्बिणीतून विवेक सरांनी गुरूचे चंद्र पाहिले होते. अशा अष्टपैलू गुरुमुळेच विवेक सरांच्या मनात बीज रुजले की, "आपल्यालाही शिक्षकच व्हायचे आहे."

 

त्या काळात १०वी आणि १२वी अशा दोन्ही परीक्षांत ते बोर्डात आले होते. त्या गुणांच्या जोरावर ते सहज इंजिनिअर किंवा डॉक्टर होऊ शकले असते. पण दाबके सरांच्या प्रभावामुळे आणि स्वतःच्या आंतरिक ओढीमुळे त्यांनी शिक्षक होण्याचे ध्येय पक्के केले. बारावीपर्यंतचे शिक्षण धुळ्यात पूर्ण करून, पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या दिशेने निघाले. एका थोर शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा विद्यार्थी, पुढे स्वतः एक महान शिक्षक म्हणून नावारूपास आला.

3

विवेक पोंक्षे सरांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका विषयाचा अभ्यासक नव्हे, तर ज्ञानाचे चालते-बोलते विद्यापीठच होते. पुण्यात आल्यावर त्यांनी मॉडर्न कॉलेजमधून फिजिक्समध्ये पदवी घेतली आणि पुढे युनिव्हर्सिटीतून एम.एससी. केले. गणित आणि भौतिकशास्त्र (Physics) हे त्यांचे जीवापासाचे विषय, पण त्यांची व्याप्ती या विषयांपुरती मर्यादित नव्हती. संस्कृत सोडले तर शाळेतील सर्व विषय त्यांनी तितक्याच ताकदीने शिकवले.

 

सरांची शिकवण्याची आणि जगण्याची पद्धत ही खऱ्या अर्थाने 'जिवंत' होती. साहित्याची त्यांना इतकी ओढ होती की, घरात कोणी वाचन कमी करत असेल तर ते स्वतः पुस्तक घेऊन स्वयंपाकघराच्या दाराशी उभे राहायचे. "तू तुझे काम चालू ठेव, मी तुला वाचून दाखवतो," असे म्हणत त्यांनी 'बनगरवाडी' किंवा 'थँक यू मिस्टर ग्लॅड' सारख्या साहित्याचे घरात अभिवाचन केले. हेच संस्कार त्यांनी शाळेतही नेले. साहित्यातील कथा केवळ वाचून न दाखवता त्या मुलांच्या मनात जिवंत करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.

 

सिनेमा या माध्यमाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सत्यजित रे यांच्या 'अपुर संसार' आणि 'पथेर पांचाली' सारख्या जागतिक दर्जाच्या चित्रपटांवर त्यांनी मुलांसोबत शिबिरे घेतली. कलकत्ता रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या एका पुस्तकातून सुरू झालेला हा प्रवास मुलांच्या वैचारिक प्रगल्भतेपर्यंत जाऊन पोहोचला. नुसता सिनेमा दाखवून ते थांबत नसत, तर 'सिंहासन' किंवा 'मुंबई दिनांक' सारखी पुस्तके आधी मुलांना वाचायला लावून, मग सिनेमा दाखवून त्यावर सखोल चर्चा घडवून आणत. "मुलांना किमान १०० प्रश्न तरी पडले पाहिजेत," असा त्यांचा आग्रह असे. प्रश्नातूनच ज्ञानाचा प्रवास सुरू होतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

 

मराठी साहित्यातील केवळ प्रसिद्ध लेखकच नव्हे, तर उपेक्षित आणि दलित साहित्याचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. दया पवारांचे 'बलुतं', केशव मेश्राम, ज्ञानेश्वर भोसले किंवा भीमराव गस्ती यांसारख्या लेखकांच्या साहित्याची ओळख त्यांनी अनेकांना करून दिली. भटक्या-विमुक्त समाजाच्या व्यथा आणि दलित चळवळीतील संदर्भांची त्यांना सखोल जाण होती. प्रत्येक लेखकाचा विचार आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय वाचन पूर्ण होत नाही, असे ते मानत. म्हणूनच, पोंक्षे सर जेव्हा कोणत्याही विषयावर बोलायचे, तेव्हा त्यामागे व्यासंग, अफाट वाचन आणि समाजाच्या सर्व स्तरांचा विचार असायचा.

 

एक अनपेक्षित वळण आणि प्रबोधिनीशीगाठ

 

विवेक पोंक्षे सरांचा कल सुरुवातीपासूनच तर्कशास्त्र (Logic) आणि चिकीत्सक विचार (Critical Thinking) यांकडे होता. म्हणूनच कदाचित गणित आणि भौतिकशास्त्र (Physics) हे त्यांचे अत्यंत आवडीचे विषय बनले. पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये बीएससी करत असताना त्यांना संशोधनाचे मोठे स्वातंत्र्य मिळाले. तिथल्या प्रयोगशाळेची किल्ली त्यांच्याकडे असायची, इतका विश्वास त्यांनी संपादन केला होता. मात्र, याच प्रवासात एक विलक्षण घटना घडली.

 

बीएससीच्या एका विषयात सर चक्क नापास झाले. ज्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक इतका तल्लख होता, त्याच्यासाठी हे धक्कादायक होते. सरांचा स्वतःवर विश्वास होता की हे शक्यच नाही, म्हणून त्यांनी पेपर पुनर्मूल्यांकनासाठी (Re-checking) टाकला. त्या काळात या प्रक्रियेला बराच वेळ लागायचा. या निकालाच्या प्रतीक्षेत त्यांचे सहा महिने रिक्त झाले आणि ते धुळ्याला आपल्या घरी परतले. पण हे सहा महिने वाया जाणार नव्हते, तर ते एका मोठ्या कार्याची पायाभरणी ठरणार होते.

 

धुळ्यात त्यांची भेट ज्ञान प्रबोधिनीचे कार्य पाहणाऱ्या दादा बिरारी आणि अशोकरावजींशी झाली. सरांची सृजनशील विचारसरणी पाहून अशोकरावांनी त्यांना प्रबोधिनीच्या कार्यात जोडून घेण्यास सुचवले. अशा प्रकारे, सहा महिने मोकळे असताना सर धुळ्याच्या प्रबोधिनीच्या शाखेत काम करू लागले. दरम्यान, त्या पेपरचा निकाल आला आणि आश्चर्य म्हणजे, ज्या विषयात सर नापास झाले होते, त्यात ते चक्क प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते! एका तांत्रिक चुकीमुळे त्यांचे वर्ष लांबले खरे, पण प्रबोधिनीशी त्यांची कायमची नाळ जोडली गेली.

 

पुढील शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर सरांनी विद्यापीठातून एमएससी फिजिक्स पूर्ण केले. यादरम्यान ते प्रबोधिनीच्या 'शनिवार बैठकी'ला नियमित जाऊ लागले. अशाच एका बैठकीत आप्पासाहेबांचे सहकारी वामनराव यांनी 'भारतातील शिक्षण' या विषयावर मांडणी केली आणि उपस्थितांना विचारले, "तुमच्यापैकी कोणाला शिक्षक व्हायचे आहे?" संपूर्ण वर्ग डॉक्टर-इंजिनिअर व्हायच्या स्वप्नात असताना, फक्त दोघांनी हात वर केला होता—एक विवेक पोंक्षे आणि दुसरे महेंद्र सेठिया.

 

एका चुकीच्या निकालपत्राने सरांना प्रबोधिनीच्या वाटेवर आणून सोडले आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास एका ध्येयनिष्ठ शिक्षकाच्या रूपात पूर्णत्वास गेला. गणिताच्या तर्काकडून शिक्षणाच्या संस्कारांकडे झालेला हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे.

 

खेड शिवापूर ते ध्येयवेडाचा प्रवास: शिक्षकी पेशाची ओढ

 

बीएससीच्या निकालातील तांत्रिक गोंधळामुळे विवेक सरांचे एक वर्ष सक्तीने लांबणीवर पडले. मात्र, याच काळात त्यांनी शिक्षणावरील साहित्याचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासाने त्यांच्यातील शिक्षकाला जागृत केले. 'प्रिय बाई' हे सुधा करमरकरांनी अनुवादित केलेले पुस्तक सरांच्या काळजाला भिडले. इटलीतील डोंगराळ भागात राहणाऱ्या मुलांनी लिहिलेली ती कैफियत—'गाईच्या गोठ्यापेक्षा शाळा नक्कीच चांगली असेल ना?'—या प्रश्नाने सरांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यासोबतच सुमती देवस्थळींचे 'आल्बर्ट श्वाईत्झर' वाचून त्यांना समाजसेवेची आणि ग्रामीण भागात काम करण्याची प्रेरणा मिळाली.

 

पुण्यात एमएससी करत असताना सर प्रबोधिनीच्या हॉस्टेलमध्येच राहत असत. एकदा गिरीशराव बापट सहज त्यांच्या रूमवर आले आणि त्यांनी विचारले, "पुढे काय करणार?" तेव्हा सरांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली, "मला ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्याचा अनुभव घ्यायचा आहे." योगायोगाने खेड शिवापूरला प्रबोधिनीचे 'कृषी तांत्रिक विद्यालय' नुकतेच सुरू झाले होते. गिरीशरावांनी सुचवले आणि सरांनी क्षणाचाही विलंब न लावता तिथे जाण्याचा निर्णय घेतला.

 

खेड शिवापूरचा तो काळ अत्यंत जिवंत आणि भारलेला होता. शिवकालीन वाड्यामध्ये ३०-४० कार्यकर्ते एकत्र राहून काम करायचे. तिथे सरांना अनेक दिग्गज सहकाऱ्यांचा सहभाग लाभला. यामध्ये अशोक ताकमोघे नावाचे एक शिक्षक होते, जे हेमलकसाला प्रकाश आमटेंच्या प्रकल्पावर तीन वर्षे काम करून आले होते. आपण ज्या 'हस्ताक्षर सुधारण्याच्या वह्या' प्रबोधिनीत पाहतो, त्यांचे जनक पाकमोघे सरच होते. त्यांनीच विवेक सरांना हस्ताक्षराचे शास्त्र समजावून सांगताना म्हटले होते, "हे बघ, हस्ताक्षर ही कला नसून शास्त्र आहे, चार रेघांमध्ये सराव केला की ते नक्की सुधारते."

 

तिथे गोडसे व्यवस्थापक, सिसोदे सर, तागडे सर अशा अनेक निस्पृह कार्यकर्त्यांच्या सहवासात सरांनी ग्रामीण शिक्षणाचे धडे गिरवले. त्याच काळात तिथे दारुबंदीचे मोठे आंदोलनही उभे राहिले होते. अशा धामधुमीच्या आणि संस्कारक्षम वातावरणात विवेक पोंक्षे नावाचा एक प्रयोगशील शिक्षक घडत होता.

4

याचा ध्यास आणि कष्टाची सायकल: बागेश्रीताईंचा प्रवास

 

विवेक पोंक्षे सरांच्या आयुष्यातील खेड शिवापूरचा काळ जसा महत्त्वाचा होता, तसाच तो बागेश्रीताईंच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. खेड शिवापूरच्या त्या ऐतिहासिक वाड्यात आरोग्य प्रकल्प, कुष्ठरोग निर्मूलनाचे काम आणि कृषी तांत्रिक विद्यालयाचे शिक्षण असे एक जिवंत विश्व साकारले होते. तिथे गायत्रीताई आणि सरिताताईंसोबत राहून बागेश्रीताईंनी ग्रामविकासाच्या कामाला सुरुवात केली. कुंभार वस्तीत राहून महिलांचे संघटन करणे आणि पुढे महिलांच्या दारुबंदीसाठी आंदोलन उभे करणे, यात त्यांचा मोठा वाटा होता.

 

पण या प्रवासाची सुरुवात झाली होती पुण्यातील 'स्व-रूपवर्धिनी'मधून. १२ वीत असताना घरच्या संस्कारांतून समाजकामाची ओढ निर्माण झाली होती. स्वरूप वर्धिनीचे प्रमुख किशाभाऊ पटवर्धन यांच्याकडे पत्रलेखनाच्या कामापासून बागेश्रीताईंच्या कार्याला गती मिळाली. त्या काळातील त्यांची जिद्द थक्क करणारी आहे. सहकारनगर ते युनिव्हर्सिटी रस्ता आणि तिथून पुन्हा पुणे स्टेशन किंवा बिबवेवाडी, असा त्यांचा रोजचा प्रवास सायकलवरून व्हायचा.

 

विविध शाखांवर देखरेख करणे, देणगीदारांना भेटणे आणि पत्रे पोहोचवणे अशा कामांसाठी बागेश्रीताई  दिवसाकाठी तब्बल १०० किलोमीटर सायकल चालवायच्या. ही केवळ शारीरिक कसरत नव्हती, तर समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा तो एक अदम्य उत्साह होता. त्यांच्या आईनेही सावरकरांशी संबंधित लोकांशी संवाद साधून कथा लिहिण्याचे काम केले होते, तोच वैचारिक वारसा बागेश्रीताईंनी पुढे नेला. एका बाजूला विवेक सरांची बौद्धिक बैठक आणि दुसरीकडे बागेश्रीताईंचे हे जमिनीवरचे कष्ट, यातूनच पुढे एका आदर्श जोडप्याचा समाजकार्यातील प्रवास खऱ्या अर्थाने बहरला.

 

सावलीतले सामर्थ्य: जिद्द, कौशल्य आणि समाजकार्याचा ध्यास

 

बागेश्रीताईंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एका अशा घरात झाली, जिथे विचार आणि कृती यांची सांगड घातलेली होती. त्यांच्या आईची गोष्ट थक्क करणारी आहे. १० वी पर्यंत शिकलेल्या असूनही त्यांनी सावरकरांना भेटलेल्या लोकांच्या १५-२० कथा शब्दांकित केल्या. सावरकर स्वतः त्या कथा तपासून देत, हा संस्कार बागेश्रीताईंच्या मनावर खोलवर रुजला होता. त्यांची आई केवळ लेखनातच नाही, तर तांत्रिक कामातही निपुण होती. नाशिकच्या 'सटाणा जोशीं'कडून (जे आरएसएसचे प्रचारक होते) त्यांनी प्लंबिंग आणि वायरिंगचे काम शिकून घेतले होते. इतकेच काय, ज्ञान प्रबोधिनीच्या सुरुवातीच्या इमारतीचे वायरिंग करताना आईने आपल्या वडिलांना मोलाची मदत केली होती. घरात नळ गळला किंवा वायर बिघडली की आई स्वतः स्टुलावर उभी राहून पाणा हातात घ्यायची; स्त्री-पुरुषांच्या कामातील ही भिंत त्यांनी केव्हाच ओलांडली होती.

 

पण जेव्हा स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न आला, तेव्हा बागेश्रीताईंना केवळ कौटुंबिक चौकटीत अडकायचे नव्हते. घरातून लग्नासाठी विचारणा सुरू झाल्यावर, समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. याच ओढीतून त्या बारावीनंतर घर सोडून बाहेर पडल्या. अकोल्याच्या आश्रमात काही काळ व्यतीत केल्यानंतर त्यांना जाणवले की, आपले कार्यक्षेत्र इथे नाही. त्या पुन्हा पुण्यात आल्या आणि 'स्व-

रूपवर्धिनी'शी जोडल्या गेल्या. वर्धिनीमध्ये कामाचा डोंगर होता आणि तिथेच त्यांची भेट विवेक पोंक्षे सरांशी झाली. सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःला पूर्णवेळ कामात झोकून दिले. पुढे हा वैचारिक प्रवास लग्नाच्या नात्यात गुंफला गेला आणि दोघांनीही ग्रामीण भागात जाऊन सेवा करण्याचा निश्चय केला.

 

बागेश्रीताईंच्या जिद्दीचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांचे कारखान्यातील काम. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दहावीनंतर त्या एका 'डायनॅमिक बॅलेंसिंग'च्या कारखान्यात हिशोब लिहिण्यासाठी लागल्या होत्या. पण मशीनवरचे ते तांत्रिक काम पाहून त्यांचे कुतूहल जागे झाले. "पैसे नकोत, पण मला हे काम शिकायचे आहे," ही जिद्द त्यांनी तिथेही दाखवली. गिअर शाफ्ट्स आणि क्राँक शाफ्ट्सचा इम्बॅलन्स ओळखून ते ड्रिलिंग किंवा वाइंडिंगने दुरुस्त करण्याचे कठीण काम त्या आनंदाने शिकल्या.

 

 

जबाबदारी, जिद्द आणि शिक्षणाचा ध्यास: बागेश्रीताईंचा खडतर प्रवास

 

बागेश्रीताईंच्या जीवनाची गोष्ट म्हणजे एका ध्येयवेड्या आणि जबाबदार मुलीचा प्रवास आहे. १० वी मध्ये ८० टक्के गुण मिळवलेल्या आपल्या मुलीने सायन्सला जाऊन खूप शिकावे, अशी त्यांच्या आईची मनापासून इच्छा होती. पण वडिलांचा एअरफोर्समधील बॉण्ड संपून आर अँड डी मध्ये लागल्यानंतरचा तो तुटपुंजा पगार आणि घरी असलेल्या तीन धाकट्या बहिणी, ही परिस्थिती बागेश्रीताईंच्या डोळ्यांसमोर होती. आई म्हणायची, "तू आधी शिकून स्वतःला सिद्ध कर," पण ताईंच्या मनात विचार होता की, "मी जर केवळ शिकत बसले, तर घराचा गाडा कसा चालणार?"

 

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी दहावीनंतरच नोकरी स्वीकारली. त्या एका डायनॅमिक बॅलेंसिंगच्या कारखान्यात हिशोब लिहिण्यासाठी लागल्या. पण तिथेही त्यांची जिज्ञासू वृत्ती गप्प बसली नाही. गिअर शाफ्ट्स, पुलीज आणि फॅन्सचा इम्बॅलन्स ओळखून तो ड्रिलिंग किंवा वाइंडिंगने दुरुस्त करण्याचे तांत्रिक काम पाहून त्या भारावून गेल्या. मालकांना त्यांनी विनंती केली की, "मला हिशोबासोबत हे मशीनवरचे कामही शिकायचे आहे, त्याचे पैसे नाही दिले तरी चालतील." या तांत्रिक कौशल्यातूनच त्यांच्यातील प्रयोगशील वृत्ती अधिक प्रगल्भ झाली.

 

सामाजिक कामाची ओढ इतकी होती की, त्यासाठी त्यांनी प्रसंगी घरच्यांच्या विरोधाचाही सामना केला. आईला वाटायचे शिक्षण महत्त्वाचे, तर ताईंना वाटायचे की कामासोबतच समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. त्या काळात हे द्वंद्व इतके वाढले की, त्यातूनच पुढे त्यांनी घर सोडून स्वतःची वाट शोधण्याचा धाडसी निर्णय घेतला.

 

तरीही शिक्षणाची ओढ मात्र कधीच सुटली नव्हती. आपल्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणाचा न्यूनगंड मनात असतानाच, त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरून बहिस्थ (External) पद्धतीने पुन्हा शिक्षणाचे पाऊल उचलले. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी विष्णुपंत महाजनांनी सुरू केलेल्या 'स्वाध्याय महाविद्यालया'त त्या संध्याकाळचे कॉलेज करू लागल्या. दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी शिक्षण घ्यायचे, अशा कसरत करत त्यांनी स्वतःची पदवी पूर्ण केली.

 

कर्तव्य आणि ध्येय यांच्यातील हा संघर्ष पेलत असतानाच त्यांची गाठ पोंक्षे सरांशी पडली. एका बाजूला स्वतःचा तांत्रिक अनुभव आणि दुसरीकडे शिक्षणाचा ध्यास, या जोरावरच बागेश्रीताईंनी पुढे समाजकार्यात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.

 

चंदन युनिव्हर्सिटी ते स्व-रूपवर्धिनी: एक नवी सुरुवात

बागेश्रीताईंच्या प्रवासात 'स्वप्नभूमी' या संस्थेचा एक छोटा पण महत्त्वाचा टप्पा आला. फिरोदिया करंडकाच्या निमित्ताने त्यांची ओळख सूर्यकांत देशपांडे यांच्याशी झाली होती. घराचा विरोध आणि सामाजिक कामाची ओढ यातून ताईंनी कोणालाही न सांगता परभणी जिल्ह्यातील 'स्वप्नभूमी' गाठली. तिथे 'होम फॉर बेगर्स अँड डेस्टिट्यूट' अशा स्वरूपाचे काम होते. ही चूक होती की नाही हे काळाने ठरवलेच, पण या घटनेने त्यांच्यातील जिद्दीची जाणीव मोठ्या माणसांना करून दिली.

 

या सर्व घडामोडींतून ताई जेव्हा पुन्हा पुण्यात परतल्या, तेव्हा किशाभाऊ पटवर्धन स्वतः त्यांना भेटायला घरी आले. एखाद्या मोठ्या माणसाने केवळ एका सामान्य मुलीला भेटायला तिच्या घरी येणे, ही गोष्ट ताईंच्या मनाला स्पर्शून गेली. किशाभाऊंनी अगदी मायेने विचारले, "सामाजिक कामच करायचे आहे ना, मग इतक्या लांब पळून कशाला जातेस? स्वरूप वर्धिनी आहे ना!" आणि इथूनच ताईंच्या कार्याची नवी दिशा ठरली.

 

किशाभाऊंना ही माहिती मिळाली होती ती शिरीष पटवर्धन यांच्याकडून. बागेश्रीताईंची आत्या पुष्पा फडके आणि त्यांचे यजमान हे लोकमान्य नगरच्या 'चंदन' नावाच्या घरात राहायचे. प्रबोधिनीशी जोडलेले हे कुटुंब स्वतः झुंजत शिकले होते. त्यांना स्वतःचे अपत्य नव्हते, पण त्या घरात नेहमी २०-२५ मुले शिकायला असायची. म्हणूनच त्या घराला 'चंदन युनिव्हर्सिटी' म्हटले जाई. शिरीष पटवर्धनही तिथेच राहत असत आणि ते स्वरूप वर्धिनीचे काम पाहत. त्यांच्याच माध्यमातून ताईंचा संपर्क किशाभाऊंशी आला आणि वर्धिनीला एक हक्काची कार्यकर्ती मिळाली.

 

पुढे ताई केवळ पोंक्षेसरांच्या सहचारिणीच झाल्या नाहीत, तर त्यांच्या शिष्याही झाल्या. सरांनी त्यांना केवळ समाजकार्यच नाही, तर जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. "बायको कम शिष्या" असे स्वतःचे वर्णन करणाऱ्या बागेश्रीताईंच्या मते, पोंक्षे सर हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे मेंटॉर होते. एका बाजूला 'चंदन'मधील संस्कार आणि दुसऱ्या बाजूला विवेक सरांचे मार्गदर्शन, यातूनच बागेश्रीताईंच्या रूपाने एक खंबीर समाजसेविका घडत गेली.

 

घर्ष, सेवा आणि ज्ञान प्रबोधिनीची ओढ

 

बागेश्रीताईंच्या प्रवासात खंड पडला तो शरीराने दिलेल्या एका कौलारु इशाऱ्यामुळे. स्वरूप वर्धिनीच्या कामासाठी रोज १०० किलोमीटर सायकल चालवल्याने त्यांना 'सायटिका'चा तीव्र त्रास सुरू झाला. पाऊल टाकणेही कठीण झाले आणि घरात बसून राहणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. अशा वेळी किशाभाऊ पटवर्धन त्यांच्या मदतीला धावून आले. किशाभाऊंनी स्वतः प्रबोधिनीच्या सुरुवातीच्या काळात आप्पांसोबत मोलाचे काम केले होते. आप्पांनी त्यांचे वर्णन 'पर्स्युएशन दाई नेम इज पटवर्धन' असे केले होते, कारण लोकांच्या मनात कार्याबद्दल विश्वास निर्माण करून त्यांच्याकडून निधी मिळवण्यात किशाभाऊंचा हातखंडा होता.

 

किशाभाऊंची अशी धारणा होती की, प्रबोधिनीचे कार्य केवळ सुखवस्तू मुलांपुरते मर्यादित न राहता, पूर्व पुण्यातील अशा मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे ज्यांची परिस्थिती बेताची आहे पण ते बुद्धिमान आहेत. याच तळमळीतून त्यांनी बागेश्रीताईंना ज्ञान प्रबोधिनीचे तत्कालीन संचालक अण्णा ताम्हणकरांकडे नेले. प्रबोधिनीच्या पूर्व पुण्यातील विस्तारामागे आणि तेथील कार्याला गती मिळवून देण्यामागे किशाभाऊंचे अदृश्य पण खंबीर हात होते. ताईंच्या आयुष्यातील हा वळणबिंदू त्यांना एका नवीन सामाजिक आव्हानाकडे घेऊन गेला.

 

'पर्स्युएशन'ची किमया आणि प्रबोधिनीचा नवा उलगडा

 

बागेश्रीताईंच्या प्रवासात किशाभाऊ पटवर्धनांच्या मार्गदर्शनाने एक मोठे वळण घेतले. किशाभाऊंच्या निधी संकलनाच्या कौशल्याचा एक किस्सा ताई आजही आवर्जून सांगतात. सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका पटवर्धन गृहस्थांचा आक्षेप होता की, "तुम्ही फक्त निवडक बुद्धिमान मुलांसाठीच काम का करता?" पण किशाभाऊ डगमगले नाहीत. त्यांनी ताईंना सोबत घेऊन वर्षभर दर महिन्याला त्या गृहस्थांकडे जाऊन कामाचा अहवाल देणे सुरू ठेवले. त्यांच्या या सातत्यपूर्ण 'पर्स्युएशन'चा परिणाम असा झाला की, वर्षभराने त्या गृहस्थांनी दीड लाख रुपयांची मोठी देणगी दिली. आप्पा पेंसे म्हणूनच त्यांना 'पर्स्युएशन दाई नेम इज पटवर्धन' असे म्हणत.

 

जेव्हा 'सायटिका'मुळे ताईंना सायकल चालवणे अशक्य झाले, तेव्हा किशाभाऊंनीच त्यांना ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामीण कामात (खेड शिवापूर) सहभागी होण्याचा सल्ला दिला. ताईंचे प्रबोधिनीशी नाते तसे जुनेच होते. आप्पा पेंसे हे त्यांचे लांबचे नातेवाईक. अनघाताई लवळेकर या त्यांच्या बहिण. ज्या घरात वरच्या मजल्यावर आप्पा राहायचे, त्याच 'रघुकुल-घरकुल' मध्ये ताईंच्या आजी राहायच्या.

 

नातेसंबंध असूनही ताईंच्या मनात प्रबोधिनीबद्दल एक भीती होती. "प्रबोधिनी ही फक्त अति-बुद्धिमान मुलांची संस्था आहे, मग माझे तिथे काय काम?" असा न्यूनगंड त्यांच्या मनात होता. कारण शालेय वयात प्रबोधिनीच्या निवड चाचणीत त्या निवडल्या गेल्या नव्हत्या. मात्र, पुढे प्रबोधिनीच्या कामात आल्यावर त्यांना उमजले की, प्रबोधिनीचा खरा विचार 'एव्हरीबडी इज इंटेलिजंट' (प्रत्येकजण बुद्धिमान आहे) हाच आहे. फक्त प्रत्येकाची बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन आपल्याकडे नाही.

 

आप्पांच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी स्वतः ताईंना बोलावून घेऊन पेटीवर प्रार्थना म्हणायला सांगितली होती. हा क्षण ताईंच्या आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आहे. स्व-रूपवर्धिनी आणि ज्ञान प्रबोधिनी अशा दोन्ही महान संस्थांच्या धुरिणांचा सहवास लाभल्यामुळे ताईंच्या सामाजिक जाणिवेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

 

खेड शिवापूरचा वाडा आणि त्यागाचे पहिले पाऊल

 

बागेश्रीताईंनी जेव्हा पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून ज्ञान प्रबोधिनीच्या खेड शिवापूर येथील कृषी तांत्रिक विद्यालयात प्रवेश केला, तेव्हा त्यांच्यासमोर एक विलक्षण दृश्य होते. विद्यालयाचे प्राचार्य यशवंतराव स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत होते. शुभ्र धोतर, नेहरू शर्ट आणि टोपी अशा साध्या वेशातील एका प्राचार्याला झाडू मारताना पाहून ताई भारावून गेल्या. त्यांनी आपली कापडी पिशवी बाजूला ठेवली आणि यशवंतरावांच्या हातातील झाडू स्वतः घ्यायला धावल्या. तेव्हा यशवंतराव हसत म्हणाले, "राहूदे, मी रोजच झाडतो. इथे कुणी मोठा किंवा लहान नसतो, कामापासूनच कार्याची सुरुवात होते." निस्वार्थी सेवेचा हा पहिला धडा ताईंच्या मनावर कायमचा कोरला गेला.

 

खेड शिवापूरच्या त्या वास्तव्यात ताईंना रामभाऊ आणि यशवंतराव यांसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे भक्कम मार्गदर्शन लाभले. रामभाऊ ग्रामीण विकासाच्या कामात ओतप्रोत भिजलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी दुधाच्या व्यवसायाचे हिशोब ठेवण्यापासून ते प्रत्यक्ष दूध पोहोचवण्यापर्यंतची सर्व कामे आनंदाने केली. लहानपणापासून वर्तमानपत्रे वाटणे किंवा कष्टाची कामे करण्याची सवय असल्याने ताईंनी प्रबोधिनीच्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून दिले.

 

याच काळात खेड शिवापूर परिसरात स्त्रियांच्या दारूबंदीचे ऐतिहासिक आंदोलन उभे राहिले. या आंदोलनात ताईंना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. एकदा तर त्यांच्यावर तलवारीने हल्ला होण्याचीही वेळ आली होती. तरीही डगमगून न जाता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. आज जरी त्या या संघर्षाबद्दल विनम्रतेने "जाऊ दे, हे सांगण्याची काय गरज आहे" असे म्हणत असल्या, तरी प्रबोधिनीच्या ग्रामीण कार्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी इतिहास आहे.

 

लग्नाची आगळीवेगळी 'पत्रिका' आणि ध्येयवादाची गाठ

 

खेड शिवापूरच्या त्या जिवंत वातावरणात विवेक पोंक्षे सर आणि बागेश्रीताईंची भेट झाली. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या साप्ताहिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांच्या वैचारिक मांडणीची सवय लावली जात असे. विवेक सर तेव्हा शाळेत शिक्षक होते. बैठकींमध्ये जेव्हा सर 'डी-स्कूलिंग' किंवा 'प्रिय बाई' यांसारख्या विषयांवर ताकदीने बोलायचे, तेव्हा त्यांच्या विद्वत्तेची ओळख सगळ्यांना झाली होती. मात्र, त्यांची दाढी, चष्मा आणि बोलण्यातील शिस्त यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा दरारा होता. ताईंना तर वाटायचे की, जर आपला अहवाल सरांना दाखवला तर ते लाल पेनाने तो सगळा खोडून काढतील, इतकी त्यांची 'कडक शिक्षक' अशी प्रतिमा होती.

 

पण जेव्हा लग्नाचा विचार सुरू झाला, तेव्हा बागेश्रीताईंनी एक क्रांतिकारक पाऊल उचलले. त्यांनी आपली पत्रिका तयार केली, पण ती केवळ ग्रहांच्या मांडणीसाठी नव्हती. पत्रिकेच्या मागच्या कोऱ्या पानावर त्यांनी स्वतःच्या अटी लिहिल्या. त्यात स्पष्ट नमूद केले होते की, "मला सामाजिक काम करायचे आहे. मी बँकेत किंवा एलआयसीमध्ये नोकरी केली असती तर खूप पैसे मिळाले असते, पण मला तिथे जायचे नाही. मला किमान सकाळी १० ते संध्याकाळी ६ सामाजिक क्षेत्रातच काम करायचे आहे. जे मला ही परवानगी देतील, अशाच व्यक्तीशी मी लग्न करेन."

 

ही 'विशेष पत्रिका' घेऊन त्या नानाजी ढोबळे किंवा विनायकराव लिमये यांसारख्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे गेल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मला असा नवरा हवा आहे जो स्वतः सामाजिक कार्यकर्ता असेल.

 

एका प्रश्नाने बदललेली दिशा: अरुणाचलचा ध्यास

 

१९८५ हे 'आंतरराष्ट्रीय युवक वर्ष' म्हणून साजरे केले जात होते. त्यानिमित्ताने विवेक पोंक्षे सर, दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांसोबत विवेकानंद केंद्राचे काम पाहण्यासाठी ईशान्य भारताच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे युवकांशी संवाद साधताना 'राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर मोठी चर्चा सुरू होती. त्याच वेळी एका स्थानिक अरुणाचली विद्यार्थ्याने उपस्थित युवकांना एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला— "तुमच्यापैकी कोणाला अरुणाचल प्रदेशची राजधानी सांगता येईल का?"

 

दुर्दैवाने, त्या क्षणी कोणालाही पटकन 'इटानगर' हे नाव आठवले नाही. यावर तो तरुण विद्यार्थी जे काही बोलला, ते सरांच्या जिव्हारी लागले. तो म्हणाला, "आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेची गरज नाहीये, ती तुम्हालाच आहे. कारण तुम्ही आम्हाला आजही नीट ओळखत नाही!"

 

हा प्रसंग विवेक सरांच्या मनावर कायमचा कोरला गेला. केवळ भाषणांमधून राष्ट्रीय एकात्मता साध्य होणार नाही, तर तिथे जाऊन, तिथल्या लोकांशी नाते जोडणे ही काळाची गरज आहे, हे त्यांना मनोमन पटले. अरुणाचलचा तो दुर्गम भाग त्यांना खुणावू लागला. खेड शिवापूरच्या कृषी तांत्रिक विद्यालयात काम करत असतानाही त्यांच्या मनात अरुणाचलचे विचार घोळत होते. अखेर, त्यांनी गिरीशरावांकडे आपली इच्छा बोलून दाखवली की, "मला काही काळ अरुणाचलमध्ये जाऊन शिक्षक म्हणून काम करण्याची परवानगी द्या."

 

एका तरुणाने विचारलेल्या प्रश्नाने विवेक सरांना केवळ अंतर्मुख केले नाही, तर त्यांना एका नवीन ध्येयाकडे प्रवृत्त केले. ईशान्य भारताचा तो प्रदेश आणि तिथले प्रश्न समजून घेण्यासाठी सरांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या सामाजिक जाणीवेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

 

पर्वतीवरील तो संवाद आणि दोन ध्येयवाद्यांची युती

 

विवेक पोंक्षे सरांच्या मनात अरुणाचलला जाण्याचे विचार घोळत होते, पण त्यांच्या आईला काळजी होती की, "हा मुलगा एकदा तिकडे गेला की पुन्हा लग्नाचा विचारही करणार नाही." आईच्या आग्रहाखातर सर म्हणाले, "मला लग्नाचा विरोध नाही, पण अरुणाचलच्या दुर्गम भागात माझ्यासोबत यायला कोण तयार होईल? अशी मुलगी मिळाली तर नक्की लग्न करेन."

योगायोगाने, याच सुमारास सर त्यांचे मित्र अभय लिमये यांच्याकडे गेले होते. तिथे अभयचे वडील विनायकराव लिमये बागेश्रीताईंनी दिलेली ती 'अटींची पत्रिका' अभयला दाखवत होते. सरांनी जेव्हा 'बागेश्री गोखले' हे नाव वाचले आणि पत्रिकेमागचे ते स्पष्ट लिखाण पाहिले, तेव्हा त्यांना खेड शिवापूरच्या त्या जिद्दी कार्यकर्तीची आठवण झाली.

 

सर थेट बागेश्रीताईंच्या घरी पोहोचले. दाढी वाढवलेला, चष्मा लावलेला तो तरुण पाहून ताईंच्या घरच्यांना सुरुवातीला वाटले की हा दारूबंदी आंदोलनातील तोच 'कंजारभाट' समाजाचा कोणीतरी माणूस तर नाही ना? पण ताईंनी सर्वांना सावरले. सरांनी स्पष्टपणे विचारले, "आई म्हणतेय अरुणाचलला लग्न करून जा, आणि तुम्हाला सामाजिक काम करायचे आहे. मला यात कोणतीही अडचण नाही."

 

घरात लहान बहिणी आणि धांदल असल्यामुळे अधिक मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी दोघेही 'पर्वती'वर गेले. तिथे सुमारे दीड तास चर्चा झाली. ताईंच्या मते, आयुष्यातील ५० गोष्टींपैकी पहिल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी जुळल्या की बाकीच्या ५० मध्ये तडजोड करता येते. त्यांच्यासाठी 'सामाजिक कामाची ओढ' आणि 'कष्टाची तयारी' हे दोन मुख्य प्राधान्यक्रम होते, जे सरांच्या विचारांशी तंतोतंत जुळत होते.

 

दोन ध्येयवेड्या मनांनी पर्वतीवर घेतलेला तो निर्णय एका आदर्श सहजीवनाची आणि संघर्षाची नांदी ठरला. अशा प्रकारे, एका पत्रिकेने दोन प्रवासांना एकाच मार्गावर आणून सोडले.

 

6

लग्नाची गाठ आणि ध्येयवादाची ओढ: एक पारदर्शक प्रवास

 

बागेश्रीताई  आणि विवेक पोंक्षे सरांचे लग्न ४ जून रोजी झाले आणि अवघ्या पाच दिवसांनी, ९ जूनला हे नवदाम्पत्य अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या कामासाठी रवाना झाले. हे लग्न केवळ दोन व्यक्तींचे नव्हते, तर दोन ध्येयवाद्यांचे मिलन होते. ताईंच्या घरचे वातावरण अतिशय मोकळे आणि सुधारक विचारांचे होते. त्यांचे वडील एअरफोर्समध्ये होते आणि त्यांनी स्वतःचे लग्न कोणत्याही पत्रिकेविना १५ ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या मुहूर्तावर केले होते. पण मुलीच्या लग्नाच्या वेळी समाजाच्या चौकटीत राहून त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

 

स्थळ बघण्याच्या त्या पारंपरिक कार्यक्रमांमध्ये बागेश्रीताईंना नेहमीच एक प्रकारचा संकोच वाटायचा. "आम्ही काय वस्तू आहोत का?" असा प्रश्न त्यांना पडायचा. तरीही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्या या कार्यक्रमांना जात असत.

 

स्वतःच्या सामाजिक कार्याची 'अर्ज' (Urge) इतकी प्रबळ होती की, वडिलांनी दिलेल्या परवानगीनंतर त्यांनी आपल्या अटींची पत्रिका कार्यकर्त्यांकडे दिली होती. "जर सामाजिक कामाची आवड नसलेला नवरा मिळाला, तर मी सुखी राहू शकणार नाही," ही त्यांची स्पष्ट धारणा होती. म्हणूनच जेव्हा विवेक पोंक्षे सरांसारखा 'मेंटॉर' त्यांना जोडीदार म्हणून लाभला, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अरुणाचलच्या दुर्गम भागात जाण्याचा निर्णय घेतला.

 

 

अरुणाचलमधील 'विवेक' पर्व: एक वेगळा शिक्षक, एक वेगळा दृष्टिकोन

 

लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत विवेक पोंक्षे सर आणि बागेश्रीताई  अरुणाचल प्रदेशातील जयरामपूरच्या विवेकानंद केंद्रात रुजू झाले. तिथे सरांकडे अशी तीन कामं सोपवण्यात आली होती, ज्यामुळे कोणत्याही शिक्षकाला मुलांमध्ये लोकप्रिय होणं कठीण होतं.

 

पहिली जबाबदारी होती 'मेस इंचार्ज'ची. परिस्थिती इतकी बेताची होती की, आठवड्यातून फक्त एकदाच मुलांना मीठ देता यायचे. दुसरी जबाबदारी होती गणिताचे शिक्षक, ज्या विषयात मुलांना मार्क मिळणं कठीण जायचं. आणि तिसरी म्हणजे मुलांच्या घरून येणाऱ्या पैशांचं व्यवस्थापन. मुलं दर गुरुवारी सिनेमा बघायला पैसे मागायची, तेव्हा सर त्यांना म्हणायचे, "अरे, मागच्या गुरुवारी सिनेमा पाहिला होतास, या गुरुवारी काहीतरी वेगळं करून बघूया का?" मुलांचा पैसा वाचवून त्यांना नवनवीन गोष्टींसाठी प्रवृत्त करणं हे सरांचं कसब होतं.

 

गणिताची भीती घालवण्यासाठी सरांनी एक अनोखी पद्धत शोधली होती. ते मुलांना सांगायचे, "तुझी तुलना इतरांशी नको, तर स्वतःशीच कर." रात्री १२-१२ वाजेपर्यंत ते 'विवेक हॉस्टेल'वर मुलांना शिकवायचे. मुलांच्या कॉटपाशी त्यांच्या गणिताच्या मार्कांचा 'आलेख' लावलेला असायचा. स्वतःची प्रगती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे मुलांमध्ये विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला. ४ वाजता उठायचं असूनही रात्री उशिरापर्यंत मुलांना वेळ देताना सरांच्या चेहऱ्यावर कधीही थकवा नसायचा.

 

सरांची स्मरणशक्ती आणि मुलांबद्दलचं प्रेम अफाट होतं. जयरामपूरच्या दहावीच्या बॅचमधील सर्व ४० मुलांची नावं, त्यांची गावं, त्यांचा समाज आणि कौटुंबिक परिस्थिती सरांना तोंडपाठ होती. पुढे ज्ञान प्रबोधिनीत २० वर्ष प्राचार्य असतानाही, ते डोळे मिटून कोणत्याही बॅचमधील मुलांची माहिती सांगू शकत असत. आजारपणातही एखाद्या मुलाचं नाव आठवलं नाही, तर ते अस्वस्थ व्हायचे.

 

मुलांवर केवळ प्रेम करून चालत नाही, तर त्यांच्या प्रगतीचा शास्त्रशुद्ध ध्यास कसा घ्यावा, याचा आदर्श म्हणजे विवेक पोंक्षे सर.

 

निसर्गाची शाळा आणि बांबूचा 'जखा': अरुणाचलमधील समृद्ध दिवस

 

विवेक पोंक्षे सर शाळेत गणिताचे आलेख मांडत असताना, बागेश्रीताईंनी मात्र वस्त्यांवरील मुलांशी गणिताचे नाते मासे पकडता पकडता जोडले होते. हाजंग आणि चकमा समाजाच्या वस्त्यांवर जेव्हा ताई जायच्या, तेव्हा तिथल्या पालकांना वाटायचे की शाळेत गेली तर मुले मासे पकडायला कधी शिकणार? यावर उपाय म्हणून ताईंनी त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच कलेतून शिक्षण सुरू केले.

 

मुलांनी ताईंना बांबूचा 'जखा' (मासे पकडण्याचे साधन) तयार करायला शिकवले. मग झाडांच्या मोठ्या बुंध्यांवर बसून गणिताचे तास भरायचे. कोणाला किती मासे मिळाले, कोणाचे जास्त, कोणाचे कमी आणि दोन मासे मिळाले तर सरांना काय जेवण घालणार? या गप्पांतून बेरीज-वजाबाकीच्या संकल्पना सहज स्पष्ट व्हायच्या. गमतीची गोष्ट म्हणजे, ताईंनी पुण्याहून नेलेली साबणाची (लक्स वगैरे) सुवासिक वेष्टने ही त्या मुलांसाठी सर्वात मोठी 'बक्षिसे' होती. तो सुवासिक कागद मिळवण्यासाठी मुले गणिताची उदाहरणे आवडीने सोडवू लागली.

 

संसाधने नसतानाही ताईंचा उत्साह दांडगा होता. एका आदिवासी माणसाकडून त्यांनी सायकल मिळवली आणि त्या एका सायकलवर पाच-पाच मुलांना बसवून त्या वस्त्यांवर फिरू लागल्या. यातूनच त्यांनी '१० अधिक शून्य' किंवा 'हातच्याची बेरीज' यासारख्या क्लिष्ट संकल्पना त्या मुलांना खेळता खेळता शिकवल्या. एका वर्षाच्या प्रवासात ही मुले दशक-शतकाच्या बेरजांपर्यंत पोहोचली, हे त्यांचे मोठे यश होते.'मिल्क पावडर संपेल' म्हणून टोकले तरी, प्रत्येकाला कॉफी पाजण्याचा त्यांचा स्वभाव तिथेही कायम होता. अरुणाचलच्या त्या दुर्गम भागात बांबू, मासे, सायकल आणि साबणाची वेष्टने यांच्या माध्यमातून शिक्षणाची एक वेगळीच पहाट बागेश्रीताईंनी फुलवली होती.

 

विवेक सरांच्या व्यक्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे 'मेंटॉरिंग' किंवा मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती. बागेश्रीताई सांगतात त्याप्रमाणे, मार्गदर्शन ही गोष्ट केवळ एका ठराविक काळापुरती मर्यादित नसते, तर ती आयुष्यभर करायची असते, ही संकल्पना सरांनी आपल्या आचरणातून रुजवली. विद्यार्थी दहावी-बारावी झाला की नाते संपले, असे सरांच्या बाबतीत कधीच घडले नाही. मुकुंद कुलकर्णीसारख्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील पाणी हेच सांगते की, सरांनी कमावलेली माणसे किती मोठी होती. "आता मी काय करू? सरांना विचारल्याशिवाय मी काहीच केले नाही," ही त्या विद्यार्थ्याची भावना सरांच्या मार्गदर्शनाची व्याप्ती स्पष्ट करते.

 

देशसेवेची ओढ या दाम्पत्याला अरुणाचल प्रदेशासारख्या दुर्गम भागात घेऊन गेली होती. मुलगा आदित्यच्या जन्मानंतरही एक वर्ष विवेक सर तिथेच कार्यरत होते. मात्र, तिथल्या हवामानामुळे त्यांना सतत होणारा खोकला आणि खालावलेली प्रकृती यामुळे त्यांना तिथून परतावे लागले. पण हा परतावा केवळ प्रकृतीमुळे होता, ध्येयापासून बाजूला होण्यासाठी नव्हता. प्रबोधिनीचे काम करायचे हे सरांनी पहिल्यापासूनच पक्के केले होते. बागेश्रीताईंनीही या संपूर्ण प्रवासात सरांना खंबीर साथ दिली. प्रकृती साथ देत नसतानाही ध्येयवाद मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. एक आदर्श शिक्षक, कार्यकर्ता आणि मार्गदर्शक कसा असावा, याचा वस्तुपाठच या प्रवासातून पाहायला मिळतो.

7

 

विवेक सर आणि बागेश्रीताई यांच्या वैचारिक जडणघडणीत हिंदुत्व आणि धर्मसंस्थापना या प्रबोधिनीच्या मूलभूत तत्त्वज्ञानाबद्दल कमालीची स्पष्टता होती. सरांचा संघाशी असलेला जवळचा संबंध आणि तळजाईवरील मोठ्या शिबिरातील त्यांची बौद्धिक टिपणे काढण्याची जबाबदारी, यातून त्यांचा वैचारिक पाया पक्का झाला होता. एम.एस्सी. करत असताना रूमवर राहणारा ख्रिश्चन मुलगा असो, दलित पँथरचा कार्यकर्ता असो किंवा चर्चमधील भेटीगाठी, या सर्व अनुभवांतून सरांनी विविध विचारप्रवाह जवळून पाहिले. शेजारी राहणारे समाजवादी विचारसरणीचे परांजपे काका-काकू किंवा रिपब्लिकन पक्षाचे शंकरराव यांच्याशी होणाऱ्या सखोल चर्चांमधून सरांचा हिंदुत्वाचा विचार अधिक प्रगल्भ आणि सखोल होत गेला. बागेश्रीताईंचीही धारणा अशीच होती; विविध विचारसरणीच्या मित्रांशी चर्चा करताना त्यांचाही हिंदुत्वाचा विचार प्रबोधिनीपूर्वीच पक्का झाला होता.

 

देशसेवेची ओढ या दाम्पत्याला अरुणाचल प्रदेशासारख्या दुर्गम भागात घेऊन गेली. तिथे आदित्यच्या जन्मानंतरही एक वर्ष सरांनी सेवा दिली. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना परतावे लागले. पण हा परतावा केवळ शारीरिक होता, मानसिकदृष्ट्या ते प्रबोधिनीच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित होते. प्रबोधिनीचे काम करायचे हे त्यांनी सुरुवातीपासूनच निश्चित केले होते. स्वतःच्या विचारांवर ठाम राहून आणि सर्वसमावेशक चर्चांमधून आपले तत्त्वज्ञान पक्के करून समाजसेवेसाठी आयुष्य वेचणारे हे दाम्पत्य अनेकांसाठी आजही प्रेरणास्थान आहे.

 

कर्तव्यकठोर ध्येयवाद: विवेक पोंक्षे सरांची 'कर्मयोग' साधना

 

विवेक पोंक्षे सरांचे आयुष्य म्हणजे विचारांची स्पष्टता आणि कर्तव्याप्रती असलेली पराकोटीची निष्ठा यांचा एक विलक्षण संगम होता. प्रबोधिनीचे 'आध्यात्मिक हिंदुत्व' आणि संघाचे 'सांस्कृतिक हिंदुत्व' यावर चर्चा करताना, त्यांच्या जीवनात हे दोन्ही प्रवाह कृतीतून उतरलेले दिसतात. जरी त्यांच्या घरात सुरुवातीला देव्हारा नव्हता किंवा ते स्वतः पूजा-अर्चा, ध्यानाला बसत नव्हते, तरीही त्यांचे संपूर्ण जीवन हीच एक अखंड 'उपासना' होती. अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर माणसांची सेवा आणि आपल्या तत्त्वांवरची अढळ श्रद्धा, हेच सरांनी आयुष्यभर जपले.

 

सरांच्या व्यक्तिमत्त्वातील पारदर्शकता त्यांच्या वागण्यातून पावलोपावली जाणवत असे. बागेश्री ताई जेव्हा आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या सेवेसाठी त्यांना घरी आणण्याचा विचार करत होत्या, तेव्हा सरांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना सोबत राहण्यास सांगितले. घरी देव आले, पूजा अर्चा सुरू झाली, तरी सरांचा त्याला कधीच विरोध नव्हता. "देवाने आपल्याला माणसांकडे दुर्लक्ष करायला सांगितले नाही," ही त्यांची धारणा होती. स्वतः ध्यानाला न बसताही, ज्या पद्धतीने त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले, तो एक प्रकारचा 'आध्यात्मिक अनुभव'च होता.

 

त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागली ती अखेरच्या काळात. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने शरीर पोखरलेले असताना, वजन ४० किलोने घटलेले असतानाही, सरांचा ज्ञान प्रबोधिनीतील वावर थांबला नव्हता. तीन मजले चढून वर जाताना अंगात ताकद नव्हती, पण जिद्द मात्र अफाट होती. ताई त्यांचे पाय एक-एक पायरी वर उचलून ठेवायच्या आणि सर रेलिंग धरून स्वतःला सावरत वर चढायचे. अशा स्थितीतही रोज चार तास प्रबोधिनीत येऊन त्यांनी 'अटल टिंकरिंग लॅब'चे अत्यंत महत्त्वाचे काम पूर्णत्वास नेले.

 

मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांचे चित्त केवळ कामातच होते. ११ मार्चला त्यांनी गिरीशरावांना फोन करून आपली शक्ती संपत चालल्याची जाणीव करून दिली आणि आपली सेवा रुजू झाली असे मानले. शेवटच्या फोनवरही त्यांनी अरुणाचल, नंदुरबार येथील शाळांच्या कामाचा पाठपुरावा केला आणि कामाची साखळी तुटणार नाही याची काळजी घेतली. "आपण करत होतो ते काम चांगले आहे, ते करत राहूयात; जगात काही फरक पडणार नाही, फक्त मी नसणार आहे," हे त्यांचे शेवटचे शब्द त्यांच्यातील स्थितप्रज्ञ वृत्ती दर्शवतात. पॅलिएटिव्ह केअर घेतानाही डॉक्टरांशी होणारा त्यांचा संवाद एका सखोल वैचारिक पाया असलेल्या ऋषितुल्य माणसाचाच होता. विवेक सरांनी शेवटच्या श्वासापर्यंत कामातूनच आपले 'हिंदुत्व' आणि 'अध्यात्म' सिद्ध केले.

 

मृत्यूवर मात करणारा कर्मयोग

खरे अध्यात्म हे केवळ पूजा-अर्चेत नसते, तर ते संकटाच्या वेळी माणसाने दाखवलेल्या धैर्यात आणि कर्तव्यात असते. विवेक पोंक्षे सरांचे आयुष्य याच तत्त्वावर आधारलेले होते. जेव्हा डॉक्टर धनंजय केळकरांनी त्यांना सांगितले की त्यांच्याकडे आता फक्त एक वर्ष उरले आहे, तेव्हा सामान्य माणूस खचून गेला असता; पण सरांनी अतिशय शांतपणे बागेश्रीताईंना सांगितले, "आता आपल्याला या एका वर्षाची रचना करावी लागेल." मृत्यूची भीती वाटावी अशी परिस्थिती असताना, सरांचे मन मात्र कामाच्या नियोजनात मग्न होते.

 

सरांचा स्वभाव मुळातच अत्यंत चिकित्सक आणि तर्कसंगत होता. त्यांच्या घरात सुरुवातीला देव्हारा नव्हता, पण म्हणून ते संस्कारहीन नव्हते. त्यांचे वडील स्वतः सोवळं-ओवळं पाळून देवाची पूजा करायचे, मात्र सरांचा दृष्टिकोन व्यावहारिक आणि कर्तव्यप्रधान होता. घरातील स्त्रियांना सणावाराच्या कामासाठी नोकरीतून रजा घ्यावी लागू नये, म्हणून "तो विधी रविवारी का करता येणार नाही?" असा रोकडा प्रश्न विचारण्याइतकी त्यांची वृत्ती पुरोगामी आणि कामाला प्राधान्य देणारी होती. तरीही बागेश्रीताईंच्या मते, सरांच्या या वर्तणुकीतच खरे 'अध्यात्म' दडलेले होते. कोणतीही सक्ती नसताना, सासूबाई आणि पती विवेक यांनी ताईंच्या आई-वडिलांना घरी आणून त्यांची सेवा करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्यातील माणुसकी आणि आध्यात्मिक उंचीचाच पुरावा होता.

 

आपल्याकडे उरलेला मर्यादित वेळ सरांनी प्रबोधिनीच्या कामाची व्यवस्था लावण्यात खर्च केला. संशोधिकेतील कोणते प्रकल्प कोणाकडे सोपवायचे, शैक्षणिक उपक्रम कसे चालवायचे, याची त्यांनी सूक्ष्म रचना केली. गिरीशरावांशी बोलून कामाची जबाबदारी योग्य व्यक्तींकडे सोपवताना त्यांची धडपड केवळ संस्थेचे काम थांबू नये, यासाठी होती. वजन कमी झालेले असताना आणि शरीरात त्राण नसतानाही, शेवटचे आठ महिने ते रोज चार तास प्रबोधिनीत जात राहिले. ताई जेव्हा त्यांचे पाय एकेक पायरी वर उचलून ठेवत होत्या, तेव्हा त्या केवळ त्यांच्या शरीराला नाही, तर सरांच्या ध्येयवादाला साथ देत होत्या.

 

बागेश्रीताई या प्रवासात सरांच्या सावलीसारख्या सोबत होत्या. सरांची चिकित्सक वृत्ती आणि घराण्यातील पारंपरिक धार्मिकता या दोन्हीचा मेळ त्यांनी अत्यंत कौशल्याने घातला. सरांनी कधी स्वतः ध्यानाला बसून साधना केली नाही, पण शेवटच्या श्वासापर्यंत कामाप्रती दिलेला 'बळी' हीच त्यांची मोठी साधना होती. "आपण करत असलेले काम चांगले आहे आणि ते सुरूच राहील, फक्त मी नसेन," असे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेली शांतता ही एखाद्या स्थितप्रज्ञ संतासारखीच होती. विवेकसर आणि बागेश्रीताईंचा हा प्रवास केवळ एका कार्यकर्त्याचा प्रवास नाही, तर तो एका निस्सीम 'कर्मयोगाचा' अध्याय आहे.

 

प्रबोधक कुटुंब

 

पोंक्षे कुटुंब हे कधी चौकोनी नव्हतंच, म्हणजे आम्ही चार आणि आमचं घर असं कधी फारसं तिथे घडलंच नाही. आठवड्यातून निदान चार-पाच लोकं तरी नित्य जेवायला नक्की असायचे. अरुणाचलचं तर ते काय म्हणतात त्याला, 'सेकंड होम' होतं. बहुतेक अरुणाचलमधून शिकायला येणाऱ्या अनेक मुलांचे सर आणि ताई गार्डियन होते. काही मुलं काही दिवस राहिली, तर काही मुलं अगदी तीन-तीन वर्ष राहिली.

 

हाजुली  नावाचा एक मुलगा होता, त्याच्याबद्दल एका मुलाने ताईला सांगितलं की, "ताई हाजुली  एक दिवस वडापाव खातो आणि एक दिवस चहा पितो." हे ज्यावेळी कळलं त्यावेळी ताई तडक उठल्या, त्या मुलाला घेऊन हाजुलीकडे गेल्या आणि हाजुलीला सरळ त्यांनी आपल्या घरी आणलं. पुढे हाजुली  तीन वर्ष पोंक्षे कुटुंबाचा सदस्य होता. अशी तीन-एक वर्ष राहणारे निदान चार-एक लोकं तरी नक्की असतील. एक-दोन वर्ष अशी राहणारी २०-एक मुलं तर असतील.

 

अनेक संघटनांचे कार्यकर्ते, अनेक संघटनांचे पदाधिकारी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे पदाधिकारी, प्रबोधिनीचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, अविवाहित कार्यकर्ते, हे तर सरांच्याकडे नेहमीच जेवायला असायचे. आशताई म्हणजे आपल्या भोजनगृहातली पंगत; ह्यानंतर पुण्यातली पंगत मी अनुभवली, ती केवळ पोंक्षे सरांच्या घरीच. त्यामुळे पोंक्षे सरांचं कुटुंब हे नेहमी विस्तारणारच राहिलं.

 

घर घेण्याची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पहिलं घर घेण्यासाठी एसबीआयमध्ये लोन घेण्यासाठी गेले सर आणि योगायोगाने त्यांचा विद्यार्थी समोर होता. सरांची पे-स्लिप त्यांनी पाहिली आणि नंतर बागेश्री  ताईंना त्यांनी बोलवून घेतलं, ते खूपच अस्वस्थ होते, नाराज होते आणि म्हणाले की, "सरांच्या या पे-स्लिपवर मी त्यांना लोन देऊ शकत नाही ताई." ताईंनी त्यांना 'का', 'परंतु' असले काही प्रश्न नाही विचारले. त्यांनी "ठीक आहे, काही हरकत नाही, सरांनाही वाईट वाटणार नाही" आणि खरोखरच दोघांना काही वाटलं नाही, ते परत आले.

 

दुसरं घर घ्यायचा प्रसंग आला आणि त्यावेळी ताईंच्या आई सरांकडे राहायला येणार होत्या. घर थोडंसं मोठं लागणार होतं आणि योगायोगाने बाजूचं घर विकायला निघालं आणि सोसायटीच्या तिथल्या माणसांना कळलं की सरांनाही घर घ्यायचंय, हे विकायला आलंय; ते थेट ताईंना भेटायला आले आणि विचारलं, "ताई तुमच्याकडे पाच-दहा हजार रुपये आहेत का?" ताई म्हणाल्या, "बघावं लागेल, असतील का नाही ते सांगता येत नाही." पाहिले आणि योगायोगाने ५००० रुपये होते आणि ते पैसे घेतले आणि पहिला इसार दुसऱ्या घरासाठी झाला. पैशाची जुळवाजुळव करणं खूपच अवघड होतं. सरांचं असं पक्कं मत होतं की, पैशांचा विचार करण्यापेक्षा पैसे जर आपण दिले तर आपल्याला पैसे मिळतात. आपल्यासाठी पैशांची योजना होते.. प्रबोधिनीतल्या अनेक लोकांनी मदत केलेलीच होती; प्रबोधिनी तर सरांचं एक कुटुंबच.

 

एक दिवस सहज आपल्या शेजारी असणाऱ्या मिलिंदसरांशी ताई बोलत होत्या अशा घरातल्या लोकांशी की, "असं पैशाची जुळवाजुळव होत नाहीये" आणि ते मिलिंद सर थेट उठले आणि म्हणाले, "चला ताई आपण बँकेत जाऊ" आणि ते बँकेत गेले आणि त्यांनी चक्क त्यांच्याकडे असणारे सगळे शेअर्स विकून टाकले आणि घराला लागणारी तीन चतुर्थांश रक्कम त्यांनी मदत म्हणून दिली. न मागता ही मदत सरांना येत राहिली, कुटुंबाला येत राहिली. असं हे खरंच वेगळं प्रबोधक कुटुंब आहे.

 

ताईंच्या आई आजारी झाल्या, त्यांना अर्धांगवायूचा त्रास होता आणि ताईंना त्यांची शुश्रूषा करण्यासाठी सतत जावं लागायचं. "त्यापेक्षा धावपळ एवढी करण्यापेक्षा आईंना आपल्याच घरी आणून ठेवलं तर काय हरकत आहे, धावपळ पण होणार नाही आणि काम पण होईल", अशी सूचना देखील देणारे सर तर होतेच पण सासूबाई पण होत्या.

 

मध्यंतरीच्या काळामध्ये सरांचा अचानकच फोन आला. "अरे प्रसाद, आपण असं करू तसं करू", असे युज्वल फोनवर ते बोलायचे. ह्यावेळी बोलताना त्यांनी मला म्हणले की, "प्रसाद माझं एक काम करशील का?" सरांनी त्यांचं काम सांगावं आणि मी न करावं असं काही असू शकत नव्हतं. सर म्हणले, "अभिषेक करायचा आहे देवीला अंबाजोगाई च्या" आणि तो नवरात्रीच्या असायचा. सर फारसे मंदिरात जात नाहीत हे मला माहित होतं, अभिषेक तर खूप दूरची गोष्ट होती. मी स्वतः जोगाईच्या मंदिरात वर्षानुवर्ष जात नाही आणि नवरात्रीत तर मी पाय ठेवत नाही.

मी सरांना "हो" म्हणलं, अभिषेक झाला आणि "प्रसाद कुठे पाठवू" म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं की, "आईच्या पत्त्यावर पाठव, आईच्या नावाने पाठव." मग मला लक्षात आलं की आईसाठी पोंक्षे सर हा अभिषेक करतायत. जवळपास आई असेपर्यंत सरांचा नवरात्रीमध्ये मला फोन यायचा, त्या निमित्ताने माझं पण योगेश्वरीचं दर्शन व्हायचं. आपल्या आईसाठी कधीकधी आपला सारासार विवेक बाजूला ठेवून भावना जोडणारे असे सर होते.

 

सरांचं काम अफाट होतं. अरुणाचल प्रदेशमधून आल्यानंतर त्यांना पाहायचं होतं की आपण पैसे कमवू शकतो का आणि त्यांनी गिरीशरावांकडून परमिशन मागितली आणि ते एका क्लासमध्ये शिकवायला लागले. सकाळी ६ ला क्लासमध्ये शिकवायला जायचं, त्यानंतर १० ला शाळा, ५ ला शाळा सुटली की मग परत १० वाजेपर्यंत क्लासमध्ये शिकवायचं. ६ ते १० झालं आणि त्याच काळामध्ये किल्लारीचा भूकंप झाला आणि किल्लारीच्या भूकंपाच्या मदतकार्याच्या कार्यालयाची जबाबदारी पोंक्षे सरांवर आली. पोंक्षे सरांचं काम झालं सकाळी ६ ते रात्री २.

 

काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला! सर असं काय म्हणतात त्याला, 'पराक्रमाची कृती' करून... म्हणजे राष्ट्रार्थ भव्य कृतिका ही पराक्रमाची भव्य कृतिका चाललेली होती एका प्रकारे राष्ट्रार्थ. तर त्यावेळी सगळी घरची जबाबदारी मात्र बागेश्रीताई सांभाळत होत्या. मुलांची अगदी शाळा, जेवण, त्यांचे अभ्यास, त्यांच्या सगळ्या गोष्टी, घरातल्या लोकांना भेटणं, बोलणं. एकीकडे विवेक होता तर एकीकडे भावना होती. एकीकडे मस्तिष्क होतं तर दुसरीकडे हृदय होतं.

 

त्यांची मुलं पण अफलातून आहेत. छोटी निवेदिता चौथी-पाचवीच्या वर्षाची असेल आणि एक दिवस ताई कुठल्यातरी बाहेरगावाला व्याख्यानासाठी जाणार होत्या. तिला आणण्यासाठी म्हणून सरांना सांगितलं, सर काहीतरी कामात व्यस्त होते, विसरून गेले. ही छोटी पोरगी कुठलाही त्रागा न करता आपल्या काकूकडे निघून गेली आणि काकूकडून तिने आईला फोन केला, "आई तू तर गावाला गेलीस हे मला माहित होतं आणि बाबा तर येणं शक्य नव्हतं. मी काकूकडे आले आणि ठीक आहे आता.” अशी ही छोटी निवेदिता.

 

सरांना कॅन्सर झाला आणि ते झगडत होते कॅन्सरशी. याच काळामध्ये निवेदिता 'कॅन्सर जे कॅन्सरमधून सर्व्हाइव्ह झालेले आहेत अशा सगळ्या लोकांची एक प्रश्नावली भरून घेत होती. तिला तिच्या मैत्रिणीने विचारलं की, "तुझे वडील देखील कॅन्सर सर्व्हायव्हर आहेत ना, तू त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणार का?" ती म्हणली, "नाही, माझे वडील कॅन्सर सर्व्हायव्हर नाहीयेत, ते कॅन्सर फायटर आहेत. त्यांच्याकडून मी फॉर्म भरून घेणार नाही."

 

मला नेहमी असा प्रश्न पडतो की, सर आणि ताईंमध्ये भांडणं होत नसतील का? सरांच्या भव्य कृती करण्याच्या धुंदीमध्ये कधी-कधी अनेक गोष्टी राहून जायच्या आणि मग कधी-कधी ताई चिडायच्या, त्यांचा भांडणाचा मनोदय असायचा. पण सर एकदम शांत, भांडण्यामध्ये त्यांची ती शांत भूमिका असायची. त्या भांडणाची हवाच निघून जायची ना !!

 

खरं तर आधी ताईंना कॅन्सर होण्याची शक्यता आहे असा अंदाज होता, त्यामुळे त्यांना नियमित चाचण्या करायला जावं लागायचं. आणि एक दिवस त्यांना असं वाटलं की आपल्याला कॅन्सर झालाच आहे आणि त्यांचा चेहरा उतरला ना! सर त्यांना म्हणाले, "सहा-सात वर्षांच्या छोट्या लेकराला ज्यावेळी ब्लड कॅन्सर होतो त्यावेळी त्यांनी काय समजायचं? आपलं तर असं एखादं अवयव आहे की खरं त्याचा उपयोग संपलेला आहे, ते काढून टाकलं तर काय प्रॉब्लेम!" आणि पुढे प्रत्यक्ष ज्यावेळी सरांना कॅन्सर झाला, त्यावेळी त्यांचं वागणं असंच होतं. अशाच पद्धतीने विवेकपूर्ण विचार करण्याची त्यांची प्रक्रिया होती.

 

हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते म्हणायचे की, "ते सलाईन पडतंय ना, ते संपल्यानंतर काहीतरी असा हॉर्न देणारा, सिग्नल देणारा, इन्फॉर्मेशन देणारा असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट आपल्याला शोधून काढता येईल का? ते फार गरजेचं आहे." या स्थितप्रज्ञासारख्या वागणाऱ्या सरांना पाहूनच ताईंनी खूप काही गोष्टी शिकल्या. ताईंच्या आईला अर्धांगवायू झाला त्यांची सेवा, पुढे पोंक्षे सरांना कॅन्सर झाला त्यांची सगळी सेवा. अचानक तरुण निवेदिता जात राहिली तो मोठा धक्का, आणि आता ९२ वर्षांच्या वडिलांची शुश्रूषा करणं. मी समजू शकतो, मी गेल्या ७ वर्षांमध्ये आईची सेवा करताना माझ्यामध्ये झालेले बदल, माझ्यामध्ये आलेली अस्वस्थता, त्यामुळे अगदी मला सायकियाट्रिस्टपर्यंत जायची वेळ आली.

 

मी ताईंना ज्यावेळी या प्रश्नाबद्दल विचारतो, त्यावेळी ताई म्हणतात की, "सरांकडे पाहून मी हे सगळं शिकले. धक्के सहज पचवता यायला लागले." असं एकमेकाला समजून घेणारं, एकमेकाला असं सांभाळून घेणारं हे सगळं कुटुंब. सरांच्या वडिलांना तर अल्झायमर झालेला होता आणि त्या परिस्थितीत वडील ते सगळे अंबाजोगाईला आलेले होते. त्यावेळी त्या सगळ्या कुटुंबाचं पोंक्षे कुटुंबाचं ज्यावेळी मी पाहिलं घरी आल्यानंतर, डॉक्टर लोहियांकडे गेल्यानंतर त्यांचं सगळं एक वेगळेपण खरंच जाणवतं. मी पाहिलेला तत्वविचार प्रत्यक्ष जगण्यात आणणारं हे खरोखर एक प्रबोधक कुटुंब आहे.