सोमवार, ३१ मार्च, २०१४

तु ही तृप्त नाही व तुझ्या सोबतचे पण .....



मला खूप वेळा निसर्गाचे नियम आणि माणसांनी केलेले नियम यांचा होणारा संघर्ष पाहिल्यावर खूप काही समजते. गांधीजी म्हणायचे निसर्ग तुमच्या गरजा नक्की पूर्ण करतो हाव नाही. गांधीजींनी हा समजून घेतलेला व आचरणात आणलेला सिद्धांत समजून घेताना खूप काही कळते. काय हो काय निसर्ग नियमित आहे आणि काय मानव निर्मित आहे याची गणती मी करू लागतो
.
मानवजात (स्त्री व पुरुष) निर्माण केली निसर्गाने.वृक्ष, झाडी, फुले, फळे निर्माण केली निसर्गाने...पशु, पक्षी, जलचर निर्माण केले निसर्गाने....भूमी,पाणी, हवा, अग्नी,प्रकाश निर्माण केला निसर्गाने....गंमत पाहताना असे लक्षात येते  की ज्याला जे हवे असते ते सगळे निसर्गाने निर्माण केले. आपल्या उदरनिर्वाहासाठीच्या सर्व गोष्टी निसर्गाने निर्माण केल्या.....वृक्षाचा धर्म असतो फुले, फळे निर्माण करण्याचा. तसाच मनुष्य, पशु,पक्षी इतर जीव पण आपल्या सारखेच जीव निर्माण करतात....मनुष्य सोडला तर प्रत्येक जीव जी काही निर्मिती करतो त्या निर्मितीची जोपासनी करण्याचे दाइत्व विशिष्ठ काळा नंतर निर्मात्यावर असते. एकदा ती निर्मिती स्वयंपूर्ण झाली की ती स्वतःच आपल्या अस्तिवाची काळजी घेते...झाडाला अपेक्षा नसते परत फुला फळांनी त्याच्या आश्रित राहावे म्हणून. एकदा फळ पिकले की ते गळूनच पडणारा. झाडाला कितीही वाटले ते आपल्या सानिध्यात ठेवावे ते नाही रहात. हा निसर्गाचा नियम आहे.

मनुष्याच्या निर्मिती बाबत मात्र असे होताना दिसत नाही. मुळातच मला असे वाटते निसर्गाची सर्वात कमजोर निर्मिती म्हणजे म्हणजे मनुष्य...हे त्याला समजण्यासाठी निसर्गाने त्यांना मन व बुद्धी दिली. या मन व बुद्धी द्वारे मनुष्याने आपले स्वतःचे काही नियम निर्माण केले. आणि काही मग सुरु झाला मनुष्यातीलच आपसी संघर्ष...आई व वडील मुलाचे पालन पोषण करतात म्हणून त्यांची काही कर्तव्य व नंतर मुलांचे त्यांच्या साठी कर्तव्य ....कर्तव्य हे सहज भावनेने फुलण्या पेक्षा ते नियमाच्या आणि अपेक्षाच्या बंधनात अडकायला लागले. याव्यक्ती कडून मला हेच मिळाले पाहिजे हा अट्टाहास पुढे सुरु झाला. तो निर्माण होण्याचे कारण मला खुपदा अपेक्षा,भीती व त्यातून निर्माण झालेल्या आवडी निवडी. त्यातून मग संघर्ष, अस्वस्थता, अराजकता, रोग निर्माण झाले.

मुळातच मला वाटते प्रेम,आपुलकी,सोबत,मदत,मार्गदर्शन आपल्याला आमुक एका व्यक्ती पासूनच मिळायला पाहिजे म्हटल्यावर त्याव्यक्ती वर ते अवलंबून असते. मला स्वतःला असा अनुभव आहे की यासाऱ्या गोष्टी निसर्ग आपल्याला योग्य त्यावेळी योग्य त्या व्यक्ती कडून देतच असतो. पण आपण निसर्गाच्या या चिरंतन नियमावर विश्वास न ठेवता आपण आपल्या अपेक्षा वाढवत जातो. यातूनच मनुष्याची गोची होते. तो मग अयोग्य व्यक्ती कडून अपेक्षा करतो किंवा काही लोकां कडून जबरदस्तीने, स्वतः अस्वस्थ होत ते मिळवण्याचा हतबल प्रयत्न करत असतो. निसर्गाच्या चिरंतन नियमावर आपला विश्वास नसतो म्हणून आपल्या हातात येते केवळ असफलता, अस्वस्थता, त्रागा, त्रास, ताण ....त्यातून मग आपण घेरले जातो षड रीपुनी .....आपल्याला पाहिजे ते नव्हे तर आवश्यक ते नक्की मिळणार व ते योग्य वेळी मिळणार या वर विश्वास नाही ठेवला तर हे विषचक्र नक्कीच आपल्या मागे लागणार....म्हणूनच आपल्या अनुभव सिद्ध संतांनी म्हणतले अरे माणसा थोडं धीर धर...संयम ठेव ...थोडी वाट पहा ...थोडी तितिक्षा कर ...अरे कर्म करत रहा फळ तर नक्कीच मिळणार आहे....पण फळाची अपेक्षा ठेवून नको रे कर्म करू.... त्यामुळे तुझेच जीवन एक मृगजळ होऊन जाईल ...

तु ही तृप्त नाही व तुझ्या सोबतचे पण .....