शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

व्यापक विश्व आणि विश्वास असणारा प्रशांत !!



सातारा जिल्ह्यातील वाई एक आगळे वेगळे गाव. कृष्णेच्या काठी वसलेले हे छोटे गाव अनेक थोरामोठ्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी.गावाला धार्मिक,ऐतिहासिक आणि सामजिक पार्श्वभूमी. मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईचे. त्यांच्या घरापासून आठवे घर हे पांडुरंगराव दिवेकरांचे. पांडुरंगराव व त्यांची पत्नी नीताताई दोघेही शिक्षक.स्त्री शिक्षण संस्थेचे ते लाईफ मेंबर होते. वाई हे सामाजिक गाव. स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणे हे गावाचा उपजत स्वभाव आहे. तेथील घाटांची स्वच्छता करणे किंवा कृष्णामाईचा उत्सव असेल त्यात मंडप उभारण्या पासून जेवणावळी वाढण्या पर्यंत सर्व काम खूप तळमळीने करणे हे गावातील प्रत्येकाला वाटे.त्यामुळे नकळतच येथील लहानांपासून थोरांवर  स्वतःच्या पलीकडे जाऊन व्यापक विचार करण्याचा संस्कार होत असे. दिवेकरांचे कुटुंब असेच एक व्यापक विचार करणारे होते. पांडुरंगरावांचे वडील डॉक्टर. आपला पेशा त्यांनी व्यवसाय म्हणून न करता सेवा म्हणून केला तर नीताताईंचे वडील स्वातंत्र्यसैनिक अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता. प्रशांत दिवेकर या कुटुंबातील मोठा मुलगा.

लहान वयापासूनच कुटुंब,परिसर आणि शाळेचा व्यापक विचार करण्याचा संस्कार प्रशांतवर झालेला होता. शाळा राष्ट्रीय विचारांची होती. शाळेत पाठ्यपुस्तकं अतिशय तळमळीने शिकवणारे शिक्षक होते तसेच देशभक्ती आणि सामाजिक कामाचे संस्कार देणारे शिक्षक पण होते. गावातून पूर्णवेळ राष्ट्र कार्य करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा आदर्श प्रशांत समोर होता. तो पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायचा. अनेक गणमान्य व्यक्ती त्याच्या घरी यायचे. प्रशांतच्या आईचे वडील बेळगावचे. ते कडवे काँग्रेसी होते. तसेच ते चांगले उद्योजक होते. अनेक संस्थाना देणग्या ते देत असतं. प्रशांतची मावशी अपंग होती. ती अपंग संघटनेची काम करायची. तिच्याबरोबर अनेक ठिकाणी प्रशांत जायचा. लहान वयातच प्रशांतचे भावविश्व व्यापक बनत होते.

महाविद्यालयात असताना त्याने विज्ञान शाखा घेतली. दिवस आनंदाचे होते. भरपूर खेळणे आणि प्रचंड वाचन करणे हा प्रशांतचा स्वभाव बनला.कथा कादंबऱ्या पासून ते तत्त्वज्ञानाचे ग्रंथ असे चौफेर वाचन त्याचे होते. अर्थात त्यामुळे त्याचे विचार विश्व खूप व्यापक बनले. वाईच्या सार्वजनिक ग्रंथालयाचा पुरेपूर वापर त्याने करून घेतला होता. हिंदू वसंत व्याखानमाला,कृष्णा माईचा उत्सव यातील व्याख्याने यामुळे अनेक दिग्गज माणसांचे दर्शन त्याला होत होते.पदवीचे शिक्षण चालू असतानाच महाविद्यालयातील शिक्षक होण्याचे विचार प्रशांतच्या मनात दृढ होत होता.घरातले वातावरण पण त्याला अनुकूलच होते.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर प्रशांतने B.Ed. केले व पुढे M.Ed करण्यासाठी तो पुण्यात आला होता. सकाळीच महाविद्यालय असल्याने दिवसाचा बराच वेळ मोकळा मिळायचा. भरपूर भटकंती पण त्याने या काळात केली. त्याचे वडील आणि ज्ञान प्रबोधिनीचे माधवराव देशपांडे हे एकमेकांचे परिचित. माधवराव त्यावेळी औषधी वनस्पतीचा एक प्रकल्प प्रबोधिनी तर्फे राबवत होते. प्रशांतचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास चांगला होता. वडिलांनी प्रशांतला प्रबोधिनीत माधवरावांना संपर्क करण्यास सांगितले आणि त्याचे प्रबोधिनीत येणे वाढले. वेल्ह्यात असो की सिन्नरला तो माधवरावांच्या बरोबर जायचा. असेच एकदा तो ग्रामविकसन कार्यालयात बसला असताना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य श्री विवेक पोंक्षे तिथे आले होते.माधवरावांनी प्रशांतची ओळख पोंक्षेसरांशी करून दिली.

“बघा विवेकराव हा तरुण M.Ed. करतोय. तुम्हाला शिक्षक म्हणून हवा आहे का ?चांगला उमदा पोरगा आहे !!” माधवराव पोंक्षेसरांना म्हणाले.

सरांनी लगेच एक अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन महिन्याने एक पत्र प्रशांतला मिळाले. प्रत्यक्षात ते पत्र दोन महिने आधीच पाठवलेले होते व शिक्षक पदाच्या भर्ती साठीचे होते. प्रशांतने थेट प्रबोधिनी गाठली. त्याने झालेला प्रकार सांगितला. पोंक्षे सरांनी प्रशांतला दादा नवाथेनां भेटण्यास सांगितले. दादांनी चक्क दोन तास प्रशांतशी गप्पा मारल्या. त्यात प्रचलित शिक्षकाच्या मुलाखती सारखे काहीच नव्हते.त्या गप्पा चौफेर होत्या. दोन दिवसांनंतर शिक्षक प्रशिक्षणाला येण्याचा निरोप प्रशांतला मिळाला व प्रशांत शिक्षक म्हणून प्रबोधिनीत रुजू झाला.  

तत्त्वज्ञान, विज्ञान, राजकारण, समाजकारण यात पराकोटीच्या विवेकाने वावरणाऱ्या विवेकराव पोंक्षेनी आपल्यातील माणूस कधीच मरू दिला नव्हता. त्यांचा वावर तसा सर्वत्र. तसे त्यांचे आप्त ही सर्वत्र. त्यांच्या ह्या सर्व दूरू संचाराने अनेकांशी आत्मिक नाते सरांचे  निर्माण झाले होते. वाड्या, वस्ती,तांड्यातील अंत्यज व गिरीजनांपासून विकसित देशातील ज्ञानवंताच्या पर्यंत हा सर्व नात्यांच्या भावबंध होता.ज्ञान प्रबोधिनीच्या प्रशालेचे ते प्राचार्य असले तरी प्रत्येक शिक्षकाचे ते अभिमित्रच होते.प्रशांत विवेकसरांच्या सहवासात रमू लागला. संपर्क,सहवास आणि सामूहिक कृतीतून शिक्षण हे तो प्रत्यक्ष अनुभवत होता. प्रशालेतील प्रज्ञावंतांचे शिक्षण ते ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधून त्यांच्या विकासासाठीची ग्रामीण प्रज्ञा विकास योजना अशा दोन्ही ठिकाणी प्रशांत रमू लागला. शाळेतील पहिला दिवस मजेदार होता.प्रशांतचा विषय होता विज्ञान आणि प्रत्यक्षात त्याला शिकवण्यासाठी गणित विषय दिलेला. पोंक्षेसरांना त्याने हे सांगितले. त्यावर हसून ते म्हणाले,

“ शिकवायला लाग, तुला जमेल नक्की.”

पुढे हळूहळू तो अनेक विषय शिकवू लागला.फार दीर्घकाळ तो प्रबोधिनीत शिकवेल असे त्याला वाटत नव्हते. स्टेपिंग स्टोन सारखा प्रबोधिनीतील अनुभव त्याला उपयोगी पडेल असेच त्याला वाटत होते.

काळाच्या पोटात मात्र काही तरी वेगळेच लिहिलेले होते. पोंक्षेसर,प्रियाव्रत देशपांडे, अजय शेलार यासर्वांच्या बरोबर दिवाळीच्या सुट्टीत प्रशांत २५ दिवसांचा अभ्यास दौरा करण्यासाठी ईशान्य भारतात निघाला. हा अभ्यास दौरा त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देवून गेला.या काळात तो जे काही प्रबोधिनीत बोलले जात होते तो ते प्रत्यक्ष अनुभवत होता. सोबतच्या व्यक्तींशी त्याचे दृढ नाते निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच सोबत ईशान्य भारताशी पण.शिक्षण म्हणजे काय हे त्याला हे त्या दौऱ्यात कळले. इतर कुठे तो शिक्षक झाला असता तर चांगला पाठयपुस्तक शिकवणारा शिक्षक झाला असता. आता मात्र प्रत्येकात दडलेलं पूर्णत्व व्यक्त करणे हे म्हणजे शिक्षण असे तो शिकत होता. पोंक्षे सरांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच प्रभाव प्रशांतवर या काळात घडला.१९९९ सालचा हा दौरा प्रशांतच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा ठरला.

तीन वर्षे प्रबोधिनीत शिक्षक म्हणून काम केल्यावर आदिवासी विकास विभागाच्या एका आश्रम शाळेसाठी असणाऱ्या पात्रता परीक्षेत तो उतीर्ण झाला. प्रत्यक्ष बोलावणे येईल असे वाटत नव्हते. शासनाचा सावळा गोंधळ असतो. कॉल आल्यावर वडिलांचे मत होते की भीमाशंकरच्या डिंबे येथील आश्रम शाळेत रुजू व्हावे. आर्थिक सुरुक्षितता असावी असे त्यांचे मत होते. शनिवार रविवार प्रबोधिनिसाठी द्यावेत आणि इतर वेळ आश्रमशाळेत शिकवावे. वडिलांचा प्रभाव बराच प्रशांतवर होता.त्यांच्या मनाविरुद्ध काही करण्याची इच्छा त्याची अजिबात नव्हती. शेवटी त्याने आश्रम शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याना तो शिकवू लागला.

तीन वर्षे तो आश्रम शाळेत शिकवत होता. रविवारी काही झाले तरी तो पुण्यात यायचा. पोंक्षेसर, मिलिंद नाईक, प्रवीण पायगुडे,शिवाजी कोंडे या प्रबोधिनीतील त्याच्या मित्रांशी नाळ मात्र तुटली नव्हती.याच काळात स्वामी विवेकांदांची स्मृती शताब्धी होती. आपल्या प्रबोधिनीतील मित्रांच्या सोबत प्रशांतने भीमाशंकर भागात अनेक व्याख्यानांचे आयोजन केले. तो परिसरातील अनेक शाळेत पण जाऊ लागला होता. याच काळात त्याच्या मनात एक विचार अनुभवाने पक्का होत होता.शिक्षणात काही करायचे असेल तर शासकीय रचनेत काम करायला मर्यादा आहेत.त्यात त्या विभागाचा कारभार प्रचंड भ्रष्ट. याच काळात लग्नाचा विचार पण चालू होता. परत प्रबोधिनीत जायचे म्हंटले तर कमी पगार मिळणार. त्या पगाराला स्वीकारेल अशाच मुलीशी लग्न करणे योग्य होते. याच काळात वडिलांचे निधन झाले. आता आईला प्रबोधिनीत काम का करायचे हे पटवून देणे सोपे होते. शेवटी प्रशांत परत प्रबोधिनीत आला.आश्रम शाळेत असताना पण त्याचे शिकवणे प्रभावीच होते. पण प्रबोधिनीत असलेल्या शिक्षणाची विविधता. कामात मिळणारे नवनवीन अनुभव आणि मुख्यतः कामासाठी मिळणारे स्वातंत्र्य हे खूपच प्रशांतला भावणारे होते.प्रबोधिनीत तो विविध विभागांच्या कामात तो सहभागी होत असे.

प्रबोधिनीच्या शाळेत अनेक शिक्षक येतात. काही काळ काम करतात.चांगल्या पगाराची नौकरी मिळाली की ते निघून जातात. प्रशांतच्या बाबतीत नेमकं उलटे घडत होते. तो चांगल्या पगाराची नौकरी सोडून परत प्रबोधिनीत आला होता. याचे कारण समजून घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे त्याला भावलेली प्रबोधिनीची सतत नवीन काही तरी करत राहण्याची उर्मी आणि त्यासाठी मिळणारे स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे दोन्ही आजोबांच्या  साधेपणाचा संस्कार. त्यामुळे तो केवळ प्रबोधिनीत परत आलाच नाही तर प्रचंड ताकदीने त्याने काम करायला सुरुवात केली.

मुलांचे अनेक अभ्यास दौरे काढण्यास सुरुवात केली. विद्याव्रत संस्काराच्या कामात तो हिरीरीने सहभाग घेवू लागला. ग्रामविकसनच्या कामात पण तो प्रासंगिक सहभाग घेवू लागला. अनेकांना प्रबोधिनी तो दाखवू लागला. छात्र प्रबोधन मधील काम असे अनेक ठिकाणी तो सहभागी होऊ लागला.याच काळात त्याचा आत्मविश्वास पण कमालीचा वाढला. गरज पडली तर मोठी आर्थिक कमाई करण्याची क्षमता त्याची आता झाली होती. विद्यार्थ्यांना शिकवणे या सोबतच तो पोंक्षेसरांच्या बरोबर तो शिक्षक प्रशिक्षण घेण्याचे काम करत होता. शिक्षकाचे प्रशिक्षण किती महत्वाचे आहे हे त्याला आश्रम शाळेतील अनुभवा नंतर लक्षात आले होते. एकुणात प्रशांतचे व्यक्तिमत्व सर्व स्पर्शी होत होते. 

ज्ञान प्रबोधिनी,सोलपुरच्या प्रशालेत आता एका प्रमुखाची नितांत गरज होती. त्यासाठी म्हणून प्रशांतला जबाबदारी देण्यात आली. प्रमुख म्हणून त्याने दोन वर्षे चांगले काम केले. मुलगा मोठा झाल्यावर त्याला परत येणे गरजेचे होते. परत आल्यावर तो तीन दिवस शाळेत शिकवायचा आणि तीन दिवस शिक्षक प्रशिक्षांचे काम करायचा.याच काळात त्याची संघटनात्मक घडण पण होत गेली. त्याने प्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा पण घेतले.विद्याव्रत संस्काराच्या शिबिरांच्या तो मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने त्यातील मर्म आणि प्रबोधिनीचे मर्म त्याला समजू लागले होते.

आजच्या घडीला त्याने प्रबोधिनीच्या माध्यमातून व अनेक सहकाऱ्यांच्या सोबत  २५ एक हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.जवळपास पन्ना संस्थाशी त्याच्या संपर्क आलेला आहे.दोनशेच्या वर शाळेत तो प्रशिक्षणासाठी जाऊन आलेला आहे. जवळपास आठ राज्यात त्याने काम केले आहे.एक विद्यार्थी म्हणून सुरु झालेला प्रशांतचा जीवन प्रवास एक शिक्षक प्रशिक्षक म्हणून विस्तारट गेला. त्याला भविष्यात ज्ञान प्रबोधिनीचे संचित विचारत नेण्याची आस आहे.

ज्ञान प्रबोधिनीचा अन्यराज्यात विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. तामिळनाडूचा शिलेदार आहे प्रशांत जोरदार काम चालू आहे.


मराठवाड्यातील युवकाची स्फूर्ती गाथा ...व्यंकटराव भताने


  

अंबाजोगाई तालुक्याच्या पूर्वेला डोंगराळ पट्यात एक छोटे गाव ‘भतानवाडी’. गावातील सर्वांचे आडनाव भताने. मानाजीराव भताने आपल्या परिवारासह इथे आपला प्रपंच चालवत होते. आपल्या पत्नी सह कोरडवाहू शेतीत राब राब राबावे हा त्यांचा दिनक्रम होता. व्यंकट हा त्यांचा सर्वात लहान मुलगा. मानाजीरावांचा मोठा मुलगा आणि व्यंकट यांच्या वयात मोठे अंतर.शिक्षणाचे वारे भतानवाडीत आता सुरु झाले होते. गावातील प्राथमिक शाळेत व्यंकट जाऊ लागला. तो एक भारी  चुणचुणीत मुलगा. चौथी पर्यंतचे शिक्षण आनंदात झाले. पुढे शिकायचे असेल तर चार किलोमीटर लांब असणाऱ्या उजनीच्या शाळेत पायी जावे लागायचे. गावातील सर्वच मुलं शिकण्यासाठी उजनीला जाऊ लागली. शाळेतील शिक्षणाचे संस्कार उत्तम होते. व्यंकटची शिक्षणातील रुची आणि गती वाढली.शाळेच्या ओढीने उन्ह पावसात आठ किलोमीटर चालणे त्यामुळे फारसे जिकीरीचे वाटलेच नाही. आपल्याला पाहिजे ते साध्य करायचे असेल तर परिस्थितीशी निकराने लढावे लागते हे व्यंकट लहान वयातच शिकत होता.तसा तो जिद्दी आणि कष्टाळू होता.

 

निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहत होते. बीड लोकसभा मतदार संघातून क्रांतिसिंह नाना पाटील उभे होते. त्यांची एक सभा उजनीला आयोजित करण्यात आलेली होती. व्यंकट आणि मित्र शाळा सुटल्यावर परत गावी जायचे सोडून थेट सभेला गेले. रात्र झाली. गावात मुलं नाही परतली म्हणून काळजीचे वातावरण होते.सगळे पालक आपल्या मुलांना शोधण्यासाठी उजनीला निघाली. भरपूर शोधाशोध केल्यावर सभेच्या ठिकाणी मुलांचा ठावठिकाणा लागला. कातावलेल्या पालक मंडळीनी पोरांना चांगलाच दम भरला आणि फटके पण दिले. व्यंकटच्या मनात मात्र पत्री सरकारचे जनक क्रांतिसिंह नाना पाटीलांना पाहिल्याचे आणि ऐकल्याचे भारी समाधान होते. याच काळात त्याने हैदाबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र पण वाचून काढले. असे नकळतच राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्यंकटवर होत होते.

 

दहावीच्या परीक्षेत पास झाल्यावर आता पुढेचे शिक्षण अंबाजोगाईला. अंबाजोगाई विद्येचे माहेरघर. अनेक मातब्बर मंडळींचा इथे राबता होता. संस्कार आणि संस्कृती याचा सुरेख संगम अंबाजोगाई झालेला पाहण्यास मिळतो. याच भूमीत हैदाबाद मुक्ती संग्राम चांगलाच लढला गेला त्यामुळे संघर्षाचा वसा अंबाजोगाईकरांसाठीची मोठी ठेव आहे. संस्कार,संस्कृती आणि संघर्ष यातून मनुष्य घडण अंबाजोगाईच्या वातावरणात होते. आता व्यंकटला स्वतः स्वयंपाक करावे लागायचे. सकाळी स्वयंपाक करून मराठवाडा कॉलेजमध्ये शिकण्यास जायचे आणि परतल्यावर रात्रीचा स्वयपाक करायचा. असे चांगलेच वर्षभर चालले. त्यानंतर मात्र त्यांनी खानावळ लावली. अंबाजोगाईचे सेलूकर गुरुजी भतानवाडीत शिक्षक होते. बऱ्याच वेळा त्यांचा मुक्काम शाळेत असायचा. त्यावेळी व्यंकटची आई त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची. त्याचा परिणाम असा झाला की गुरुजींनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यंकटला सेलूकर वाड्यात राहायला बोलावले. भल्यामोठ्या सेलूकर वाड्यात व्यंकट चांगलाच रमला. उमेश सेलूकर व त्याची सर्व भावंडे व्यंकटची जिवाभावाची मित्र झाली. भरपूर शिकले पाहिजे याचा संस्कार त्याच्यावर याच काळात झाला. अंबाजोगाईतील मामा क्षीरसागर यांचा सहवास त्यांना याच काळात लाभला.त्यांचे मामाच्या घरी आणि खोलेश्वर विद्यालयात येणे जाणे वाढले. मामा खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. चुणचुणीत तरुण व्यंकट मामाच्या मनात चांगलाच भरला. याच काळात व्यंकटचे पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात सुरु झाले.

 

रात्री कॉलेज असल्याने दिवसा आपण काही तरी कमावले पाहिजे यासाठी श्री.लाला यांच्याकडे ते सुपरवायझर म्हणून काम करू लागले. पुढे उस्मान आणि पटेल यांच्याकडे ते कामाला लागले. हुतात्मा स्मारक बांधण्याचे काम तीन जिल्ह्यात चालू झाले होते.व्यंकटची फिरती वाढली आणि गावाकडे त्यांचे येणे कमी होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की घरातील वडीलधार्यांनी व्यंकटचे लग्न ठरवले.ते सगळे केवळ दोन दिवसातच घडले. ३१ मे १९८२ ला व्यंकटचे लग्न झाले. काही दिवसाच्यासाठी तो अंबाजोगाईला आला.

 

इकडे अंबाजोगाईत मात्र वेगळेच काही घडत होते. श्री मामा क्षीरसागर यांच्याकडे ज्ञान प्रबोधिनीचे वामनराव अभ्यंकर आलेले होते. त्यांचे आणि मामाचे खूप स्नेहाचे आणि निरपेक्ष नाते होते. बोलता बोलता एक तरुण कार्यकर्ता त्यांना ज्ञान प्रबोधिनीच्या कामासाठी हवा आहे असे त्यांनी मामांना सांगितले. मामांच्या मनात लगेच व्यंकटचे नाव आले. प्रबोधिनीच्या कामाला आणि वामनरावांच्या साथीला व्यंकट अतिशय साजेसा आणि योग्य ताकदीचा युवक होता.मामानी काही दिवसात व्यंकटला आपल्याकडे बोलावले. त्यांनी पुण्यातील प्रबोधिनीच्या कामाच्या बद्दल त्यांना सांगितले. घडलेले लग्न आणि सध्या करत असलेले काम सांगून व्यंकटने जाण्याची असमर्थता व्यक्त केली. त्यावर मामानी चक्क हुकूमच दिला,“ मी सांगतोय न ......तुला जावेच लागेल.”

 

मामाची प्रेमाची आज्ञा व्यंकट मोडू शकला नाही. आता त्यांचा व्यंकट ते व्यंकटराव प्रवास सुरु झाला होता.थेट पुण्याची बस पकडून व्यंकटराव पुण्यात आले व तेथून सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनीत.मामानी दिलेले पत्र त्यांनी वामनरावांन दाखवले.परांडे वाड्यात व्यंकटरावाना भाऊनी आवरून यायला सांगितले. ते एका शिबिरात व्यस्त होते. पुढच्या भेटीच्या वेळी वामनराव व्यंकटरावला म्हणाले, “ मी सांगतो ते नीट लक्ष देवून एका. मी फक्त एकच वेळ तुम्हाला ते सगळे सांगणार आहे. परत तुम्ही विचारायचे नाही आणि मी सांगणार नाही. मी सांगितलेली मोहिम तुम्ही यशस्वी केली तरच मला परत भेटायला या नसता मला नाही भेटला तरी चालेले. आपल्याला आपला मार्ग आहे.”

 

वामनरावांनी सलग न थांबतात निगडीला जाण्याचा मार्ग व्यंकटरावनां सांगितला व सोबत एक पत्र दिले. निगडीत पटवर्धनकाका आणि पांडेकाकांना भेटून ज्ञान प्रबोधिनीसाठी प्राधिकरणात मिळालेली जागा पाहून येण्याची मोहिम ती होती.जर तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घरात चहा पिवून आलात तर मोहिम यशस्वी झाली असे समजा नसतात अपयशी !!” वामनरावांचे शेवटचे वाक्य !! व्यंकटराव पुण्यात पहिल्यांदाच येत होते. त्यांनी याआधी कुठल्याही महानगरात प्रवास केलेला नव्हता. सगळेच काही नवे होते. त्यात ओळखीचे असे कुणीच नाही. वामनरावांचे बोलणे व्यंकटरावने आपल्या मेंदूत पक्के केले आणि ते थेट निगडीला निघाले. अचूक मार्गक्रमण करत ते योग्य ठिकाणी पोहोंचले.पटवर्धन काका व पांडेकाकांना त्यांनी वामनरावांचे पत्र दाखवले. नवनगर विद्यालयाची जागा पाहून आले आणि खास म्हणजे काकांच्या घरी चहा पिवून आले. सर्व काही व्यवस्थित झाले होते. व्यंकटरावांना शिक्षक म्हणून घेणे अशी सूचना वामनरावांनी तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था पण करण्यास सांगितले. व्यंकटरावांची निगडीतील घोडदौड सुरु झाली.

 

निगडीत व्यंकटराव शिक्षक म्हणून रुजू झाले. बराच मोठा संघर्ष होता. प्रबोधिनीला न देता ती जागा अनेकांना हवी होती.त्यांना त्यांची शाळा सुरु करायची होती. त्यामुळे अनेक अवघड क्षण आले. गुंडगिरी झाली,हाणामारीचे क्षण आले. व्यंकटराव नेटाने सगळ्यांच्या बरोबर लढत होते. असे संघर्ष उद्दात्त ध्येयासाठी केल्याने व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येते असे प्रबोधिनी मानते. संघर्षाच्या बरोबरच शिक्षणात पण प्रगती करण्याचा मानस व्यंकटरावांचा होता. परंतु तिकडे गावाकडे काही वेगळेच घडत होते. केवळ लग्न झाल्यावर दहा दिवस झाल्यावरच व्यंकटरावांनी निगडीत प्रबोधिनीचे काम सुरु केल्याने अनेक वावड्या उठायला लागल्या. त्यांच्या पत्नीच्या वडिलांना काळजी वाटायला लागली. मुलगा रुसून पळून गेला आहे का असे अनेकांना वाटत होते. पत्नीला सोबत आणावे तर राहण्यास जागा मिळत नव्हती. सगळीकडूनच अवघड प्रसंग होता. हे जवळपास दोन वर्षे झाले. शेवटी एक दुसऱ्या मजल्यावरील खोली वामनरावांच्या प्रयत्नांनी मिळाली व शेवटी आशाताई निगडीत आल्या.

 

व्यंकटरावांनी शिकवण्या बरोबरच शिकण्याचा धडाका लावला.त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. प्रबोधिनीत कार्यकर्त्यांना शिकण्यास खूप प्रेरणा दिली जाते. एकीकडे ते हिंदी सारख्या विषय शिकत होते तर दुसरीकडे खेळातील अतिशय उत्तम दर्ज्याच्या NIS मधून क्रीडा शिक्षण घेवून आले. अशी त्यांचे अभ्यास विश्व आणि कार्यविश्व वाढत जात होते. याच काळात अजून एक संकट आले. व्यंकटरावांना आपली असलेली खोली सोडावी लागली. आता काय करणार हा मोठा प्रश्न होता. वामनराव,व्यंकटराव आणि मनोजरावांन चक्क पत्र्याच्या खोल्या बांधून नवनगर विद्यालयाच्या जागेत राहायला आले. आजची भव्य दिव्य वास्तू पाहिल्यावर आपल्याला लक्षात येणार नाही की त्यामागे किती अथक परिश्रम आहेत.पुढे शाळा खूप मोठी झाली. शाळेला अनुदान मिळाले. आता सगळेकाही चांगले चालू होते.जवळपास दहा वर्षे व्यंकटरावांनी निगडीच्या शाळेत काम केले.

 

याच काळात मावळातील साळुंब्रे येथे ज्ञान प्रबोधिनीने शाळा काढावी असा प्रस्ताव पुढे आला. निगडी पासून काही किलोमीटर असणारे साळुंब्रे. आता या नवीन मोहिमेची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न होता. भाऊ (वामनरावांनी ) आपल्या सर्व शिक्षकांच्या समोर आव्हान ठेवले. ग्रामप्रबोधिनीची पहिले कार्यवाह कोण हा मोठा प्रश्न होता. शाळेला जागा नाही. अनुदान नाही विशेष म्हणजे मान्यता पण नव्हती. कोणीच जाण्यास तसे तयार नव्हते. भाऊनी व्यंकटरावांना बोलाऊन घेतले. भाऊ म्हणाले, “ तुम्हाला आयुष्यभर नौकरी करायची आहे की काम करायचे आहे ?”

व्यंकटरावांनी उत्तर दिले, “ काम करायचे आहे !!”

नौकरी तर तुम्हाला आहेच मग आता काम करायला लागा!  यापुढे ग्रामप्रबोधिनीचे कार्यवाह तुम्ही.” भाऊंचा आदेश. ग्राम प्रबोधिनीचे पहिले कार्यवाह व्यंकटराव झाले. मुख्याद्यापक म्हणून  मग दोन वर्षांनी त्यांनी जबाबदारी घेतली. एका वाड्यात केवळ तीन मुलांच्या वर ही शाळा सुरु झाली. प्रचंड परिश्रम घेवून आज ग्रामप्रबोधिनी डौलात उभी आहे. साळुंब्रे आणि परिसरातील मावळ भागातील अनेक मुलांना घडवणारी ही एक विलक्षण शाळा आहे. अनेक प्रयोग येथे चालतात. आज स्वतःची वास्तू आहे,अनुदान आहे आणि खास म्हणजे भरपूर मुलं आहेत. यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. यावरच न थांबता मुलांच्यासाठी तंत्रशिक्षणाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे.

 

शाळेच्या बरोबर परिसराचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रकल्प इथे राबवले जातात. पवनामाईचा उत्सव त्यातील एक आहे. साळुंब्रे गाव आदर्श करण्यात ग्रामप्रबोधिनी आणि व्यंकटरावांचा कोठा वाटा आहे. यासोबतच शिक्षकांचे संघटन यासाठी खूप सारे प्रयत्न व्यंकटरावांनी केले. दुष्काळी मराठवाड्यातील भतानवाडी गावातील एक व्यंकट कर्तृत्ववान व्यंकटराव होतो याची ही स्फूर्ती गाथा आहे. ज्ञान प्रबोधिननीच्या शालेय संस्कारात न शिकता थेट तारुण्यात संपर्कात येणाऱ्या युवकाला उमदा नेता बनवण्याची ज्ञान प्रबोधिनीची प्रक्रिया अफलातून आहे !!