रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

अंबाजोगाईच्या बहाद्दर प्राध्यापकाची कथा

अंबाजोगाईच्या बहाद्दर प्राध्यापकाची कथा ....



गेली काही वर्षे महाविद्यालयात जाण्याचा योग फारसा आलेला नाही. त्यामुळे कोविड नंतरची महाविद्यालय आणि त्यांची झालेली वाताहत आपल्याला पाहवणार नाही म्हणून फारसा प्रयत्न पण केला नाही. आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचे डॉ कल्याण सावंतसरांनी मला तीन महिने आधी बजावून सांगितले की माझ्या महाविद्यालयात तुम्हाला यावच लागणार आहे. सावंतसर तसा उमदा माणूस. ज्ञान प्रबोधिनीचे पालक त्यामुळे अजून जवळीक. उंचापुरा,तगडा आमच्या ग्राऊंडवर उठून दिसणारा हा तरुण. चुकून सुद्धा कधी ते ग्राऊंडवर यायचे विसरत नाहीत.
दिवस 24 सप्टेंबर सकाळी 9 वाजता मी आढेवेढे घेत सरांच्या बरोबर जायला तयार झालो. प्रवासात माझे पुराण संपले आणि सरांच्या बाबत जाणून घेऊ लागलो. सर धारूरचे. दहावी पर्यँतचे शिक्षण तिथे झाले आणि मग अंबाजोगाई. इथून त्यांची घोडदौड सुरू झाली ती थांबली Phd करूनच. उच्च शिक्षणातील सर्व परीक्षा पहिल्या दमात पास. अभ्यासाच्या शिवाय महाविद्यालयातील सर्वच क्षेत्रात त्यांनी उतुंग भरारी घेतली. NSS आणि NCC तर जीव की प्राण.
महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्राध्यापक होणायचे स्वप्न काही दिवसातच पूर्ण आणि तेही देवगिरी महाविद्यालयात. एक जबरदस्त कॉलेज. काही दिवस सरांनी काम केलं आणि त्यांना हाक आली एका अशा महाविद्यालयाची की जिथे वरिष्ठ महाविद्यालयात शिकण्यासाठी बाहेरच्या राज्यातून मुलं येतात. कॉलेज सगळ्यात टॉपचे. अगदी प्राध्यापकांच्या नियुक्तीची कोटी रुपयांची उलाढाल सर्वत्र चालू आहे. या महाविद्यालयात मात्र एक नया पैसा पण नियुक्तीसाठी घेतला जात नाही. सरांची मुलाखत झाली. भरपूर स्पर्धा होती. बाहेर आल्यावर मित्रांनी विचारले कशी झाली मुलाखत ? " जर महाविद्यालयाचे आधीच कुणाला घायचे ठरले नसेल तर माझी निवड पक्की !! " काय जबरदस्त आत्मविश्वास !! आणि आत्मविश्वास निवडला गेला.
मी आणि सर कॉलेजमध्ये पोहनचलो. कॉलेज एकदम मुलांनी गजबजलेलं. जिकडे पाहावे तिकडे विद्यार्थी. सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यँत विद्यार्थी महाविद्यालयात त्यानंतर शेवटी मुलांना हकलावे लागते. प्रत्येक महाविद्यालयाचे चैतन्य म्हणजे विद्यार्थी. आज तेच लोप पावत आहे. मुलांनी बहरलेलं महाविद्यालय मी कित्येक वर्षात पहिल्यांदाच पहात होतो. मला एकदम उभारी आली. सर NSS विभागाचे प्रमुख. त्यांनी खास करून हा विभाग मागून घेतलेला. अतिशय चोख आर्थिक व्यवहार आणि वर्षाच्या शेवटी काही तूट आली तर प्राध्यापक ती भरून काढतात हे एक नवलच. NSS विभाग पण विद्यार्थ्यांनी भरून गेला होता. आम्ही येण्याच्या आधीच विद्यार्थ्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. आज NSSचा स्थापना दिवस आणि माझे ग्रामीण भागातील अनुभव कथन असा योग् होता. मी महाविद्यालयात गेल्यावर पहिल्यांदा स्वच्छता गृहात जातो. विशेष करून विद्यार्थी जे वापरात ते !! त्यावरून बरेच काही कळते. मी इथे मात्र अचंबित झालो. अगदी इस्रायल मधील विश्व महाविद्यालयातील स्वच्छता गृह पण या पेक्षा स्वच्छ नव्हती. बदाम,नाव,चित्र आणि शिव्या तर दूरच.

कार्यक्रम सुरू झाला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती चिक्कार अगदी पाचशेच्या वर. प्राचार्य चक्क आपल्या तासावर होते म्हणून थोडे उशिरा आले. सोबत उपप्राचार्य होते. कार्यक्रम जोरदार झाला. मला तर बोलताना प्रचंड ऊर्जा मिळाली. कार्यक्रम संपेपर्यंत कोणताही विद्यार्थी जागचा उठला नाही. NSS च्या कॅम्प मध्ये पूर्ण 9 दिवस 50च्या वर विद्यार्थिनी निवासी असतात. त्याच सोबत विभाग प्रमुख. सावंतसरांना तर राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून पुरस्कार मिळलेला आहे. गेले कित्येक वर्षे ते ही आघाडी तर सांभाळत आहेतच पण सकाळी 8 ते रात्री 8 असे महाविद्यालयात ते नियमित असतात. रजा नावाची भानगड नाही. याशिवाय Phd च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. बाकी पडेल ते काम !! कशाला नाहीच नाही. कार्यक्रम संपल्यावर आम्ही प्राचार्यांच्या सोबत गेलो. त्यांनी प्रेमाचा आग्रह केला आपल्या कँटीन मध्ये जेवून जा !! कुठल्या हॉटेल मध्ये नाही ह !! आणि जेवण अल्पोपहार नाही. तसा दिवसभर मी महाविद्यालयातच थांबणार होतो. मग उपप्राचार्यांना भेटायला गेलो. मस्त नितळ माणूस. एका प्रथम वर्षाच्या मुलाला त्यांनी चक्क अर्धातास समुपदेशन केले. प्रचंड काम असताना पण मुलांना इतका वेळ देणारे प्राचार्य आणि उपप्राचार्य मी पहिल्यांदा पहात होतो. कँटीन मधील जेवण अप्रतिम होते. मी तसा भोजन आणि चव बहाद्दर !! कमालीची चव अन्नाला. महाविद्यालयातील प्राध्यापक कँटीनची देखरेख करतात. कंत्राटदार नाही !!

विशेष म्हणजे हे महाविद्यालय कोण्या एका विचाराचे नाही. सगळ्यांना प्रवेश आहे. नाही तर मला अंबाजोगाईत आज काल ही वैचारिक अस्पृश्यता खूप जाणवते. हे सर्व अनुभवताना मला एक मात्र कमालीचे जाणवत होते की डॉ कल्याण सावंतसरांच्या बाबतीत. विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्य यांना कमालीचा आदर आहे. आमच्या अंबाजोगाईच्या बहाद्दराने महाविद्यालय आपल्या कामाने जिंकले !! कमालीची गोष्ट अशी की सरांनी सांगितले तर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उठाबशा काढतो हे मला विद्यार्थ्यांनी सांगितले !!

आता या महाविद्यालयाच्या संस्थाचालकांच्या बाबत थोडं समजून घेतले पाहिजे. संस्थेचे सचिव 91 वर्षांचे तरुण. रोज महाविद्यालयात येतात. अगदी आठ तास. रिसर्च कमिटीची बैठक चालू होती. सचिव तिथे आले. त्यांना बैठकीची कल्पना नव्हती. सगळे प्राध्यापक उठून उभारले. सचिवसर एकदम म्हणाले मला माफ करा मी तुमच्या कामात व्यत्यय आणला. अगदी प्रामाणिक माफी मागून ते मागे वळले. आजचे संस्थाचालक हे संस्था मालक आणि राजे. भ्रष्ट्राचारी नसतील तर हुकूनशहा !! इथले सगळेच संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे सेवक आहेत.मन भरून पावलं. शिक्षणाच्या पंढरीतून आमच्या कल्याण रुपी विठुरायाच्या सोबत परत अंबाजोगाईला निघालो.

महाविद्यालयाचे नाव मुद्दाम लिहिले नाही. आपण मला जरूर सांगा हे महाविद्यालय कोणते ? डॉ कल्याण सावंतसरांचा मोबाईल नंबर 94035 91841 जरूर फोन करा तुम्हाला नक्कीच एक छान मित्र मिळेल !!

डॉ कल्याण सावंत:- 94035 91841

अंबाजोगाईच्या संगणक विश्वातील एक विश्वास ...मयूर

 अंबाजोगाईच्या संगणक विश्वातील एक विश्वास ...मयूर

आपल्या कर्तृत्वाने प्रचंड कष्टाने बनवलेलं आपलं व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या जोरावर आपली स्वतःची समाज मनावर छाप पाडणाऱ्या व्यक्ती मला खूप आवडतात. वडिलोपार्जित वारसा असणाऱ्या लोकांच्या मध्ये असणारा दर्प या पेक्षा शून्यातून विश्व निर्माण करणारे हे लोक एका ध्यासाने झपाटलेले असतात. वस्तीवरील मुलांना अशा व्यक्तींना भेटवायला मला खूप आवडते. दिवाळीत आपण सगळेच त्यांच्यासाठी खूप काही करतो पण या 67 मुलांनी भेटायला आलेल्या अशा खास व्यक्तींचा ध्यास आत्मसाथ केला तर सर्वात मोठे यश असेल. बाकी शिकणे,मजा करणे आणि बालपण जोपासणे हे तर चालूच असते.

या दिवाळीत कुणाला घेऊन जायचे मुलांना भेटायला हे खूप दिवसांच्या पासून ठरवत होतो. पण काही केल्या मी यशस्वी होत नव्हतो. याच काळात मी एक अत्याधुनिक संगणक घेण्याच्या विचारात होतो. तो माझ्या 48 अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्रांची मला भेट होता. त्यामुळे तो खासचं होता माझ्यासाठी. मला संगणक अंबाजोगाईतील व्यक्तीकडून हवा होता. हे माझे पक्के होते. माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. मी सर्व दुकाने पालथी घातली खूप वेळ दिला. पण मला नीट समजून सांगणारे आणि योग्य त्याही पेक्षा तातडीने प्रतिसाद देणारे कुणीच भेटत नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून मी मयूर कर्वाला फोन लावला. त्यानंतर पुढील 10 दिवस आम्ही मला पाहिजे तसा संगणक मिळवण्याच्या मागे लागलो. मी दररोज नवीन काही समजून घेत होतो आणि त्यातून माझ्या अपेक्षा अजून वाढत होत्या. पहिल्यांदा प्रत्यक्ष नंतर फोनवर आणि त्यानंतर whatsapp वर माझं आणि मयूरचे संवाद सुरू झाले. यासर्व प्रक्रियेत मयूर न थकला न त्याने टोलवा टोलव केली आणि शेवटी त्याच्या आणि माझ्या मंथनातून एक संगणक आम्ही निश्चित केला. एकूण सर्व प्रक्रियेत मजा आली.

मयूर ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी. घरची परिस्थिती फारच बेताची अगदीच अवघड. वडिलांचा छोटा व्यवसाय होता आणि खर्च कमाई पेक्षा जास्त. छोट्या मयूर मध्ये लहानपणा पासून व्यवसाय करण्याचा ध्यास होता. वेळप्रसंगी तो शाळा बुडवायचा आणि वडिलांच्या दुकानावर बसायचा. शालेय शिक्षण पूर्ण झालं बारावीला बरे मार्क्स पडले आणि मयूरचा नंबर अभियांत्रिकी महाविद्यालयात लागला. परिस्थिती खूप बेताचीच होती. मयूर संभाजीनगरला गेला व शिकणे सुरू झाले. पण महाविद्यालयाची फिस काही भरता आली नाही आणि मयूरला परत यावे लागले. कठीण प्रसंग होता. पण तो तसा खटपट्या होत्या तसा चिकित्सक पण. कोणतेही यंत्र उघणे आणि ते समजून घेऊन परत बसवणे हा त्याचा छंद. यातून तो मोलाची गोष्ट शिकला ती म्हणजे ज्याला यंत्र आत्मविश्वासाने उघडता येते व परत जोडता येते त्याला ते यंत्र दुरुस्त करता येते. यातून तो यंत्र दुरुस्तीत पारंगत झाला. काही गोष्टी त्याला जमू लागल्या पण संगणकासारखे आधुनिक यंत्र समजून घेणे अवघड आणि हे कळल्यावर त्याने स्वतःच संगणक दुरुस्ती सुरू केली. सुरुवातीला तो संगणक लातूरला घेऊन जायचा. तिथे दुरुस्त करायचा आणि अंबाजोगाई येऊन तो परत करायचा. यात तो कमालीचे शिकला. महाविद्यालयात तो वाणिज्य शाखेत होता मात्र स्वतःच्या जगण्यात तो संगणक तज्ञ बनत होता.

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्या अनुभवातून एक व्यवसायाचे एक तत्वज्ञान बनते. तसेच मयूरचे तीन तत्व पक्की झाली. १) खोटे कधी बोलायचे नाही.२) संगणकातील जे खराब झाले आहे त्याचीच फक्त दुरुस्ती करायची बनवाबनवी करायची नाही. ३) ग्राहकांशी प्रामाणिक राहायचं. खराब झालेला पार्ट परत द्यायचा.आपल्या तत्वांशी मयूर खूप प्रामाणिक आहे कारण ती तत्वे त्यांनी स्वतः स्वतःच्यासाठी ठरवली आहेत.नकळत ती त्याची जीवन मूल्येच झाली आहे.

कुठलेही फॉर्मल शिक्षण संगणकाचे नसताना अंबाजोगाई तच नव्हे तर अगदीच महानगरात पण त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. तत्पर सेवा, चोख व्यवहार आणि संगणक क्षेत्राचा अगदीच परीपूर्ण अभ्यास याच्या जोरावर मयूर आज अंबाजोगाईच्या संगणक विश्वातील एक विश्वास झाला आहे. आज ही सर्व रोजची कामे झाल्यावर आपले ज्ञान ताजे ठेवण्यासाठी तो काही तास अभ्यास करतो. अंबाजोगाईतील सर्व शैक्षणिक संस्था,सरकारी, इतर कार्यालयं,व्यापारी आणि डॉक्टर यांच्यासाठी कृष्णा कॉम्पुटर अँड सर्व्हिसेस हे खात्रीचे ठिकाण आहे. मध्यंतरी मयूरच्या वडिलांचा मृत्य झाला. मोठा आधार गेला. पण आता लाला शर्मा त्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतोय. असा ध्यासाने व्यवसाय करणाऱ्या मयूर वस्तीवरील मुलांशी बोलताना मात्र खूप भावून झाला. त्याचा आदर्श फक्त मुलांच्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी पण आहे. मयूरशी जरूर बोला. त्याला फोन करा. त्याला नक्कीच प्रेरणा मिळेल.
मयूर कर्वा :- 758 805 7085

अंबाजोगाईचा King ऑफ Fitness ...कृष्णा !!

 अंबाजोगाईचा King ऑफ Fitness ...कृष्णा !!

कृष्णा अरुण पुजारी नाव वाचले तर नावात एक जोर आहे. अरुण पुजारी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष. त्यांचा हा मुलगा. अरुण पुजारी यांचे नाव काढल्यास या कृष्णात खरंच काही दम आहे का हे समजून घेण्यात मला स्वारस्य होते. तसा तो ज्ञान प्रबोधिनीचा पालक आणि आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपचा सदस्य. ग्राउंडवर सर्वात शेवटी येणारा सदस्य. सर्वांना हसत गुड मॉर्निंग करत सोबतच्या लोकांशी हसत,गप्पा मारत,किस्से आणि गोष्टी सांगत अगदीच रमतगमत ट्रॅक वर चालणारा हा आमचा छोटा दोस्त. पाहता क्षणी पहिलवान वाटावा अशी त्याची देहयष्टी. हळूहळू आमची दोस्ती होत गेली. त्याच्या गोष्टी सांगण्याचा अंदाज फारच भारी एकदम चांगल्या गुरुजींना लाजवणारा. तो अनेक गोष्टी सांगायचा. एक दिवस मी त्याला त्याचीच गोष्ट विचारली आणि महाराज बोलते झाले.
कृष्णाला लहानपणा पासून व्यायामाची आवड. त्याच्या घरा जवळील बाईच्या वाड्यात तो व्यायाम करायचा. झाडांना दोऱ्या बांधून एक सिंगल बार केला होता. पोत्यात माती भरून त्यावर मुष्टि प्रहार तो करायचा असे नानाविध प्रकार त्याचे चालायचे. सोबत काही मित्र. तो व्यायामाने झपाटून गेला होता.

वाढदिवसाच्या दिवशी अरुणमामांनी त्याला विचारले तुला काय हवे आहे. महाराजांचे उत्तर तयारच होते. दहा हजार रुपये आणि ते कशाला तर जिम सुरू करायला. शेवटी देवीच्या मंदिराच्या जवळील एक हॉल स्वच्छ करून त्यात कृष्णांची पहिली जिम सुरू झाली. तो व्यायाम करतो हे पाहून अनेक जण येऊ लागले. पुढे इतके लोक आले की त्याचे व्यवस्थापन करणे कृष्णाला जमेना. त्यात साहित्य कमी असल्याने पोरांची भांडणे. अवघड होते सारं.

एकीकडे व्यायाम सुरू होता तर दुसरीकडे महाविद्यालयात शिक्षण. फार्मसी मधील पदविका अभ्यासक्रम तो करत होता.याच काळात अरुणमामाचा दुर्दैवी मृत्य झाला. यापुढे काय करायचे हा कृष्णांच्या समोरील मोठा प्रश्न होता. शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला कोणी कामावरच ठेवेना. आता काय करायचे. कृष्णा जेवढा नटखट तेवढाच धडपड्या. तो स्वस्थ बसणाऱ्यातील नव्हता. त्याने त्याचा पहिला व्यवसाय सुरू केला योगेश्वरी शाळेच्या जवळ चॉकलेट विकायचा. माजी नगराध्यक्षाचा मुलगा चॉकलेट विकतो हे पाहणे आपल्याला अवघड पण कृष्णा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होता. हैद्राबादहुन चॉकलेट आणायचे आणि ते विकायचे. व्यवसाय नफ्यात होता. मग किचेन विकणे सुरू झाले. हसत प्रेमाने आणि आपुलकीने बोलणाऱ्या कृष्णांचा माल चांगलाच खपू लागला. यातील नफयातून त्याने STD PCO सुरू केले. पुढे जूसबार आणि रसवंती. यासर्वातून तो व्यवसायाचे खाच खळगे शिकत होता. हिशोब करायला शिकला. नफ्या नुकसानीचे गणिते शिकला. सगळ्यात महत्वाचे न लाजता प्रचंड मेहनत करायला शिकला. त्याच्या अंतर्मनातून जिम हा विषय मात्र सुटला नव्हता. आलेल्या पुंजीतून त्याने लातूरची एक जिम विकत घेतली आणि ते साहित्य आणून देवीच्या मंदिराच्या पाठीमागे हिंदकेसरी जिम सुरू केली. पाहता पाहता सभासद वाढत गेले. प्रचंड प्रतिसाद होता. आता तो कृष्णाचा गुरुजी झाला. व्यायाम शाळेतील सर्व जण कृष्णाला भेटल्यावर प्रणाम गुरुजी म्हणायला लागले. आजही ग्राऊंडवर प्रणाम गुरुजी म्हणणारे आम्हाला भेटतात. आवडीचा व्यवसाय सुरू केला पण जे शिकलो त्याचे काय ? कोणी दुकानात नौकरी मात्र हया पहिलवानाला देत नव्हते.

डॉ नयना शिरसट अंबाजोगाईतील प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ. अंबाजोगाईच्या पंचक्रोशीत त्यांची प्रॅक्टिस खूप जोरात चालू होती. त्या एकेदिवशी देवीच्या दर्शनाला आल्या. नवरात्र चालू होते. प्रचंड गर्दी. कृष्णाने त्यांना पाहिले आणि ओळखले. त्यांच्या जवळ जाऊन त्याने विचारले आपल्याला दर्शन करायचे आहे का ? अर्थातच त्यासाठी त्या आल्या होत्या. गुरुजींनी त्यांना व्यवस्थित दर्शन घडवले. मॅडमनी त्याला नाव विचारले. काय शिकला हे विचारले. आमच्याकडचे दुकान चालवतोस का हे पण विचारले. कृष्णा खुश आनंद गगनात मावेना. योगेश्वरी देवीची कृपा झाली होती. दुसऱ्या दिवशी कृष्णाला भेटायला बोलावले आणि कृष्णाचे पाहिले मेडिकलचे दुकान सुरू झाले. सगळं काही जीव ओतून करायचे हे कृष्णाकडून शिकावे. सकाळी आठ ते रात्री कितीही वाजेपर्यंत कृष्णा दुकानातच. त्याने पैशांच्या सोबत नाव पण कमावले. त्याचे जामीनदार होते नंदकिशोर मुंदडा. दहा वर्षाच्या नंतर तो त्यांना भेटला व धन्यवाद म्हणून म्हणाला बघा मी असे एकही कृत्य नाही केले की ज्याने माझी तक्रार तुमच्याकडे येईल. त्यानंतर अजून एक दुकान व ते डॉ. विनोद जोशींच्या बरोबर. खूप विश्वासाने डॉ जोशींनी कृष्णांला दुकान चालवायला दिले. कृष्णांची सचोटी आणि धडपड त्यांना माहित होती. नंतर चक्क होलसेलचे दुकान पण सुरू झाले. कृष्णा चॉकलेटवाला ते गुरुजी ते कृष्णासेठ हा प्रवास तसा अवघडच होता.

कृष्णासेठ झाला तरी त्याने त्याच्यातील गुरुजी मरू दिला नव्हता. हिंद केसरी बंद पडली पण त्याच्या मनात ती अजून जिवंत होती. अंबाजोगाईतील मोहन टॉकीजचे नवीन बांधकाम सुरू झाले होते. तिसरा मजला सुरू झाला. अगदीच नगरपालिकेच्या समोर मध्यवर्ती जागा. कृष्णा दररोज तिथे जायचा. दररोज येणारा कृष्णाला पाहून मालकांनी विचारले तू दररोज इथे का येतोस. मला इथे जिम सुरू करायची आहे. मालक अवाक. अजून बांधकाम बाकी आहे आणि आमच्या मनात आम्हीच जिम सुरू करण्याचे आहे. लगेच कृष्णाने प्रस्ताव दिला तुमच्या सोबत भागीदारीत सुरू करू तुम्ही नफ्यात 50 % हिस्सेदार !! प्रस्ताव भारी होता. हजरजबाबी कृष्णाने पहिली लढाई जिंकली. यासोबतच त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी साथ मिळाली ते गिरीश हजारीची. दोघे खूप चांगले मित्र बनले. डॉ जोशी आणि गिरीश हजारी सारखे साथीदार कृष्णांला मिळाले ही त्याची खरी कमाई होती. आपली सर्व कमाई त्याने जिमच्या साहित्यासाठी वापरली. देशभर फिरून त्याने एका पेक्षा एक चांगल्या आणि आधुनिक जिम पहिल्या. सर्वांतील चांगल्या गोष्टी घेतल्या आणि मोहन कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर अंबाजोगाईतील पहिली अत्याधुनिक जिम सुरू झाली. Krishna नावाने ती सुरू करावी असा मानस होता पण त्याने स्वतःला आवर घातला. King Fitness नावाने ती सुरू झाली. काही दिवसात मेंबर फुल झाले. वर्षभर सारेच मस्त होते आणि नंतर कोविडची महामारी सुरू झाली. पण पहिल्या वर्षातील कमाईने हिशोब चुकता झाला होता. दररोजचा चॉकलेटचा हिशोब ते King Fitnessचा हिशोब यात मात्र कृष्णा King राहिला. त्याने काही वर्षातच आपली दुसरी शाखा मोरेवाडीत सुरू केली.

त्यांपुढे अमृतुल्यचहा आणि उडपी आणि परळीला kekiz असा व्याप पण कृष्णांचा वाढला. आज सगळे वळून बघताना सहज वाटून गेलं. जिथे कुठे अरुणमामा असतील तेथून अंबाजोगाईच्या या King ऑफ Fitness ची घोडदौड पाहताना त्यांचा उर अभिमानाने भरून आलेला असेल. अजूनही कृष्णाची सकाळ लाल मातीच्या योगेश्वरी मैदानातून होते आणि नंतर तो दीडतास आपली जिम मध्ये घाम गाळतो. कृष्णा आज सुद्धा यारोंका यार है !! जरूर त्याच्याशी बोला !!
कृष्णा पुजारी :- 9405833333

आकाशाला गवसणी घालण्याची आस असणारे... पाटील !!

 आकाशाला गवसणी घालण्याची आस असणारे... पाटील !!

लोमटे आणि अंबाजोगाईतील नाव ऐकताच लोकांचा काळजीपूर्वक व्यवहार व्हायला सुरुवात होते. माझं लहानपण सगळं लोमटेंच्या सोबतच गेलं त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. अंबाजोगाईत दोन ठिकाणी लोमटे कुटुंब राहतात. एक गौड गल्ली आणि दुसरे खडकपुरा. राजकारण आणि भांडण नसानसात भिनलेलं असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. आमच्या गुडमॉर्निंग ग्रुपचा कॅप्टन पण महेश लोमटे. तो तसा खूप मितभाषी सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आम्हा 50 च्या वर लोकांना फोन येणार तो महेशकाकाचा. मैदानावर सर्वांनी यावं यासाठी त्याचे प्रयत्न खूप चालू असतात. तर सगळे मैदान ओस पडायले की एक धूमकेतू प्रगट होतो. त्याच्या आवाजाने मैदान भरून जाते. आले पाटील आले म्हणत सर्वजण एकमेकांना सांगतात. मग व्यायाम करत गप्पांची मैफिल रंगते पाटील शंभर जोर काढतात. सगळा व्यायाम संपला की पाटलांचा आग्रह असतो चहा प्यायला चला. अगदी माझ्या सगट हंसराज देशमुख सारखे शिस्तबद्ध आयुष्य जगणारे लोक पाटलांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडतात. असे काही दिवस चालते आणि पाटील अचानक गायब होतात. आम्ही नेहमीसारखे आमचे रस्ते आणि वेळा पाळतो व घरी जातो. परत काही दिवसांनी पाटील हजर परत मैफिल परत चहा परत गप्पा....

मला या पाटलांच्या बाबत भारीच कुतूहल निर्माण झालं. माझी व गणेश लोमटे ( पाटील ) यांची ओळख खूप जुनी. तो MPSC चा अभ्यास करत होता त्यावेळी पासून. प्रबोधिनीशी त्याचे विशेष नाते. मध्यंतरी गणेश सिमेंट चे दुकान चालवत होता आणि प्रबोधिनीच्या विवेकवाडीचे बांधकाम सुरू झालेले. थोडं फार बोलणं व्हायचे. पण अचानक दुकान बंद आणि साहेब गायब ते थेट मला भेटले मैदानावर !! आमची मॉर्निंग गुड करणारे पाटील काय करतात हे समजून घ्यावे म्हणून त्याला मी माझ्यासोबत राऊंड मारायला घेतले आणि त्याने स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा मारत मारत गेल्या अनेक वर्षांच्या सूर्य प्रदक्षिणेचा प्रवास एकदम खुलेआम सांगितला.

गणेशचे वडील डॉ सुभाष लोमटे रेकॉर्ड टाइम मध्ये विज्ञान विषयात Phd करणारे व माजलगावच्या मोठ्या महाविद्यालयात प्राचार्य तसे ते मराठवाड्याला परिचित व्यक्तिमत्त्व. गणेश लहानपणी म्हणजे तिसरी पर्यँत अंबाजोगाई आपल्या आजी आजोबांच्या सोबतच राहत होता. तिसरीत असताना त्याने एक कांड ( पाटलांच्या भाषेत ) केलं. महाराज व त्यांचे मित्र खेळत खेळत अंबाजोगाईच्या बाहेर असणाऱ्या नागझरीला गेले. इकडे घरी शोधाशोध सुरू. सगळेच परेशान. अनोळखी रस्त्याने बिनधास्त जाणे हे बहुतेक गणेशच्या रक्तातच आहे. पण यामुळे त्यांची रवानगी झाली माजलगावला थेट वडिलांच्या सोबत. शाळा सिद्धेश्वर विद्यालय शिस्त आणि संस्कार याचा चांगलाच ठेवा. चक्क 12 वी पर्यँत गणेश माजलगावला होता. याच काळात त्याचा संपर्क RSS शी आला. लोमटे आणि RSS गणित चुकतंय असे मला वाटले. पण हे साहेब नुसते शाखेवरच गेले नाहीत तर शाखेचे कार्यवाह पण झाले अनेक शिबिरं पण केली. संघ प्रचारक सहस्त्रबुद्धे यांच्या सोबत ते सतत असायचे. बारावी झाली आणि अचानक वेगळीच वाट थेट नाट्यशास्त्र विभागात प्रवेश. बहुदा लोमटेंच्या मध्ये नाट्यशास्त्र शिकणारे ते पहिलेच असावेत. यासोबतच होते राजकारण आता मात्र NSUI एकदम भिन्न मार्ग. महाविद्यालयाचा गणेश विद्यापीठ प्रतिनिधी झाला.राजकारणाचे बाळकडू त्याला होतेच पण नाट्यशास्त्र आणि वक्तृत्व यात त्याची हुकूमत मिळवण्यास सुरुवात झाली. नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख केशवराव देशपांडे यांचा तो पट्ट शिष्य झाला. असा एकही दिवस नसेल की गणेश अंबाजोगाईत आहे आणि तो केशवसरांना भेटला नाही गप्पा गोष्टी झाल्या नाहीत. याच काळात भागवत मसने महाविद्यालयात प्राध्यापक होते. गणेश आणि ते चहा पिण्यासाठी कँटीनला गेले विषय होता राजकारण. पहाडी आवाजात आणि आवेशात गणेश आपली मुद्दे प्रभावीपणे मांडत होता. सरांनी त्यातील स्पार्क ओळखला आणि त्याला अगदीच बळजबरीने वक्तृत्वकला पारंगत करण्यात तयार केले. सहज काही करतील ते लोमटे कसे !! आता सुरू झाला स्पर्धा, युथ फेस्टिवल, नाट्यस्पर्धा,एकांकिका स्पर्धा गाजवण्याची मोहिम. त्याच्या आयुष्याचा हा एक वेगळाच श्रीगणेशा होता.

पाटलांनी कॉलेज खूप गाजवले आता त्यांना अंबाजोगाईचे क्षितिज अपुरे वाटू लागले. ते निघाले पुण्याला. त्यांचे स्वप्न होते प्रशासकीय अधिकारी बनण्याचे. अभ्यासाला सुरुवात झाली. चौफर वाचन सुरू झाले. वैचारिक जडणघडण होऊ लागली. नकळत जीवनभर अविवाहित राहण्याचा विचार मनात घोळू लागला. हे सगळेच अनाकलनीय होते.तगडा अभ्यास झाला. वैचारिक बैठक पक्की झाली. प्रचंड वाचण आणि अभ्यासाचा व्यासंग वाढला. फक्त एकच गोष्ट घडली ती म्हणजे MPSC च्या परीक्षेत यश काही मिळाले नाही. घरून काही तरी पोटापाण्याचे करावे म्हणून सुचवले जाऊ लागले. मुक्त विहार करत क्षितिजे पादाक्रांत करणाऱ्या गणेशला अंबाजोगाईला परतावे लागेल आणि चक्क एक सिमेंटचे दुकान सुरू करावे लागले. पर्याय नव्हता पण मनात प्रचंड अस्वस्थता होती. सतत नाविन्याची आस असणाऱ्या व्यक्तीला पिंजऱ्यात कोंडावे तसेच काही झाले होते. परिणाम व्हायचा तो झाला. दुकानावर दहा लाखांच्या वर कर्ज झाले. मला जे काही करायचे ते हे नाही हे मनातून पक्के होऊ लागले.

आणि एक दिवस आला सर्व काही सोडून गणेश गेला मुंबईच्या काँग्रेस भवनात तिथे काम करायला. त्याचे खरे तर आदर्श होते प्रमोद महाजन पण त्याने काँग्रेसचा मार्ग निवडला. सोबत काहीच नव्हते फक्त जबर इच्छा शक्ती होती. काही तरी करण्याची उर्मी होती. वेळ पडली तर फुटपाथवर झोपण्याची तयारी होती. असा आशावाद फार कमी जणांना असतो त्यातील गणेश एक. 2009च्या काँग्रेसचा प्रचार करण्याचा त्यांचा मानस होता.काँग्रेस भवनात भेट झाली बाळासाहेब विखे पाटील,माणिकराव ठाकरे,मोहन जोशी व सुशील शुक्ल यांची. फार मजेदार प्रसंग घडला ते सगळेच गुरुदास कामतचा प्रचार करण्यासाठी जाणार होते सोबत गणेशला घेऊन गेले. प्रचार सभेच्या मध्यंतरात त्यांनी चक्क गणेशला भाषण करायला सांगितले. हे सगळेच खूप अनपेक्षित घडत होते. संकटाला संधीत रूपांतर करण्याची वेळ होती आणि पाटलांनी ती केली. जोरदार भाषण झाले. पाटलांच्या मधील स्पार्क दिग्गजांनी ओळखला आता सुरू झाली घोडदौड. विलासराव देशमुखांना ते भेटले पूर्ण तयारीनिशी. साहेब एकदम खुश झाले. तसं याच काळात त्यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण पण मिळाले होते पण विलासरावांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रात राहायचे ठरले आणि ते महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोअर प्रचार यंत्रणेचा ते भाग बनले. पूर्ण महाराष्ट्र पिंजून झाला. जोरदार मुसंडी मारली होती. स्वतःच्या कोअर स्ट्रेंथ पाटलांना कळल्या होत्या. परंतु एक पण होत्या. डोक्यावरची लाखांचे कर्ज. ते घेऊन जगणे त्यांच्या आत्मसन्मानाला पटत नव्हते.

आणि वेगळी वाट निवडण्याचा निर्णय झाला. भाषण कला शिकाव्यण्याच्या पुण्याच्या वर्गात असताना त्यातील स्कोप समजला होता. पहिली 30ची बॅच सुरू करण्याचे ठरले. मज ध्येय गवसले हो असेही काही झाले आणि त्यातून ऑर्किड HRD ट्रेनिंग याचा जन्म झाला. यातून भाषण कला,नेतृत्व कौशल्य आणि राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांच्यासाठी राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. अथक प्रयत्न,जिद्द आणि ध्यास याच्या पुढे यश वाकून उभे असते हे पाटलांनी सिद्ध केले आणि महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली पर्यँत प्रशिक्षण वर्ग झाले. आता लाखाच्या कर्जाची भीती नव्हती आता लक्ष्मी सरस्वतीने प्रसन्न केली होती. कोण बनेगा करोडपती हे स्वप्न प्रत्यक्षात आले. काही हजारांच्या वर प्रशिक्षणे झाली आणि त्यातून अगदी मंत्री पातळीवरचे नेतृत्व उभे राहिले. जे सर्व होत असताना त्यांची लाल मातीशी आणि अंबाजोगाईशी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती. शनिवार रविवार वर्ग घेण्यासाठी धूमकेतू गायब होतो आणि काही दिवसांनी परत मैदानात प्रगट होतो ह्याचे आकलन मला झाले.

सर्वांनाच घरात बंदी होण्याचे दिवस आले. कोविडचे संकट समोर. आता पाटलांनी यासंकटाला संधीत रूपांतर केले आणि आपल्या सर्व संचिताचा निचोड असणारे पुस्तक त्यांनी लिहून काढले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी ....राजकीय नेतृत्व कौशल्य !! पुस्तक मराठी व हिंदी भाषेत आले. मराठी पेक्षा हिंदी प्रति जास्त विकल्या गेल्या बाकी लाखाची उलाढाल ही गौण गोष्ट !!
आकाशाला गवसणी घालणाऱ्या व्यक्तीला भौगोलिक सीमा नसतात आणि एकाच क्षेत्रात ते स्वतःला बांधत नाहीत. गणेश लोमटेंच्या अफाट कल्पकतेतून अजून काय धूमकेतूसारखे प्रगटेल याची वाटच पाहावी लागेल !!
गणेश लोमटे पाटील :- 94231 68252

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

अंबाजोगाईची आस असणारा ....आनंद कुलकर्णी !!

 

अंबाजोगाईची आस असणारा ....आनंद कुलकर्णी !!

प्रत्येक लहान मुलांच्यात प्रचंड क्षमता असतात. फक्त त्या क्षमता व्यक्त झाल्या पाहिजेत. अभिजात असणाऱ्या ह्या क्षमता व्यक्त होण्यास पोषक वातावरण, संधी,उपक्रम आणि काही अंशी धक्के पण मुलांना द्यावे लागतात.काही घडणारे प्रसंग मुलांच्या मनात एवढे पक्के बसतात की त्यांची प्रगती पण होऊ शकते आणि अधोगती सुद्धा !! काही प्रसंग अगदीच साधे असतात तर काही प्रसंग प्रचंड धारदार. यातून स्वतःला बदलण्याचा मार्ग मिळाला की ते मुलं प्रगतीचा मार्ग सुसाट वेगाने धावू लागते. आपण त्याला टर्निंग पॉईंट पण म्हणतो. हा टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात कधी येईल हे सांगता येत नाही.
आनंद असाच हरपन मौला असलेला धमाल पोरगा. आई वडील शिक्षक पण महाराज आपल्याच दुनियेत मग्न असायचे. कधी गृहपाठ पूर्ण नाही तर कधी वर्गात लक्ष नाही. त्यामुळे अगदीच सगळ्याच प्रकारच्या शिक्षा त्याला झाल्या. वर्गाच्या बाहेर उभे करणे हे तर अगदीच मामुली. यासर्व शिक्षांचा फारसा चांगला किंवा वाईट परिणाम स्वतःवर करून घेण्यास त्याला स्वारस्य नव्हतं. त्याला आवडत होते मैदानी खेळ. क्रिकेटचा भारी नाद. त्यामुळे वर्गापेक्षा मैदानावर स्वारी जास्त रमायची तिथे मात्र तो मुलखाचा तत्पर होता. त्याचा मोठा भाऊ प्रसाद मात्र हुशार अभ्यासात चांगला आणि त्याचा परिणाम चांगलाच झाला. बारावीच्या परीक्षेतील त्याच्या यशाने त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला. घरात एकदम आनंदाचे वातावरण. आई वडील एकदम खुश. आयुष्याचे एक स्वप्न पूर्ण झाले होते. मस्त सामुहिक भोजनाचा बेत आखला. आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले. एक वेगळाच माहोल घरात होता. असे कधी आनंदनी आधी पाहिलेले नव्हते. तो क्षण त्याच्या मनावर चांगलाच कोरला गेला. आयुष्याचा टर्निंग पॉईंट त्याला मिळाला.
आनंद आता झपाटून अभ्यास करू लागला. एका प्रसंगाने त्यांच्यातील असणाऱ्या अभिजात क्षमता तो मैदानात आधी व्यक्त करत होता आता अभ्यासातही ते सुरू झाले. परिणाम व्हायचा तो झाला. अशी स्वयंस्फूर्ती खरं तर आपल्या शिक्षण प्रक्रियेतून मुलांना मिळाली पाहिजे. आनंदला बारावीच्या नंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल दोन्हीलाही प्रवेश मिळू शकत होता. अगदीच साध्या इंजेक्शनच्या सुईला घाबरणार आनंद, आजारी व्यक्तींच्या वेदना न पाहू शकणारा आनंद अगदीच दवाखान्यात जाण्यास घाबरणारा आनंद मेडिकलला प्रवेश घेणं अवघडच होते. त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला JNEC ला प्रवेश मिळाला. कॉलेज खासगी होते त्यामुळे फिस पण दांडगी. दुसरी फेरी नांदेडच्या कॉलेजला होती. शासकीय कॉलेज मिळाले तर सोन्याहून पिवळे असा काही भाव आनंदच्या मनात होता. तो नांदेडला निघाला.
प्रचंड पाऊस होता. गोदावरीला पूर आला होता. बस थांबली. नांदेडला कसेही पोहोंचने गरजेचे होते. पूर ओसरण्याचा वाट पाहत सर्व जण उभे होते. आनंद आणि त्याच्या मित्रांचा जीव मात्र कासावीस होत होता. आणीबाणीचा प्रसंग. असे प्रसंग माणसाची खरी ताकद पाहतात. शेवटी सर्वांनी ठरवले. आपली कागद पत्रकं शर्ट मध्ये बांधून ती डोक्यावर घेतली एका हाताने ती पकडून दुसरा हात मित्रांच्या हातात देत साखळी केली आणि वाहत्या पाण्यातून साहस मार्गस्थ झाले. दुसऱ्या फेरीत आनंदला शासकीय कॉलेज मिळाले आणि कॉम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाली. GECA म्हणजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद. आता सुरू झाला वेगळा प्रवास.
चार वर्षे वेगाने गेले. आपण नौकरीसाठी कुठलाही सॉफ्टवेअर कोर्स करणार नाहीत हे आनंदने नक्की केलं. परिणाम व्हायचा तो झाला. नौकरी काही मिळेना. संघर्ष सुरू झाला.पुण्यात जाणे, बायोडाटा तयार करणे,वेगवेगळ्या कंपनी मध्ये जाणे तिथे तो देणे आणि नकार पचवून परत येणे. वडिलांच्याकडून आता पैसे घेणे आनंदला पटत नव्हते पण उपाय नव्हता. शेवटी ओळखीने एक नौकरी मिळाली. दोन वर्षांच्या संघर्षाच्या नंतर मिळलेली ही नौकरी. ते काम सॉफ्टवेअर टेस्टिंगचे होते. बरा पगार होता. पण आनंदचे मन काही यात रमेना. त्याने नौकरी सोडण्याचा निर्णय घेतला पण याच काळात त्याचे लग्न ठरले. साखरपुडा झाला व लग्नाची तारीख काढली 25 डिसेंबर. अशा परिस्थितीत जॉब सोडणे म्हणजे थोडं विचित्रच होते पण ज्या वाटेने आपल्याला जायचे नाही हे कळल्यावर त्याच वाटेवर चालत राहणे हे काही आनंद स्वीकारणारा नव्हता. नौकरी सोडून त्याने केलेल्या बचतीतून जावाचा कोर्स केला आणि नौकरी शोधणे सुरू.याच काळात पुण्यातील हिंजेवाडीला नवीन नवीन IT कंपन्या सुरू होत होत्या.त्यासर्वात आनंदने आपला बायोडाटा दिला पण सहज म्हणून गेलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा कॉल त्याला आला आणि त्यात त्याची निवड पण झाली. निवड पत्र त्याच्या हातात पडले आणि त्यावर तारीख होती लग्नाच्या दिवसाची. प्रसंग बाका होता. त्याने आपल्या बॅग मधून पत्रिका काढली आणि तेथील अधिकाऱ्याना दाखवली. त्यांना वाटले कुणाचे तरी लग्न आहे. आनंदनी सांगितले माझेच लग्न आहे. शेवटी त्याला जॉइनिंग date बदलून मिळाली. इकडे घरचे लोक परेशान होते. सगळंच काही नौरोबांच्या मुळे खोळंबून बसले होते. शेवटी लग्न पार पडले.
Tata नंतर त्याने Sungard जॉईन केलं त्यानंतर त्याला Optra आणि एका मोठ्या कंपनीत त्याला ऑफर आली. Optra ही छोटी कंपनी होती. पण तिथे शिकायला मिळणार होते. त्याला नेमके तेच हवे होते. पॅकेज पेक्षा शिकणे त्याला मोठे होते. आता त्याला खूप शिकायला मिळाले. त्यानंतर तो जॉईन झाला
Persistence मध्ये. तिथे तो चांगलाच रमला.प्रचंड मेहनत घेणे,आनंदाने काम करणे,कामात मस्त राहणे हे आनंदाचे खास गुण. त्याला कधीच आर्थिक असुरक्षितता वाटली नाही त्यामुळे तो शिकत राहिला,बदलत राहिला आणि प्रगती करत राहिला. देशविदेशाच्या वाऱ्या घडू लागल्या. बहुतांश माणसं अशा सर्व प्रवासात आपल्या गावाला विसरतात पण आनंदचे वेगळे पण यातच आहे. त्याला अंबाजोगाईची प्रचंड आस आहे. त्याच्या भावविश्वाचा एक मोठा कप्पा अंबाजोगाई आहे. कुठेही काही चांगले दिसले की ते अंबाजोगाईत कसे होईल याचा विचार तो करतो. आनंदचे गाव केज तालुक्यातील येवता. तिथं पण काही न काही करण्याचे प्रयत्न त्याचे चालू असतात. अंबाजोगाईचे पुणे,मुंबई आणि परदेशातील अनेक मित्रांच्या मदतीने त्याने अंबाजोगाई प्राईड ग्रुप सुरू केला. अंबाजोगाईच्या मुलांना नौकरी मिळवण्याच्या पहिल्या संघर्षात त्याने खूप मदत केली. अंबाजोगाईच्या लोकांचे हक्काचे घर म्हणजे आनंदचे आणि चैतालीचे घर. मध्यंतरी त्याने मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येवत्याला उभा करण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील सर्व अंबाजोगाईकरांना तो एकत्र करू लागला. हे सर्व करताना त्याने आपल्या मुलींच्याकडे आणि बायकोकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. चैतालीला शिकण्यास आणि नौकरी करण्यास त्याने प्रोत्साहन दिले आणि सगळी मुलींची जबाबदारी स्वतः घेतली. याला अर्थात सोबत होती महंमद रफीच्या गाण्याची. रफीची गाणे म्हणजे आनंदचे व्हिटॅमिन. तो नुसता ऐकतच नाही तर गातोपण. अनेक गाणे त्याला मुखोद्गत आहेत.
माणसे जोडण्यात त्याचा हातखंडा आहे. माझ्या एका वाढदिवसाला तो भेटायला आला आणि सोबत एक मस्त शर्ट घेऊन आला. मला थोडं नवलच वाटलं. काम,छंद आणि कुटुंब त्यातही आईवडील त्याच्यासाठी खूप काही आहेत.
तो खूप चांगला टीम लीडर पण आहे त्यांच्यातील प्रज्ञा पाहता प्रणव जोशी आणि योगेश दसपुते यांनी त्याला आपल्या Krios info मध्ये एक संचालक म्हणून सहभागी करून घेतले. सगळा काही अनुभव घेऊन मागच्या वर्षी त्याने स्वतःची आत्मन नावाची कंपनी सुरू केली. आनंदाची बाब म्हणजे यातील 70 % युवक अंबाजोगाईचे आहेत. खूप लोकांना त्याने प्रशिक्षण दिले आणि मोठ्या कंपनीत नौकरी मिळाली तर आनंदाने निरोप पण दिला कुठलाही हक्क न सांगता. अंबाजोगाईतीलच काय मराठवाड्यातील गुणी तरुण अभियंत्यांसाठी धडपडण्याचे व्यासपीठ आता उभे केले आहे. काही करोड मध्ये वाटचाल आहे. सर्वांच्यासाठी नवीन क्षितिज खुलं करणारा आनंद कुलकर्णी.
नवरात्रात चैतालीचा मला फोन आला. तिला काही तरी वस्तीवरील मुलींच्यासाठी करायचे आहे आणि खास करून धडपडणाऱ्या मुलींसाठी. तिने आनंदाने अकरा मुलींचे शैक्षणिक साहित्याचे पालकत्व घेतले. दोघांना नाते जोडायला खूप आवडते. जरूर संपर्कात राहा. फक्त नौकरी मिळावी म्हणून नाही तर अंबाजोगाईची आस असणारा आनंदच्या सोबत खूप काही शिकायला मिळेल !! खास करून आपल्यातील सुप्त असणाऱ्या क्षमता व्यक्त करायला शिकण्यासाठी. आनंदशी दोस्ती नक्कीच आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असू शकते !!
चैताली कुलकर्णी :- 9921968858
आनंद कुलकर्णी :-9850417098

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

व्यापक विश्व आणि विश्वास असणारा प्रशांत !!



सातारा जिल्ह्यातील वाई एक आगळे वेगळे गाव. कृष्णेच्या काठी वसलेले हे छोटे गाव अनेक थोरामोठ्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी.गावाला धार्मिक,ऐतिहासिक आणि सामजिक पार्श्वभूमी. मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईचे. त्यांच्या घरापासून आठवे घर हे पांडुरंगराव दिवेकरांचे. पांडुरंगराव व त्यांची पत्नी नीताताई दोघेही शिक्षक.स्त्री शिक्षण संस्थेचे ते लाईफ मेंबर होते. वाई हे सामाजिक गाव. स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणे हे गावाचा उपजत स्वभाव आहे. तेथील घाटांची स्वच्छता करणे किंवा कृष्णामाईचा उत्सव असेल त्यात मंडप उभारण्या पासून जेवणावळी वाढण्या पर्यंत सर्व काम खूप तळमळीने करणे हे गावातील प्रत्येकाला वाटे.त्यामुळे नकळतच येथील लहानांपासून थोरांवर  स्वतःच्या पलीकडे जाऊन व्यापक विचार करण्याचा संस्कार होत असे. दिवेकरांचे कुटुंब असेच एक व्यापक विचार करणारे होते. पांडुरंगरावांचे वडील डॉक्टर. आपला पेशा त्यांनी व्यवसाय म्हणून न करता सेवा म्हणून केला तर नीताताईंचे वडील स्वातंत्र्यसैनिक अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता. प्रशांत दिवेकर या कुटुंबातील मोठा मुलगा.

लहान वयापासूनच कुटुंब,परिसर आणि शाळेचा व्यापक विचार करण्याचा संस्कार प्रशांतवर झालेला होता. शाळा राष्ट्रीय विचारांची होती. शाळेत पाठ्यपुस्तकं अतिशय तळमळीने शिकवणारे शिक्षक होते तसेच देशभक्ती आणि सामाजिक कामाचे संस्कार देणारे शिक्षक पण होते. गावातून पूर्णवेळ राष्ट्र कार्य करण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा आदर्श प्रशांत समोर होता. तो पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर जायचा. अनेक गणमान्य व्यक्ती त्याच्या घरी यायचे. प्रशांतच्या आईचे वडील बेळगावचे. ते कडवे काँग्रेसी होते. तसेच ते चांगले उद्योजक होते. अनेक संस्थाना देणग्या ते देत असतं. प्रशांतची मावशी अपंग होती. ती अपंग संघटनेची काम करायची. तिच्याबरोबर अनेक ठिकाणी प्रशांत जायचा. लहान वयातच प्रशांतचे भावविश्व व्यापक बनत होते.

महाविद्यालयात असताना त्याने विज्ञान शाखा घेतली. दिवस आनंदाचे होते. भरपूर खेळणे आणि प्रचंड वाचन करणे हा प्रशांतचा स्वभाव बनला.कथा कादंबऱ्या पासून ते तत्त्वज्ञानाचे ग्रंथ असे चौफेर वाचन त्याचे होते. अर्थात त्यामुळे त्याचे विचार विश्व खूप व्यापक बनले. वाईच्या सार्वजनिक ग्रंथालयाचा पुरेपूर वापर त्याने करून घेतला होता. हिंदू वसंत व्याखानमाला,कृष्णा माईचा उत्सव यातील व्याख्याने यामुळे अनेक दिग्गज माणसांचे दर्शन त्याला होत होते.पदवीचे शिक्षण चालू असतानाच महाविद्यालयातील शिक्षक होण्याचे विचार प्रशांतच्या मनात दृढ होत होता.घरातले वातावरण पण त्याला अनुकूलच होते.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर प्रशांतने B.Ed. केले व पुढे M.Ed करण्यासाठी तो पुण्यात आला होता. सकाळीच महाविद्यालय असल्याने दिवसाचा बराच वेळ मोकळा मिळायचा. भरपूर भटकंती पण त्याने या काळात केली. त्याचे वडील आणि ज्ञान प्रबोधिनीचे माधवराव देशपांडे हे एकमेकांचे परिचित. माधवराव त्यावेळी औषधी वनस्पतीचा एक प्रकल्प प्रबोधिनी तर्फे राबवत होते. प्रशांतचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास चांगला होता. वडिलांनी प्रशांतला प्रबोधिनीत माधवरावांना संपर्क करण्यास सांगितले आणि त्याचे प्रबोधिनीत येणे वाढले. वेल्ह्यात असो की सिन्नरला तो माधवरावांच्या बरोबर जायचा. असेच एकदा तो ग्रामविकसन कार्यालयात बसला असताना ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य श्री विवेक पोंक्षे तिथे आले होते.माधवरावांनी प्रशांतची ओळख पोंक्षेसरांशी करून दिली.

“बघा विवेकराव हा तरुण M.Ed. करतोय. तुम्हाला शिक्षक म्हणून हवा आहे का ?चांगला उमदा पोरगा आहे !!” माधवराव पोंक्षेसरांना म्हणाले.

सरांनी लगेच एक अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन महिन्याने एक पत्र प्रशांतला मिळाले. प्रत्यक्षात ते पत्र दोन महिने आधीच पाठवलेले होते व शिक्षक पदाच्या भर्ती साठीचे होते. प्रशांतने थेट प्रबोधिनी गाठली. त्याने झालेला प्रकार सांगितला. पोंक्षे सरांनी प्रशांतला दादा नवाथेनां भेटण्यास सांगितले. दादांनी चक्क दोन तास प्रशांतशी गप्पा मारल्या. त्यात प्रचलित शिक्षकाच्या मुलाखती सारखे काहीच नव्हते.त्या गप्पा चौफेर होत्या. दोन दिवसांनंतर शिक्षक प्रशिक्षणाला येण्याचा निरोप प्रशांतला मिळाला व प्रशांत शिक्षक म्हणून प्रबोधिनीत रुजू झाला.  

तत्त्वज्ञान, विज्ञान, राजकारण, समाजकारण यात पराकोटीच्या विवेकाने वावरणाऱ्या विवेकराव पोंक्षेनी आपल्यातील माणूस कधीच मरू दिला नव्हता. त्यांचा वावर तसा सर्वत्र. तसे त्यांचे आप्त ही सर्वत्र. त्यांच्या ह्या सर्व दूरू संचाराने अनेकांशी आत्मिक नाते सरांचे  निर्माण झाले होते. वाड्या, वस्ती,तांड्यातील अंत्यज व गिरीजनांपासून विकसित देशातील ज्ञानवंताच्या पर्यंत हा सर्व नात्यांच्या भावबंध होता.ज्ञान प्रबोधिनीच्या प्रशालेचे ते प्राचार्य असले तरी प्रत्येक शिक्षकाचे ते अभिमित्रच होते.प्रशांत विवेकसरांच्या सहवासात रमू लागला. संपर्क,सहवास आणि सामूहिक कृतीतून शिक्षण हे तो प्रत्यक्ष अनुभवत होता. प्रशालेतील प्रज्ञावंतांचे शिक्षण ते ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोधून त्यांच्या विकासासाठीची ग्रामीण प्रज्ञा विकास योजना अशा दोन्ही ठिकाणी प्रशांत रमू लागला. शाळेतील पहिला दिवस मजेदार होता.प्रशांतचा विषय होता विज्ञान आणि प्रत्यक्षात त्याला शिकवण्यासाठी गणित विषय दिलेला. पोंक्षेसरांना त्याने हे सांगितले. त्यावर हसून ते म्हणाले,

“ शिकवायला लाग, तुला जमेल नक्की.”

पुढे हळूहळू तो अनेक विषय शिकवू लागला.फार दीर्घकाळ तो प्रबोधिनीत शिकवेल असे त्याला वाटत नव्हते. स्टेपिंग स्टोन सारखा प्रबोधिनीतील अनुभव त्याला उपयोगी पडेल असेच त्याला वाटत होते.

काळाच्या पोटात मात्र काही तरी वेगळेच लिहिलेले होते. पोंक्षेसर,प्रियाव्रत देशपांडे, अजय शेलार यासर्वांच्या बरोबर दिवाळीच्या सुट्टीत प्रशांत २५ दिवसांचा अभ्यास दौरा करण्यासाठी ईशान्य भारतात निघाला. हा अभ्यास दौरा त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देवून गेला.या काळात तो जे काही प्रबोधिनीत बोलले जात होते तो ते प्रत्यक्ष अनुभवत होता. सोबतच्या व्यक्तींशी त्याचे दृढ नाते निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच सोबत ईशान्य भारताशी पण.शिक्षण म्हणजे काय हे त्याला हे त्या दौऱ्यात कळले. इतर कुठे तो शिक्षक झाला असता तर चांगला पाठयपुस्तक शिकवणारा शिक्षक झाला असता. आता मात्र प्रत्येकात दडलेलं पूर्णत्व व्यक्त करणे हे म्हणजे शिक्षण असे तो शिकत होता. पोंक्षे सरांच्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच प्रभाव प्रशांतवर या काळात घडला.१९९९ सालचा हा दौरा प्रशांतच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा ठरला.

तीन वर्षे प्रबोधिनीत शिक्षक म्हणून काम केल्यावर आदिवासी विकास विभागाच्या एका आश्रम शाळेसाठी असणाऱ्या पात्रता परीक्षेत तो उतीर्ण झाला. प्रत्यक्ष बोलावणे येईल असे वाटत नव्हते. शासनाचा सावळा गोंधळ असतो. कॉल आल्यावर वडिलांचे मत होते की भीमाशंकरच्या डिंबे येथील आश्रम शाळेत रुजू व्हावे. आर्थिक सुरुक्षितता असावी असे त्यांचे मत होते. शनिवार रविवार प्रबोधिनिसाठी द्यावेत आणि इतर वेळ आश्रमशाळेत शिकवावे. वडिलांचा प्रभाव बराच प्रशांतवर होता.त्यांच्या मनाविरुद्ध काही करण्याची इच्छा त्याची अजिबात नव्हती. शेवटी त्याने आश्रम शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्याना तो शिकवू लागला.

तीन वर्षे तो आश्रम शाळेत शिकवत होता. रविवारी काही झाले तरी तो पुण्यात यायचा. पोंक्षेसर, मिलिंद नाईक, प्रवीण पायगुडे,शिवाजी कोंडे या प्रबोधिनीतील त्याच्या मित्रांशी नाळ मात्र तुटली नव्हती.याच काळात स्वामी विवेकांदांची स्मृती शताब्धी होती. आपल्या प्रबोधिनीतील मित्रांच्या सोबत प्रशांतने भीमाशंकर भागात अनेक व्याख्यानांचे आयोजन केले. तो परिसरातील अनेक शाळेत पण जाऊ लागला होता. याच काळात त्याच्या मनात एक विचार अनुभवाने पक्का होत होता.शिक्षणात काही करायचे असेल तर शासकीय रचनेत काम करायला मर्यादा आहेत.त्यात त्या विभागाचा कारभार प्रचंड भ्रष्ट. याच काळात लग्नाचा विचार पण चालू होता. परत प्रबोधिनीत जायचे म्हंटले तर कमी पगार मिळणार. त्या पगाराला स्वीकारेल अशाच मुलीशी लग्न करणे योग्य होते. याच काळात वडिलांचे निधन झाले. आता आईला प्रबोधिनीत काम का करायचे हे पटवून देणे सोपे होते. शेवटी प्रशांत परत प्रबोधिनीत आला.आश्रम शाळेत असताना पण त्याचे शिकवणे प्रभावीच होते. पण प्रबोधिनीत असलेल्या शिक्षणाची विविधता. कामात मिळणारे नवनवीन अनुभव आणि मुख्यतः कामासाठी मिळणारे स्वातंत्र्य हे खूपच प्रशांतला भावणारे होते.प्रबोधिनीत तो विविध विभागांच्या कामात तो सहभागी होत असे.

प्रबोधिनीच्या शाळेत अनेक शिक्षक येतात. काही काळ काम करतात.चांगल्या पगाराची नौकरी मिळाली की ते निघून जातात. प्रशांतच्या बाबतीत नेमकं उलटे घडत होते. तो चांगल्या पगाराची नौकरी सोडून परत प्रबोधिनीत आला होता. याचे कारण समजून घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे त्याला भावलेली प्रबोधिनीची सतत नवीन काही तरी करत राहण्याची उर्मी आणि त्यासाठी मिळणारे स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे दोन्ही आजोबांच्या  साधेपणाचा संस्कार. त्यामुळे तो केवळ प्रबोधिनीत परत आलाच नाही तर प्रचंड ताकदीने त्याने काम करायला सुरुवात केली.

मुलांचे अनेक अभ्यास दौरे काढण्यास सुरुवात केली. विद्याव्रत संस्काराच्या कामात तो हिरीरीने सहभाग घेवू लागला. ग्रामविकसनच्या कामात पण तो प्रासंगिक सहभाग घेवू लागला. अनेकांना प्रबोधिनी तो दाखवू लागला. छात्र प्रबोधन मधील काम असे अनेक ठिकाणी तो सहभागी होऊ लागला.याच काळात त्याचा आत्मविश्वास पण कमालीचा वाढला. गरज पडली तर मोठी आर्थिक कमाई करण्याची क्षमता त्याची आता झाली होती. विद्यार्थ्यांना शिकवणे या सोबतच तो पोंक्षेसरांच्या बरोबर तो शिक्षक प्रशिक्षण घेण्याचे काम करत होता. शिक्षकाचे प्रशिक्षण किती महत्वाचे आहे हे त्याला आश्रम शाळेतील अनुभवा नंतर लक्षात आले होते. एकुणात प्रशांतचे व्यक्तिमत्व सर्व स्पर्शी होत होते. 

ज्ञान प्रबोधिनी,सोलपुरच्या प्रशालेत आता एका प्रमुखाची नितांत गरज होती. त्यासाठी म्हणून प्रशांतला जबाबदारी देण्यात आली. प्रमुख म्हणून त्याने दोन वर्षे चांगले काम केले. मुलगा मोठा झाल्यावर त्याला परत येणे गरजेचे होते. परत आल्यावर तो तीन दिवस शाळेत शिकवायचा आणि तीन दिवस शिक्षक प्रशिक्षांचे काम करायचा.याच काळात त्याची संघटनात्मक घडण पण होत गेली. त्याने प्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा पण घेतले.विद्याव्रत संस्काराच्या शिबिरांच्या तो मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याने त्यातील मर्म आणि प्रबोधिनीचे मर्म त्याला समजू लागले होते.

आजच्या घडीला त्याने प्रबोधिनीच्या माध्यमातून व अनेक सहकाऱ्यांच्या सोबत  २५ एक हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.जवळपास पन्ना संस्थाशी त्याच्या संपर्क आलेला आहे.दोनशेच्या वर शाळेत तो प्रशिक्षणासाठी जाऊन आलेला आहे. जवळपास आठ राज्यात त्याने काम केले आहे.एक विद्यार्थी म्हणून सुरु झालेला प्रशांतचा जीवन प्रवास एक शिक्षक प्रशिक्षक म्हणून विस्तारट गेला. त्याला भविष्यात ज्ञान प्रबोधिनीचे संचित विचारत नेण्याची आस आहे.

ज्ञान प्रबोधिनीचा अन्यराज्यात विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. तामिळनाडूचा शिलेदार आहे प्रशांत जोरदार काम चालू आहे.


मराठवाड्यातील युवकाची स्फूर्ती गाथा ...व्यंकटराव भताने


  

अंबाजोगाई तालुक्याच्या पूर्वेला डोंगराळ पट्यात एक छोटे गाव ‘भतानवाडी’. गावातील सर्वांचे आडनाव भताने. मानाजीराव भताने आपल्या परिवारासह इथे आपला प्रपंच चालवत होते. आपल्या पत्नी सह कोरडवाहू शेतीत राब राब राबावे हा त्यांचा दिनक्रम होता. व्यंकट हा त्यांचा सर्वात लहान मुलगा. मानाजीरावांचा मोठा मुलगा आणि व्यंकट यांच्या वयात मोठे अंतर.शिक्षणाचे वारे भतानवाडीत आता सुरु झाले होते. गावातील प्राथमिक शाळेत व्यंकट जाऊ लागला. तो एक भारी  चुणचुणीत मुलगा. चौथी पर्यंतचे शिक्षण आनंदात झाले. पुढे शिकायचे असेल तर चार किलोमीटर लांब असणाऱ्या उजनीच्या शाळेत पायी जावे लागायचे. गावातील सर्वच मुलं शिकण्यासाठी उजनीला जाऊ लागली. शाळेतील शिक्षणाचे संस्कार उत्तम होते. व्यंकटची शिक्षणातील रुची आणि गती वाढली.शाळेच्या ओढीने उन्ह पावसात आठ किलोमीटर चालणे त्यामुळे फारसे जिकीरीचे वाटलेच नाही. आपल्याला पाहिजे ते साध्य करायचे असेल तर परिस्थितीशी निकराने लढावे लागते हे व्यंकट लहान वयातच शिकत होता.तसा तो जिद्दी आणि कष्टाळू होता.

 

निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहत होते. बीड लोकसभा मतदार संघातून क्रांतिसिंह नाना पाटील उभे होते. त्यांची एक सभा उजनीला आयोजित करण्यात आलेली होती. व्यंकट आणि मित्र शाळा सुटल्यावर परत गावी जायचे सोडून थेट सभेला गेले. रात्र झाली. गावात मुलं नाही परतली म्हणून काळजीचे वातावरण होते.सगळे पालक आपल्या मुलांना शोधण्यासाठी उजनीला निघाली. भरपूर शोधाशोध केल्यावर सभेच्या ठिकाणी मुलांचा ठावठिकाणा लागला. कातावलेल्या पालक मंडळीनी पोरांना चांगलाच दम भरला आणि फटके पण दिले. व्यंकटच्या मनात मात्र पत्री सरकारचे जनक क्रांतिसिंह नाना पाटीलांना पाहिल्याचे आणि ऐकल्याचे भारी समाधान होते. याच काळात त्याने हैदाबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थांचे चरित्र पण वाचून काढले. असे नकळतच राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्यंकटवर होत होते.

 

दहावीच्या परीक्षेत पास झाल्यावर आता पुढेचे शिक्षण अंबाजोगाईला. अंबाजोगाई विद्येचे माहेरघर. अनेक मातब्बर मंडळींचा इथे राबता होता. संस्कार आणि संस्कृती याचा सुरेख संगम अंबाजोगाई झालेला पाहण्यास मिळतो. याच भूमीत हैदाबाद मुक्ती संग्राम चांगलाच लढला गेला त्यामुळे संघर्षाचा वसा अंबाजोगाईकरांसाठीची मोठी ठेव आहे. संस्कार,संस्कृती आणि संघर्ष यातून मनुष्य घडण अंबाजोगाईच्या वातावरणात होते. आता व्यंकटला स्वतः स्वयंपाक करावे लागायचे. सकाळी स्वयंपाक करून मराठवाडा कॉलेजमध्ये शिकण्यास जायचे आणि परतल्यावर रात्रीचा स्वयपाक करायचा. असे चांगलेच वर्षभर चालले. त्यानंतर मात्र त्यांनी खानावळ लावली. अंबाजोगाईचे सेलूकर गुरुजी भतानवाडीत शिक्षक होते. बऱ्याच वेळा त्यांचा मुक्काम शाळेत असायचा. त्यावेळी व्यंकटची आई त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची. त्याचा परिणाम असा झाला की गुरुजींनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यंकटला सेलूकर वाड्यात राहायला बोलावले. भल्यामोठ्या सेलूकर वाड्यात व्यंकट चांगलाच रमला. उमेश सेलूकर व त्याची सर्व भावंडे व्यंकटची जिवाभावाची मित्र झाली. भरपूर शिकले पाहिजे याचा संस्कार त्याच्यावर याच काळात झाला. अंबाजोगाईतील मामा क्षीरसागर यांचा सहवास त्यांना याच काळात लाभला.त्यांचे मामाच्या घरी आणि खोलेश्वर विद्यालयात येणे जाणे वाढले. मामा खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. चुणचुणीत तरुण व्यंकट मामाच्या मनात चांगलाच भरला. याच काळात व्यंकटचे पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात सुरु झाले.

 

रात्री कॉलेज असल्याने दिवसा आपण काही तरी कमावले पाहिजे यासाठी श्री.लाला यांच्याकडे ते सुपरवायझर म्हणून काम करू लागले. पुढे उस्मान आणि पटेल यांच्याकडे ते कामाला लागले. हुतात्मा स्मारक बांधण्याचे काम तीन जिल्ह्यात चालू झाले होते.व्यंकटची फिरती वाढली आणि गावाकडे त्यांचे येणे कमी होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की घरातील वडीलधार्यांनी व्यंकटचे लग्न ठरवले.ते सगळे केवळ दोन दिवसातच घडले. ३१ मे १९८२ ला व्यंकटचे लग्न झाले. काही दिवसाच्यासाठी तो अंबाजोगाईला आला.

 

इकडे अंबाजोगाईत मात्र वेगळेच काही घडत होते. श्री मामा क्षीरसागर यांच्याकडे ज्ञान प्रबोधिनीचे वामनराव अभ्यंकर आलेले होते. त्यांचे आणि मामाचे खूप स्नेहाचे आणि निरपेक्ष नाते होते. बोलता बोलता एक तरुण कार्यकर्ता त्यांना ज्ञान प्रबोधिनीच्या कामासाठी हवा आहे असे त्यांनी मामांना सांगितले. मामांच्या मनात लगेच व्यंकटचे नाव आले. प्रबोधिनीच्या कामाला आणि वामनरावांच्या साथीला व्यंकट अतिशय साजेसा आणि योग्य ताकदीचा युवक होता.मामानी काही दिवसात व्यंकटला आपल्याकडे बोलावले. त्यांनी पुण्यातील प्रबोधिनीच्या कामाच्या बद्दल त्यांना सांगितले. घडलेले लग्न आणि सध्या करत असलेले काम सांगून व्यंकटने जाण्याची असमर्थता व्यक्त केली. त्यावर मामानी चक्क हुकूमच दिला,“ मी सांगतोय न ......तुला जावेच लागेल.”

 

मामाची प्रेमाची आज्ञा व्यंकट मोडू शकला नाही. आता त्यांचा व्यंकट ते व्यंकटराव प्रवास सुरु झाला होता.थेट पुण्याची बस पकडून व्यंकटराव पुण्यात आले व तेथून सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनीत.मामानी दिलेले पत्र त्यांनी वामनरावांन दाखवले.परांडे वाड्यात व्यंकटरावाना भाऊनी आवरून यायला सांगितले. ते एका शिबिरात व्यस्त होते. पुढच्या भेटीच्या वेळी वामनराव व्यंकटरावला म्हणाले, “ मी सांगतो ते नीट लक्ष देवून एका. मी फक्त एकच वेळ तुम्हाला ते सगळे सांगणार आहे. परत तुम्ही विचारायचे नाही आणि मी सांगणार नाही. मी सांगितलेली मोहिम तुम्ही यशस्वी केली तरच मला परत भेटायला या नसता मला नाही भेटला तरी चालेले. आपल्याला आपला मार्ग आहे.”

 

वामनरावांनी सलग न थांबतात निगडीला जाण्याचा मार्ग व्यंकटरावनां सांगितला व सोबत एक पत्र दिले. निगडीत पटवर्धनकाका आणि पांडेकाकांना भेटून ज्ञान प्रबोधिनीसाठी प्राधिकरणात मिळालेली जागा पाहून येण्याची मोहिम ती होती.जर तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घरात चहा पिवून आलात तर मोहिम यशस्वी झाली असे समजा नसतात अपयशी !!” वामनरावांचे शेवटचे वाक्य !! व्यंकटराव पुण्यात पहिल्यांदाच येत होते. त्यांनी याआधी कुठल्याही महानगरात प्रवास केलेला नव्हता. सगळेच काही नवे होते. त्यात ओळखीचे असे कुणीच नाही. वामनरावांचे बोलणे व्यंकटरावने आपल्या मेंदूत पक्के केले आणि ते थेट निगडीला निघाले. अचूक मार्गक्रमण करत ते योग्य ठिकाणी पोहोंचले.पटवर्धन काका व पांडेकाकांना त्यांनी वामनरावांचे पत्र दाखवले. नवनगर विद्यालयाची जागा पाहून आले आणि खास म्हणजे काकांच्या घरी चहा पिवून आले. सर्व काही व्यवस्थित झाले होते. व्यंकटरावांना शिक्षक म्हणून घेणे अशी सूचना वामनरावांनी तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था पण करण्यास सांगितले. व्यंकटरावांची निगडीतील घोडदौड सुरु झाली.

 

निगडीत व्यंकटराव शिक्षक म्हणून रुजू झाले. बराच मोठा संघर्ष होता. प्रबोधिनीला न देता ती जागा अनेकांना हवी होती.त्यांना त्यांची शाळा सुरु करायची होती. त्यामुळे अनेक अवघड क्षण आले. गुंडगिरी झाली,हाणामारीचे क्षण आले. व्यंकटराव नेटाने सगळ्यांच्या बरोबर लढत होते. असे संघर्ष उद्दात्त ध्येयासाठी केल्याने व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी येते असे प्रबोधिनी मानते. संघर्षाच्या बरोबरच शिक्षणात पण प्रगती करण्याचा मानस व्यंकटरावांचा होता. परंतु तिकडे गावाकडे काही वेगळेच घडत होते. केवळ लग्न झाल्यावर दहा दिवस झाल्यावरच व्यंकटरावांनी निगडीत प्रबोधिनीचे काम सुरु केल्याने अनेक वावड्या उठायला लागल्या. त्यांच्या पत्नीच्या वडिलांना काळजी वाटायला लागली. मुलगा रुसून पळून गेला आहे का असे अनेकांना वाटत होते. पत्नीला सोबत आणावे तर राहण्यास जागा मिळत नव्हती. सगळीकडूनच अवघड प्रसंग होता. हे जवळपास दोन वर्षे झाले. शेवटी एक दुसऱ्या मजल्यावरील खोली वामनरावांच्या प्रयत्नांनी मिळाली व शेवटी आशाताई निगडीत आल्या.

 

व्यंकटरावांनी शिकवण्या बरोबरच शिकण्याचा धडाका लावला.त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. प्रबोधिनीत कार्यकर्त्यांना शिकण्यास खूप प्रेरणा दिली जाते. एकीकडे ते हिंदी सारख्या विषय शिकत होते तर दुसरीकडे खेळातील अतिशय उत्तम दर्ज्याच्या NIS मधून क्रीडा शिक्षण घेवून आले. अशी त्यांचे अभ्यास विश्व आणि कार्यविश्व वाढत जात होते. याच काळात अजून एक संकट आले. व्यंकटरावांना आपली असलेली खोली सोडावी लागली. आता काय करणार हा मोठा प्रश्न होता. वामनराव,व्यंकटराव आणि मनोजरावांन चक्क पत्र्याच्या खोल्या बांधून नवनगर विद्यालयाच्या जागेत राहायला आले. आजची भव्य दिव्य वास्तू पाहिल्यावर आपल्याला लक्षात येणार नाही की त्यामागे किती अथक परिश्रम आहेत.पुढे शाळा खूप मोठी झाली. शाळेला अनुदान मिळाले. आता सगळेकाही चांगले चालू होते.जवळपास दहा वर्षे व्यंकटरावांनी निगडीच्या शाळेत काम केले.

 

याच काळात मावळातील साळुंब्रे येथे ज्ञान प्रबोधिनीने शाळा काढावी असा प्रस्ताव पुढे आला. निगडी पासून काही किलोमीटर असणारे साळुंब्रे. आता या नवीन मोहिमेची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न होता. भाऊ (वामनरावांनी ) आपल्या सर्व शिक्षकांच्या समोर आव्हान ठेवले. ग्रामप्रबोधिनीची पहिले कार्यवाह कोण हा मोठा प्रश्न होता. शाळेला जागा नाही. अनुदान नाही विशेष म्हणजे मान्यता पण नव्हती. कोणीच जाण्यास तसे तयार नव्हते. भाऊनी व्यंकटरावांना बोलाऊन घेतले. भाऊ म्हणाले, “ तुम्हाला आयुष्यभर नौकरी करायची आहे की काम करायचे आहे ?”

व्यंकटरावांनी उत्तर दिले, “ काम करायचे आहे !!”

नौकरी तर तुम्हाला आहेच मग आता काम करायला लागा!  यापुढे ग्रामप्रबोधिनीचे कार्यवाह तुम्ही.” भाऊंचा आदेश. ग्राम प्रबोधिनीचे पहिले कार्यवाह व्यंकटराव झाले. मुख्याद्यापक म्हणून  मग दोन वर्षांनी त्यांनी जबाबदारी घेतली. एका वाड्यात केवळ तीन मुलांच्या वर ही शाळा सुरु झाली. प्रचंड परिश्रम घेवून आज ग्रामप्रबोधिनी डौलात उभी आहे. साळुंब्रे आणि परिसरातील मावळ भागातील अनेक मुलांना घडवणारी ही एक विलक्षण शाळा आहे. अनेक प्रयोग येथे चालतात. आज स्वतःची वास्तू आहे,अनुदान आहे आणि खास म्हणजे भरपूर मुलं आहेत. यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. यावरच न थांबता मुलांच्यासाठी तंत्रशिक्षणाची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे.

 

शाळेच्या बरोबर परिसराचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रकल्प इथे राबवले जातात. पवनामाईचा उत्सव त्यातील एक आहे. साळुंब्रे गाव आदर्श करण्यात ग्रामप्रबोधिनी आणि व्यंकटरावांचा कोठा वाटा आहे. यासोबतच शिक्षकांचे संघटन यासाठी खूप सारे प्रयत्न व्यंकटरावांनी केले. दुष्काळी मराठवाड्यातील भतानवाडी गावातील एक व्यंकट कर्तृत्ववान व्यंकटराव होतो याची ही स्फूर्ती गाथा आहे. ज्ञान प्रबोधिननीच्या शालेय संस्कारात न शिकता थेट तारुण्यात संपर्कात येणाऱ्या युवकाला उमदा नेता बनवण्याची ज्ञान प्रबोधिनीची प्रक्रिया अफलातून आहे !!