सोमवार, ९ एप्रिल, २०१२

जिवंत बालाजीच्या श्रीमंत कविता


बालाजी सुतार 
You and Balaji Sutar
Facebook friends since November, 2011 • Living in Ambajogai

बालाजी सुतार व माझी पहिली भेट, दोघंही अंबाजोगाईत राहत असून सुद्धा, फेसबुक वरील. शालेय जीवनानंतर, १९९९ पासून मी अंबाजोगाईत स्थिरावलो. गेल्या १३ वर्षांत या नावाची व्यक्ती अंबाजोगाईत राहते हे पण माहित नव्हते. माझे बरेच कवी,लेखक व साहित्यिक मित्र आहेत पण त्यांच्या तोंडून पण मी हे नाव कधी ऐकलं नाही. कविसंमेलनात माझे जाणे नगण्यच ...... शाळेत मराठीच्या पुस्तकात जेवढ्या कविता वाचल्या व गुरुजींनी त्या ज्या पद्धतीने शिकवल्या व त्यावर थोडा मुलामा चढवत परीक्षेतील प्रश्नांना दिलेली उत्तरं एवढाच काय तो, माझा कवितेशी संबंध.

महाविद्यालयीन काळात एका मुलीवर कविता केली होती. किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळी कविते सारखे काही तरी लिहिले होते. या व्यतिरिक्त कविता स्फुरण्याचा योग कधी आलाच नाही. बा.भ बोरकर, विंदा, सुरेश भट व ग्रेस यांच्या नेट वरील कविता फावल्या वेळात वाचायचो व काही काळ मन तरल तर कधी अस्वस्थ व्हायचे.

अंबाजोगाईतील लहानपणापासून माहित असलेले कवी म्हणजे राम काका मुकद्दम. एकदा शाळेत त्यांच्या काही कवितांची ओळख, त्यांनी स्वतःच करून दिली होती तो प्रसंग खोल मनात घर करून आजही बसलेला आहे. दिनकर जोशींबरोबर गप्पा मारताना कधीकधी त्यांच्या ऐकलेल्या एक दोन कविता........... हे एवढेच माझे काव्य विश्व.

15 December 2011
तारखेला 
Balaji Sutar 
हितसंबंधांचं एक मजबूत जाळं आपल्या आसपास विणून घ्यावं घट्टपणे...

Prasad Chikshe:-
मला वाटतं हितसंबंधापेक्षा ......आत्मीयतेचं व त्यातून निर्माण होणाऱ्या आशिर्वादाचे कवच असावे, आपल्या भोवती. जाळे तोडले जाऊ शकते, कवच अभेद्य असते.

Balaji Sutar :- Prasad ,
वर लिहिलेला विचार तात्विक स्वरूपाचा नसून तो अत्यंत व्यवहारी जगण्याशी भिडणारा विचार आहे. नीटपणे तपासून पाह्यलं, तर, माणसं - (मी, तुम्ही, आणि अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता आपल्या आसपासची सगळीच.) नेहमीच असं स्वार्थी हितसंबंधांचं जाळं आपल्या सभोवती विणून अधिकाधिक भीतीमुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसू.

17 December 2011 

Balaji Sutar 
अत्यंत मठ्ठ मूर्खपणाने आपण किती शहाणे आहोत हेच सांगत राहावे सदोदित...

Prasad Chikshe:- Balaji Sutar ग्रेसचा प्रभाव वाढत चालला आहे काय ? थोडं समजून सांगावं आम्हाला .

Balaji Sutar:- Prasad Chikshe-
मी जगण्याची मला उमगलेली व्यवहारी (?) सूत्रे सांगत आहे. (कुणाच्या प्रभावाखाली लिहिण्याचे माझे दिवस अर्थातच कधीच आलेले नव्हते. -:) ग्रेस असलं काही सांगत होते काय?)

Prasad Chikshe:- Balaji Sutar ग्रेस हा, आपल्या दरम्यानचा एक दुवा ...तो ही फेसबुक वरचा ..थोडा अनाकलनीय प्रथमदर्शी तरी .....तेवढंच त्या प्रश्नार्थक वाक्याचं महत्व.आपल्याला उमगलेलं सूत्र ……थोडं स्पष्ट करता येईल का ? मला वाटते, ते मला खूप उपयोगी होईल.

Balaji Sutar:- Prasad Chikshe- हे सूत्र अधिक स्पष्ट करायचं तर, हे असलं काही लिहून मी स्वत: लैच वेळा मी किती शहाणा आहे हेच सांगत नाहीय काय? हे सूत्र माझ्यावरूनच तर उमगलं मला. -:)

Prasad Chikshe:- Balaji Sutar मला आज नक्की आपल्याला भेटायचे आहे ....आपला वेळ द्या .....

Balaji Sutar:- Prasad Chikshe- मन:पूर्वक स्वागत आहे, सर. आपल्याला भेटणे माझ्यासाठी अतिशय आनंदाचे असेल. कुठे भेटूयात? तुम्ही सांगा, मी येईन तिकडे..

आणि मी भर दुपारी बालाजीला भेटायला गेलो. मराठवाडयातील मातीचा रंग असलेला, ठेंगणा व थोडासा गोल चेहरा व खूप शांत पण गंभीर डोळे. सावकाश व संथपणे त्यांचे बोलणे माझ्याशी एक नाते निर्माण करत होते. संगणक प्रशिक्षणाचा त्यांचा व्यवसाय. मनोज इंगळेमुळे माझ्या अनेकांच्या ओळखी झाल्या, त्याच्याच दुकानात आम्ही थोडं बोललो. त्या दिवसानंतर आम्ही फार कधी भेटलो नाही, बोललो नाही पण बालाजीच्या कविता मात्र मला बोलत होत्या. अधून मधून फेसबुक वरील त्याच्या काही शब्दांच्या ओळी मनात काहूर माजवत असत.

Prasad Chikshe
कविता माणसाला जगायला शिकवते व कसे जगायचे हे पण शिकवते ....बरोबर न ?

Balaji Sutar
नक्की, सर. सगळ्याच अभिजात कलांमधून नीटपणे जगण्याचं बळ मिळतं.. कविता अपवाद कशी असेल?

बालाजीच्या कवितांवर लिहिणे किंवा त्याचे रसग्रहण करण्याची क्षमता, माझी अजिबात नाही. पण त्याचे अनुभव विश्व समजून घेण्याचा प्रयत्न गेले दोन महिन्यांपासून करत आहे.

Balaji Sutar
:  Prasad Chikshe- जगण्याच्या गुंतागुंतीत प्रत्येक क्षणी मनाच्या पटावर जे रण होतं त्यात प्रत्येकालाच असं जखडणं कधी ना कधी भोगावं लागतं. आता, हे अटळ असतं की स्वीकृत हे ठरवणं जरासं अवघडच पण सर्वांनाच पावलोपावली आपापले संघर्ष या रणावर लढावे लागतात हे नक्की.

बालाजीचे असे वाक्य, मला विचारांच्या एका वेगळ्याच विश्वात नेतात. मी बालाजीला, त्याच्या कवितेतून उमलताना पाहतो. मनुष्य घडणीची प्रक्रिया अभ्यासणे, हा माझा नित्याचाच भाग. सभोवतालच्या निसर्गाच्या, मानवी जीवनाच्या क्रियांना प्रतिसाद आपण द्यायला लागतो त्यावेळी त्याची माणूस बनण्याची प्रक्रिया सुरु होते. साहजिकच आपल्या भोवतालच्या विराट व अनेक रूपातून व्यक्त होणाऱ्या निसर्गाचा, आपल्या सर्वांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटत असतो. बालाजीसारखा कवी निसर्गाशी एकरूप होतो व ते अभक्त होणं, व्यक्त होते, छानश्या एका कवितेतून .... 

"सोहळा"

असा बरसला घन
ओलाचिंब तन-मन.
अशी कडाडली वीज
थरारलं पान-पान.

असं गाणं धरित्रीचं
रान फुलु-फुलु येई,
तिच्या मनातली धून
मग आभाळाशी जाई.

जडे प्रीत आभाळाशी
संग तिचा-त्याचा होई,
घडे सृजन-सोहळा,
रान गर्भारशी होई.!


निसर्गाचा सृजन सोहळा पाहताना व तो अनुभवताना बालाजी आपल्या अवती भोवतीच्या कुरुक्षेत्राकडे व त्यात लढणाऱ्या जिद्दी बापाकडे पाहतो.

"कुरुक्षेत्र"

सूर्य उतरतो,
मस्तकात थेट,
संपूर्ण मारक क्षमतेनिशी.

धग ही एवढी, की,
पाण्यालाही घाम फुटावा.

असा धुमसता आसमंत, एका बाजूला, अन्,
नांगरट घालणारा जिद्दी, बाप दुसरीकडे,
उभे राहतात, आमनेसामने, 
ठामपणे, दरसाल.
रानभर कुरुक्षेत्र पेटत जाते ..!!! 

बालाजीच्या शब्दांमधील दाहकता आपल्या मस्तकात शत सूर्य उतरवते......

फक्त दाहक दर्शन करून बालाजीच्या कविता थांबत नाहीत त्या मला अंतर्मुख करतात व तपासून पहायला लावतात माझे मलाच .........कसा आहेस तू ? मुक्त की बंदिवान ?

"बंदोबस्त"
 
समग्र 
जन्माची गाथा
लिहायची
खरीखुरी, तर,
निव्वळ नागड व्हावं लागेल,
कुणालाही,
खरंतर प्रत्येकालाच.
म्हणून,
भयग्रस्त सकलजन, 
आवरण बद्ध.
मेंदू सुद्धा 
कवटीच्या टणक बंदोबस्तात, 
कडेकोट.!!!!!!!

असं अवघं विश्व कवेत घेऊन, स्वतःला व्यवस्थित आवरणारा मेंदू आपण बंदोबस्तात ठेवला की आपण आंधळ्या डोळ्यांनी पाहतो......व आपले वागणे,असणे स्वार्थी बनत जाते. अशा स्वार्थाच्या बाजारात ज्ञानेश्वरसुद्धा व्यथित होतात तर माझ्या सारख्या सामन्याचे काय? खूप अस्वस्थ वाटतं. दूर कुठे तरी निघून जावे असे वाटते  ......बालाजीची कविता, मला नाही सोडून जात इथंती साथ देते मला ..... 

"इथं..."

रस्ते चकवतात,
कितीही काळजीपूर्वक निवडले तरी.

माणसं फसवतात,
कितीही काळजीपूर्वक जोडली तरी.

आभाळ दगलबाजी करतं,
कितीही भरून आलं तरी.

पाणी तहान भागवत नाही,
कितीही शोषलं तरी.

इथं,
या जीवाचं त्या जीवाला होत नाही,
एकमेकांना कितीही भिडलो तरी.

इथल्या हवेत,
निखळ श्वास घेणंसुद्धा कठीण.

आता, हा,
ग्रह बदलून कुठेतरी गेलं पाहिजे.

फक्त रस्ते,माणसं, आभाळ दगाबाज झाले नाही तर आख्खं गावच दगाबाज झाले आहे, असं कधी कधी वाटते. माणूस माणूसपण विसरला ...... फक्त मी नाही तर एखाद मुक्तीची आस असणारे व सर्वांनाच ज्याचे भय लहानपणापासून वाटते असे भूतपण ......गळफास घेईल की ?

"निर्माणूस"

काळाच्या
एका गोठलेल्या
बिंदुतून निघालेलं
एक भूत,
माणसाच्या शोधात,
गावभर फिरलं.

घरं, आड, विहिरी,
वड, पिंपळ,
नदी, डोह.
धांडोळून दमलं.
धपापलं,
उरी फुटलं.

निर्जन वस्तीतून
घाबरून परतताना
वाटेत भेटलेल्या
बाभळीच्या फांदीला
गळफास घेऊन,
मोकळं झालं.!

ज्ञानेश्वराची मुक्ताबाई असते ती माऊलीची माऊली होते. ग्रहण लागलेल्या माझ्या मनाला मात्र बालाजीची कविता परत माझी माऊली बनत मला सनातनसत्य ठासून सांगते.

"सनातन"

नातं-
तुटता तुटत नाही,
त्या भोवतालाशी,
आणि, 
कहाणी-
संपता संपत नाही.

ही गांज 
का छळते,अशी, 
निरंतर ?
आई म्हणाली,
तुझी नाळ पुरली, , तिथे 
म्हणून !!!! 

माझं अस्तित्व ज्या अस्तित्वामुळे...
जिच्या मुळे मी जन्माला आलो आणि जगायला शिकलो ....थोडं बेभान,बेधडक. त्या माझ्या आईचे आणि माझे नाते अनाकलनीय.....पण शाश्वत ...रथसप्तमीला तिचा वाढदिवस ,सूर्याने आपले प्रकाशाचे भांडार यादिवशी सर्व विश्वाला खुले केले. सूर्य एका चाकाच्या रथातून चालतो. एका चाकाचा रथ चालविणे हे अवघड ... असाच, एका चाकानेच तिने संसार केला. माझी आईची, बालाजीची कविता ओळख करून देऊन ती माझ्या घरची होते.

"साकड" 

तुला 
क्षणा-क्षणाशी
लढताना पाहिलं आहे मी,

संसाराची गाठ
वादळाशी असताना, 
तुला पदरा आड
दिवा जपताना पाहिलं मी,

गुढीसारखा
साखरेचा गोडवा
अन्,
निंबाचा कडवटपणा
गाठीशी घेऊन,
ताठपणे उभं राहिलेलं, 
पाहिलं,मी तुला!
तस,
माथ्यावर आकाश अन् 
नजरेत सूर्य पेलण्याचं,
आत्ता मलाही, 
बळ दे, 
आई !! 


फक्त माझ्या आईची ओळख करून दिल्यावर बालाजीची कविता थांबत नाही ......गर्भातील मुली पासून, अन छाती लोंबू लागणाऱ्या, निराधार, वृद्ध, देहव्यापार करत जगत, सतत मरणाऱ्या मातेच्या वास्तवाचे व पोटाखालच्या भुकेपेक्षा पोटातली भूक जास्त जीवघेणी असते, या समाजातील कुरूप सत्याचे भान ती आणते. पण त्या बरोबरच प्रश्न निर्माण करते 

मनात 
आरंभापासूनच
जखडणा-या अंधाराचे
दरोबस्त आक्रमण
तुझ्यावर.

सगळी नाती-
आई, बहिण,
प्रेयसी, बायको,
मैत्रीण, रखेल -
निव्वळ
पुरुषपणाच्या खुंट्याशी
जखडलेली.

मग ती माझ्यातील निरागस मूल जाग करते आणि म्हणते 

बये,
आमच्या छळवाद्याना 
जन्म देणंच का थांबवत नाहीस ?

तर माझ्यातील शोधकाला प्रश्न पाडते बालाजीची कविता ....

अस सर्व असून ही,

आई,
कुठल्या बळावर 
संजीवक हसतेस तू ?

हा सर्व विदीर्ण दुनियेचा कवितामय प्रवास सुरूच राहतो व बालाजीची कविता मला वर्तमान दाखवते

"वर्तमान"

आडदांड पाटलाने 
निराधार बाई ठासावी,
बेगुमानपणे, भरदिवसा,
तसलं पाशवी वर्तमान,
भूत-भविष्याच्या उज्वल छाताडावर
अपरंपार पाय रोवून.

स्वच्छ निळ्या आभाळाचे दिवस
कसे असतात कुणास ठाऊक?
कुठं सापडेल नि:शंक पाण्याची नदी,
अन् कशी असते कसदार कुशीची जमीन,
हेही कुणास ठाऊक !

नाळेपासून तुटलेली अन्
भुईचा आधार निसटलेलीच
माणसे जागोजाग,
पाताळापासून अंतराळापर्यंत.

पण या सर्वांशी निकरांनी लढले पाहिजे ........आपले जग, आपले गाव, आपले लोक आपणच बदलले पाहिजे म्हणून पहिल्यांदा बोलले पाहिजेअसा आदेश देते मला बालाजीची कविता.

कुणाचंही अस्तित्व 
सहजपणे नाकारता येईल,
अशी रझाकारी व्यवस्था इथे,
सरेआम .... सर्वत्र ! म्हणून-
आपण बोलले पाहिजे ....
जीभ छाटली जाण्या पूर्वीच !!!

ती माझ्या भावनेचा ठाव घेत म्हणते मला अरे 

हेही 
फारच बरं आहे की,
डोळ्यातून अजून पाणी वाहतं माझ्या....
मी खरचं अजून जिवंत आहे हे खरंच किती छान आहे .......

बालाजी सुतार आणि अनिल अवचट 


अश्या जिवंत बालाजीच्या श्रीमंत कविता, मला ओसाड माळावरच्या श्रीमंतीची ओळख करून देतात व मला समृद्ध होण्याचे  सुत्रसांगतो ....

सूत्र रुपाने
सांगायचे झालं, तर ,

एवढंच, की,
जिवंत उमाळ्याचा 
एकही झरा,
मुळाशी नसला, तरीही,
सुन्नाट माळावरची बाभळ,
नुसती जीवंतच राहते,
असं नाही , 
ती-फुलारते सुद्धा !!

माणसाने सुद्धा असेच असावे !!

बालाजीच्या कवितेला कॉपीराईट नसते म्हणून ती समाजाची कविता बनते. कारण तिला समाजाला आश्वासक व बलवान करायचे असते म्हणून ती आपल्याला साद देते. आपणच पहिलं पाऊल टाकण्याचे बाकी सगळेआपोआप होईल ...

आभाळ अखंड पणे मस्तकावर,
पायाखाली ठाम भक्कम धरणी.

पुरेशी हवा खेळतेय फुफ्फुसांतून,
रक्त धमन्यांमधून वाहतेय जोरकस.

एवढंच खरं पुरेसं व्हावं माणसाला.

बाकी सगळे सोडून द्यावं,
आश्वासन मनगटावर !!!

देणारा तो देव, मागणारा तो माणूस पण बालाजीची कविता फक्त स्वतः साठी मागायला शिकवत नाही. आईसारख्या वत्सल मातीशी एकरूप होण्याआधी ती सांगते मला .....कलशाध्याय

असं, सत्य घ्यावं,
सगळ्या आदिमांकडून,
अन्, असं,
तावून, सुलाखून,
मग शेवटी 
आई सारख्या वत्सल मातीशी
एकरूप व्हावं,
ज्याचं देणं, त्याला द्यावं !!!!

फक्त देण्याघेण्याची रीत न सांगता ती माझ्या बरोबर प्रार्थनाकरते 

बा, आकाशीच्या बापा,
असलासच तू,तर, 
सर्वांचे क्षेम असू दे ...!!!

बालाजी सुतार 


पाऊस: काहि रुपके या कवितेनी तर मला जन्मापासून मरणापर्यंतचे दर्शन घडविले ..........अशी विविध अंगानी,रंगानी,भावांनी,शब्दांनी नटलेल्या कवितांनी मी समृद्ध झालो व श्रीमंत झालो .......

मी झालो प्रसाद आज .....
बालाजीच्या कवितांचा.....

निर्मित्याचे निर्मिती मागचे भाव आपण स्वतःच टिपायचे असतात ......
हीच निर्मितीची व निर्मात्याची आपण केलेली आरती असते ......
त्या आरतीचे दर्शन आपणसुद्धा करावे ....त्या सोबत निर्मात्या व निर्मितीचे पण ....

·          

२ टिप्पण्या:

गौरी म्हणाले...

खूप छान लेख ...श्री.बालाजी सुतार यांच्या कविता फेसबुक वर मी वाचत असतेच आणि प्रत्येक कविता मनाला थेट भिडते ...धन्यवाद
गौरी करंदीकर

manchidiya म्हणाले...

मातीशी घट्ट नाळ असलेला, भवतालातील जळजळीत वास्तव निर्भिडपणे मांडणारा, सामान्यातला सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून साहित्य सेवा कराणारा उमदा लेखक कवी..