सोमवार, २३ जुलै, २०१२

एकही पुस्तक प्रकाशित नसणारे स्वयंप्रकाशित नवनाथ बंडू पवार.......


नवनाथ बंडू पवार

एका अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातला जन्म, १९६६
तीन बहिणी, दोन भाऊ आणि सर्वात लहान नवनाथदादा  अशी सहा भावंडे.
जन्मगाव खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद,
सध्या राहण्याचे ठिकाण, सातारा परिसर, औरंगाबाद,
पत्नी संगीता, विवाह १९८८.
ती बी.कॉम असून एका खाजगी आस्थापनेत अकौंटंट म्हणून काम पाहते.



पहिली ते चौथीचे शिक्षण वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत (१९७२ – १९७६ ),
पाचवी ते दहावी गावातील जिल्हा परिषद प्रशालेत (१९७६-१९८२)
दहावीनंतर शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविका (१९८५),
आणि लगेच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पेम्ब्रील इंजिनिअरिंग येथे
प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून रुजू १९८५.

तिथे विविध जबाबदाऱ्या हाताळून २००३ साली नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसायास प्रारंभ,


संगी कंट्रोल्स या नावाने चिकलठाणा वसाहतीत,व्यवसाय आहे,

इंजिनिअरिंग प्रोडक्ट डिझाईन आणि निर्मिती,
त्यात प्रामुख्याने ऑटोमेशनचे छोटे प्रकल्प, ज्यात प्रामुख्याने इलेक्ट्रोनिक्स कंट्रोल असतात,
एम्बेडेड सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल कंट्रोल प्यानल यात जास्त काम.

एका उद्योजाकासाठी एक संपूर्ण नवीन प्रोडक्ट डिझाईन विकसित केले आहे, आणि ते उत्पादन करणारे ते जगातले सर्वद्वितीय उत्पादक ठरतील, मात्र पेटंट रजिस्टर होई पर्यंत जास्त माहिती देता येत नाही.
नवनाथदादांना  स्वत:चे स्वतंत्र डिझाईन करायला आवडते, कॉपी करायचा जाम कंटाळा.
एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा, सांगण्याचाहि तसा कंटाळाच.

बालपण शेतातच गेले,


घरात नवनाथ ग्रंथ आणि रामविजय, हरिविजय, सिद्धान्त्बोध, पांडवप्रताप सारखे प्राकृत ग्रंथ मोठे भाऊ वाचत त्यामुळे त्यांनाही त्याची गोडी लागली. अगदी दुसरी तिसरीपासूनच ते वाचून सांगण्याची धडपड त्यांचे शब्दभांडार समृद्ध करणारी ठरली. चौथीला असताना पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाल्यावर, साऱ्या गावाचा नवनाथदादा लाडका झाले . प्राथमिक शाळेतील शिक्षक दिनकर शिरोडकर यांनी त्यांना , भाषण, वाचन, लेखनाची गोडी नव्हे चटक लावली. त्यासाठी गावातील वाचनालयातून स्वत:च्या नावावर पुस्तके घेऊन ते त्यांना वाचायला देत. ती वाचनाची सवय आयुष्यभरासाठी कामी आली.

पौराणिक ग्रंथांव्यतिरिक्त इतर ग्रंथांणी माझ्यावर खूप खोलवर संस्कार केले. मात्र त्यांना नवनाथ ग्रंथातील नाथ पंथीयाप्रमाणे तप करून, मंत्रशक्ती मिळवून प्रचंड सामर्थ्यवान व्हायचे वेडहि लागले. वयाच्या अक्र्व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञाननिष्ठ सावरकरांचे पुस्तक वाचायला मिळाले, आणि त्यांच्या जीवनाला मोठी आणि कायमस्वरूपी कलाटणी मिळाली. पौराणिक ग्रंथातील चमत्कारावरचा विश्वास उडून ते विज्ञाननिष्ठ आणि बराचसा बंडखोर बनला. पुढील आयुष्यात बऱ्याच उशिरा स्वाध्याय परिवाराचे दादा पांडुरंगशास्त्री आठवले यांचे साहित्य वाचले. माध्यमिक शाळेत शेतातल्या घरापासून चार किलोमीटर पायी जाताना एक तास नवनाथदादा एखादे पुस्तक वाचत जात, येतानाहि वाचत घरी येत. या काळात सातवीला शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश मिळाल्याने गावात त्याचं खुपच कौतुक झाले आणि लाड वाट्याला आले.

शालांत परीक्षा पास झाल्यावर औरंगाबादला शिकायला गेले, तेव्हा शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी नावाच्या वादळाने आता शेतकऱ्यांना आपल्या भोवऱ्यात ओढायला सुरुवात केली होती. त्यांचे मोठे भाऊ त्या चळवळीत सक्रीय होतेच. पण नवनाथदादांच्या  आयुष्यात शरद जोशींच्या विचाराने  कायमस्वरूपी क्रांती केली. त्यांचे साहित्य वाचून ते त्या चळवळीत वेळ मिळेल तसा सहभाग देत गेले पण त्यांची भाषणे आणि लिखाणाने दादांना शेतकऱ्यांच्या  दारिद्र्याचे खरे कारण समजले. अनेक आदर्श उलटेपालटे करणाऱ्या त्या विचारांनी दादांच्या जीवनातील दारीद्री विचार नष्ट केले. अगदी १९९५ पर्यंत ते त्या चळवळीत सहभाग दिला. आजही त्यांचे विचार त्यांना आवडतात. पण राजकीय कारणांनी ती चळवळ मात्र मागे पडत गेली.

फुले, आंबेडकर वाचून त्यांचे विचार प्रगल्भ होत गेले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अनिसचे संस्कार त्यांच्यावर आहेत. मित्र शहाजी भोसले बुवाबाजी भांडाफोड करतात, त्या निमित्ताने ती चळवळ दादांना समजून घेता आली. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे स्वाध्याय चे प्रणेते दादा पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या साहित्याने दादांना भारतीय संस्कृती समजून घ्यायला खूप मदत झाली. नवनाथदादा समतोल होत गेले.दादाच्या शब्दात सांगायचे झाले तर, 

"स्वाध्याय परिवाराचे दादा पांडुरंगशास्त्री आठवले यांचे साहित्य वाचायला मिळाले म्हणून बरे, नसता एकूणच हिंदू संस्कृतीबद्दल मी फारच नकारात्मक विचार करू लागलो होतो."


नवनाथदादांना लिखाणाची उर्मी लहानपानापासून मनात होती. औरंगाबादला आल्यवर दै. मराठवाडा, लोकमत, तरुण भारत, दै. महानगर  आदी दैनिकात स्फुट लेखन प्रसिद्ध होत असे. प्रा. चंद्रकांत भालेराव यांच्या प्रासंगिक लेखांच्या उपरोधिक शैलीचा खूप मोठा प्रभाव दादांवर आहे. पण पत्रकारितेत पुढची वाटचाल वेळे अभावी खुंटली. त्याच काळात दादांवर  औद्योगिक वसाहतीत इंजिनिअर म्हणून काम करताना कामगार कल्याण मंडळाच्या शिबिरात प्रा. रा. रं. बोराडे, त्र्यम्बक महाजन, आकाशवाणीचे लक्ष्मीकांत धोंड, प्रा. अजित दळवी, लेखिका अनुराधा वैद्य आदी मान्यवरांनी लिखाणाचे संस्कार केले. डोक्यातील जळमटे झाडून टाकली, आणि  नवनाथदादांनी स्वतंत्र लिखाण करण्याचा प्रयत्न केला. 


कामगार साहित्य संमेलनाच्या स्पर्धातून कथांना पारितोषिके मिळालेली पाहुन दादांचे  मित्र ज्येष्ठ मित्र नागनाथ काजळे यांनी त्यांना  नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. आणि दादांचे पहिले तीन अंकी नाटक “चाहूल वादळाची” प्रायोगिक स्वरुपात स्पर्धेत उतरले, लिखाणाचे पारितोषिकही मिळाले. यात अर्थातच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची प्रेरणा होती. नंतर कामगार जीवनावर आधारीत पण विषय मुक्त अर्थव्यवस्थेचे आव्हान असा, संप टाळेबंदीला दूर ठेवून एक अनोखा विषय घेऊन आलेले “आता उजाडेल”, ग्रामीण जीवनात नव्याने विकसित होणारी समज पेलवून धीरोदात्त स्त्री रंगवणारे “यशवंता”, स्किझोफ्रेनिया या आजरावर आधारित “कुठे बिघडलं”, आदर्शांची ससेहोलपट पेलवत उभा राहू पाहणारा स्वाध्यायी शिक्षक रंगवणारे “मगरमिठी”, चळवळीच्या नावाच्या आडून धंदा करू पाहणारी वृत्ती रेखाटनारे “जाशील तर कुठे जाशील”, स्त्री भृणहत्येचा विषय घेऊन “या चिमण्यांनो परत फिरा, अशी नाटके नवनाथदादा लिहीत गेले. एकांकीकात, विवाहित स्त्रीला ब्ल्याक्मेल करणाऱ्या प्रवृत्तीचा खंबीर मुकाबला करणारे “हे असेच व्हायला हवे” हे नभोनाट्य, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित “इतिहासाचे महाभारती” याही प्रायोगिक स्पर्धेत सादर झाल्या आहेत.  कविता आणि कथालेखनहि केले आहे. गम्मत म्हणजे नवनाथदादांचे अजून एकही स्वतंत्र पुस्तक प्रकाशित नाही. 

दादांच्या  बहुतेक साहित्यात त्यांनी  धीरोदात्त स्त्री नायिका उभ्या केल्या आहेत. अर्थात हे ठरवून असे झालेले नाही.

फेबुक्वरील बेम्भाटे मास्तरांची शाळा या ग्रुपवरील ‘इवलासा वेलू’ या काव्यसंग्रहाच्या संपादनात सहभाग हा दादांचा सध्याचा प्रकल्प आहे. नवनाथदादांना नव्याने काही करू पाह्नारास हिम्मत, प्रोत्साहन द्यायला आवडते. त्यामुळे अनेक मित्र जोडले जातात. निराशेने खचू पाह्नारास उभे करण्यात आनंद मिळतो. एकूणच दाद देणारा म्हणून त्यांना दादा म्हणतात, अन्यथा दादा म्हणता येईल अशी काहीही कर्तबगारी माझ्यात नाही. दादांचा व माझा परिचय पण बेम्भाटे मास्तरांच्या शाळेतील. मी फेसबुकवर लिहिण्यास सुरवात 
केल्यावर मला वेळोवेळी नवनाथदादा मार्गदर्शन करायचे.

नवनाथदादा :- प्रसादजी .... लगे रहो ... आपण एक स्वत:ची दृष्टी घेऊन लिहिता ... चालू ठेवा... आणि शक्य झाल्यास चंद्रकांत वानखेडे यांचे आपुलाची वाद वाचा .... विश्वास पाटलांचे झाडाझडती आपण वाचलेच असेल ... आपला सूर लगेच जुळेल ..

मी :- धन्यवाद ...आपली साथ हवी आहे ..

नवनाथदादा :- तुमच्या सारख्या मित्रांचे उमलणे पाहण्यात मला नेहमीच आनंद मिळतो ... मी सदैव आपलाच आहे.

माझ्या एका लेखावर दादांनी दिलेला अभिप्राय हा त्यांची दादागिरी सिद्ध करते.

नवनाथदादा :-प्रसाद त्रिवार नाही शतवार नमस्कार... इतक्या प्रासादिक भाषेत ..... हे शब्दचित्र उभे केलेत ... शेती जीवनातला एक मनाला भिडणारा अनुभव .... मला नवीन नाही हे सर्व काही .... पण तुमचे कौतुक यासाठी की, तुम्ही ही जीवाची वेदना फार पोटतीडीकीने मांडली.... कुठलीही उधार उसनवारी न करता .... आपले आकलन मनोभावे, आपल्या शब्दात मांडले... एका थोर विचारवंताने भारत आणि इंडिया हा सिद्धांत अशाच पोटतीडीकीने मांडलेला मी तीस वर्षापूर्वी ऐकले होते .... तेव्हा अंगावर रोमांच उभे राहून काही काळ एका चळवळीत मी ओढला गेलो होतो... आज तीस वर्षानंतर तेच चित्र त्याच अनुभवातून नेत आहे... एकेकाळी अशाच एखाद्या कुडा मातीच्या घरातून ... अंगावरच्या कपड्यानिशी आम्ही काही मित्र शहरात शिकायला आलो ... आज त्यातले अनेक जन सहा आकडी कमाई महिन्याला करतात ... आणि त्यांचेच शेतीत राबणारे भाऊ आजही ... त्याच पायाला भेगा .... तेच रात्री विंचू सापाच्या संगतीने पिकाला पाणी भरणे ... शेतीला पैसा लावायचा म्हणून अंगावरचे दुखणे तसेच रेटून ... पिकाला खत, औषधे यावर खर्च करणे... नंतर कापसाच्या कांद्याच्या पैशाच्या भरवशावर मुलीच्या लग्नाचे नियोजन ... ऐनवेळी कोसळणारे भाव .... तेच बापाच्या सुरकुतल्या चेहऱ्याकडे पहात मुलीचे झुरणे ... आणि ऐन अडचणीची संधी साधून वीज कापली जाणे, ब्यान्केने जप्ती आणणे.....अपमानित कारभार्याची आत्महत्या त्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकारी प्याकेज ... मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते चा रोकडा अनुभव ...... काही म्हणजे काहीच नाही बदलले त्या भारतात... आम्हाला तिसऱ्या वर्षी गाडी बदलण्याचे वेध आणि त्यांना घासलेटवर चालणारी तीस वर्षापूर्वीची बाईक घेण्याचे अप्रूप स्वप्न .... कवी इंद्रजित भालेरावांनी आपल्या अनेक कवितात रेखाटलेले चित्रच तुम्ही जिवंत केलेय .... एखादी माय भर उन्हात प्रसववेणा देऊ लागते... आणि अडली तर बंद असलेल्या आरोग्यकेंद्राच्या पायरीवर मोकळी होते... तिकडे काहीच नाही बदलले ... भूकम्पही अशा दिन दुबळ्यांची दगड मातीची घरटीच उध्वस्त करणार ... ........ हे सगळे आपणही पुन्हा मांडले .. 

ज्ञान प्रबोधिनीचा मूळ चेहरा शिक्षणाचा त्यावर दादा लिहितात,

निर्जीव खेळणी एकवेळ नसली तर परवडली... पण त्यांचा अतिरेक मुलांचे बालपण खाऊन टाकतो.... हे कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. वेगवेगळया आर्थिक आणि सामाजिक गटातील मुले एकत्र शिकणे तर खुपच फलदायी असते... प्रत्यक्ष जीवनात त्यांचा आत्मविश्वास कधीही ढासळत नाही त्यामुळे...!दादा, मी माझे बालपण आठवतो ... पाचवीला चार किलोमीटर पायी शाळेत जायचो... अविस्मरणीय खेळ आणि मस्ती .... कुठली कृत्रिम खेळणी नव्हती ... पण एक वेगळीच तृप्ती असायची .... लिंब, आंब्याच्या,चिंचेच्या अंगा खांद्यावर चढून केलेली मस्ती ... टेकड्यावरील दगडांचे खेळ ... एवढे मुक्त आभाळ ... निर्जीव खेळण्यात कुठे असते... काही मिनिटात मूळ कंटाळते ... आणि पुन्हा काहीतरी नवीन शोधू लागते...! शिवाय शिकवणी, क्लासचा बोजा सतत मानगुटीवर ..... आणि दूरचित्रवाहिनीचे आभासी जग ... सगळेच विचित्र ... त्यात ज्ञान प्रबोधिनीचा प्रकल्प जणू आशादीप वाटतो..!

नवनाथ दादांच्या कविता पण एक वेगळाच वेध घेतात.

मित्रांनो, आपल्या व्यथा ...

मित्रांनो, आपल्या व्यथा अत्यंत प्रामाणिकपणे बोलतात.
प्रत्येकाच्या व्यथेमागे एक कथा असते... एक सल असतो..
जो जीवलगाशिवाय कुठे बोलवतही नाही..
अन नाही बोलले तर झोपेतली स्वप्नेही बेईमान होतात..
पण तरीही एक गोष्ट विचारा आपल्या जीवाला...
खरेच आपण आजही तिथेच आहोत?
काय आपण अजून एक पाऊलही पुढे चाललो नाही?
काय सगळं प्रवास फक्त एका पावलाचाच असतो?
सूर्य नसेलही उगवला, पण ताम्बडेही फुटलेले दिसत नाही?
दीपस्तंभ अजूनही खुनावताहेतच बंदराकडे..!!
काय तुफान जराही माणसाळले नाही?
आकाश आधी काळेकुट्ट होते, काय क्षितिजा पलीकडून एक पितरेषा.... 
स्मितहास्य करीत आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही?
सूर्य जवानीत येत असतांनाही निळे आकाश पार क्षितिजापाशी निळ्या अथांग सागराला भिडलेले ...
हे पाहून मस्तक उन्नत होत नाही?
मला तर दिसतोय एका लाल सूर्याचा अस्त् आणि एक सूर्याचे ध्वजारोहण ...!
आणि श्वापदे पुन्हा विसरलीत लज्जाराक्षनाचे धर्मकर्म ..
मित्रांनो, आपल्या व्यथा अत्यंत प्रामाणिकपणे बोलतात..........!


सुख आणि दुःख

सुख आणि दुःख अनेक प्रकारे भेटत राहते...
कधी बाहेरून आत येते एखाद्या वादळासारखे...
कधी आतून बाहेर झिरपते ...
जखमेतल्या रक्तासारखे.. ..
रोज भेटते नवनवीन रूपात ...
कधी दुःखही मैत्रीचा हात पुढे करते...
आणि सुखापेक्षा जास्त चांगली साथ देते...
जिथे शोधावे तिथे सापडत नाही..
अन जिथून आशा नाही तिथून अचानक उगवते ...
म्हणून हल्ली मी दिलाय त्या शोधाला पूर्ण विराम ...
इथून सुरु होतो एक अद्भूत रम्य प्रदेशाचा प्रवास.....
सुखदुःखाचा प्रत्येक क्षण उलगडणे अवघड असते...
त्यांना भोगताना तेही आपल्याला भोगतात ...
एकेक क्षण असा निसटत जातो ...
सुख आणि दुःख अनेक प्रकारे भेटत राहते...!




 हे वसुंधरेच्या लेकी ......

तुला हरून कसे चालेल ...
तुला रडून कसे चालेल ...
हे वसुंधरेच्या लेकी ......
तुझ्या शिवाय जीवन कसे उमलेल ...!

ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाईच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्या निमित्य .........

एकही पुस्तक प्रकाशित नसणारे स्वयंप्रकाशित नवनाथ बंडू पवार दादांच्या हस्ते झालिया 

दर्शनचे प्रकाशन होणार याचा आनंद..........

प्रकाशन दिनांक १९ ऑगस्ट २०१२
स्थळ :-मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई
वेळ :- सायंकाळी ६ ते ८ 






  
   

   

   

1 टिप्पणी:

hemant म्हणाले...

वाह्ह्ह..! नवनाथजी हे एक संतुलित, संयमित व अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. प्रसिद्धिपासून दूर असले तरी विविध माध्यमातून त्यांना जाणणाऱ्या लोकांना त्यांचा अधिकार व अभ्यास याची जाणीव आहे.

गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सताम्
केतकी गन्धमाघ्रातुं स्वयमायन्ति षट्पदा:|
:अर्थात्‌ एखादा माणूस कितीही दूर/अलिप्त असला तरी त्याचे गुण दूतत्वाच्या भूमिकेतून त्याची महती जगास पटवून देतात, ज्याप्रमाणे केतकी झाकून राहिली तरी तिचा सुगन्धाचे चाहते असलेले भ्रमरगण स्वतःहून तिथवर पोहोचतात!

आपले व नवनाथजींचे मन:पूर्वक अभिनंदन!
-हेमंत राजोपाध्ये