गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती.

भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती.

मी तीन वर्षाचा असेल त्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले. मृत्यु म्हंजे काय ? आईच वैधव्य म्हंजे काय ? स्मशान, सरण,पिंडदान यांची त्या वयात माझ्याशी ओळख होणे किवा अनुभव घेणे हे शक्यच नव्हते. फक्त अंत्ययात्रेच थोडं स्मरण माझ्या लक्षात आहे. आई ने मात्र मला कधीही वडील नसल्याची पुसटशी कमी कधी वाटू दिली नाही अगदी सर्वार्थाने. पण एखादी प्रेतयात्रा पाहिली की अंगात कापरं भरायचं.

पुढे अगदी पदव्युत्तर शिक्षण होई पर्यंत या सर्वांचा काडी मात्र संबंध माझा आला नाही. विवेकानंद केंद्रात काम करत असताना अरुणाचल प्रदेशात असे अनुभव आले पण तेथील पद्धत वेगळी.......अंत्यविधी फक्त दर्शक म्हणून पहायचा व तसे फार आपुलकीचे नाते विकसित पण झालेले नव्हते.

अरुणाचल प्रदेशातुन अंबाजोगाईला परत आल्यावर अंबाजोगाईत लहान मुलांशी नाते जुळले . बहरणाऱ्या फुलांबरोबर राहण्याचा अनुभव मस्त असतो. खूप काही मिळाल्यावर देण्याचा अनुभव पण एक जबरदस्त उमेद जागवणारा असतो. त्यातल्या त्यात घेणारा जर मस्त ताकदीचा असेल तर मजा काही औरच असते . पण देणाऱ्याच व घेणाऱ्याच एक वेगळ नात व्हावं लागतं आणि ते फक्त पाठ्यपुस्तक शिकून होत नाही तर जीवनातील सुखादुःखाचे जिवंत सहअनुभव घ्यावे लागतात.हे अनुभव घेताना आपण एकमेकांना पहात असतो, अनुभवत असतो व त्यातून एक भावनिक बंध निर्माण होतो. तो जर शुद्ध आणि सात्विक असला तर दिव्यत्वाचा अनुभव आपल्याला नात्यात होतो.

संपर्क, सहवास आणि सामुहिक कृतीतून शिक्षण अस एक वेगळी जीवन शिक्षणाची पद्धती अनुभवण्याची धडपड आम्हा काही मित्रांची चालू होती.अगदी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यान पासून शिशुविहार पर्यंतची एक छान टीम तयार झाली अगदी गमतीने लोक म्हणायची KG to PG.

पराग उपेन्द्र भालचंद्र आणि त्याची छोटी प्रतिमा म्हंजे राहुल राजीव सारणीकर. पराग पदव्युत्तर शिक्षण घेऊन UPSC ची तयारी करत होता तर राहुल ९ वीत स्पर्धा परीक्षांची तयारी करायचा. दोघे ही खूप हरहुन्नरी व्यक्तीमत्वे पण खूप हळवी,भावनिक पण बिनधास्त. पराग उंच, प्रचंड उपक्रमशील राहुल थोडा ठेंगणा रोडका. दोघेही सावळ्या रंगाचे. पण या दोघान मध्ये एक साम्य म्हंजे झाडान वरचे प्रेम. दोघेही वृक्ष मित्र आणि त्यांना आधार होता आमच्या चिरतरुण आणि सदा चरण तत्पर असणाऱ्या वैद्यकाकांचा( श्री. उमेश वैद्य ). परागनी अंबाजोगाईत १ लक्ष झाडे लावण्याचा संकल्प आमच्या समोर व्यक्त केला. एक घर निदान एक झाड ही त्याची घोषणा होती. मग राहुल कसा मागे राहणार? त्यांनी संकल्प केला मी १० लाख झाडे लावीन.निसर्गावर खूप प्रेम व नवीन गोष्टी शिकण्यावर दोघेही नेहमी आघाडीवर. मग सुरुवात आधी माझ्या पासून ही त्यांची वृत्ती. दोघांच्याही घरी त्यांनी छोटी रोपवाटिका तयार केली होती. आज अंबाजोगाईतील अनेक जागी हिरवळ ह्या दोघांनी केली.

प्रबोधिनीच्या काही सदस्यांनी भविष्यात प्रबोधिनीला जागा लागेल म्हणून स्वखर्चानी ६ एकर विकत घेतली होती. काय करणार त्या जागेत? कुणी विचारले की वैद्य काका ऊर भरून आपल्या खमक्या आवाजात म्हणायचे, “जंगल करणार इथे.” आम्ही त्या जागेला नाव दिल “विवेकवाडी”. अगदी शेतातील दगड वेचणे ,पाण्याचा हौद, झाडांची खड्डे ते शेततळे तयार करण्यापर्यंत स्वतःच्या मेहनतीने काय काय केल नसेल आमच्या या KG to PG च्या टीम ने. झाड लावण फार सोप पण वाढवण खूप अवघड. त्यात त्या भुताच्या माळावर तर पाण्याची खूपच वानवड. रात्री ३ वाजे पर्यंत कधी कधी पाणी दिले.

राहुलची दहावीची परीक्षा झाली होती. सुट्टी आणि मोकळा वेळ. संध्याकाळच्या उपासने नंतर आम्ही प्रबोधिनी च्या बाहेरील बाकान वर बसून गप्पा मारायचो.

“काय राहुल सेठ काय चालू आहे सध्या ? मग काय सध्या तुमच उगवण सूर्य डोक्यावर आल्यावरच होत असेल ”, मी राहुलला विचारले.

राहुलची आई आणि माझी आई एकाच शाळेत सहशिक्षिका. त्यामुळे बऱ्याच बातम्या मला माझ्या आई कडून कळायच्या.

राहुल काही बोलला नाही.

“काय राव तुम्ही फक्त झाड लावता पण त्यांना पाणी कुणी द्यायचं? येणार का माझ्या बरोबर दररोज
सकाळी वाडीवर झाडांना पाणी द्यायला?”, मी थोडं जोरातच राहुल समोर प्रस्ताव ठेवला.

शेत, झाडं म्हटल्यावर राहुल काहीही त्याग करायला तयार मग अगदी सकाळच्या सुट्टीतील गुलाबी झोपीचापण.

सुट्टी लागली की लहानपणी हे साहेब सरळ गावाकड पळायचे. शेत हा त्याचा आस्थेचा व प्रीतीचा विषय. शेतातील सर्व कामे तो करायचा. केकत सारणी हे त्यांचे गाव म्हणून ते सारणीकर. राहुलचे वडील राजीव सारणीकर एक खरच राजा माणूस! लोक त्यांना राजा या नावानीच ओळखायचे. अगदी भिक्षुकी, लोकांच्या गाई सांभाळणे, ६० फुट विहिरीतून दिवसभर देशपांडेन कडे पाणी भरणे. मध्यम उंची व शाररिक ठेवण असलेला हा माणूस ज्या वेळी अंबाजोगाईला आला त्या वेळची पहिली रात्र न जेवता अंबाजोगाईच्या बस स्थानकावरच काढली. अगदी रस्त्याच्या बाजूच्या नाल्या खोदण्याचे काम पण त्यांनी केले .

दररोजचा दिवस एक नवीन प्रश्न घेऊन यायचा व त्यावर विजयी होत जीवाचा राजा होणे हेच त्यांचे जीवित ध्येय बनले. अंगमेहनतीच काम करत असतांनाच त्यांना शिक्षण खात्यात सेवकाची नौकरी मिळाली. शिक्षणाचे महत्व त्यांना कळाले. स्वतः अल्प शिक्षित होते. लग्न झाल्यावर आपल्या पत्नीला पुढे शिकून शिक्षिका केले व स्वतःही सेवांतर्गत परीक्षा देत लेखनिक झाले.

कॉपी नाही करायची हा त्यांचा शब्द राहुल आज पर्यन्त पाळत आला.
“दादा, एक शब्द पाहून नाही लिहिला कधी, बाबानां दिलेला शब्द मी नेहमी पाळतो”, राहुल मोठ्या अभिमानाने नेहमी सांगायचा.

दुसऱ्या दिवसा पासून आमची रोजची शेत फेरी सुरु झाली. सकाळी ५ वाजता उठून राहुलच्या घरच्या फोनवर पाच रिंग द्यायच्या हा राहुल साठी उठण्याचा अलार्म, मग तो तयार झाला की त्यांनी माझ्या मोबाईल वर त्याच्या घरच्या फोन वरून मिस कॉल दयायचा. त्याच घर मुख्य रस्त्या पासून ५ मिनिटे. मला मिस कॉल आला की मी मोटरसायकलनी निघायचो, राहुल मुख्य रस्त्यावर येऊन उभा राहायचा. मग आम्ही दोघ मिळून ६ किमी वर असणाऱ्या विवेकवाडीला जायचो. हौदात पाणी आहे का ते बघणे. मग प्रत्येक झाडाला मोजून पाणी देणे. देखणा सूर्योदय पाहणे. व राहुलचे अनेक प्रश्न व त्याला माझ्या परीने उत्तर. एकदा सर्व झाडांना पाणी दिल की मन प्रफुल्लित व्हायचं. सकाळ फारच मस्त असायची.

सूर्य थोडा वर आला की आम्ही परतीच्या मार्गावर. शेत मुख्य रस्त्या पासून ५०० मी दूर व तो कच्चा रस्ता. तेवढ अंतर मी मोटरसायकल चालवायचो मग त्यानंतर राहुलचे शिकणे चालू. पहिले काही दिवस क्लच कसे सोडायचे,गेर कसे टाकायचे असे करत करत राहुल मोटरसायकल शिकत होता. सकाळी रस्त्यावर फारशी वर्दळ पण नसायची त्यामुळे त्याला लवकर शिकता आले आणि काहीही अपघात न होता.

उन्हाळा बहरत होता आणि आमच्या समोर पाण्याचे अनेक प्रश्न. मग एक नवीन युक्ती शोधून काढली १ इंची प्लास्टिक पाईप झाडाच्या जवळ ६ इंच खोचायचा व त्यावर एक लिटरची बिसलरी ची पाण्याची बाटली पाणी भरून पाईपात उलटी करून सोडायची. असे एक लिटर पाण्यात आम्ही उन्हाळ्यात झाडं जगवत होतोत. राहुलही मोटरसायकल चांगला शिकला. दोन महिन्याची सुट्टी मस्त एन्जोय केली आम्ही दोघांनी. राहुलनी अनेक झाडे तयार केली व लावली त्यात वड, पिंपळ गुलमोहर हे विशेष होती.

महाविद्यालयात गेल्यावर राहुलची भेट थोडी नित्याची राहिली नाही पण प्रबोधिनीच्या अनेक उपक्रमात त्याचा कर्ता सहभाग होता.भेट नित्याची नसली तरी तो दररोजच्या जाणीवेचा भाग मात्र होता कारण त्याच्याशी एक नात तयार झाले होते.

विवेकवाडी आत्ता मस्त हिरवी होत होती, बहरत होती.माणसान पेक्षा झाडं लवकर वाढतात फक्त सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागते. एकदा मूळ धरली की मग पाणी पण तेच शोधतात व ते सुरू झाले की त्यांच्या वाढीच्या वेग वाढतो. मग फुल, फळ धरण्याची प्रक्रिया सुरु होते व ते थोडया दिवसां मध्ये ते झाड छाया पण दयायला लागते. शिक्षण पण अशीच प्रक्रिया असली पाहिजे. मुलांना आपली मूळ लवकरात लवकर ज्ञान ग्रहणाच्या शाश्वत निर्झराशी लागली की मग त्यांच्या विकासाचा वेग वाढतो. पण आपण त्यांना सतत शिकवणी, अभ्यासवर्ग अश्या अनेक बाह्य माहितीच्या दवबिंदून वर ठेवतो त्यामुळे ते उठून दिसतात पण स्वावलंबी होत नाहीत.या शिक्षण प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मनुष्य जीवनाला फुले, फळे येतातही भरपूर पण ते केवळ त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा भाग होतो. कोण्या आगंतुकाला ते तृप्त ही करू शकत नाहीत आणि तप्त ग्रीष्मात आल्हाददायक सावली पण देऊ शकत नाहीत .......

निसर्गचक्रा मध्ये अश्या ह्या मूळ धरलेल्या छाया देणाऱ्या झाडांचे खूप मोठे स्थान असते तर समाज जीवन समृद्ध करण्यासाठी असे मूळ धरलेली मनुष्य जीवने निर्मितीचे व परिवर्तनाची केंद्र बनतात. पण आता जागेला आलेल्या किमती मुळे बोनसाय तयार करण्यात सुख मानतो आपण.

सुभाष तळेकर असच एक अफलातून स्वावलंबी व्यक्तीमत्व. बाजारू विश्वात विकण्यासाठी असणाऱ्या बाह्य व्यक्तीमत्वाचा कुठलाही लवलेशही नाही. बुटकी व रोडकी ही आमची विठ्ठलाची मूर्ती. सकाळी ब्रेड, फुलांचे हार, वर्तमानपत्र विकण्यापासून दिवस सुरुवात होई त्याचा. आपल्या हाताची भाजी भाकर स्वतःच्या कमाईची असली की एक आपलंसं करणार स्मित नित्याच चेहेऱ्यावर येत, असा आमचा प्रबोधिनीचा तो कार्व्हर होता.

सुभाष बरोबर विवेकवाडीत गेलो होतो. संध्याकाळची वेळ,सूर्यास्त झाला की आम्ही परत अंबाजोगाई ला निघालो. चुकून मोबाईल आज घरीच विसरला होता. अंबाजोगाईच्या जवळ २ किमी आलो नसेल तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात जायला लागल्यापासून पाऊस आम्हाला खूप वाट पहावयास लावणारा पण आला की एक खोल शांतता देणारा मित्र झाला होता. सुरुवातीस टपोरे थेंब मोटारसायकल वर झेलताना मजा येत होती पण आज आमचा मित्र फारच बहरात होता थोड्यावेळात त्याने आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते. आत्ता आमच्या मित्रांनी चांगलच झोडपायला सुरुवात केली. शेवटी त्याला शरण जाऊन एका ढाब्याचा निवारा आम्ही पकडला. पण पुढील पाच मिनिटात तो ढाबाच कोसळला.

शेवटी पुढे दुसरा निवारा शोधण आवश्यक होत. आत्ता भिजलेले कपड्यान पेक्षा किंचितस भयभीत मनाची अनुभूती जास्त होत होती. अंबाजोगाईत प्रवेश केला तर नाल्यातून प्रचंड वेगानी पाणी वहात होते रस्त्यावर पण आत्ता त्याचे साम्राज्य चांगलंच जाणवत होत. मोटारसायकल चालवण दुरापास्त झाल होत. शेवटी परत एक निवारा शोधला. एक उंच वाढलेलं अशोकाच झाड करकर आवाज करत धपकणी जमिनीवर पडल. का थैमान घालतोय हा आज एवढा? मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.

पावसाचा वेग थोडा कमी झाला व आम्ही मग परतीला निघालो. मस्त चिंब भिजल्याने गरम गरम पकोडे, फापडा व मिठ लावलेली हिरवी मिरची हॉटेलात खाल्ली व गरम चहा घेऊन घरी निघालो. घरी येऊन पहिल्यांदा चिंब भरलेले कपडे काढले व गरम पाण्यानी स्नान केले.

आई म्हणाली, “अरे, फोन कितीदा वाजला घरीच विसरून गेलास.”

लगेच मोबाईल पहिला तर ३० मिस कॉल! बऱ्याच जणांचे होते पण वैद्य काकांचे जास्त होते. काकांना फोन लावला.

“काका, का हो इतके फोन केले?”, मी विचारले.

“अरे ! राहुल सारणीकरचे वडील गेले”, वैद्य काका थोड्या कापऱ्या आवाजातच बोलत होते.

“काय ?”, मी ओरडलोच.

“मी, किरण आणि राधेश इकडे लाकडे आणण्यासाठी आलोत तू लवकर तयार होऊन राहुल च्या घरी ये.” काका म्हणाले.

मी फोन बंद केला. अनेक प्रश्न मनात घेऊन राहुलच्या घरी निघालो. दोन वर्षांन पूर्वीच नवीन ऐसपैस घर बांधल होत. घरी पोहोंचलो तर राहुल च्या जवळ त्याचा छोटा भाऊ योगेश जो ९ वीत होता व त्यांचे सगळे मित्र. राहुलनी मला पाहिलं आणि टाहो फोडला. गळ्यात पडून तो धायमोकून रडत होता. आत्ता पर्यंत त्याच्या डोळ्यातून टिपूस पण आले नव्हते. खूप धीर देण्याचा प्रयत्न अवस्थ मनाने मी करत होतो. १०/१५ मिनिटांनी थोडं वातावरण शांत झाले.

वैद्यकाका परत आले होते. किरण व राधेश लाकडाची गाडी घेऊन स्मशानभूमीत निघाले. किरण राउतमारे खूप हुशार, त्याला प्राथमिक शिक्षक व्हायचे होते पण आपल्या शिक्षण पद्धतीतील प्रामाणिक(?) परीक्षकांनी १२ वीच्या परीक्षेत इंग्रजी मध्ये नापास केलं होत. बाकीच्या प्रत्येक विषयात त्याला ७० च्या वर गुण होते. तर राधेश त्याचाच वर्ग मित्र. राधेश म्हंजे जाड्या व किरण म्हंजे रोड्या. लॉरेल आणि हार्डी ची आमची ही जोडी. ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच रात्री १०.३० ला स्मशानभूमीत जात होते. काकांनी त्यांना लाकडे मारवाडी स्मशानभूमीत उतरवण्याचे स्थान सांगितले. छप्पर असलेली अंबाजोगाईतील एकमेव स्मशानभूमी.

राहुलच्या घरी त्याच्या वडिलाचा मृत देह post mortem करून पूर्ण कपड्यात गुंडाळून एका जीप मध्ये आणला होता. Post mortem? माझे विचारचक्र परत वेगानी सुरु झाले पण ही वेळ विचार करण्याची नव्हती व विचारण्याची पण नव्हती. वैद्यकाका नी सांगितले राहुल च्या वडिलांनी आपल्या आयुष्याचा स्वतः हून शेवट केला. शरीरातून एक जोरदार विजेचा प्रवाह गेल्या सारखे वाटले. नंतर कळले जीवनाच्या प्रत्येक समस्येला धैर्यांनी तोंड देणारा हा राजा एका अवघड व्याधीतून धैर्यानी बाहेर आला होता. पण गेल्या एक वर्षापासून परत त्या व्याधीने त्याला ग्रासले. जवळ पास वर्ष दीड वर्ष संघर्ष चालू होता स्वतःशी पण शरीर काही साथ देत नव्हत. औषध पण काम करेनासे झाले. सतत कार्यप्रवण असणाऱ्या माणसाला हे म्हंजे मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. असेच होते.....

पाऊस काही थांबत नव्हता. पांढरे कापडे गुंडाळून राहुलला व योगेशला तयार केले पाऊस असल्याने मृतदेह बाहेर पण काढता येत नव्हता त्या मुळे जीप मध्येच शेवटचे संस्कार केले व मी,राहुल आणि योगेश व बाजूला जीपचा ड्राईव्हर व मागे मृतदेह व बाकीचे सर्व माणसं दुसऱ्या टेम्पो मध्ये. माणसं कसली राहुलचे काही नातेवाईक व प्रबोधिनीचे युवक कार्यकर्ते सोडले तर लहान वयाचीच सगळी अमित, मंगेश, मुंजा, राधेश, किरण हे सर्व धीरांनी सगळ्या गोष्टी करत होती.

रात्री ११.३० ची वेळ प्रचंड पाऊस पडत होता. आमची जीप स्मशानभूमी कडे निघाली. मोठा टेम्पो थोडं हळूच मागून येत होता. आम्ही स्मशानभूमीत पोहोंचलो. बाहेर किट्ट अंधार, जीप मध्ये आम्ही चार जण. अजून मागचा टेम्पो यायचा होता. कुठे दहन करायचे याची कल्पना मला नव्हती त्यामुळे टेम्पो येण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हत. भर मध्यरात्री स्मशान शांततेत राहुलच्या चेहऱ्यावरची शांतता जास्त अस्वस्थ करणारी होती. लहान वयातच आलेल मोठेपण जाणवत होत. वडिलांनां शोधण्यासाठी त्यांनी गेली दोन दिवस जीवाच रान केलं होत पण शेवटी अंत्य दर्शन पण मिळाल नाही.

योगेश रडत म्हणाला होता, “दादा, आता आपले कसे होणार?”

राहुलनी धीरानी उत्तर दिल, “मी आहे न ?”

वेळ आल्यावरच एवढ प्रगल्भ आपण होतो की ती प्रगल्भता आपल्यामध्ये कोणत्याही जाणत्या वयात असतेच आणि परिस्थिती निर्माण झाली की ते आपल्या आत्त्मिक बलासह प्रगट होते.

१५ मिनिटात सर्व जण आलीच पण अश्यावेळी मिनिटांचे तास झाल्याचे अनुभवास येते. मारवाडी स्मशानभूमीत त्या परिस्थितीचा काहीच अनुभव नसलेले एकदम खूप अनुभव असल्या सारखे वागत होते. सरण रचणे, मृतदेह नीट त्यावर ठेवणे. शेवटचे विधी सर्व जण शांतपणे करत होते. भरपावसात भिजलेली लाकडे कशी पेटणार? मग त्या साठी मीठ आणि करडीचा भुसा कसा वापरतात हे सर्व ते अनुभवत होती आणि पाहिजे ती मदत ती आम्हा सर्व जाणत्या लोकांना करत होती.

धगधगनाऱ्या चितेचा लाल भडक प्रकाश सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या मनात चाललेली खळबळ मात्र सर्वजन लपवत आहेत हे मात्र स्पष्ट दिसत होते. मातीचे छोटे मडके खांद्यावर खेऊन राहुलनी चिते भोवती तीन फेऱ्या मारल्या व शेवटच्या फेरीनंतर त्याला मडके पाटीमागे सोडून द्यायला सांगितले. मडके फुटले अंत्यविधी पूर्ण झाला. सर्व जण परत निघाले. आम्हाला घेऊन आलेली जीप निघून गेलेली. एका रिक्षात दोन्हीही मुलांना घेऊन आम्ही निघालो पण मध्येच रिक्षा बंद पडली. शेवटी एका दुचाकीने दोघांना घरी पोहोचते केले. टेम्पो नसल्यानी बाकी सर्व जण पाईच चालत निघाली. रात्रीचा पावून वाजला होता.

राहुलच्या आयुष्यातील हा काळ्या रात्रीचा प्रवास पुढे जवळ पास ६ वर्ष चालला. कधी एकांती रडत, तर कधी घंटोन घंटे हॉलीबॉलच्या मैदानात तर कधी मित्रांच्या सहवासात राहुल मनानी एकटाच निकरांनी लढत होता स्वतःशी व परिस्थितीशी.

त्यांनी परिस्थितीवर मात केली आज तो इंजिनिअर होऊन अंबाजोगाईला परत आला कुठलीही नौकरी करण्यापेक्षा अंबाजोगाईतील मुलांना तंत्रशिक्षण व धैर्याच जीवन शिक्षण देण्यासाठी....

पगोमे आँधिया भरे, प्रयाण गान चाहिये
नवीन पर्व के लिये नवीन प्राण चाहिये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: